आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
आधुनिक काळातील अनेक वैज्ञानिक संशोधनामुळे मानवी जीवन सुसह्य आणि सुलभ बनले असले तरी काही संशोधनामुळे पृथ्वी आणि पर्यावरणाची अतोनात हानी झालेली आहे, हेही खरे आहे. डायनामाइट, अणुबॉम्ब यांसारख्या संशोधनामुळे जीवसृष्टी आणि पर्यायाने पृथ्वीलाच धोका निर्माण होऊ शकतो. तसेच काही संशोधनांमुळे निर्माण झालेल्या घातक परिणामाची फळे आज आपण सगळेच भोगत आहोत.
संशोधकांनी जर या दोन रसायनांचा शोधच लावला नसता तर पर्यावरणाची आणि ओझोनच्या थराची आज जी हानी झालेली आहे कदाचित ती झाली नसती. गेल्या अनेक पिढ्यांनी या संशोधनांचे दुष्परिणाम भोगलेले आहेत, आजही भोगत आहेत आणि दुर्दैवाने याचे परिणाम पुढच्याही काही पिढ्यांना भोगावे लागतील.
या लेखातून जाणून घेऊया अशाच घातक संशोधनाबद्दल ज्यांनी आजही आपले जगणे दुष्कर केले आहे.
मिक्सरचा वापर नेहमीपेक्षा थोडा जरी जास्त झाला तर मिक्सर बंद पडतो, हा अनुभव तर काही आपल्याला नवा नाही. १९२० च्या दशकात वाहनांची आणि इंजिनवर चालणाऱ्या अनेक वस्तूंचा शोध लागला होता. सगळ्याच इलेक्ट्रिक उपकरणांत छोटे-मोठे इंजिन किंवा मोटार हे असतेच. त्याकाळीही या इंजिनवर थोडासा जरी ताण आला तर ते इंजिन एक विचित्र आवाज करत असे आणि त्यानंतर बंद पडत असे.
इंजिनच्या अशा अचानक बंद पडण्याने पुढील कामात व्यत्यय येत असे. याला ‘इंजिन नॉक’ असे म्हटले जाते. हा इंजिन नॉक कसा टाळावा यासाठी अमेरिकेतील चार्ल्स केटरिंग यांच्या जनरल मोटार्स डेल्को रिसर्च लॅबोरेटरीच्या वतीने संशोधन सुरू होते.
या संशोधनात थॉमस मिज्ली यांनीही आपले योगदान दिले. थॉमस मिज्ली यांनी १९११ साली कॉर्नेल युनिव्हर्सिटीतून मेकॅनिकल इंजिनियरची पदवी घेतली होती. त्यांनी दोन अशा रसायनाचा शोध लावला, ज्यामुळे इंजिन नॉकिंगची समस्या दूर झाली आणि शीतपेटीची कार्यक्षमता वाढली पण या दोन्ही संशोधनांचे पर्यावरणाची अपरिमित हानी झालेली आहे. ज्याचे परिणाम आज आपण सगळेच भोगतोय आणि येणाऱ्या पिढीलाही भोगावे लागणार आहेत.
त्यांनी लावलेला पहिला शोध होता टेट्राइथिल लीडचा (TEL) गॅसोलीनसोबत इंजिनमध्ये याचा वापर केल्यास इंजिनची कार्यक्षमता वाढणार होती, नॉकिंग प्रॉब्लेम दूर होणार होता आणि इंजिनची गतीही वाढणार होती. जनरल मोटर्स, तेल कंपन्या आणि कार उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी मिज्ली यांच्या या संशोधनाला पाठींबा दिला. १ फेब्रुवारी १९२३ पासून या टीइएलचे इथाइल या व्यावसायिक नावाने उत्पादन आणि वापर सुरू झाला.
टेट्रा इथाइल लीडमधील लीड म्हणजे शिसे हे रसायन किती घातक आहे याची खुद्द मिज्लींना देखील कल्पना होती. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्वच सहकाऱ्यांना याची कल्पना होती तरीही या रसायनाच्या उत्पादनातून मिळणाऱ्या फायद्याकडे पाहून याच्या जीवघेण्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करण्यात आले. जनरल मोटार आणि स्टँडर्ड ऑईल यांनी या इथाइलच्या उत्पादन आणि विक्रीवर देखरेख करण्यासाठी इथाइल कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि मिज्ली या कॉर्पोरेशनचे उपाध्यक्ष बनले. मिज्लींना त्याच्या कामाची पोचपावती मिळाली होती. त्यांना या घातक रसायनाच्या उत्पादनातून अब्जावधी रुपये कमवायचे होते, तेही स्वप्न साकार झाले.
