आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
यशस्वी उद्योग ! एका साधारण व्यक्तीने बघितलेले स्वप्न जे साकारायला प्रचंड इच्छाशक्ती, सकारात्मकता, आर्थिक नियोजन याची व्यवस्थित जोडणी होणे आवश्यक असते. व्यावसायिक मनोभूमिका असणाऱ्या व्यक्ती उपरोल्लेखित सर्वच गुणांच्या धनी असतात. या गुणांच्या उपलब्धतेमुळे अनेक व्यवसाय यशस्वी होऊन पुढे गेलेले आपण पाहत असतो. कमी साधन-सुविधा असूनही दुर्दम्य इच्छाशक्ती आणि संघर्षशीलत्याच्या जोरावर यशस्वी झालेले अनेक उद्योग नंतर आयुष्यात संघर्ष करणाऱ्यांना सतत प्रेरणा देण्यासाठी उपयुक्त ठरत असतात.
आजकालच्या स्टार्ट-अपच्या युगात अमेझॉन, डेन्झो, बैजू, झोमॅटो आणि तत्सम यशस्वी उद्योगांच्या केस स्टडी नवउद्योजकांना अभ्यासायला आवडत आहेत. एवढेच नाही तर सामाजिक उद्योजकतेचे उदाहरण असलेले मुंबईचा डब्बेवाला, अमूल समूहाचा अभ्यास देखील जगातल्या मोठ मोठ्या विद्यापीठांमध्ये केला जातो. आपण केलेले नियोजन ठरवलेले इच्छित अर्थसहाय्य्य आणि व्यवसाय याचा मेळ बसला की उद्योग यशस्वीतेकडे जातो.
आपला देश हा नवउद्योजकांचा देश आहे. अनेक देशांच्या तुलनेत भारताचा तरुणवर्ग जास्त प्रमाणात उद्योग धंद्यांकडे वळला आहे. उदयोन्मुख उद्योजकांना उद्योग करत असताना काय करावे आणि काय करू नये यावर विशेष लक्ष द्यावे लागते. आपण या सदरात एका अशा कंपनीच्या विषयी जाणून घेणार आहोत जी कंपनी भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली होती परंतु दूरदृष्टीच्या अभावाने आणि अयोग्य निर्णयप्रक्रियेमुळे ती दिवाळखोरीत निघाली.
कोणती आहे ती कंपनी?
९० च्या दशकांमध्ये टीव्ही वर विविध नवनाविन मालिकांचे प्रयोग चालू असताना त्या मालिकांच्या मध्यंतरात नेहमी काही ठराविक कंपनीच्या उत्पादनांची जाहिरात व्हायची आणि त्यात अग्रक्रमाने नाव असायचे ते व्हिडियोकॉन या कंपनीचे.
१९८६ च्या काळात नंदलाल धूत नामक एका उद्योजकाने महाराष्ट्रातील गतीने विकसित होणाऱ्या औरंगाबाद येथे आदिगाम ट्रेडिंग या कंपनीची सुरुवात केली. आदिगाम ट्रेडिंग ही कंपनी प्रामुख्याने पेपर ट्यूब बनवायची. चांगल्या पद्धतीने व्यवसाय सुरु झाला आणि स्थिरावलाही.
काही दिवसांतच कंपनीच्या विकासाचा विचार करून याच कंपनीचे नाव त्यांनी व्हिडीओकॉन असे केले आणि त्यांना भारतात रंगीत टीव्ही संच बनवण्याची अनुज्ञप्ती (लायसन) मिळाली. रंगीत टीव्ही भारतात बनवणारी ही पहिलीच कंपनी होती. पाहता पाहता कंपनीने यशस्वितेची सीमा गाठली आणि भारतातील नंबर १. ची कंपनी बनण्याचा मान पटकावला.
एका वर्षात १ लक्ष टीव्ही संच उत्पादित करायचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून अत्यंत जोमाने सर्वजण कामाला लागले. १९९० च्या काळात औरंगाबादसारख्या औद्योगिक क्षेत्राने व्यापलेल्या शहरात अनेक कुटुंबांना व्हिडिओकॉनने आधार दिला. महत्वाच्या ३ कंपन्या ज्या मध्ये शहरातील अधिकांश कामगार काम करतात त्यापैकी व्हिडीओकॉन बनली. हळूहळू कंपनीचा व्याप वाढला आणि कालौघात कंपनीची सर्व सूत्रे नंदलाल धूत यांचे सुपुत्र वेणुगोपाल धूत यांच्याकडे आली. वेणुगोपाल धूत यांनी कंपनीला एका वेगळ्या स्तरावर नेण्याचा प्रयत्न केला. दैनंदिन जीवनात घरात लागणारी सर्व उपकरणे या कंपनीने बनवायला सुरुवात केली. हळूहळू घरगुती उपकरणाच्या उत्पादनात देखील व्हिडीओकॉन देशाचा क्रमांक १ चा ब्रँड बनला.
जेव्हा यशाची शिखरे पादाक्रांत करायची असतात तेव्हा मोठी स्वप्ने दिसत असतात तसेच काहीसे वेणुगोपाल धूत यांच्या बाबतीत झाले आणि त्यांनी आपल्या कंपनीचा व्याप वाढवला आणि आपल्या भारतातील क्रमांक १ च्या कंपनीला चालू ठेवून स्वतः व्हिडीओकॉनला ऑइल आणि गॅसच्या व्यवसायात आजमावले.
