आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
साऊथ कोरिया आणि नॉर्थ कोरिया यांच्यामधील ऐतिहासिक संघर्ष सर्वश्रुत आहे. तिसऱ्या देशांच्या दोन वेगळ्या विचारसरणीवर फाळणी झालेल्या या दोन देशांतील शासक एकमेकांबरोबर स्पर्धा करण्याच्या प्रयत्नांत आपल्या असंख्य निष्पाप नागरिकांचा बळी घेतात. लष्करी हुकूमशहा चुन-डू हॉनच्या नेतृत्वाखालील साऊथ कोरियाने आपल्या ऐतिहासिक प्रतिस्पर्धी जपानला मागे टाकत १९८८ साली होणाऱ्या ऑलिम्पिकच्या यजमानपदाचा अधिकार जिंकला. आता शेजारी असलेल्या शत्रूने एवढा मोठा यजमानपदाचा अधिकार जिंकला आहे म्हटल्यावर नॉर्थ कोरिया शांत बसेल काय?
स्पर्धा रद्द करण्यासाठी ११५ लोकांचा बळी:
‘११५ निष्पाप लोकांची जाणीवपूर्वक ह*त्या करणाऱ्याला कधी माफ करता येईल का?’ हा प्रश्न ‘किम ह्यून-ही’ आणि कोरियन एअर फाईट-८५८ मधील प्रवाशांचे सर्व कुटुंबीय आयुष्यभर स्वतःला विचारत राहतील. या भयाण घटनेच्या काही महिन्यांपूर्वी नॉर्थ कोरियाची २५ वर्षीय स्पेशल एजंट (विशेष गुप्तहेर) ‘ह्यून-ही’ला तिच्या या मिशनबद्दल माहिती दिली गेली.
तिच्या या मिशनच्या यशस्वी होण्याने साऊथ कोरियामध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धा अराजकता आणि भीती यांमुळे रद्द होईल आणि कोरियाच्या एकीकरणामध्ये हा मोठा प्रयत्न असेल असे तिला सांगण्यात आले. हे मिशन ‘किम इल-संग’चा मुलगा आणि वारसदार ‘किम जोंग-इल’ याच्या थेट, हस्तलिखित आदेशानुसार पार पडणार होते. या मिशनमध्ये किम ह्यून-ही एकटी नव्हती, तर तिच्यासोबत वरिष्ठ एजंट ‘किम सेंग-इल’सुद्धा सामील होता.
बगदादहून अबू धाबीकडे जाणार्या कोरियन एअर फ्लाइट ८५८ ह्यून-ही आणि तिच्यासह आणखी एक स्पेशल एजंट बसला. फ्लाईटच्या पहिल्या टप्प्यातून उतरताना त्यांनी ओव्हरहेड लगेज कम्पार्टमेन्टमध्ये बॉ*म्ब प्लांट केला. त्यानंतर, विमान बँकॉकला निघाले. २९ नोव्हेंबर १९८७ रोजी, कोरियन प्रमाणवेळेनुसार दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी बॉ*म्बस्फो*ट झाला.
या स्फो*टामध्ये विमानातील सर्व ११५ प्रवासी, क्रू आणि वैमानिक ठार झाले. मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांमध्ये प्रामुख्याने तेल आणि बांधकाम कामगारांचा समावेश होता. हे सगळे कामगार परदेशात अनेक वर्षे काम केल्यानंतर आपल्या मायदेशी परतण्यास उत्सुक होते. बॉम्बस्फोटानंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत होती. नॉर्थ कोरियन योजनेप्रमाणे ऑलिम्पिक स्पर्धा रद्द तर झाल्या नाहीत, पण किमान अपेक्षेनुसार, स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या.
नॉर्थ कोरियाच्या दोन एजण्ट्सनी अबू धाबीहून व्हिएन्ना येथे पळून जाण्याचा प्रयत्न केला. व्हिएन्नामध्ये ते नॉर्थ कोरियाच्या दूतावासात लपणार होते. पण बाहरेनमधून प्रवास करीत असताना दक्षिण कोरियाच्या इंटेलिजन्सनी त्यांचा शोध लावला. त्यांची प्रवासाची कागदपत्रे बनावट असल्याची माहिती मिळताच त्यांनी त्यांच्या सिगारेटमधील ‘सायनाइड कॅप्सूल’ घेतली. सेउंग-इलचा त्वरित मृत्यू झाला. किम ह्यून-ही मात्र केलेल्या कर्माची फळे भोगण्यासाठी जिवंत राहिली.
