आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
१९ डिसेंबर २०१६ च्या त्या दिवशी चेन्नईच्या मैदानावर खेळला गेलेला करुणचा तो तिसराच कसोटी सामना होता. इंग्लंड संघाविरूध्द झालेल्या या कसोटी सामन्यात त्याने प्रत्येक चेंडू काळजीपूर्वक हाताळला होता. तिसऱ्या दिवशी ७१ धावांवर असताना चौथ्या दिवशी २३२ धावांचा डोंगर पार करून त्याने त्रिशतक गाठले. २५ वर्षाच्या एका नवख्या क्रिकेटरसाठी ही खरेतर खूपच अभिमानाची गोष्ट होती.
त्रिशतक मारणाऱ्या त्या खेळाडूचे नाव होते करूण नायर!
पण, भारतीय क्रिकेटला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा क्रिकेटर सापडला असे वाटत असतानाच अचानक करूणला भारतीय क्रिकेट संघातून वगळण्यात आले. त्रिशतक झळकावणारा हा सामनावीर पुढच्या कसोटी क्रिकेट संघात नव्हता. हे एक मोठे आश्चर्य होते.
३०३ धावा करणाऱ्या फलंदाजाला कसोटी संघात स्थान न मिळणे ही खरोखरच आश्चर्यकारक बाब तर होतीच पण, एका उमद्या खेळाडूचे मानसिक खच्चीकरण करणारीही होती. संघातून वगळण्यामागे नेमके काय कारण होते हेही करूणला आजवर कळाले नाही.
त्यानंतर त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात निवडण्यात आले पण या सामन्यात भारताला दारूण पराभव स्वीकारावा लागला. यानंतर करूणला सलग चार वेळा कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली पण चारही वेळा त्याच्या नशिबाने त्याला साथ दिली नाही.
२०१७\१८ मध्ये रणजी ट्रॉफीसाठी तो कर्नाटक संघाच्या वतीने खेळला तेव्हा पुन्हा एकदा करूण नायरला आपला जुना फॉर्म सापडला होता. ७ सामन्यात त्याने ६१२ धावा केल्या आणि तीन शतकेही ठोकली. त्याच्या या खेळाने पुन्हा एकदा निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. पुढे अफगाणिस्तान आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत पुन्हा एकदा करूणला भारतीय संघात स्थान मिळाले. संघात स्थान मिळूनही त्याला पहिल्या अकरामध्ये येता आले नाही. भारतीय संघासोबत करून दौऱ्यावर गेला असला तरी यावेळी त्याला त्याच्या बॅटची जादू दाखवता आली नाही. या वेळीही संघात स्थान मिळून खेळण्याची संधी का दवडली या प्रश्नाचे उत्तर करूणला मिळाले नाही. आधीच आपल्या बॅड पॅचमधून बाहेर पडण्याची धडपड करणाऱ्या करूणला यामुळे आणखीच निराशा आली.
पुढे वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात तर त्याला पहिल्या पंधरामधूनही वगळण्यात आले. २०१७ सालच्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात त्याने सुरूवात तर चांगली केली पण आपल्या खेळातील सातत्य टिकवण्यात मात्र त्याला अपयश येत गेले. अर्थात,भल्याभल्या फलंदाजांसोबतही असा चढ-उतार झालेला पाहायला मिळतो. याला कुठलाच खेळाडू अपवाद ठरू शकत नाही. या अपयशी खेळानंतर पुन्हा एकदा करूणला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
राहुल द्रविडने त्याला आयपीएलमध्ये संधी दिली. आयपीएलमध्ये करूणने थोडाफार चांगला खेळ दिला. आयपीएलमध्ये पहिल्यांदा राजस्थान रॉयल्स आणि नंतर दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघाकडून करुण खेळला. करूणने आपल्या खेळावर राहुल द्रविडचा प्रभाव असल्याचेही मान्य केले आहे.
भारताच्या सध्याच्या टॉपच्या क्रिकेटपटूंपैकी एक असणारा के. एल. राहुल आणि करूण दोघेही मुळ कर्नाटकचे. १३ वर्षाखालील गटातून राहुल आणि नायरने एकत्रच क्रिकेट करिअरची सुरुवात केली. राहुल आणि करूणची केमिस्ट्री चांगली जमते हे अनेकदा दोघांच्या खेळावरून सिद्ध झालेले आहे. इंग्लंडच्या संघाविरुद्ध ज्या सामन्यात करूणने ३०३ धावा काढल्या होत्या त्याच सामन्यात राहुलने १९९ धावा काढल्या होत्या. दोघांनी मिळून १६१ धावांची विजयी भागीदारी केली होती. त्याआधीही २०१५ मध्ये रणजी ट्रॉफीसाठी तामिळनाडू विरोधात खेळताना राहुलने १८८ धावा केल्या होत्या तर नायरने ३२८ धावा केल्या होत्या.
२०१८-१९ च्या सीजनमध्येही त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. या सीजनमध्ये त्याने फक्त २२४ धावा केल्या. २०२० च्या आयपीएलमध्येही त्याने पुन्हा एकदा नव्या जोमाने खेळण्याचा प्रयत्न केला पण याही वेळेला त्याला फार मोठी झेप घेता आले नाही. २०१३-१४ मध्ये त्रिशतक ठोकणारा नायर आता हरवला होता. एक अव्वल दर्जाचा खेळाडू बनण्यासाठी वाटेत येणाऱ्या अडथळ्यांवर मात करून आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागते. नायरला मात्र अडचणींवर मात करून आपली कौशल्य सुधारण्याची किमया जमलीच नाही. उलट तो पडत्या काळात आणखीनच खचत गेला.
अगदी स्थानिक सामन्यातही तो जेव्हा कर्नाटकचे नेतृत्व करत होता तेव्हाही त्याच्या खेळात फार काही सुधारणा झाली नव्हती. आपला हरवलेला फॉर्म कशामुळे हरवला, आपली कुठे आणि काय चूक झाली यावर आत्मचिंतन करण्याची संधी त्याने स्वतःला दिलीच नाही. यामुळे दिवसेंदिवस तो आणखीनच सुमार खेळ करू लागला. आपल्या बॅटच्या सहाय्याने आपले कर्तृत्व सिद्ध करणे त्याला जमलेच नाही.
स्थानिक सामन्यात त्याला वारंवार संधी दिली जातेय, पण आंतरराष्ट्रीय संघात अशा प्रकारची दयामाया दाखवण्याची अपेक्षा करणेच चुकीचे आहे. यावेळी जर त्याने आपला खेळ सुधारला नाही तर त्याची क्रिकेट कारकीर्द लवकरच संपुष्टात येईल.
करूण नायरने अजूनही मिळणाऱ्या संधीचे सोने कसे करता येईल यावर लक्ष केंद्रित करून खेळ करणे गरजेचे आहे. अजूनही त्याच्या हातून वेळ गेलेली नाही. हातात असलेल्या संधीचा वापर करून तो पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवू शकतो. एक त्रिशतक ठोकणारा खेळाडू क्रिकेट पटलावरून असा पटकन गायब व्हावा हे काही पटण्यासारखी गोष्ट नाही. इतक्या गुणी खेळाडूने इतक्या लवकर क्रिकेटला रामराम ठोकावा ही कल्पना तशीही कुणाला फारशी रुचणार नाही. क्रिकेटमध्ये टिकणे न टिकणे शेवटी सर्वस्वी करुणच्याच हातात आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.