आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब
सिरीया आज त्याच्या नागरिकांसाठीच असुरक्षित झाला आहे. कित्येक सिरीयन लोक आपला देश सोडून स्थलांतर करतायत. सिरीयातील गृहयुद्धाने आणि त्यात महासत्तांनी आपापल्या परीने दाखल दिल्याने या देशातील नागरिकांचे जीवन नरकयातनेहूनही भयानक झाले आहे. म्हणूनच लाखो सिरीयन नागरिक मिळेल त्या देशात शरण जात आहेत. पण त्यांना स्वतःचा देश मात्र नको वाटतो आहे.
कोणत्याही नागरिकांना आपल्या देशाबद्दल तेव्हाच अभिमान वाटू शकतो जेव्हा त्या देशात त्यांना शांतता, सुरक्षा आणि सुखी जीवनाची हमी मिळू शकेल. याउलट जर जीवन नेहमीच असुरक्षिततेने वेढलेले असेल तर? असेच काहीसे सिरीयन नागरिकांच्या बाबतीत झाले आहे.
झालं असं की, सिरीया हा पूर्वी फ्रांसच्या ताब्यात होता. भारतावर जसे इंग्रजांचे राज्य होते. तशीच सिरियात फ्रांसची सत्ता होती.
१९७१ साली फ्रांसने सिरीयातून काढता पाय घेतला आणि जाता जाता सिरियाची सूत्रे हाफिज-अल-असद याच्याकडे सोपवण्यात आली. फ्रांसकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हाफिज-अल-असद सिरियाचे नवे राष्ट्रपती झाले. पण, खरी मेख इथेच होती. फ्रांसने सिरियातील सत्ता तर सोडली पण जाता जाता फ्रांसने सिरियाच्या विनाशाची बीजे पेरली.
हाफिज-अल-असद हे शिया पंथी होते आणि सिरियातील बहुतांश लोकसंख्या ही सुन्नी आहे. शिया, सुन्नी यांच्या व्यतिरिक्तही तिथे ख्रिश्चन आणि अगदी अल्प प्रमाणात डुरुज धर्माचेही नागरिक आहेत. पण, शिया आणि सुन्नी यांच्यातील वाद चिघळत गेला. शिया लोकांवर खूप अत्याचार झाले. हाफिज-अल-असद यांचे सरकार देशातील वाढती सांप्रदायिकता रोखण्यात असमर्थ ठरले.
त्याचवेळी इतर अरब राष्ट्रांमध्ये क्रांतीचे वारे वाहत होते. सिरियातील लोकांनाही राष्ट्रपती राजवट नको होती. इतर देशांप्रमाणेच स्वतंत्र लोकशाही राज्याचे स्वप्न सिरीयन जनतेनेही पहिले. विशेषत: सिरियातील नवतरुण वर्गात ‘अरब स्प्रिंग’ने एक नवा जोश भरला.
आजूबाजूचे लिबिया, ट्युनिशियासारख्या देशात हुकुमशाही संपून लोकशाही राजवट लागू करण्यात आली होती. सिरियन नागरिकांनाही स्वतःच्या देशात स्वतःचे राज्य हवे होते. हाफिज-अल-असदनंतर सिरियाची सूत्रे त्याचा मुलगा बशर-अल-असदच्या हाती आली.
बशरने मात्र स्वातंत्र्याची स्वप्ने पाहणाऱ्या सिरीयन नागरिकांना सरळ सरळ यमलोकाचा रस्ता दाखवला.
हाफिजच्या काळातच लोकांच्या मनात असंतोष खदखदत होता. बशीरच्या काळात लोकांनी त्या असंतोषाला वाट करून दिली आणि इथेच सिरीयन लोकांसाठी नरकाचे द्वार उघडले गेले.
सिरियातील दारा शहरातील काही विद्यार्थ्यांनी बशरच्या विरोधात काही घोषणा शाळेच्या भिंतीवर लिहिल्या. ही मुले अरब स्प्रिंगचे उघड उघड समर्थन करणारी होती. या मुलांच्या मनात अरब स्प्रिंगने चांगलेच मूळ धरले होते. हळूहळू जनतेच्या मनातील खदखद शांततामय मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागली.
