आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारतीय विज्ञान क्षेत्राने आज अणू ऊर्जेपासून अवकाशापर्यंत झेप घेतली असली तरी, याचा पाया घालण्याचे काम खूप वर्षे आधीपासून सुरु होते. आज आपण घरगुती कामासाठी ज्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतो त्यातील किती तरी वस्तूंचा शोध भारतीय शास्त्रज्ञांनी लावला आहे.
मुळात विज्ञान आणि शास्त्रज्ञ याबद्दल खूपच कमी लोकांना माहिती असते. भारतात विज्ञान क्षेत्राचा पाया रचणाऱ्या या पाच शास्त्रज्ञांबद्दल तर आपल्याला माहिती असलीच पाहिजे.
या शास्त्रज्ञांनी हे अभ्यास सुरु केले तेव्हा तर भारतात पुरेशा सुविधा देखील नव्हत्या, ना त्यांच्या अभ्यासासाठी विशेष प्रयोगशाळा. सामाजिक वातावरणही पुरेसे पोषक नव्हते. तरीही, आपल्या जिद्दीचा पाठलाग करत, कुशाग्र बुद्धीच्या सहाय्याने यांनी आपल्या संशोधनाची पताका फडकावली.
यांनी लावलेल्या शोधाचा आज संपूर्ण जगाला अभिमान वाटतो. अशा शास्त्रज्ञांबद्दल आपल्याला एक भारतीय म्हणून थोडीबहुत माहिती नक्कीच हवी.
या शास्त्रज्ञांच्या योगदानाबद्दल संपूर्ण जगभरातून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला जातो. त्यांचा सन्मान केला जातो. मात्र, भारतातच या शास्त्रज्ञांचे योगदान काहीसे दुर्लक्षित राहिले.
शंकर आबाजी भिसे
१८५७ च्या उठवाच्या दशकभराआधी शंकर आबाजी भिसे यांचा जन्म झाला. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी घरातल्या घरात कोळशापासून गॅस निर्मिती करण्याचा शोध लावला होता.
भिसे हे मुळचे मुंबईचे. विज्ञान मासिके आणि साप्ताहिकाच्या माध्यमातून यांची जागतिक पातळीवरील विज्ञान जगताशी ओळख झाली.
त्यांनी इलेक्ट्रिक सायकलचाही शोध लावला होता. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे यंत्रणेसाठी त्यांनी स्टेशन इंडिकेटरचा शोध लावला. सध्या दुकानात जो इलेक्ट्रिक वजन काटा दिसतो त्याचाही शोध भिसेनीच लावला.
त्यांच्या या शोधाला ब्रिटीश इन्व्हेंटर स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाले होते.
विशेष म्हणजे भिसे ओळखले जातात ते त्यांच्या भिसोटाइप या टाइप कास्टिंग मशीनसाठी. ज्यामुळे छपाई उद्योगात क्रांतीच घडून आली. भिसे यांनी एकूण २०० शोध लावले आणि त्यांच्या नावाने ४० पेटंट आहेत. ज्यात एका टेलीफोन मॉडेलचा देखील समावेश आहे. त्यांना भारताचा एडिसन म्हणूनही ओळखले जाते.
पहिल्या महायु*द्धाच्या काळात भिसे यांच्या संशोधनासाठी जो निधी मिळत होता त्यामध्ये कपात झाली. त्यामुळे त्यांना संशोधन करण्यात अडचणी येऊ लागल्या. नंतर नंतर तर ते विस्मृतीतच गेले. ७ एप्रिल १९३५ रोजी वयाच्या ६८व्या वर्षी न्यूयॉर्क येथे असताना त्यांचे निधन झाले.
गोपालस्वामी दोरास्वामी नायडू
भारताचे एडिसन म्हणून ओळखले जाणारे नायडू यांनी भारतातील औद्योगिक क्रांतीत फार मोठे योगदान दिले. भारताने औद्योगिक क्षेत्रात जी प्रगती केली त्याचे श्रेय नायडू यांनाच दिले जाते. पहिल्या इलेक्ट्रॉनिक मोटारचा शोध त्यांनीच लावला.
शिवाय मेकॅनिकल कॅलक्युलेटर, तिकीट विक्रीचे मशीन, पूर्वीचे इलेक्ट्रिक रेझर, फ्रुट ज्यूसर, केरोसीनवर चालणारा फॅन, आणि प्रोजेक्शन टीव्ही, असे कितीतरी शोध त्यांच्या नावावर नोंदवले गेले आहेत.
