आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
कारतलब खानाला आदेश सुटला!! “जाओ, उत्तर कोकण जीत के आओ!”.
त्याकाळी उत्तर कोकण म्हणजे कल्याण, भिवंडी हा भाग येत असे (म्हणजे अजूनही तोच येतो पण आता त्या भागाला कोकण म्हणावयाला मन तयार होत नाही). खानाची स्वारी निघाली. इकडे महाराजांना ही खबर आधीच येऊन पोहोचली होती की खान निघणार आणि तो कुरवंडे घाट मार्गे उंबर खिंडीतूनच जाणार. महाराज हे ऐकून मोट्ठ्याने हसले असावेत, “बरा सापडला!!”
उंबर खिंड!! आंबा नदीचा घळीमुळे झालेला चिंचोळा भाग आणि कुरवंडे घाट तर दुर्गम भागातच मोडणारा!!
बरा सापडला, आता खानाला उतरू दे खिंडीतून.. महाराजांच्या आज्ञा सुटल्या, “खिंडीत मोर्चे बांधा” आणि एवढं बोलून स्वतः जातीने उंबर खिंडीमध्ये डेरेदाखल झाले. किर्र जंगल, दुपारच्या उन्हात सुद्धा समोरची व्यक्ती दिसणार नाही इतकी झाडी.. खानाला पकडायला परफेक्ट जागा!!
इकडे खान पुण्याहून निघाला. तळेगाव वगैरे करत लोहगड-विसापूर किल्ल्यांजवळून गेला. काहीच प्रतिकार नाही वरून. खानाला वाटलं घाबरले बहुतेक! आणि आज्ञा दिली ‘चलो उंबर खिंड!!’ बराच लवाजमा घेऊन खान कुरवंडे घाटाच्या दिशेने निघाला. सोबत जड जवाहीर, दासदासी, अनेक सरदार आणि भरपूर सैन्य. त्याच्या बरोबर रायबागन नावाची राजपूत घराण्यातील शूर स्त्री सुद्धा होती.
कुरवंडे घाटाच्या माथ्यावर आल्यावर खानाचे धाबे दणाणले. हा घाट उतरायचा? इथे येऊन चूक तर नाही ना केली? नानाविविध शंकेने ग्रासलेल्या खानाने अन् त्याच्या सैन्याने घाट उतरण्यास सुरुवात केली. आधीच झालेली बेकार अवस्था आणि त्यात आजूबाजूचे जंगल यातच खानाचे सैन्य ढेपाळले.. घाटाच्या अर्ध्या भागापर्यंत कसे बसे येवून पोहोचले.
आता अजून अर्धेच राहिला होते. इतक्यात जोरदार आरोळी आली!! हर हर महादेव!! अन् खानच्या छातीत धस्स झाले!! या खुदा, भास तर होत नाहीत ना? चहू बाजूंनी सपासप बाण यायला लागले आणि पाहता पाहता खानाचे सैन्य खाली कोसळाला सुरुवात झाली.. खानाला कळेना की नक्की होतंय काय!
घोषणा ऐकू येते आहे, बाण पण येत आहेत पण मराठे कुठे दिसत नाहीत.. खानाला काही कळेनासे झाले, इतक्यात आधीच गोंधळलेल्या मुघालांवर मराठ्यांनी चहुबाजूंनी चालून जात आक्रमण केले आणि खानाचे सैन्य पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळू लागले.
हे असंच चालु राहिले तर आपलं काही खरं नाही हे रायबागनला जाणवले आणि त्या हुशार बाईने खानाला शिवाजी ला शरण जाण्याचा सल्ला दिल्ला.. “अगर खुद को बचाना है तो सिवा को शरण जा वरना खुदा के पास जायेगा!”.
खानालासुद्धा ते पटले आणि त्याने रायबागनलाच आपला वकील म्हणून महाराजांकडे पाठवले. महाराज पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसले होते.. जवळ जाताच रायबागनने महाराजांसमोर नजराणा ठेवला आणि आम्हाला जिवंत परत जावू द्यावे अशी विनंती केली.. महाराजांनीसुद्धा नुसत्या कपड्यानिशी जाण्याचा प्रस्ताव मान्य करत लुटीचे समान ताब्यात घ्यायला सांगितले. पण जाता जाता रायबागनचा वीर स्त्री म्हणून सन्मान करायला ते विसरले नाहीत. उंबर खिंडीमध्ये जाताना हा सारा इतिहास डोळ्यासमोरून सरकत जातो!!
कुरवंडे घाटाकडे जाण्यासाठी जाणारा रस्ता हा लोणावळ्यातील रायवूड जवळून जातो. कुरवंडे गावात जाण्यासाठी जीप्स असतात मात्र त्यांचा काही नेम नाही. स्वत:ची गाडी असली तर उत्तम अन्यथा पायगाडीशिवाय किंवा लिफ्ट मागण्याशिवाय पर्याय नाही.