किम ह्यून-ही
नॉर्थ कोरियामध्ये, पक्षाकडून स्पेशल एजंट हे पद मिळणे हे सर्वोच्च सन्मानांपैकी एक आहे. प्राथमिक शाळेत असल्यापासूनच किम ह्यून-हीने देशभक्तीचे अचाट प्रदर्शन केले होते. तिच्या स्थानिक युथ कॉर्प्सची प्रमुख म्हणून किम इल-सुंगच्या पुतळ्यासाठी फुलांची व्यवस्था करणे आणि बंडखोरीची भावना स्वीकारलेल्या कोणावरही आरोप करण्यासाठी सहकारी विद्यार्थ्यांना संघटित करण्याचे काम तिने केले. तिच्या सौंदर्यामुळे तिने अनेक राजकीय प्रचाराचे चित्रपट आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये काम केले.
याशिवाय तिच्या कुटुंबातील काही लोक क्युबामध्ये मुत्सद्दी डिप्लोमॅट्स होते. या सर्व कारणांमुळे तिला नॉर्थ कोरियन समाजामध्ये मानाचे स्थान प्राप्त झाले. हायस्कूलच्या शेवटच्या वर्षात तिला प्रतिष्ठित किम इल-सुंग विद्यापीठाच्या जीवशास्त्र विभागात प्रवेश देण्यात आला. काही महिन्यांनंतर तिची ‘प्योंगयांग फॉरेन लँग्वेज कॉलेज’मध्ये बदली झाली.
‘प्योंगयांग फॉरेन लँग्वेज कॉलेज’मध्ये तिने जपानी भाषा शिकली. याच काळामध्ये पक्षाच्या अधिकाऱ्यांनी तिची गुप्तहेर प्रशिक्षणासाठी निवड केली. यानंतर ती कुटुंब किंवा मित्रांच्या संपर्कात राहू शकणार नव्हती. तिचे नवीन नाव, किम ओके ह्वा असे ठेवण्यात आले आणि तिला आता नवी ओळख प्राप्त झाली.
त्यानंतर प्योंगयांग शहराच्या बाहेर एका निर्जन कॅम्पमध्ये तिचे तीन वर्षांचे कठोर प्रशिक्षण झाले. तिथे तिला मार्शल आर्ट्स, नेमबाजी, जपानी भाषा आणि ट्रेडक्राफ्ट हे विषय शिकवण्यात आले. शेवटी तिचे अंतिम मूल्यमापन होऊन निर्णय होणार होता. अंतिम मूल्यमापनाचा भाग म्हणून तिने रक्षक, कॅमेरे आणि कुत्रे यांनी सुसज्ज असलेल्या ‘मॉक’ दूतावासाच्या कंपाऊंडमध्ये घुसखोरी केली. त्यानंतर तिने तिजोरी शोधण्याचे आणि उघडण्याचे काम, जपानी मजकूर लक्षात ठेवण्याचे काम आणि कम्पाउंडमधून पुन्हा बाहेर पाडण्याचे काम यशस्वीरीत्या केले. ती जंगलांमधून ट्रेक करण्याससुद्धा सक्षम होती.
भांडवलशाहीपेक्षा साम्यवादाच्या श्रेष्ठतेवर तिने अनेक पानांचे निबंध तयार करून किम इल-सुंगच्या सिद्धांतांचाही सविस्तर अभ्यास केला. सदैव पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची तिची क्षमता, आर्थिकदृष्ट्या अधिक समृद्ध असणाऱ्या परदेशात असतानाही तिच्या विश्वासार्हतेसाठी महत्वाची होती. शेवटी, ह्यून-हीला सर्वाधिक गुण मिळाले. अत्यंत अचूकतेने कोणतीही ऑर्डर निष्ठेने पार पाडण्यास सक्षम असल्याने, किम राजवटीसाठी ती आता एक मौल्यवान साधन होती.
