आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
महाराष्ट्राच्या प्रगतीची ६० वर्ष ही दैदिप्यमान आहेत. आत्तापर्यंत १८ मुख्यमंत्री महाराष्ट्राने अनुभवले त्यातील वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार यांनी प्रत्येकी तीनदा तर शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांना प्रत्येकी दोनदा मुख्यमंत्रीपद भूषवण्याची संधी मिळाली. उरलेल्या सगळयांना एका कारकिर्दीनंतर आपला गाशा गुंडाळावा लागला. यापैकी सगळेच काही लोकप्रिय होते किंवा त्यांची कर्तबगारी महाराष्ट्राला आवडत होती अशातला पण भाग नाही, बऱ्याचदा दिल्लीचा प्यादा म्हणून कार्यभार सांभाळणारे या पदावर आरूढ झाले होते.
महाराष्ट्राच्या सुदैवाने म्हणा किंवा काळाच्या पुण्याईने म्हणा पण सर्वात भाग्यवान ठरले ते वसंतराव नाईक.
वसंतरावांच्या समकालीन देशातील इतर मुख्यमंत्र्यांचा विचार केल्यास त्यांची कारकीर्द अधिक प्रभावी, आखीव-रेखीव आणि तळपती होती. यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या भक्कम पायावर त्यांनी राज्यात आखलेली धोरणे आणि त्याची चोख अंमलबजावणी त्याच्या कामाच्या कृतीशिलतेचा कळस होती.
वसंतरावांच्या कृतिशील आणि प्रेमळ वागणुकीमुळे अगदी सामान्य कुटुंबातील लोकांनाही विशेषतः शेतकरी वर्गाला ते आपलेसे वाटत. जुन्याजाणत्या राजकीय मंडळींना अजूनही त्यांच्याबद्दल विचारलं तर त्यांच्याएवढा टापटीपपणा आजच्या एकही राजकीय नेत्यात नाही असेच सगळ्यांचे म्हणणे पडते.
पोशाख कितीही उच्च प्रतीचा घातला तरी सामान्य माणसांत त्यांची मिसळण्याची पद्धत ही आकर्षक होती. कितीही गर्दीचा कार्यक्रम असला तरी आपल्या हास्यावर कार्यक्रम जिंकण्याचं कसब त्यांच्यात होती.
सत्तरच्या दशकात मुंबईतील कामगार चळवळी कायम चर्चेत असत आणि त्या चळवळीचा बादशहा म्हणजे जॉर्ज फर्नांडिस. बेस्टच्या कामगारांचा नेता म्हणून जॉर्ज अगदी देशभर प्रसिद्ध होता. तत्कालीन कामगार मंत्र्यांना आपल्यासमोर एक शब्दही बोलू न देणारा जॉर्ज कामगारांच्या समस्यांबद्दल वसंतरावांशी मात्र बराच वेळ चर्चा करत.
बंद खोलीत जॉर्जचे सहकारी आणि वसंतराव यांच्यातील चर्चा कधीही पत्रकारांच्या हाताला लागल्या नाही. संप मिटला तरी पत्रकारांच्या चर्चेचं गुऱ्हाळ मात्र महिनाभर काय मिटत नव्हतं. पण कामगार संपातील सगळ्या मागण्या मान्य झालेल्या असायच्या.
त्यावेळी लाल बहादूर शास्त्री देशाचं नेतृत्व करत होते. चीन युद्धातून भारत नुकताच सावरत असतानाच दुष्काळाने देशभरात थैमान घातलं. तेव्हा देशात झालेली उपासमारी कधीच न विसरता येण्यासारखी आहे. शेतीचं उत्पादन मर्यादित, खाणारी तोंडंं जास्त. परिणामी देशात अन्नटंचाईची समस्या भेडसावू लागली.
तेव्हा मृणाल गोरेंनी महिलांचा लाटणं मोर्चा विधानभवनावर नेला होता. त्यावेळी नाईक यांनी मोर्च्याला विरोध दर्शविला. त्यांचं स्पष्ट मत होतं की अशा मोर्च्यांनी अन्नटंचाई संपणार नाही. त्याऐवजी देशातील धान्याचं उत्पन्न कसं वाढवता येईल यावर जास्ती भर द्यायला हवा. निवेदन, घोषणा देण्यासाठी उपस्थित असणाऱ्या याच हजारो लोकांची क्रयशक्ती अशी वाया घालवण्यापेक्षा योग्य ठिकाणी उपयोगात आणली पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते.
