आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
एकीकडे पंडित नेहरू चीनच्या प्रेमात बुडालेले असताना आय.बी.चे प्रमुख भोलानाथ मलिक मात्र जागरूक होते. चीनने तिबेट गिळाल्यावर मलिकांनी सी आय ए शी हात मिळवले. तिबेटी युवकांना सशस्त्र क्रांतीसाठी शस्त्रे पुरवण्याचे सी आय ए ने कबुल केले. ही शस्त्रे नियोजित निर्जन स्थळी टाकायला मदत व्हावी म्हणून मलिकांनी भारतीय आकाश अमेरिकेच्या विमानांना खुले केले.
हे करताना त्यांनी नेहरुंना हे न कळवण्याचा धोका पत्करला. इथूनच पुढे सी आय ए शी आपले संबंध प्रस्थापित झाले. केनेडी सरकारच्या काळात आलेल्या शिष्टमंडळात बरेच सी आय ए अधिकारी सामील झाले आणि एकीकडे राजकीय चर्चा चालू असताना चीन्यांचे पेकाट मोडण्याची खलबते शिजू लागली.
याचाच एक भाग म्हणुन ५००० तिबेटी तरुणांना देहरादून येथे प्रशिक्षण देण्याचे ठरले तर काही तरुण अमेरिकेत प्रशिक्षणासाठी गेले.
तिबेटींना ही सगळी मदत वेळोवेळी पुरवताना भारतीय विमाने वापरून चालले नसते. याकामी मदतीला आला एक सच्चा भारतीय नेता तो म्हणजे ओरिसाचे माजी मुख्यमंत्री “बिजू पटनायक”. या पेशाने माजी वैमानिक असलेल्या मुख्यमंत्र्याने बनावट विमान कंपनी स्थापन केली. तिचे नाव होते “कलिंग एयरवेज”.
या कंपनीच्या विमानाच्या माध्यमातून शस्त्रास्र पुरवठा करुन चीनच्या मागे “तिबेट’’ ही खरुज कायमची लावून देण्यात आली. या सी आय ए बरोबरच्या चर्चेतून आणखी एक दल स्थापण्याचा निर्णय झाला ते दल म्हणजे “इंडो तिबेटन बोर्डर पोलिस” या दलात विशेषता गिर्यारोहक सामील करण्यात आले.
एकीकडे हे सगळं चालू असताना चीन आपली पहिली अणु चाचणी घेण्यात मश्गुल होता. सी आय ए ने यात बरीच विघ्न आणली परंतु अपेक्षित यश प्राप्त झाले नाही तेव्हा किमान या अणु चाचणीची प्रहार, प्रकार, संख्या जाणून घेणं महत्वाचं होतं भारत आणि अमेरिका या दोघांसाठी. ही अणुचाचणी होणार होती “लोप नॉर” येथे.
विमाने पाठवुन, माणसे पेरून वगैरे मार्गांनी वरील माहिती गोळा करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्या नंतर काय करावे या चिंतेत सर्वजण होते. अशाच वेळेस गप्पांच्या ओघात एक गिर्यारोहकाने एवरेस्टच्या शिखरावरून चीनचा तिबेट, सिकियांग प्रदेश नजरेस पडतो असे सांगितले अणि मार्ग सापडला. हिमालयातील एखाद्या शिखरावर इलेक्ट्रॉनिक यंत्र बसवून टेलिमेट्रिक साधनाने “दोंग फेंग” या क्षेपणास्त्राचा वेग, इंधन, मर्यादा, निर्देशन प्रणाली आदींचा अंदाज कळू शकतो असे वायुदल प्रमुख कार्तीज लिमे यांना जाणवले. मग ते शिखर कोणते?
