आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आधुनिक भारतात प्रवासाची अनेक साधनं उपलब्ध आहेत. भारतासारख्या आकाराने मोठ्या देशात मोटारसायक पासून ते विमानापर्यंतची प्रवासासाठीची साधनं लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवासासाठी वापरतात. यामध्ये बस आणि रेल्वेचा प्रवास सामान्य माणसांना परवडणारा प्रवास असल्याने त्यात मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचं दिसून येतं.
विमानप्रवास हा सर्वांनाच परवडणारा नसतो, तसंही काही मार्गांवर विमान प्रवासाची गरज नसतानाही वेळ वाचवण्यासाठी किंवा अन्य काही कारणांसाठी विमान प्रवास केला जातो. भारतातील वाढत्या विमानप्रवासामुळे एअर इंडिया बरोबरच अनेक विमान कंपन्या काम करू लागल्या. यामध्ये बहुतांश कंपन्या खाजगी आहेत.
या खाजगी कंपन्यांमध्ये नफा मिळवण्यासाठी आणि बाजारावर वर्चस्व गाजवण्यासाठी त्याच्यामध्ये सतत चढाओढ सुरु असते. जास्तीचा नफा मिळवण्यासाठी आणि भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत आपला पाय रोवण्यासाठी अनेक कंपन्या वेगवेगळ्या शक्कल लढवतात. काही प्रमाणात याचा ग्राहकांना फायदासुद्धा होतो. कारण या स्पर्धेमध्ये सोयी-सुविधा मात्र सर्वोत्तम दिल्या जातात.
सोयी-सुविधा देऊन आणि ग्राहकांचा विमान प्रवास सुखकर करून, परवडणाऱ्या दरात विमान प्रवास उपलब्ध करवून देणे म्हणजे या विमान कंपन्यांसाठी तारेवरची कसरतच. या सगळ्या सेवा देऊनही जास्तीत जास्त पैसे कसे वाचवता येतील यावर या विमान कंपन्यांचं लक्ष असतं. पण भारतातील एका विमान कंपनीने एक अजबच शक्कल लढवत पैसे वाचवण्याचा प्रयत्न केला.
एका खाजगी भारतीय विमान कंपनीने फक्त महिला फ्लाइट अटेंडंट्सची भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या मते महिला फ्लाईट अटेंडंट्सचे वजन पुरुषांपेक्षा कमी असल्याने विमानातील इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होणार होती. कमी किमतीत विमान प्रवास उपलब्ध करून देणारी ही विमान कंपनी पुरुषांपेक्षा कमी २० ते ३० किलो कमी वजन असलेल्या एअर-होस्टेसचीच भरती करत असे .
या विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार प्रत्येक वाढीव किलोग्रॅमच्या वजनामागे व्यावसायिक विमानातील इंधनाचा खर्च तासाला ३ रुपये इतका येतो. त्यामुळेच विमानातील वजन कमी केल्यामुळे बचत होते. गो-एअर विमान कंपनी सध्या ५४ व्यावसायिक विमानांचे संचलन करते, या विमानांसाठी गो-एअरने ३३० क्रू-मेम्बर्सची नेमणूक केली होती, या ३३० क्रू-मेंबर्सपैकी १३२ पुरुष होते.
वजन कमी करण्यासाठी महिलांच्या भरतीबरोबरच त्यांनी विमानातील नियतकालिके काढून टाकून आणि विमानातील पिण्याच्या पाण्याचे टाके रिकामे करून वजन कमी करण्याचा प्रयत्न केला.
गो फर्स्ट विमान कंपनी, गो-एअर म्हणून २००५ साली मुंबई येथे स्थापित झाली. गो-फर्स्ट भारतातील सगळ्यात कमी किमतीत विमान प्रवास उपलब्ध करवून देणारी एअर-लाइन आहे. गो-फर्स्ट विमान कंपनी वाडिया समूहाच्या मालकीची होती.
नोव्हेंबर २००५ मध्ये गो-एअर कंपनीने एअरबस ए-320 या विमानांचा ताफा चालवायला सुरुवात केली. मार्च २०२० पर्यंत या विमान कंपनीने मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, कोलकाता, चंदीगड आणि कन्नूर येथील केंद्रांमधून २७ देशांतर्गत आणि ९ आंतरराष्ट्रीय स्थळांसह ३६ ठिकाणांसाठी दररोज ३३० उड्डाणे चालवली.
