आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
जवळपास गेल्या दोन दशकांपासून जागतिक तापमानवाढीची समस्या मोठ्या प्रमाणात समोर आली आहे. मानवानं आपल्या प्रगतीसाठी वातावरणात ग्रीन हाऊस गॅसेस सोडणं सुरू ठेवल्यानं ग्लोबल वॉर्मिंग वाढलं आहे. वाढलेलं तापमान नियंत्रित करण्याचं काम महासागर करतात. जगभरातील समुद्र आणि महासागर ग्रीन हाऊस गॅसेसमधून ९० टक्क्यांपेक्षा अधिक उष्णता शोषून घेतात.
मात्र, त्याचा आता महासागरांवरसुद्धा विपरीत परिणाम होत आहे. त्यांची वाढती पाणी पातळी चक्रीवादळे आणि टायफून यांच्याशी एकरूप होत आहेत. त्यामुळं चक्रीवादळ आणि टायफून्स अधिक धोकादायक स्वरूप धारण करतात. अशी वादळं अधिक पाऊस पाडतात. शिवाय ती अधिक शक्तिशाली असल्यामुळं ते त्यांच्या मार्गातील सर्व गोष्टींचा नाश करतात.
एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की, १९६३ ते २०१२ दरम्यान, अटलांटिक चक्रीवादळांमध्ये झालेल्या मृत्यूंपैकी निम्मे मृत्यू तर अशाच प्रकारच्या वादळांमुळं झाले आहेत. याशिवाय जगभरातील विविध ठिकाणी येणारी हरिकेन्स, टायफून्स दिवसेंदिवस अधिक घातक होत चालली आहेत. पश्चिम पॅसिफिक महासागरानं वेढलेल्या फिलिपीन्स नुकताच याचा अनुभव आला आहे. फिलिपीन्सला रायनावाच्या टायफूननं जोरदार तडाखा दिला आहे. त्यामुळं या लहानशा देशाची मोठ्या प्रमाणात वाताहात झाली आहे.
फिलिपीन्समधील परिस्थिती जाणून घेण्याअगोदर आपण टायफून्स आणि हरिकेन्स यांच्यामध्ये काही फरक आहे का? आणि असेल तर तो काय आहे, हे जाणून घेऊया. हरिकेन्स आणि टायफून्स या दोन्हीही सारख्याच घटना असून ट्रॉपिकल सायक्लोन्सचे ते प्रकार आहेत. साधारणपणे गडगडाटी वादळांचे वर्णन करण्यासाठी ट्रॉपिकल सायक्लोन हा शब्द वापरला जातो. अशी वाटळं उष्णकटिबंधीय पट्ट्यातील पाण्यावर तयार होतात. सर्वात कमी तीव्रतेच्या ट्रॉपिकल सायक्लोनला ट्रॉपिकल डिप्रेशन म्हणतात. ज्यावेळी या डिप्रेशनची तीव्रता वाढून ताशी ३९ मैलांच्या वेगानं वारे वाहू लागतात तेव्हा त्याचं वादळात रुपांतर होतं.
जर या वादळातील वाऱ्यांचा वेग ताशी ७४ मैल किंवा त्याहून अधिक झाला तर त्याला हरिकेन किंवा टायफून म्हणतात. उत्तर अटलांटिक, मध्य उत्तर पॅसिफिक आणि ईशान्य पॅसिफिकमध्ये अशा वादळांना हरिकेन या नावानं ओळखतात तर वायव्य पॅसिफिकमध्ये अशा वादळांना टायफून म्हणतात. फिलिपीन्स आणि आसपासच्या देशांमध्ये चक्रीवादळांना टायफून म्हटलं जातं.
गुरुवारी (१६ डिसेंबर २०२१) राय नावाचं टायफून फिलीपिन्सच्या आग्नेय भागात येऊन धडकलं. वादळासोबत मुसळधार पाऊस पडल्यानं ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत तीन लाखांपेक्षा जास्त नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं असून २१ जणांचा बळी गेला आहे. सध्याची स्थिती पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात घरांची पडछड झाली असून कम्युनिकेश सिस्टीम विस्कळीत झाली आहे. राय टायफूनच्या रुपात फिलीपिन्स यावर्षीच्या १५व्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करत आहे. टायफूनच्या बाह्यभागात ताशी १२० मैल वेगाने तर केंद्रस्थानी ताशी १६८ मैल वेगाने वारे वाहत होते. त्यामुळं तज्ज्ञांनी राय टायफूनची ‘सुपर टायफून’ म्हणून नोंद केली आहे.