इथाइल कॉर्पोरेशनने इथाइलची विक्री करताना त्याच्या पॅकिंगवर चुकूनही लीडचा उल्लेख केला नाही. उलट टीइएल हे एक सुरक्षित उत्पादन असल्याचेच त्यांनी सातत्याने इतरांच्या मनावरदेखील बिंबवले. पण, जिथे त्यांनी टीइएलच्या उत्पादनाचे प्लांट उभारले होते तिथल्या कामगारांना याचे दुष्परिणाम भोगावे लागत होते. शिसे हा एक धोकादायक धातू आहे. ज्यामुळे आपल्या मेंदूच्या कार्यप्रणालीवर परिणाम होतो.
या रसायनाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला भोवळ येणे, भास होणे, मानसिक संतुलन बिघडणे, असे परिणाम जाणवू लागले. इथाइल कार्पोरेशनच्या प्लांटमधील कामगार जे सातत्याने शिस्याच्या संपर्कात येत होते त्यांना जीव देखील गमवावा लागला.
या प्लांटमधून होणाऱ्या मृत्यूंची घटना आणि संख्या दोन्हींवरही सातत्याने पांघरूण घालण्यात आले. त्यामुळे शिस्यासारख्या विषारी घटकाचा अंतर्भाव असलेली टीइएलचा वापर सगळीकडेच वाढला. परिणामी मानवी बुद्ध्यांक कमी होणे, मज्जासंस्थेला क्षति पोहोचणे आणि आरोग्याच्या गंभीर समस्यांची वाढ होणे अशा समस्या वाढल्या. टीइएलच्या वाढत्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम पाहता याच्या उत्पादनावर बंदी घालण्यात यावी अशी मागणीही वारंवार होत होती. पण, स्वत: मिज्ली यांनी टीइएल कसे घातक नाही हे पटवून देण्यासाठी टीइएलची वाफ घेतली आणि त्या द्रावणाने हात देखील धुतले.
कारण, या व्यवसायातून मिळणारा नफा मोठा होता. यानेच मिज्लीच्या सारासार विवेक बुद्धी झाकोळून गेली होती.
प्लांटमध्ये कामगार योग्य ती काळजी घेत नाहीत म्हणून त्यांना याचे दुष्परिणाम भोगावे लागतात असे म्हणत त्याने कामगारांना होणाऱ्या त्रासाचे खापर त्यांच्यावरच फोडले. एकीकडे टीइएलच्या वापरावर बंदी आणण्याची मागणी होत असतानाच फेडरल ब्युरो ऑफ माइन्सने या घटनेला वेगळीच कलाटणी देऊन टाकली. फेडरल ब्युरो ऑफ माइन्सच्या अहवालानुसार टीइएल सुरक्षित इंधन असल्याचे सांगण्यात आले. अर्थात या ब्युरोवर कार्पोरेशनचा दबाव होता हे वागले सांगणे नकोच. पण या अहवालानंतर इथाइलची जोरदार जाहिरात सुरू झाली. मात्र काही वर्षानंतर याचे व्यापक दुष्परिणाम दिसून आलेच. विशेषत: लहान मुलांवर होणारे परिणाम तर गंभीर होते.
एका अभ्यास अहवालानुसार शिस्याच्या अतिसंपर्काने विसाव्या शतकात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे असा दावा करण्यात आला आहे. असे काही अभ्यास समोर आल्यानंतर आणि या दुष्परिणामांनी विक्राळ रूप घेतल्यानंतर १९९६ साली अमेरिकेत क्लीन एअर ऍक्ट पारित करण्यात आला आणि या कायद्यानुसार शिसे युक्त गॅसोलीन वापरण्यावर बंदी घातली गेली. १९९९ पर्यंत तर यावर पूर्णच बंदी आणली. तरीही जिथे आजही टीइएल इंधनावर चालणारी वाहने वापरली जातात तिथे टीइएलचे उत्पादन आजही चालूच आहे.