अंतिम नियुक्तीपूर्वी, किम ह्यून-हीने ग्वांगझू आणि अनेक युरोपियन शहरांमध्ये वेळ घालवला. बल्जेरिया, क्युबा, चेकोस्लोव्हाकिया, पूर्व जर्मनी यांसारख्या कम्युनिस्ट-ब्लॉक देशांमध्ये ती उत्तर कोरियाच्या राजनैतिक क्रेडेन्शियल्स अंतर्गत प्रवास करत असे. इतर देशांमध्ये ती बनावट जपानी पासपोर्ट वापरायची. या सहलींनी तिला गुप्त प्रवास करण्याची सवय लावली आणि तिला परदेशी भाषा आणि चालीरीतींमध्ये ‘एक्सपर्ट’ बनवले.
युरोपमधील तिच्या असाइनमेंटमधून प्योंगयांगला परतल्यानंतर काही महिन्यांनी तिला इंटेलिजन्स मुख्यालयात बोलावण्यात आले. यावेळीही ‘किम सेंग-इल’ हा तिच्याबरोबर होता. ‘किम सेंग-इल’बरोबर तिने याआधीही काम केले होते. इंटेलिजन्स मुख्यालयात तिला तिचे शेवटचे मिशन काय आहे हे कळले.
हे मिशन यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यास ह्यून-ही आणि सेउंग-इल यांना “राष्ट्रीय नायक” म्हणून गौरवण्यात येणार होते. या मिशननंतर दोघेही ताबडतोब निवृत्त होणार होते. त्यांना पक्षाकडून सगळे आर्थिक लाभ मिळणार होते. शिवाय, ‘ह्यून-ही’ला कायमचे तिच्या कुटुंबासह राहता येणार होते.
तिला असाइनमेंट मिळाल्यापासून ते पूर्ण होण्याच्या क्षणापर्यंत, ह्यून-हीच्या डोक्यातील प्रमुख मुद्दे तिचा देश आणि कुटुंब हेच होते. तिचे दक्षिण कोरियाला प्रत्यार्पण झाल्यानंतर आणि त्यानंतरच्या “डि-इंडॉक्ट्रिनेशन” नंतरच तिला तिच्या गुन्ह्याची प्रचंड तीव्रता समजली.
डि-इंडॉक्ट्रिनेशन:
बहरीनमध्ये तिच्या चौकशीदरम्यान, ह्युन-हीने ती ग्वांगझू येथील एक चिनी नागरिक आहे असे दाखवण्याचा प्रयत्न केला. तर तिला किम सेंग-इल या जपानी माणसाने दत्तक घेतले होते, त्याचा नुकताच मृत्यू झाला होता. तिची फ्लुएंट जपानी भाषा आणि तिच्या कथेतील सुरुवातीच्या सुसंगततेसह, चौकशी अधिकाऱ्यांना ती चिनी नागरिक असल्याची जवळजवळ खात्री पटली होती. परंतु, दक्षिण कोरियाला तिच्या प्रत्यार्पण झाल्यानंतर, तिने नकळतपणे तिचे कोरियन भाषेचे ज्ञान उघड केले.
प्रत्यार्पण झाल्यानंतर दोन वर्षांहून अधिक काळ तिला सेऊलच्या बाहेरील नमसान येथील सरकारी संकुलात ठेवण्यात आले होते. आगमनानंतर तिचा छळ होऊन तिच्या मृत्यूची अपेक्षा होती. त्याऐवजी, तिला कपडे, आरामदायी पलंग आणि ताजे अन्न पुरवण्यात आले. प्रश्नकर्त्यांनी तिच्याशी तिच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल, दक्षिण कोरियामधील तिच्या इमेजबद्दल आणि तिच्या कुटुंबाविषयी सौम्यपणे संवाद साधला.
काही काळाने तिला सेऊलच्या दौऱ्यावर नेण्यात आले. वाहनाच्या खिडक्यांमधून तिने ट्रॅफिक, महागडी घड्याळे विकणारे व्यापारी आणि रंगीबेरंगी कपडे घातलेले लोक पाहिले. प्योंगयांगमधील उच्चभ्रू लोकही कधीही खरेदी करणार नाहीत अशा दैनंदिन वस्तू शोधण्यासाठी तिने मिनी-मार्केटमध्ये प्रवेश केला. ती नॉर्थ कोरियाच्या शाळेत साऊथ कोरियाबद्दल अनेक चुकीच्या गोष्टी शिकली होती. ती शाळेत शिकलेल्या दारिद्र्यपूर्ण कठपुतळी राज्यासारखे तेथे काहीच नव्हते.