नायडू यांचा जन्म २३ मार्च १८९३ रोजी झाला. जन्मत:च त्यांची आई वारली. शाळेतून लवकर बाहेर पडले. शाळा सुटल्यावर त्यांनी वडिलांना शेतीच्या कामात मदत करणे सुरु केले.
१९१२ साली त्यांनी रज मोटार सायकलचे एक मॉडेल बघितले आणि त्यांना ती मोटारसायकल विकत घेण्याची इच्छा झाली. ती मोटार सायकल विकत घेण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
तीन वर्षांच्या बचतीतून त्यांनी ही मोटारसायकल खरेदी केली. मोटारसायकल खरेदी केल्यानंतर ते लागलीच सुसाट चालवत सुटले नाहीत तर, त्यांनी ती मोटार सायकल उघडून तिचा बारकाईने अभ्यास केला. या नंतर दशकभराने त्यांनी युनिव्हर्सल मोटार सर्विस नावाने स्वतःची बस सेवा सुरु केली. त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीच्या २८० बसेस होत्या.
त्याच्या न्यू इलेक्ट्रिक वर्क्स या कंपनीत भारतातील पहिली इलेक्ट्रिक मोटार तयार झाली. ते स्वतः जो काही शोध लावत त्याचे उत्पादन करण्यासाठी स्वतःच कंपनी सुरु करत.
नायडू यांनी आपली अखेरची वर्षे लोककल्याणासाठी व्यतीत केली. ४ जानेवारी १९७४ रोजी त्यांचे निधन झाले.
अन्ना मणी
जेव्हा स्त्रियांना सामाजिक वावर देखील निषिद्ध होता त्याकाळी अन्ना मणी या एक विख्यात हवामानशास्त्रज्ञ होत्या. १९१८ साली त्रावणकोर येथे त्यांचा जन्म झाला. हवामान क्षेत्रात अनोखे शोध लावून मणी यांनी संपूर्ण जगाला थक्क करून सोडले.
हवामानाच्या अंदाज लावण्याच्या अचूक पद्धतींचा त्यांनी शोध लावला. सूर्य किरणांच्या उत्सर्जनाचे मोजमाप करण्यासाठी त्यांनी स्टेशन देखील उभारले. सूर्यकिरणे आणि वाऱ्याची शक्ती यासारख्या उर्जेस्त्रोतांचा वापर करून वीज बनवणाऱ्या साधनांचा त्यांनी शोध लावला.
ओझोन थराचा त्यांनी केलेला अभ्यास आणि ओझोन थराचे मोजमाप करणाऱ्या ‘ओझोनेसोंडी’ या साधनाचाही त्यांनीच शोध लावला. अत्यंत महत्त्वाच्या शोधांपैकी हा एक आहे.
मणी लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. त्याच्या आठव्या वाढदिवसाच्या दिवशी हिऱ्याच्या डूलांऐवजी त्यांनी एनसाय्क्लोपिडीया ब्रिटानिकाची मागणी केली होती. गांधींच्या स्वदेशी चळवळीचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता.
गांधींच्या या चळवळीला पाठींबा दर्शवण्यासाठी त्यांनी कायम खादीची कपडे वापरले. त्यांच्या चारही बहिणींचे विवाह झाले तरी, त्यांनी उच्च शिक्षण घेण्याच्या उद्देशाने लग्नाला नकार दिला.
नंतर त्यांना सीव्ही रमण यांच्या प्रयोगशाळेत काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी हिरे आणि रुबी खनिजांची चमक यावर तपशीलवार अभ्यास करून प्रबंध सदर केला. पण, मद्रास विद्यापीठातील विषमतावादी मानसिकतेच्या लोकांमुळे त्यांना पीएचडी मिळू शकली नाही.
तरी त्या त्यांच्या निश्चयापासून थोड्याही ढळल्या नाहीत, पुढचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी लंडनच्या इम्पेरिअल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांनी पदार्थविज्ञान शास्त्रात संशोधन केले आणि हवामानशास्त्रातील साधनांमध्ये विशेष ज्ञान प्राप्त केले.
१९४८ साली त्या स्वतंत्र भारतात परत आल्या. भारतीय हवामान खात्यात काम करत असताना त्यांनी रेडीएशन इन्स्ट्रूमेंटचा शोध लावला. थुंबा रॉकेट प्रक्षेपण सुविधेच्या ठिकाणी हवामान वेधशाळा आणि इन्स्ट्रुमेंटेशन टॉवर उभारण्याचे श्रेयही त्यांनांच दिले जाते.