लोणावळा ते कुरवंडे हे अंतर ६-७ किमी असेल, त्यामुळे लोणावळ्याच्या थंड हवेतून चालतानासुद्धा दम लागत नाही. कुरवंडे गाव तसं बऱ्यापैकी मोठं आहे. जवळच्याच डोंगरावर असणारे शिवमंदिर पाहण्यासारखे आहे. कुरवंडे गावापासून भुशी डॅम अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे वर्षा सहलीचा आनंद घ्यायचा असल्यास, भुशी डॅमपेक्षा हा मार्ग स्विकारावा.
गावातून नागफणीपर्यंत सरळ रस्ता गेलेला आहे आणि नागफणीपासून थोड्याच अंतरावर तो थांबला आहे. मजल दरमजल करत आपण नागफणीच्या मागच्या बाजूला पोहोचतो. या बाजुनी पण नागफणीवर जायला रस्ता आहे. त्यामुळे ज्यांना ३ तासाचा ट्रेक करायचा नाही त्यांच्यासाठी हा मार्ग छान आहे.
साधारण अर्ध्या तासात वर आपण पोहोचतो आणि वरून जो नजारा मिळतो तो केवळ अवर्णनीय. खाली दिसणारा मुंबई-पुणे हा घाटरस्ता, समोर दिसणारे राजमाचीचे दोन डोंगर. यांचे नजारे डोळ्याचे पारणे फेडतो.
घाट उतरण्यास जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा लगेच ध्यानात येते की खानाने इकडे येवून काय चूक केली ते. खरं तर घाट तसा छोटाच आहे पण त्याची दुर्गमता खानच्या पराभवास कारणीभूत ठरली. सध्या गेल गॅस कंपनीच्या पाईप लाईनमुळे घाटाची वाट लगेच कळून येते. घाट उतरताना मध्ये झाडंझुडूप म्हणावा तसा फार नाही. पण रस्ता अगदीच मळलेला आणि उतरण्यास सोपा आहे. पावसाळ्यात तर हा घाट म्हणजे स्वर्गच असतो. दोन्ही बाजूंनी कोसळणारे धबाबा धबधबे आणि धुक्याची दुलई!!
साधारण कुरवंडे पासून २ तासात आपण चावणी या घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावात येऊन पोहोचतो. चावणी हा शब्द कदाचित छावणी या शब्दावरून आला असावा असे वाटते. चावणी गावात जाण्यासाठी अंबा नदीचे पात्र ओलांडावे लागते. उन्हाळ्यात कोरडी असणारी ही नदी पावसाळ्यात भरून वाहत असते तेव्हा रिवर क्रॉसिंगचा मस्त अनुभव घेता येतो.
इथून उंबर खिंड साधारण ३ किमी वर आहे आणि साधारण कोणतेही वाहन जायला मिळत नाही त्यामुळे पायपिटीशिवाय पर्याय नसतो.
उंबर खिंडीची आपली कल्पना आणि प्रत्यक्षातली खिंड यात बरीच तफावत आहे. सध्या तरी याठिकाणी त्या वीरांच्या शौर्याची कथा सांगणारे स्मारक उभारले आहे. नदीच्या बरोबर मध्यात उभारलेल्या स्मारकाच्या जवळ पावसाळा नसताना जाता येते. दोन तलवारी आणि ढाल असे त्या स्मारकाचे स्वरूप आहे. या ठिकाणाला ऐतिहासिक तसेच भौगोलिक महत्त्वसुद्धा आहे.
चावणी ते पाली-खोपोली रस्ता हे अंतर जायला मात्र गाडी शोधावी लागते कारण पुन्हा ७-८ किमी चालण्याची ताकद आपल्यात नसते. मागे वळून पाहिल्यावर दिसणारा कुरवंडे घाट, डाव्या हाताला असणारे ड्युक्स नोज, तसेच उजव्या हाताला वर पोटात काही गुहा असणारा ‘गारमाळ’ डोंगर आपल्याला पुन्हा परत यायचे आमंत्रण देतच असतात.
जायचे कसे-
पुणे-लोणावळा-कुरवंडे-चावणी- खोपोली-पाली रस्ता-खोपोली-पुणे इतका साधा सोपा मार्ग आहे. पण जर घाट उतरणार असाल तर मात्र स्वताची गाडी न नेलेलं चांगलं. पण घाट उतरून परत चढायची ताकद असेल तर गाडीने जाऊ शकता. पुणे ते कुरवंडे हे अंतर ७० किमी आहे.
जेवणाची सोय-
वर कुरवंडे गावात हॉटेल मध्ये नाश्ता मिळू शकतो, जेवणाची खात्री नाही पण नेहमीप्रमाणे सोबत आपले आपले खाणे घेऊन जावे. चावणी गावात जेवणाची सोय नाही.
पिण्याच्या पाण्याची सोय-
पावसाळ्यात गेल्यास ओढ्यातील पाणी पिता येऊ शकते परंतु उन्हाळ्यात काहीही पाणी नाही.
विशेष टीप-
चावणी गावातून खोपोली-पाली रस्त्यावर जाण्यासाठी सोय नाही त्यामुळे एखादी गाडी चावणी येथे बोलावल्यास उत्तम.
सदर लेख SP’s travel stories वर पूर्वप्रकाशित.
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.