जेव्हा एक कंपनी व्यवस्थित चालू असते आणि त्या कंपनीचा मालक दुसऱ्या लक्ष्याकडे डोळा लावून बसतो तेव्हा जे व्हायला पाहिजे तसे काहीसे इथे झाले, ऑइल आणि गॅस हे व्यवसाय भांडवल जास्त लागणारे व्यवसाय आहेत त्यामुळे साहजिकच वेणुगोपाल धूत यांना या क्षेत्रात टॅग धरून राहण्यासाठी भांडवलाची आवश्यकता भासली. हे भांडवल त्यांना आपल्या घरगुती उपकरणाच्या व्यवसायातून आणि थोड्या प्रमाणात बँकेच्या कर्जातून मिळेल असे अपेक्षित होते. तसे त्यांनी केले आणि या व्यवसायातही ते यशस्वी झाले.
पण, वेणूगोपालजी धूत यांनी इथेच चूक केली आणि विविध क्षेत्रात झेपावण्याची घाई केली. या यशानंतर व्हिडीओकॉन काच उत्पादन उद्योग, व्हिडीओकॉन D2H, इंश्युरन्स, पॉवर आणि टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस या उद्योगात त्यांनी नशीब आजमावायला सुरुवात केली.
एवढेच नाही तर काही कंपन्या देखील व्हिडीओकॉनने विकत घेतल्या. जेव्हा व्याप वाढतो तेव्हा आर्थिक भांडवलाची खूप गरज असते आणि तिथेच व्हिडीओकॉनचे गणित बिघडले. व्हिडीओकॉनचा जो आधीपासूनचा परंपरागत चालू असलेला व्यवसाय होता त्याच्याकडे दुर्लक्ष झाले.
काळाने सूर बदलला
जेव्हा भांडवलाची गरज भासायला लागली नेमके तेव्हाच टेलिकॉम कंपनीला मिळालेले केंद्र सरकारचे काम रद्द झाले. २०१२चा तो काळ होता त्या काळी 2G स्पेक्ट्रम घोटाळा उघडकीस आला आणि त्यात काम मिळालेल्या सर्व कंपनीचे काम रद्द करावे असे आदेश मा.सर्वोच्च न्यायालयाने दिले. एवढेच नाही तर २०१३मध्ये ऑइल आणि गॅसच्या कंपनीमध्ये देखील त्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले. २०१३च्या काळात जागतिक बाजारपेठेत तेलाचे दर न भूतो कोसळले होते त्यात अनेक कंपन्यांना दिवाळखोरीचा सामना करावा लागला त्यातील व्हिडीओकॉन एक कंपनी होती. नफा आणि तोटा याची जी गणिते करावी लागतात ती नेहमी चुकत गेल्याने व्हिडीओकॉन समूहावर दबाव वाढत चालला होता.
२००८ पासून या पडझडीची चाहूल लागायला सुरुवात झाली होती. सतत वाढत असलेल्या आर्थिक तणावामुळे यातून बाहेर येण्यासाठी वेणुगोपाल धूत मार्ग शोधत होतेच आणि त्यातच त्यांचे जवळचे मित्र दीपक कोचर (ज्यांच्या पत्नी चंदा कोचर ह्या प्रथितयश ICICI बँकेच्या CEO होत्या) यांनी त्यांना सोबत एक नवी कंपनी सुरु करण्याची सूचना केली.
त्यानुसार २००८ मध्ये NUPOWER RENEWABLES ही कंपनी स्थापन करण्यात आली ज्यामध्ये दीपक कोचर आणि वेणुगोपाल धूत ५०-५०% चे भागीदार होते.
या पूर्ण प्रकारातील खरी मेख पुढे आहे. २००८ साली स्थापन झालेल्या या कंपनीला वेणुगोपाल धूत यांच्या SUPREME ENERGY या कंपनीने तब्बल ६४ करोड रुपयांचे कर्ज दिले. इथेच ते थांबले नाहीत तर नंतर त्यांनी त्यांच्या SUPREME ENERGY चे ३२ करोड शेअर आणि NUPOWER कंपनीचे ५०% भाग भांडवल PINNACLE ENERGY ट्रस्टला फक्त २.५ लक्ष एवढ्या कमी किंमतीमध्ये विकले.
हा ट्रस्ट दुसऱ्या कोणाचा नसून दीपक कोचर यांचाच होती. हे सर्व झाले तेव्हाच प्रचंड वेगाने डबघाईला जात असलेल्या आणि आर्थिक आवश्यकता असलेल्या व्हिडीओकॉनला ICICI बँकेने ३२५० करोडचे कर्ज देऊ केले. कर्ज दिल्यानंतर २०१३मध्ये वेणुगोपाल धूत यांनी NUPOWER RENEWABLESया कंपनीचा राजीनामा दिला. या क्रियाकालापाचा नीट अभ्यास केला तर स्पष्ट लक्षात येईल की अवैध आर्थिक व्यवहार यात झाले आहेत.
या गोष्टी जेव्हा काही जणांनी सरकारच्या लक्षात आणून दिल्या तेव्हा सरकारी यंत्रणा सक्रिय झाली. CBI, ED आणि SFIO या यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी झाली. चौकशीअंती आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायदा २००२ नुसार व्हिडिओकॉनवर प्रचंड कर्जाचा डोंगर असूनही आर्थिक अनागोंदी झाल्यामुळे व्हिडीओकॉनला ICICI बँकेने दिलेल्या ३२५० करोडपैकी २८५० करोडचा ऐवज NPA म्हणून घोषित करावा लागला. शेवटी आर्थिक गैव्यवहार झाल्याचे स्पष्ट होताच ED म्हणजेच सक्तवसुली संचालनालयाने कोचर पती-पत्नी आणि वेणुगोपाल धूत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली तसेच व्हिडीओकॉन कंपनी संपूर्णपणे बंद झाली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.