आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
मानव हा समाजप्रिय प्राणी आहे असे आपण अनेकदा समाजशास्त्रात किंवा विज्ञानाच्या पुस्तकांमध्ये ऐकले असेल. पण गेल्या काही वर्षांमध्ये माणूस समाजप्रिय नाही तर ‘जमाव’प्रिय प्राणी असल्याचे दिसून येत आहे. एखादी वाईट अथवा गुन्हेगारी स्वरूपाची घटना घडल्यास त्या घटनेबद्दल कोणताही विचार न करता वर वर ‘संशयित आरोपी’ दिसत असणाऱ्या व्यक्तीला ‘सॉफ्ट टार्गेट’ करून त्यालाच दोषी ठरवण्याच्या अनेक घटना आजवर घडल्या आहेत. पालघरमध्ये घडलेली घटनासुद्धा अशीच काहीशी होती. सत्य आणि नीतिमत्तेचे गुणगान करणारा मानव स्वतः त्या मार्गाचा अवलंब करीत नाही हे कटूसत्य आणि वस्तुस्थिती आहे.
जर तुम्ही ८० मूर्ख आणि अतार्किक लोकांच्या एखाद्याला लिंच करणाऱ्या जमावात २० हुशार, तार्किक आणि दयाळू लोकांना टाकले तर ते २० लोक गर्दीत स्वतःची बुद्धिमत्ता आणि विचार करण्याची क्षमता पूर्णतः गमावतील. ते २० लोकही कोणताही विचार न करता त्या ८० लोकांमध्ये सहजतेने सामील होऊन जातील. दुर्दैवाने मानसिकता अशीच काहीशी आहे.
लोकांवर चुकीचा आरोप करणे आणि व्यक्तीला स्वतःचा बचाव करण्याची संधी मिळण्यापूर्वी त्यांना तुरुंगात टाकणे किंवा मृत्युदंड देणे इथपर्यंत ‘मॉब’ किंवा ‘जमावा’ची मानसिकता गेलेली असते. ‘टिमोथी इव्हान्स’ नावाच्या ब्रिटिश नागरिकाबरोबरही असंच काही घडलं. टिमोथीवर त्याची पत्नी आणि मुलीची हत्या केल्याचा चुकीचा आरोप लावण्यात आला होता आणि याच आरोपाखाली त्याला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. हे प्रकरण नेमकं काय होतं हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न..
- एक अयशस्वी विवाह:
टिमोथीचा जन्म वेल्समध्ये झाला. त्याच्या जन्माआधीच त्याच्या वडिलांनी कुटुंबाचा त्याग केला. कालांतराने त्याच्या आईने पुनर्विवाह केला आणि तिला एक मुलगी झाली. टिमोथीची शारीरिक परिस्थिती फार बिकट होती. लहानपणी त्याला बोलण्यामध्ये अडचणी येत असत, त्यामुळे तो वर्गात नेहमीच मागे पडायचा. एका अपघातानंतर त्याच्या पायावर तीव्र पुरळ उठली, त्यामुळे बराच काळ तो शाळेत जाऊ शकला नाही.
या सर्व कारणांमुळे मोठेपणी टिमोथीला लिखाण आणि वाचन जमत नव्हते. तो आपल्या होणाऱ्या पत्नीला, बेरीलला अनपेक्षितपणे भेटला आणि काही महिन्यांतच, २० सप्टेंबर १९४७ रोजी त्यांनी लग्न केले. १० ऑक्टोबर १९४८ रोजी त्यांना पहिली मुलगी झाली. तिचे नाव गेराल्डिन. गेराल्डिनच्या जन्मानंतर हे कुटुंब ‘नॉटिंग हिल’ येथे वास्तव्यास गेले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने दोघांनाही आर्थिक व्यवस्थापन नेटकेपणाने करता आले नाही. परिणामी याच गोष्टीचा विपरीत परिणाम त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर होऊ लागला.
बेरील घरकामामध्ये चांगली नव्हती. तिने अनेकदा टिमोथीने कमावलेल्या पैशांचा गैरवापर केला. सतत होणाऱ्या पराकोटीच्या वादांमुळे टिमोथीला मद्यपानाची सवय लागली आणि त्याने आपल्या कमाईतील बरेचसे पैसे मद्यपानावर खर्च केले. यामुळे टिमोथी आणि बेरीलमधील वाद आणखी वाढू लागले आणि अनेकदा या वादांचे किंवा शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर थेट हिंसाचारात होऊ लागले. हे सगळी परिस्थिती त्यांच्या शेजाऱ्यांना समजत होती. १९४९ साली बेरील पुन्हा गर्भवती राहिली. पण यावेळी तिने बिकट आर्थिक परिस्थितीमुळे गर्भपात करण्याचे ठरवले.
- बेरीलचा मृत्यू:
गर्भपाताच्या घटनेच्या काही आठवड्यांनंतर विचित्र घटना घडल्या. टिमोथी पोलिसांकडे गेला आणि आपल्या पत्नीला गर्भपात करण्यास प्रवृत्त करण्यासाठी क्वॅकचे औषध देऊन चुकून तिची हत्या केली असे त्याने कबूल केले. इंग्लंडमध्ये त्यावेळी गर्भपात हा गुन्हा असल्याने त्याने पोलिसांना कबुली जबाब दिला होता.