नाएफ अबाजिद नावाच्या एका १४ वर्षाच्या मुलाने आपल्या शाळेच्या भिंतीवर ‘अब तुम्हारी बारी है, डॉक्टर बशर-अल-असद’ असे लिहिले. हुकुमशहा बशरच्या कानावर जेव्हा ही बातमी गेली तेव्हा एका छोट्याशा मुलाने वेडेपणाच्या भरात केलेली चूक असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी अबाजिद सह सरकारने आणखी बावीस मुलांना तुरुंगात डांबले आणि त्यांना नाहक त्रास दिला जाऊ लागला.
यातील काही मुलांचा मृत्यू तर तुरुंगातच झाला. पुढे या मुलांना सोडून देण्यात यावे अशी मागणी करत हजारो लोक रस्त्यावर येऊ लागले.
या लोकांची मागणी काय आहे याचा जराही विचार न करता बशरने या आंदोलनकर्त्यांना चिरडून टाकण्याचे आदेश दिले. सरकारचा आदेश मिळताच सैन्याने या आंदोलकांवर गोळीबार सुरु केला आणि पाहता पाहता या आंदोलनात प्रेतांचा ढीग लागला.
सरकारच्या या दडपशाहीच्या धोरणाने लोक आणखीन खवळले. आंदोलनाची तीव्रता आणखी वाढली. आंदोलनाची तीव्रता वाढेल तसतशी आंदोलकांवर आणखी गोळीबार केला जाऊ लागला. डिसेंबर २०११ मधे बशर-अल-असदच्या सैन्याने इदलीबमधील कफार ओवैदमधे १११ नागरिकांना मारून टाकले. लोक आणखी जास्त खवळले.
दडपशाही तीव्र होत गेली तसतसे आंदोलन देखील तीव्र होत गेले. हळूहळू सिरियातील प्रत्येक शहरात हेच चित्र दिसू लागले. शहरा शहरातील चौकावर मृतदेहांचे ढीग लागू लागले. आपल्याच जनतेवर बशर सरकारने असे अनन्वित अत्याचार सुरु केले पण, नागरिकांच्या मागण्यांसमोर त्यांनी अजिबात मान तुकवली नाही.
आंदोलकांवर गोळीबार होतोच हे एव्हाना आंदोलकांनाही कळून चुकले होते. त्यामुळे आंदोलकांनीही शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा मार्ग सोडून दिला. आंदोलकांमधील काही लोकांनीही हत्यारे हातात घेतली. अहिंसक मार्गाने सुरु असणारे हे आंदोलन सरकारच्या हुकुमशाही धोरणामुळे चिघळत गेले. बशर-अल-असदने जनतेशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्याऐवजी जनतेचा आक्रोश दडपून टाकण्याचा घेतलेला पवित्रा सिरियासाठी आणि तेथील जनतेसाठी चांगलाच महागात पडला. पण बशीर सरकारवर मात्र याचा काहीही परिणाम झाला नाही.
जनतेने आता बश-अल-असदचे सरकार बरखास्त करण्याची मागणी सुरु केली.
एकीकडे सरकारचा विरोध तीव्र होत होता आणि दुसरीकडे सरकारविरोधी भावना तीव्र होत होत्या. सैन्याने आपल्याच नागरिकांवर बॉम्ब वर्षाव सुरु केला. या बॉम्ब हल्ल्यात कित्येक नागरिक मारले गेले. शहरे बेचिराख झाली. लोकांचे जगणे हराम झाले.
सैन्यालाही आपल्याच नागरिकांवर अशा प्रकारे अत्याचार करणे रुचत नव्हते. ज्यांना रुचत नव्हते त्यांनी सैन्यातून बाहेर पडून स्वतःची फ्री सिरीयन आर्मी स्थापन केली. अशा प्रकारे सैन्यातच फुट पडल्यानंतर मात्र हे आंदोलन आंदोलन न राहता याला गृहयुद्धाचे स्वरूप आले.
तरुणांना सरकारचा हा आततायीपणा सहन होत नव्हता. असे तरुण या फ्री सिरीयन आर्मीत स्वतःहून भरती होऊ लागले. तरुणांना शस्त्र हातात घेणे भाग झाले. या फ्री सिरीयन आर्मीला अमेरिकेने शास्त्रास्ते पुरवली.
बशर-अल-असदचे सरकार पाडण्यासाठी आणि अल-नुसरासारख्या दहशतवादी संघटनांचा बिमोड करण्यासाठी अमेरिकेने सिरियातील विरोधी पक्ष, फ्री सिरीयन आर्मी, आणि सरकार विरोधी ज्यांना कुणाला लढायचे आहे, अशा सर्वांना शस्त्रे पुरवली व ते चालविण्याचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली.