एवरेस्ट तर बाद झाले कारण तिथे वर्षभर पर्यटक असतात. दुसरं होतं ते “कांचनजुंगा ” हेच नाव फायनल झालं. तोपर्यंत तिकडे पहिली अणुचाचणी घेण्यात चीनने यश मिळवलं. परंतु ही मोहीम बाद करण्यात आली नाही. या मोहिमेसाठी “कमांडर कोहली” यांना निवडण्यात आलं. ते आणि त्यांचे अकरा सहकारी अमेरिकेत पोहचले. तिथे खास बनवण्यात आलेलं SNAP या यंत्रा विषयी माहिती देऊन ते कसं बसवायचं याचं प्रशिक्षण देण्यात आलं.
पुन्हा भारतात परतल्यावर त्यावेळेस स्वतंत्र देश असलेल्या सिक्कीम मधील कांचनजुंगा हे शिखर राजकीय वादविवाद नको यामुळे बाद झालं आणि “नंदादेवी” शिखर फायनल झालं.
२३७५० फुट उंचीच्या शिखरावर ५६ किलो चा सरंजाम वाहून नेऊन हे अवघड दिव्य पार पाडायला २४ सप्टेंबर १९६५ ला सुरवात झाली तिसरा पाडाव २१००० फुटावर असताना जिम नावाच्या परदेशी हेराने या SNAP यंत्राशी खेळायला सुरवात केली.
हे यंत्र म्हणजे एक प्रकारची अणुभट्टीच असते. ज्यात प्लुटोनीयम असते. या प्लुटोनियम मुळेच हे यत्र सतत २ वर्ष चालू रहाणार होते. इकडे हे लोक शेवटच्या टप्प्यापासून ८५५ फुटावर असताना निसर्गाने रौद्ररूप धारण केलं. इकडे हिमवर्षाव सुरु, दुसरीकडे एकाच्या मुर्खपणामुळे अणुभट्टी सुरु आणि मुक्काम वाढल्यामुळे अन्न पदार्थ संपायला अशा अवस्थेत ती अणुभट्टी तिथेच लपवून ही टिम निराश मनाने माघारी परतली ती पुन्हा येण्याचा निश्चय करुन.
माघारी आल्यावर अपयशाची उलटतपासणी झाली. या चर्चेतून “नंदाकोट” हे कमी उंचीचं शिखरही चालू शकेल हे बाहेर आलं आणि पुन्हा एक टिम लपवून ठेवलेली अणुभट्टी शोधायला पाठवली गेली. शेर्पांच्या या टिमला तिथे फक्त अस्ताव्यस्त झालेली वस्तू सापडल्या पण SNAP यंत्राचा पत्ता नव्हता. हिम प्रपातामुळे हे घडले होते. परंतु हे प्लुटोनियम हिमनदिमुळे गंगेत मिसळुन कलकत्त्यातील लाखो लोकांचा जीव धोक्यात आलेला होता.
अत्यंत गुप्ततेने शोध मोहिमेसाठी लाखो करोडो रुपये खर्चून देखील ते SNAP यंत्र सापडले नाही. नंदादेवी शिखर खाजगी पर्यटनासाठी बंद करण्यात आल. नंदाकोटच्या शिखरापर्यंत दुसरं SNAP यंत्र पोहचवण्यासाठी कमांडर कोहलीना ३० मे १९६६ उजाडला.
१९६७ च्या जून महिन्यात चीनने घेतलेल्या हायड्रोजन बॉम्बच्या चाचणी वेळेस मात्र चीनी गुपित भारतीय लष्करी कार्यालयात वेळेवर अचूक पोहचलं होत ते फक्त वरील मोहिमेत सहभागी असणाऱ्या कमांडर कोहली आणि त्यांचे सहकारी हरीश रावत, सोनम वाग्याल सोनम ग्यात्सो, थोन्दुप, पेद्रो त्रिपाठी, गुरुचरण भंगु ही गिर्यारोहक गुप्तहेर टीम, आणि इतर लोक म्हणजे भोलानाथ मलिक, बिजू पटनायक, आणि भारतीय सुपर स्पाय रामेश्वरनाथ कावो !
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. ThePostman.co.in संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही. | आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.