मुळातच वसंतराव हाडाचे शेतकरी होते. वडील फुलसिंग त्याकाळातील प्रसिद्ध बागायतदार. ग्रामीण विकासात त्यांच्या कुटुंबाचा हातखंडा होता. त्यांच्या आजोबांनी गहुली गाव निसर्गपूरक विकसित केलं होतं. त्यांचे कुटुंब शेतीबरोबरच पशुपालनदेखील करत. शेती आणि कृषीपूरक उद्योगांचे संस्कार खोलवर रुजले होते. त्याचा फायदा त्यांना पुढे जनतेचे प्रश्न सोडवताना झाला.
वकील असूनही त्यांचा शेतीच्या कामांमध्ये चांगलाच हातखंडा होता. त्यामुळेच ‘शेतकऱ्यांचे वकील’ म्हणून त्यांना नावलौकिक मिळाला.
त्याचबरोबर सामाजिक सुधारणांचा आग्रह धरणारे, अंधश्रद्धेला खतपाणी न घालणारे एक उत्तम समाजसुधारक, भूदान चळवळीतले कार्यकर्ते, काँग्रेसी विचार जपणारे सहृदयी नेतृत्व म्हणून त्यांचा नावलौकिक होता.
स्वतंत्र महाराष्ट्र होण्याअगोदर मध्यप्रदेशात विधानसभा सदस्य आणि महसूलमंत्री म्हणून त्यांनी काम केले. मुंबई राज्यात सहकार, शेती ही खाती त्यांनी सांभाळली. नंतर १९६०-६३ याकाळात ते महाराष्ट्राचे महसूलमंत्री झाले.
मारोतराव कन्नमवार यांच्या निधनानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तब्बल एक तप महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सांभाळले.
प्रथम कृषिमंत्री आणि नंतर मुख्यमंत्री असताना शेती क्षेत्राला आणि शेतात राबणाऱ्या मजुरांना विशेष महत्व दिले. शेतीक्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी बरेच बदल घडवून आणले. नदीनाल्यांची बांधबंदिस्ती करून ओलिताखालील जमिनीचे प्रमाण वाढवले. राज्यभर दौरे काढून शेतीचे प्रश्न समजावून घेतले. नुसती भाषणं न ठोकता प्रत्यक्षात काम करण्यावर त्यांचा जास्ती भर होता.
आळस आणि नकारात्मक दृष्टिकोन बाजूला सारून शेतीसाठी झोकून द्या काळिमाई तुम्हाला उपाशी राहू देणार नाही असं ते सारखं सांगत.
दुष्काळी भागातील रस्ते बांधणे, ग्रामदान, शेतकऱ्यांना माल साठवण्यासाठी गोदामे, सहकारी तत्वावर कापसाचे जिनिंग हब उभे केले. आरेच्या धर्तीवर अनेक दुधकॉलोन्या स्थापन केल्या. आधुनिक बी-बियाणे त्याचबरोबर शेतीतील नवनवीन अवजारे तयार करण्यास व वापरास प्रोत्साहन दिले.
नाईकांनी जलसंवर्धनसाठी बंधारे बांधले ते बंधारे आज ‘वसंत बंधारे’ नावाने प्रसिद्ध आहेत. कापसाला हमीभाव देण्याची ‘कापूस एकाधिकार योजना’ हीदेखील त्यांच्याच कामाचं फलित आहे. मुख्य म्हणजे बेरोजगारांसाठी ‘रोजगार हमीसारखी’ योजना सर्वोदयी नेते वि. स.पागेंच्या कल्पनेतून त्यांनी साकारली जी आजतागायत देशभर अविरत चालू आहे.
वसंतरावांच्या प्रयत्नांमुळेच महाराष्ट्रात चार कृषि विद्यापीठांची स्थापना झाली.
जपानच्या भातमंडळावर त्यांनी केलेले भारताचं प्रतिनिधित्व आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या कामातील अनुभव त्यांना महाराष्ट्रातील ‘७२चा दुष्काळ हटवणे आणि राज्यात ‘हरितक्रांती’ घडवून आणण्याच्या कामी आला.
शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळावे, सहकार वाढावा म्हणून त्यांनी ‘कृषी औद्योगिक’ अर्थव्यवस्थेचा अभिनव प्रयोग राज्यात घडविला. स्वतःच्या पक्षाबरोबर इतर काम करणाऱ्या मंडळींनासोबत घेतल्याने त्याचे शत्रू देखील तयार झाले. वसंतरावांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात हरितक्रांती झाली, राज्य दुष्काळावर मात करू शकले. दारूबंदीसारखे निर्णयही विनोबा भावेंच्या मदतीने राबवला.
महाराष्ट्र राज्याच्या कारभार हा मराठीतच व्हावा असा पहिला विचार त्यांनी मांडला होता.
वसंतराव नाईक यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा अजरामर राहील असाच आहे. शेतीविषयक काम वसंतरावांनंतर आजवर एकालाही जमलं नाही.
या माध्यमावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकाची असतात, संपादक मंडळ त्याच्याशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.