यानंतर मिज्लीने संशोधित केलेले दुसरे घातक रसायन म्हणजे सीएफसी. क्लोरोफ्ल्युरोकार्बन.
सुरुवातीला रेफ्रिजरेटरमध्ये इथर आणि अमोनियाचा वापर होत होता. पण ही दोन्ही रसायने ज्वलनशील होती. औद्योगिक क्षेत्रात जे मोठमोठी रेफ्रिजरेटर वापरली जात होती त्यामुळे नेहमीच आग लागण्याच्या घटना घडत होत्या. १८९३ साली शिकागोच्या वर्ल्ड्स फेअरमध्ये आग लागली ज्यात सतरा जणांचा बळी गेला. रेफ्रिजरेटरमधील अमोनिया आणि इथरमुळेच ही घटना घडल्याचे नंतर जॅक्सनने सिद्ध केले. त्यानंतर रेफ्रिजरेटरमध्ये सल्फर ऑक्साईड वापरले जाऊ लागले जे त्यापेक्षाही घातक होते. या वायुच्या गळतीने अनेक कुटुंबाचा झोपेतच बळी घेतला.
मिज्लीने यावर संशोधन सुरु केले आणि १९३० साली त्याला सीएफसीचा शोध लागला. या वायुच्या उत्सर्जनाने वातावरणातील ओझोनच्या थराला क्षति पोहोचली. ओझोनचा थर हा वातावरणात सर्वात वर असतो जो पृथ्वीवर येणारी अल्ट्रा व्हायोलेट किरणे आणि इतर उत्सर्जित किरणांना वरच रोखतो.
सीएफसीमुळे जागतिक तापामानातही वाढ झाली. ज्यामुळे हवामान बदलासारख्या दुष्परिणामांची भर पडली. ज्याचा परिणाम आजच्या पिढीला तर भोगावा लागतोच आहे पण येणाऱ्या पिढीवरही होणार आहे.
१९८७ पासून सीएफसीवर सुद्धा बंदी आली असली तरी आधीच हवेत जो सीएफसी तरंगत आहे, तो नष्ट झालेला नाही. सीएफसीची १४० वर्षे वातावरणात राहू शकतो.
इतके घातक शोध लावणाऱ्या मिज्लीला त्याच्या हयातीत अनेक मानाचे पुरस्कार बहाल करण्यात आले. ज्यात विलीयार्ड गिब्ज मेद्ल्म निकोलस मेडल, प्रीस्टली मेडल, पार्किन मेडल यांचा समावेश होतो. मिज्लीच्या नावावर या व्यतिरिक्तही १७० पेटंट्स आहेत.
१९४० मध्ये पोलिओ आणि त्यामुळे झालेल्या पॅरालीसीसमुळे मिज्लीचा मृत्यू झाला. त्याच्या एका शोधानेच त्याचा बळी घेतला. सततच्या विषारी वायूच्या संपर्कात आल्याने मिज्लीची एक बाजू लुळी पडली होती. त्याला स्वतःहून हालचाल करता येणे शक्य नव्हते. इतरांवरील अवलंबन कमी करण्यासाठी त्याने स्वतःला आधार देणारे आणि त्याला त्याच्या बेडवर उठताना सहाय्यकारी ठरेल असे एक साधन बनवले. ज्याला चाके आणि काही दोऱ्या जोडलेल्या होत्या. याच दोरीच्या सहाय्याने उठण्याचा प्रयत्न करत असताना त्याला फास लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. मिज्लीचे संशोधन खुद्द त्याच्यासाठीही जीवघेणेच ठरले. २ नोव्हेंबर १९४४ रोजी त्याचे निधन झाले.
अर्थात, पर्यावरणाच्या ऱ्हासासाठी एकट्या मिज्लीलाच जबाबदार धरणे चुकीचे आहे. कारण, त्याच्या या संशोधनाचा लाभ घेणारी एक मोठी यंत्रणा कार्यरत होती. पण, या घातक रसायनांच्या संशोधनाचे श्रेय मात्र त्यालाच जाते. म्हणूनच पृथ्वी आणि मानवजातीची जितकी हानी मिज्लीने केली तितकी कुणीच केली नाही असे म्हटले जाते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.