१६ ऑगस्ट २००१ रोजी त्यांचे निधन झाले.
नरिंदर सिंग कपानी
पंजाबमध्ये जन्मलेले शास्त्रज्ञ नरिंदर कपानी यांना फायबर ऑप्टिक्सचे जनक मानले जाते. ऑप्टिकल फायबरच्या सहाय्याने संवाद साधण्याचा शोध त्यांनी लावला. याच आधारावर नंतर इंटरनेट आणि मेडिकलमधील लेजर सर्जरी किंवा इंडोस्कोपिंगचे तंत्रज्ञान विकसित झाले.
कपानी यांचेच संशोधन पुढे नेऊन ‘चार्ल्स क्यू को’ यांनी नोबेल पटकावले.
नरिंदर यांचा जन्म १९२७ रोजी मोगा येथील शीख कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांनी आग्रा युनिव्हर्सिटीतून पदवी पूर्ण केली आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांनी लंडनच्या इम्पेरीयल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तंत्रज्ञानात त्यांनी भरपूर संशोधन केले.
याचवेळी त्यांना ऑप्टिकल फायबरवर प्रतिमांचे ट्रान्समिटिंग करण्यात यश मिळाले. ज्याला फायबर ऑप्टिक्स म्हटले गेले. ऑप्टिकल फिजिक्स या एका नव्या ज्ञानशाखेचा उगम त्यांच्या या संशोधनामुळेच झाला.
ते रोचेस्टर येथील विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. नंतर अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली येथे उद्योजक म्हणून स्थिरस्थावर झाले. त्यांच्या नावावर सुमारे १०० पेटंट्स आहेत. सिख फाउंडेशन नावाची एक समाज कल्याणकारी संस्था देखील ते चालवतात.
डॉ. नौतम भट्ट
डॉ. नौतम भट्ट यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतातील विख्यात शास्त्रज्ञांच्या यादीत यांच्या नावाचा समावेश होतो.
मिसाईलमध्ये बसवल्या जाणाऱ्या व्हेरीएबल टाईम फ्युजचा शोध त्यांनीच लावला. दिल्ली येथे फिजिक्स लॅबोरेटरीची स्थापना करण्यात त्यांनीच पुढाकार घेतला. हेलियम-न्युऑन लेजर्स त्यांनीच विकसित केले.
सोलर सेल, सेमिकंडक्टर चिप्स अशा कितीतरी वस्तूंचा शोध त्यांच्याच खात्यावर जमा आहे. त्यांच्या या संशोधनांमुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रात क्रांती घडून आली.
भट्ट यांचा जन्म १९०९ साली गुजरातमधील जामनगर येथे झाला. सी. व्ही. रमण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भौतिकशास्त्रातील उच्च पदवी संपादन केली. पीएचडीच्या संशोधनासाठी ते मॅसॅच्यूसेट येथील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे गेले. भारतात परत आल्यावर ते आयआयएससीमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर, १९४९ साली त्यांना दिल्ली येथील डिफेन्स सायन्स ऑर्गनायझेशनमध्ये नेमण्यात आले. डिफेन्स सायन्स ऑर्गनायझेशनच्या रिवाजानुसार त्यांची अनेक संशोधने सुरक्षेच्या कारणास्तव जाहीर करण्यात आली नाहीत. परंतु, ध्वनी विज्ञानातील त्यांचे योगदान अजिबात विसरता येण्यासारखे नाही.
त्यांच्याच पुढाकाराने भारतात ७०मिमीचे थियेटर्स उभी राहिली. शैला आणि ओडियनसारखी दिल्लीतील थिएटर्स आणि मुंबईतील बिर्ला मातोश्री थिएटरचे ध्वनीविज्ञानावर आधारित डिझाईन त्यांनीच बनवले होते
भारतीय शास्त्रीय संगीताचा नैसर्गिक आस्वाद घेता यावा म्हणून त्यांनीच या वैशिष्ट्यपूर्ण थिएटर्सची रचना आखली होती. या थिएटर्समध्ये संगीत ऐकण्यासाठी लाउडस्पीकर किंवा ऍम्प्लिफायरची गरज पडत नाही.
२००५ साली नौतम भट्ट यांचे निधन झाले.
या पाच शास्त्रज्ञांनी दिलेल्या योगदानाची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली. या शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे आज आपले आयुष्य कितीतरी सुखकर झाले आहे. या शास्त्रज्ञांच्या कार्याची ओळख करून घेणे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता बाळगणे हे एक भारतीय म्हणून आपले आद्यकर्तव्य आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.