आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब
ब्रिटिशांनी भारताला १९४७ साली स्वातंत्र्य बहाल केले. हे राजकीय स्वातंत्र्य मिळेपर्यंत अनेकांनी आपापल्या हिंसक-अहिंसक मार्गाने या परकीय सत्तेविरोधात जोरात टक्कर दिली. पण, आता इथून पुढे भारताची खरी कसोटी सुरू होणार होती. कारण, भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाले असले तरी भारतातील काही अनिष्ट प्रथा-परंपरा भविष्यात देशाच्या प्रगतीला खीळ घालणाऱ्या ठरणार होत्या.
अशा अनिष्ट प्रथांपैकीच एक प्रथा होती जमीनदारी. या विरोधातही दोन्ही प्रकारे संघर्ष सुरू झाला. हिंसक संघर्षाने नक्षलवाद जन्माला घातला आणि अहिंसक संघर्षाने प्रत्येक भारतीय मनात लपलेल्या करुणेला साद घातली.
आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीने जे करून दाखवले ते सरकारलाही जमले नाही. सरकारने जमिनी न्याय वाटप करण्यासाठी भूमी अधिग्रहण कायदा आणला. विनोबाजींच्या कारुण्यमयी सादाला जो प्रतिसाद मिळाला. पण कायद्याच्या बडग्यापुढे लोक नमले नाहीत.
विनोबाजींची ही चळवळ खरी क्रांतिकारी चळवळ होती, जी रक्ताचा एकही थेंब न सांडता यशस्वी झाली. आजच्या काळातही विनोबाजींच्या या सत्याग्रही भूमिकेची आणि करुणेला साद घालण्याची नितांत गरज आहे. भारत स्वतंत्र तर झाला पण, भारतातील लक्षावधी दलित, आदिवासी लोकांकडे स्वतःची हक्काची जमीन नव्हती. त्यांनी राहायचे कोठे, काम काय करायचे आणि जगायचे कसे हा प्रश्न होता.
आचार्य विनोबा भावे हे नाव घेताच एक शांत, प्रसन्नचित्त, शुभ्र दाढीतील कृश व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. पण, वरून कृश वाटणारी ही व्यक्ती आतून किती कणखर होती हे त्यांनी केलेल्या कामावरून कळते. शारीरिक ताकदीबरोबरच मानसिक ताकद कमावणे का महत्त्वाचे आहे हे आचार्यांच्या कर्तृत्वावरून आणि व्यक्तित्वाकडे बघितल्यावर पटते.
स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, भू-दान आणि सर्वोदय आंदोलनाचे प्रणेते, गांधीवादाचे डोळस अनुयायी अशा असंख्य विशेषणांनी ज्यांचे वर्णन केले जाते ते आचार्य विनोबा भावे यांचे पूर्ण नाव होते, विनायक नरहरी भावे!
गणित आणि अध्यात्म यांचा एक अद्भुत संगम त्यांच्या व्यक्तित्वात होता. भगवद्गीतेचा तर त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता.
गांधीजीनंतर भारतीय जनमानसावर ज्यांनी राज्य केले ते म्हणजे विनोबा भावे!
दलित, आदिवासी आणि फाळणीमुळे भारतात आलेले विस्थापित अशा असंख्य लोकांसमोर एकच प्रश्न होता, राहायचे कुठे, खायचे काय आणि जगायचे कसे? भारतातील या मोठ्या वर्गाकडे मुलभूत गरजांची पूर्तता करण्याचीही क्षमता नव्हती.
कारण भारतातील शेती योग्य जमीन आणि तत्सम संसाधनांवर मुठभर लोकांची मक्तेदारी होती. सुपीक जमिनीची मालकी काही थोड्या लोकांच्या हातातच एकवटलेली होती.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जमीनदारी निर्मुलन आणि भू-हद्दबंदी सारखे उपाय योजले गेले. दक्षिण भारतात तर जमिनीच्या मालकी हक्कावरून रक्तरंजित संघर्ष सुरु झाला होता. दक्षिण भारतातील या भागात विनोबाजी स्वतः गेले आणि तेथील लोकांशी त्यांनी चर्चा केली. दोन्ही बाजूंशी त्यांनी शांततेने चर्चा केली. त्यानंतर त्यांनी जमिनदारांना आपल्याकडील थोडी जमीन दान देण्याचा आग्रह केला.
जमीन दान देण्याच्या या आग्रहातूनच भू-दान आंदोलनाने जन्म घेतला. संपूर्णत: अहिंसा आणि करुणेच्या तत्वावर आधारलेले हे आंदोलन होते.