परंतु, टिमोथीने नंतर आपली स्टोरी बदलली. टिमोथीने नन्तर दिलेल्या कबुली-जबाबानुसार, त्याने आपल्या पत्नीशी भांडण केले. नंतर त्याने तिचा गळा दाबून हत्या केली आणि तिचा मृतदेह नाल्यात फेकून दिला असे सांगितले. त्याने पुन्हा आपली स्टोरी बदलली आणि त्याने त्याच्या शेजारी असलेल्या ‘जॉन क्रिस्टी’ला आपल्या पत्नीचा गर्भपात करण्यास सांगितले होते असे सांगितले.
- कुप्रसिद्ध जॉन क्रिस्टी:
मृतदेह अखेरीस क्रिस्टीच्या बागेत सापडले. बेरील आणि गेराल्डिन या दोघांचीही गळा दाबून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी क्रिस्टीची नीट चौकशीही केली नाही. त्यांनी टिमोथीला त्यांच्या मृत्यूची माहिती दिली आणि त्याच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला कारण त्याला आपल्या मुलीचा मृत्यू केवळ अनपेक्षित होता आणि तिच्या मृत्यूबद्दल त्याला पुसटशीही कल्पना नव्हती. घटनास्थळाच्या आसपास असणाऱ्यांची साक्ष शिवाय क्रिस्टीने टिमोथीच्या विरोधात कठोरपणे साक्ष दिल्याने खटला वेगाने पुढे गेला.
टिमोथी निर्दोष असल्याचा निकाल मिळण्याची शक्यता अतिशय कमी होती, कारण त्याने याआधी अनेक वेळा आपली स्टेटमेंट्स बदलून गोंधळाची परिस्थिती निर्माण केली होती. त्याला दोषी ठरवण्यात आले आणि ९ मार्च १९५० रोजी त्याला फाशी देण्यात आली. खरी कथा टिमोथीच्या फाशीनंतर सुरू होते..
टिमोथीला फाशी दिल्यानंतर तीन वर्षांनी टिमोथीच्या खटल्यातील मुख्य साक्षीदार, क्रिस्टी हा एक सीरियल किलर होता हे पोलीस अधिकाऱ्यांना कळले. क्रिस्टीने राहत असलेल्या जागेवरून स्थलांतर केले होते आणि तिथे आलेल्या नवीन भाडेकरूला त्याच्या किचनमध्ये अनेक महिलांचे मृतदेह सापडले.
- न्यायव्यवस्थेचे अपयश:
टिमोथीचे हे संपूर्ण प्रकरण न्यायव्यवस्थेचे संपूर्ण अपयश होते. कालांतराने टिमोथीच्या विधानात वापरलेली बरीचशी स्थानिक भाषा एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याने बोलली आणि लिहिली आहे असे लक्षात आले. टिमोथीने आपल्या पत्नी आणि मुलीची हत्या केली हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी या प्रकरणात बरीच फेरफार केली होती, असे लक्षात आले.
कालांतराने दोन कामगारांच्या साक्षीकडे साफ दुर्लक्ष केले गेले होते हे सुद्धा लक्षात आले. त्या दोन साक्षीदारांच्या मते, टिमोथी निर्दोष होता. पण या दृष्टिकोनातून तपास केला असता तर केस आणखी गुंतागुंतीची झाली असती. जेव्हा बेरील आणि गेराल्डिनचे मृतदेह क्रिस्टीच्या बागेतून बाहेर काढण्यात आले, तेव्हा पोलीसांना त्या परिसरात इतर पीडितांची हाडे आहेत हे एकतर लक्षात आले नाही किंवा त्यांनी याकडे पूर्ण दुर्लक्ष केले.
यानंतर मात्र क्रिस्टीची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याने दोन स्टोरीज सांगितल्या. पहिल्या स्टोरीमध्ये त्याने बेरीलबरोबर लैंगिक संबंध ठेवताना चुकून तिची गळा दाबून हत्या केली असे सांगितले. तर दुसऱ्या स्टोरीमध्ये बेरीलला आत्महत्या करायची होती म्हणून तिला ठार मारले असे त्याने सांगितले.
बेरीलने गर्भपात करण्यासाठी क्रिस्टीला घरी बोलावले होते असे दिसते, पण गर्भपात करण्याऐवजी त्याने बेरीलची आणि तिच्या मुलीचीच हत्या केली. टिमोथीचे प्रकरण हे इंग्लंडने पाहिलेल्या न्यायव्यवस्थेच्या सर्वांत मोठे अपयश आहे. अखेरीस त्याच्या बाजूने पुन्हा निकाल लावण्यात आला. पण बेरील आणि तिच्या मुलीला क्रिस्टीनेच मारले हे या सगळ्यावरून सिद्ध झाले होते.
- समारोप:
बघता बघता ही केस सार्वजनिक झाली आणि त्यानंतर ब्रिटनच्या पोलीस तसेच न्यायव्यवस्थेत अनेक सुधारणा करण्यात आल्या. या प्रकरणात सहभागी असलेल्यांपैकी कोणीही टिमोथीला मदत केली नाही. संपूर्ण न्याय व्यवस्था त्याच्या विरोधात पक्षपातीपणाने उभी होती, कारण तोच ‘सॉफ्ट टार्गेट’ होता. समाजरुपी जमावाने त्याच्या आयुष्याचे नुकसान केले आणि त्याने न केलेल्या गुन्ह्यांसाठी त्याचा मृत्यू झाला.
एक प्रजाती म्हणून आपण अजूनही सदोष आहोत आणि आपल्याकडे जमावाच्या मानसिकतेला अनुकूल असलेला आंतरिक पूर्वाग्रह आहे, हीच शोकांतिका!!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.