कारण, रायची तीव्रता युनायटेड स्टेट्समधील पाच हरिकेन इतकी होती. २०१३ साली आलेलं ‘हियान’ हे फिलीपिन्सला धडकणारं सर्वात शक्तिशाली सुपर टायफून होतं. त्यामुळं ६ हजार ५०० पेक्षा जास्त लोक मृत आणि बेपत्ता झाले होते. फिलीपिन्स टायफून बेल्टवर वसलेला देश आहे. त्यामुळं याठिकाणी एका वर्षात सुमारे २० विध्वंसक वादळं येतात.
स्थानिक पातळीवर ‘ओडेट’ (टायफून राय) नावाने ओळखलं जाणारं हे टायफून गुरुवारी सियारगौवच्या पूर्वेकडील बेटावर येऊन धडकलं. राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाच्या माहितीप्रमाणं, सियारगौव बेटाचा बहुतांशी भाग, सियारगौव शहर, शेजारील मिंडानोव बेटावरील सुरीगौव शहरात प्रचंड नुकसान झालं आहे.
दोन्ही ठिकाणी वादळामुळं कम्युनिकेशन पूर्णपणे ठप्प झालेलं आहे. सध्या १८ हजारांहून अधिक सैनिक आणि आपत्ती निवारण विभागाचे कर्मचारी फिलीपिन्समध्ये शोध आणि बचाव कार्यात व्यस्त झाले आहेत. फिलीपीन कोस्ट गार्डनं सोशल मीडियावर वादळाचा तडाखा बसलेल्या सुरीगौव शहराचे काही फोटो शेअर केले आहेत. वादळामुळं शहरात मोठ्या प्रमाणावर विनाश झाल्याचं या फोटोंमधून लक्षात येत आहे. अनेक इमारतींची छतं उडून गेली आहेत, लाकडी बांधकामं पूर्णपणे कोसळून गेली आहेत, झाडं उन्मळून पडली आहेत. आसपासच्या शेकडो एकरांमधील भातशेती पाण्याखाली गेल्याचं एरियल फुटेजमध्ये दिसत आहे.
वादळ प्रत्यक्ष किनारपट्टीला धडकून दोन दिवस झाल्यानंतर आता वाऱ्यांची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळं आता नुकसानग्रस्त भागातील मदतकार्याला वेग आला आहे. स्थानिकांनी देखील आपापली घरं दुरुस्त करण्यास सुरुवात केली आहे. नुकसानग्रस्त भागातील लोकांना पिण्याचे पाणी, औषधं, निवारा आणि जीवनावश्यक गोष्टींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे.
अनेक रुग्णालयांमघध्ये वित्तहानी झाली आहे. त्यामुळं रुग्णालयांतील रुग्णांनादेखील जेवण आणि औषधांची गरज आहे. बाहेरून मदत पाठवून या गरजा पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. कारण, वादळामुळं विमानतळं आणि बंदरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. ज्या भागाला राय टायफूनचा तडाखा बसला आहे. ते प्रांतांची अर्थव्यवस्था प्रामुख्यानं पर्यटनावर अवलंबून आहे.
शिवाय हे भाग आत्ताशी कुठे साथीच्या आजारातून हळूहळू सावरत होते. याठिकाणी गेल्या वर्षभरात लॉकडाऊन आणि मंदीमुळे उपासमारीच्या सर्वाधिक घटना घडल्या होत्या. आता वादळामुळं या लोकांची पुन्हा वाताहत झाली असून त्यातून बाहेर पडण्यास त्यांना किती वेळ लागेल, हे सांगण कठिण आहे.
गेल्या काही काळापासून वातावरणामध्ये अनपेक्षित बदल होत आहेत. त्यांचा अंदाज लावणं शास्त्रज्ञांना कठिण जात आहे. शास्त्रज्ञांनी यापूर्वीच इशारा दिला आहे की, दिवसेंदिवस ग्लोबल वॉर्मिंगचे जास्त परिणाम दिसत आहेत. महासागरांतील पाण्याचं तापमान वाढत असल्यानं टायफून अधिक शक्तिशाली होत आहेत. फिलीपीन्सला या गोष्टीचा वाईट अनुभव आला. राय टायफून पुढे व्हिएतनामकडं सरकलं आहे. त्याठिकाणी किती हानी होते, हे पाहण्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही. अशा नैसर्गिक आपत्तींपासून मानवानं काहीतरी धडा घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.