अमेरिकेने यासाठी ५०० अब्ज डॉलर खर्च केले. शिवाय, यासाठी एक वेगळा प्रकल्पही सुरु केला.
आता दहशतवादी संघटनांना देखील सिरियातील या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप करण्याची खुमखुमी निर्माण झाली. अल-कायदाचीच एक शाखा असलेली अल-नुसरा, इजिप्तची मुस्लीम ब्रदरहूड, कुर्दिश संघटन आणि इसीस यांसारख्या संघटनाही या गृहयुद्धात उतरल्या.
२०१४मधे अल-कायदातून बाहेर पडलेल्या आयएसआयएल या संघटनेने उर्वरित सगळ्याच संघटनांना आपले लक्ष बनवले. हळूहळू त्यांनी सिरियातील एकेका शहरावर ताबा मिळवण्यास सुरुवात केली. एकूणच सिरियात मारामारी, खून हिंसक कारवाया यांना उत आला. यात कित्येक स्त्रिया आणि लहानमुलेही हकनाक बळी पडली.
बाहेरच्या प्रत्येक राष्ट्राने यात एकतर सरकारला पाठींबा दिला किंवा वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांना. बशीर विरोधी देश या संघटनांना हत्यारांचा पुरवठा करू लागले.
फ्री सिरीयन आर्मीचेही अनेक तुकडे झाले होते. या संघटनांनी देखील सिरियातील वेगवेगळ्या प्रांतावर कब्जा केला आहे. यात सीरियाचे सैन्यही मागे नव्हते त्यांनी या दहशतवादी संघटनांवर बॉम्ब हल्ले सुरु केले.
विमानातून रात्रंदिवस होत असणाऱ्या हल्ल्यांमुळे शहरात जिकडेतिकडे फक्त भग्न इमारती आणि मृतदेहांचे खच एवढेच चित्र निर्माण झाले होते. इराणच्या हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेने बशर अल असद सरकारला पाठींबा दिला तर कुर्दिश संघटनांनी सरकारच्या विरोधात करावया सुरु केल्या.
हळूहळू आपला फायदा लाटण्यासाठी तुर्क, सौदी अरब, कतारसारखे देशही वाहत्या गंगेत आपले हात धुवून घेण्यास उतावीळ झाले. फ्रांस, अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, रशिया यासारखे मोठमोठे देशही या गृहयुद्धात सामील झाले. यात कुणी अतिरेकी संघटनांचे समर्थन करू लागले तर कुणी सरकारचे आणि दोन्ही बाजूला हत्यारे, शस्त्रास्त्रे, दारुगोळा अशी मदत पुरवली जाऊ लागली.
संयुक्त राष्ट्राच्याच एका अहवालानुसार २०१६पर्यंत या गृहयुद्धात ४ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. यात लहान मुलांची संख्या ५५ हजार होती.
याच वर्षी सिरीयन सरकारने घोउटा शहरात विषारी वायू सोडला. या रासायनिक हल्ल्यात ५०० लोकांचा मृत्यू झाला अनेक लोक या विषारी वायुमुळे प्रभावित झाले. यानंतर संयुक्त राष्ट्रानेही तिथल्या मृतांच्या आकडेवारीची नोंद घेणे बंद केले.
२०१३मधेही सिरीयन सरकारने आपल्याच लोकांवर असा विषारी वायूचा प्रयोग केला होता ज्यात १५०० मुले मारली गेली होती. संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार २०१८ पर्यंत इथे एकूण ५६ लाखाहून अधिक सिरीयन नागरिकांनी आपलाच देश सोडून पळ काढला आहे.
सिरियातील हे गृहयुद्ध अजूनही सुरूच आहे. संपूर्ण सिरियाची राखरांगोळी झालेली असतानाही सरकारला युद्धाची खुमखुमी आहे. आपल्याच देशवासीयांची अशी दीन अवस्था करणाऱ्या या सरकारबद्दल कुणाला अभिमान वाटेल? या युद्धात कुणा एकाचा जयपराजय झालेला नसला तरी माणुसकीने मात्र शरमेने मान खाली घातली आहे. या युद्धात विकासाचा पराभव झालेला आहे.
दमनकारी शासन जनतेला काय देते याचे हे एक विदारक पण सत्य चित्र आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.