तेलंगणा प्रांतात जमिनीच्या वाटपावरून हिंसाचार उफाळला होता. जमिनीच्या संघर्षावरून इथे रक्तरंजित संघर्ष सुरु झाला. अशा परिस्थितीत विनोबाजींनी या हिंसाचारग्रस्त प्रदेशाला भेट देऊन तिथली परिस्थिती समजावून घेण्याचा निश्चय केला. यासाठी १५ एप्रिल १९५१ रोजी विनोबाजींनी पदयात्रा सुरु केली.
या यात्रे दरम्यान त्यांनी संतप्त झालेल्या हिंसक गटांशी बोलणी केली. त्यांच्या हितासाठी काय करता येईल यावर चर्चा केली आणि त्यांच्याबद्दल सहानुभूतीही व्यक्त केली.
१८ एप्रिल पासून त्यांनी पदयात्रेची दुसरी फेरी सुरू केली. यावेळी ते तेलंगणातील पोचमपल्ली गावात त्यांनी मुक्काम केला. इथे तर अनेकांनी जीमिनीच्या वादापायी जीव गमावला होता.
याठिकाणी नक्षली जास्त सक्रीय होते. विनोबाजींनी या गावातील हरिजन वस्तीला भेट दिली. ८० कुटुंबे होती. त्यांनी ४० एकर जमिनीची मागणी केली. विनोबाजींनी त्यांना मदत करण्याचे ठरवले. त्या गावातील जामीनदाराशी त्यांनी चर्चा केली.
रामचंद्र रेड्डी नावाच्या एका जमीनदाराने त्यांना १०० एकर जमीन दान दिली. भूदान आंदोलनातील हे पहिली दान देण्यात आलेली जमीन होती.
याने विनोबाजींची हिंमत वाढली. ते जमीनदारांना भेटून जमिनी दान देण्याचा आग्रह करू लागले. जमीनदाराच्या जमिनीच्या प्रमाणातच ते दान स्वीकारत असत. हजारो एकराची जमीन असलेल्या जमीनदाराने जर फक्त शंभर एकर जमीन देण्याची तयारी दाखवली तर ते ही जमीन स्वीकारत नसत. ते स्पष्टपणे म्हणत, “मी भिक मागायला नाही तर मी दीक्षा द्यायला आलो आहे.” असे ते म्हणत.
कसली दीक्षा देत होते ते, एकमेकांना मदत करण्याची सांभाळून घेण्याची, आहे ते वाटून घेण्याची, भौतिक सुखाचा हव्यास आणि मोह त्यागण्याची दीक्षा! करुणेची दीक्षा!
ते जमिनदारांना आवाहन करत, मला तुमचा मुलगा समजा आणि तुमच्या जमिनीतील सहावा भाग मला दान द्या. अनेक जमीनदारांना त्यांच्या या आवाहनाचा अपमर्द करू शकत नव्हते. त्यांच्या या आवाहनापुढे अनेकांची मने पाघळली. अशा रीतीने जमिनीचे न्याय वाटप होण्यास हातभार लागला. यासाठी त्यांनी रचनात्मक आंदोलन उभारले.
काही ठिकाणी तर लोक ग्रामदान करू लागले. काही ठिकाणी जमीनदारांची अनेक गावांवरच मालकी होती. त्यांनी आपल्या मालकीची ही गावेच दान दिली. या गावात बेघर लोकांना वसवण्यात आले.
सुरुवातीला तरी विनोबाजींचे हे आंदोलन कितपत यशस्वी होईल याबाबत अनेकांच्या मनात शंका होती मात्र ज्या पद्धतीने विनोबाजींनी जमीनदरांची अशी काही समजूत काढली की त्यांना यश हमखास मिळाले.
१९५१ ला त्यांनी भूदान चळवळीला सुरुवात केली. उत्तरप्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेश या राज्यातून २९ लाख ६४ हजार एकर जमीन मिळाली होती. यावरून त्यांना किती मोठे यश मिळाले होते याची प्रचीती येते. आजही पुन्हा एकदा विनोबाजींच्या भूदान आंदोलनाची गरज आहे.
विनोबाजींचा त्याग, सेवा, सद्भावना अशा गोष्टी आज आपल्याला अविश्वसनीय वाटतात. पण कायद्याच्या, ताकदीपेक्षाही भावनेची करुणेची ताकद अधिक मोठी आहे, हे विनोबाजींनी आपल्या आचरणातून दाखवून दिले होते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.