तिने अखेरीस तिची खरी ओळख कबूल केली, तरीही ती किम राजवटीचा बचाव करत राहिली. तिच्या मते, उत्तर कोरियाचे आर्थिक मागासलेपण हे किम इल-सुंगच्या नोकरशाहीच्या आपापसांतील विश्वासघाताचा परिणाम होता. तिचा देश जगाच्या तुलनेत मागे पडला असेल, पण तिच्या प्रिय नेत्याचे हेतू नेहमीच चांगले होते.
एके दिवशी टेलिव्हिजन पाहत असताना, तिला उत्तर कोरियाचे चॅनेल दिसले. तेव्हा तिला नॉर्थ कोरियाचे सत्य कळले. खरं तर ह्यून-ही कधीच अस्तित्वात नव्हती. ह्यून-ही फक्त राजकीय प्रचाराचा आविष्कार होती. ह*त्येच्या सर्व गुन्ह्यांसाठी दोषी ठरवल्यानंतर, तिच्या शिक्षेच्या दिवशी, ह्युन-हीने फ्लाइट ८५८ च्या कुटुंबियांची माफी मागितली.
त्यावेळी ती म्हणाली, “माझ्या गुन्ह्याचे गांभीर्य मला कळले आहे. मला सत्य सांगण्याची आणि सत्य जाणून घेण्याची संधी मिळाली याबद्दल मी आभारी आहे. मला किम इल सुंग यांच्याबद्दल आता फक्त द्वेष वाटतो आणि पीडितांच्या कुटुंबियांची माफी मागण्यास मला अपूर्णता वाटते.
माफी
२७ मार्च १९८९ रोजी तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायाधीशांनी भविष्यात अशा प्रकारच्या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. आश्चर्यकारकपणे, एका वर्षानंतर, तिला राष्ट्राध्यक्ष ‘रोह ताई-वू’ यांच्याकडून माफी देण्यात आली. ती किम राजवटीचे ब्रेनवॉश केलेले साधन आहे असे सांगून राष्ट्राध्यक्षांनी तिला माफी दिली.
नमसानमध्ये वास्तव्यास असताना आणि तिच्या सुटकेनंतरच्या एका वर्षांत, ह्युन-ही एक धर्मनिष्ठ ख्रिश्चन बनली. तिने १९९३ साली ‘द टीअर्स ऑफ माय सोल’ हे पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक तिने फ्लाइट ८५८ मध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना समर्पित केले.
त्यानंतर तिने १९७८ साली उत्तर कोरियाने अपहरण केलेल्या याको तागुची या जपानी नागरिकाचीही माहिती दिली. तागुचीने तिचे जपानी भाषेचे प्रशिक्षक म्हणून काम केले होते.
उत्तर कोरियामध्ये योग्य-अयोग्य, खरे-खोटे असे काहीही नाही. फक्त प्रामाणिकपणा किंवा बेईमानी आहे. तेथील सरकार, धोरणात्मक बाब म्हणून अनेकांच्या कुटुंब आणि प्रियजनांना ओलीस ठेवते. परदेशात राहिल्यानंतर तिने बहुधा परदेशी लोकांशी संवाद साधला असेल. त्यांनाही मित्र, कुटुंब, आशा आणि भीती आहेत याची जाणीव तिला झाली असेल. कदाचित किम ह्यून-हीच्या कथेमुळे एकदा “क्षमा करण्याने” माणसामध्ये कसा सकारात्मक बदल घडून येऊ शकतो हे सिद्ध होते.
उत्तर कोरिया मानवी स्वभावाच्या भयानक आणि हिं*स्त्र बाजूचे प्रतीक आहे. आपल्या आवडत्या नेत्यावरील प्रेम आणि परिणामी त्याच्या सर्व शत्रूंचा तसेच विरोधकांचा द्वेष, माणसाला दुसर्याविरुद्ध क्रू*र कृत्ये करण्यास प्रवृत्त करते. तिने केलेल्या कृत्यामुळे ह्युन-ही बद्दलचा द्वेष आणि तिने दिलेली वेदना यामुळे दक्षिण कोरियन लोकांमध्येही अशीच प्रतिक्रिया निर्माण झाली असावी, पण तरीही तिला सन्मान, आणि शेवटी जीवनात दुसरी संधी दिली गेली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.