गो फर्स्टने एअरबस ए-320 विमानाने ४ नोव्हेंबर २००५ रोजी मुंबई ते अहमदाबाद प्रवास करून त्यांची यशस्वी यात्रा सुरु केली. विशेष म्हणजे या विमान कंपनीने सुरुवातीला एकाच विमानाने आपला व्यवसाय सुरु केला. यामध्ये त्यांनी गोवा आणि कोइम्बटोर सह आणखी दोन ठिकाणी आपली सेवा सुरु केली. मार्च २००८ मध्ये त्यांची ३६ विमाने खरेदी करण्याची योजना होती.
मार्च २००८ मध्ये गो-एअर विमान कंपनीने वर्षअखेरीस इशान्य आणि दक्षिण भारतात ११ विमानांचे संचालन करण्याची आणि नवीन ठिकाणी सेवा देण्याची घोषणा केली. पण वाढत्या इंधन दरांमुळे जून २००८ मध्ये अस्तित्वात असलेल्या विमानांची संख्या कमी करणारीसुद्धा गो-एअर पहिली विमान कंपनी ठरली.
या सगळ्या अडचणींवर मात करत एप्रिल २०१२ मध्ये, किंगफिशर एअरलाइन्स ठप्प झाल्यानंतर भारतीय बाजारपेठेतील ग्राहक शेअरच्या दृष्टीने गो फर्स्ट भारतातील पाचव्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी बनली. इंडिगो आणि स्पाइसजेट या एकाचवेळी स्थापन झालेल्या विमान कंपन्यांच्या तुलनेत गो-एअर विमान कंपनीची वाढ अतिशय मंद आहे.
पण कंपनीच्या मते, भारतात मोठी स्पर्धा असल्याने ही त्यांची रणनीती आहे. बाजारपेठेत शेअरचा हिस्सा मिळवण्यापेक्षा आणि मुक्कामाची ठिकाणं वाढवण्यापेक्षा मोठा नफा मिळवण्यावर त्यांचं लक्ष असल्याचं सांगितलं.
ही कंपनी सध्या बंद पडलेली आहे.
या विमान कंपनीची मालकी भारतातील वाडिया समूहाकडे असून वाडिया समूह आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारा भारतीय उद्योग समूह आहे. या समूहाचे मुख्यालय मुंबईमध्ये असून याची स्थापना १७३६ मध्ये लवजी नुसरवंजी वाडिया यांनी केली होती. यावेळी मुंबईत जहाजे आणि डॉक्स बांधण्यासाठी लवजी वाडिया यांनी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीशी करार केला.
या आणि यानंतरच्या प्रयत्नांमुळे मुंबई हे पूर्ण आशियातील ब्रिटिश वसाहतींच्या उपक्रमांसाठी मोक्याचे बंदर बनले. मुंबई ड्राय-डॉक, आशियातील पहिला ड्राय-डॉक आहे, १७५० मध्ये लवजी वाडियांनी त्यांचा भाऊ सोराबजी यांबरोबर हा डॉक बांधला होता. त्याचबरोबर ब्रिटिश आरमाराच्या काही जहाजबांधणीची कामंही वाडिया समूहाने केली होती.
वाडिया ग्रुपचे सर्वेसर्वा नेस वाडिया आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रिटी झिंटा यांच्यात फेब्रुवारी २००५ ते २००९ पर्यंत प्रेमप्रकरणाची आणि त्यात उडालेल्या ठिणग्यांची भारतीय मीडियाने चांगलीच दखल घेतली होती. ती एक उत्तम अभिनेत्री होती, तो एक अव्वल बिजनेसमन होता. २००५ साली दोघेही भेटले आणि एका परिकथेची सुरुवात झाली. पण सगळ्याच प्रेमकथांचा शेवट मधुर नसतो पुढे या प्रकरणाने ज्वलंत स्वरूप घेतले. नेसने एका पार्टीत प्रितीला कानशिलात लगवल्याच्या बातम्या आल्यानंतर त्यांच्या प्रेमात पहिली ठिणगी २००९ मध्ये पडली, त्यानंतर काही महिन्यांनी त्यांचा ब्रेकअप झाला. पण त्यांच्या विभक्तपणाबद्दल ते कधीही सार्वजनिकपणे बोलले नाहीत.
१३ जून २०१४ रोजी प्रिटीने वानखेडे स्टेडियमवर आयपीएल सामन्यात नेसने आपल्यावर ह*ल्ला केल्याचा आरोप करत त्याच्याविरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली. शिवाय जपानच्या न्यायालयाने नेस वाडियाला अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली. ही शिक्षा सुनावताना न्यायालयाने त्याची पाच वर्षांची शिक्षाही स्थगित केली. पण ही शिक्षाही स्थगित झाल्याच्या बातम्या मध्यंतरी येत होत्या.
संदर्भ : GoAir opts for female crew to save fuel
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.