आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
जंगली प्राणी हिं*स्रच असतात असा एक दृढ समज रुजलेला आहे. एखाद्या माणसाने जरी काही घृणास्पद कृत्य केले तर त्याला लगेच जंगली श्वापदाची उपमा देऊन आपण मोकळे होतो. लांडगा या प्राण्याबद्दल तर मानवी समाजात कितीतरी नकरात्मक भावना जोपासलेल्या आहेत. धूर्त लांडगा, लबाड लांडगा, ढोंगी लांडगा, अशा कितीतरी विशेषणांनी लांडग्याचे वर्णन आपण कुठे न कुठे वाचलेले किंवा ऐकलेले असेल. इसापनीती किंवा पंचतंत्राच्या गोष्टीतूनही नेहमीच लांडग्याला खलनायक म्हणूनच रंगवण्यात आले. बायबल आणि निसर्ग यांचीही सांगड खूप जुनी. बायबलमधेही लांडग्याला दुष्ट, वाईट आणि नकारात्मक शक्तींचे प्रतिक मानले गेले.
खरे तर कुठलाही जंगली प्राणी हा काही कारण असल्याशिवाय हिं*स्र होत नाही. एकतर तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हिं*स्र होतो किंवा पोट भरण्यासाठी. शेवटी मांसाहारी प्राण्यांचे जीवनच इतर प्राण्यांच्या शिकारीवर अवलंबून आहे. निसर्गानेच त्यांना तशी योजना दिली आहे. या दोन मुलभूत प्रेरणेतूनच जंगली प्राणी हिं*सक होतात. विनाकारण हिं*सक होणारा एकमेव प्राणी म्हणजे मानव. हे माहित असतानाही सर्वच संस्कृतीतील लोकगीते, लोककथा, पुराणकथा यांनी लांडग्यासारख्या जंगली प्राण्याला नेहमीच वाईट ठरवले.
पण, खरेच इतर जंगली प्राण्यांपेक्षा लांडगे अधिक हिं*स्र असतात का? तर याचे उत्तर “नाही”, असेच द्यावे लागेल. त्यांना काही तरी त्रास दिल्याशिवाय किंवा भूक लागल्याशिवाय ते हिं*सक होत नाहीत. तसेच काही ठोस कारण असल्याशिवाय ते मानवावर ह*ल्ला करत नाही.
लांडगा हा इतर प्राण्यांच्या तुलनेत खूपच समाजशील प्राणी आहे. मोगलीसारख्या कथेत आपण बघितले आहे की, जंगलात हरवलेल्या माणसाच्या पिल्लाला लांडग्यांच्या कुटुंबानेच आधार दिला होता. तरीही वास्तवात लांडगा विनाकारण बदनाम आहे.
युरोपच्या मध्ययुगीन काळातील साहित्य वाचल्यास त्यात मोठ्या प्रमाणात लांडग्याला एका दुष्ट शक्तीचा प्रतिनिधी अशा स्वरुपात चित्रित केल्याचे आढळते. माणसाच्या ठायी असणाऱ्या विकृत वृत्ती लांडग्याच्या नावावर खपवून त्याबद्दल गोष्टी लिहिण्यात आल्या. लांडगा म्हणजे एक वाईट शक्ती असा समज दृढ करण्यात मध्ययुगीन साहित्याने मोठा हातभार लावला.
ख्रिश्चन धर्मात तर सरळ सरळ वाईट आणि चांगले अशा दोन प्रवृत्तीत नेहमीच संघर्ष दाखवण्यात आला आहे. त्यातही साहित्यात तर लांडगा हा वाईट शक्तीचेच रूप असल्याचे मानण्यात आले.
मध्ययुगीन काळात लांडग्यांचा तिरस्कार आणि त्यांच्याबद्दल भीती वाटावी यासाठी कित्येक गोष्टी कारणीभूत होत्या. श्रीमंत आणि सरंजामदार वर्गात मात्र लांडगा हा उपद्रवी प्राणी नाही तर माणसाच्या जीवाचा शत्रू असल्याचे मानले जात असे. त्याकाळातील राजे, सरदार यांना शिकारीचा छंद होता, तेव्हा शिकारीला खूप प्रोत्साहनही दिले जायचे. त्यातही लांडग्याच्या शिकारीसाठी मोठमोठी बक्षिसे दिली जात असत.
खरे तर त्यावेळी लांडगा हा काही फार धोकादायक प्राणी होता असे नाही कारण तेव्हा जंगली जनावरांचा पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात वावर असायचा. आज मात्र माणसाच्या शिकारीच्या हव्यासाने जंगलातील प्राण्याचे जीवन धोक्यात आले आहे. अनेक प्राणी नामशेष झाले, तर काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
लांडगे तर आधीच विनाकारण बदनाम आहेत. त्यात ८४६ साली फ्रेंच गॅलिक प्रदेशात लांडग्यांनी उच्छाद मांडला होता. खरे तर लांडगा हा जंगली प्राणी त्याला सपाट प्रदेशात राहण्याची माहितीच नव्हती. शिकार, जंगलतोड अशा कारणाने जंगलातील लांडग्यांचा अधिवासच संपल्यात जमा होता. पोट भरण्यासाठी हे लांडगे जंगलातून बाहेर पडायचे आणि मानवी वस्तीत घुसायचे. मानवी वस्तीत “घुसला रे घुसला” असे समजले की लगेच त्याची शिकार केली जायची. पण लांडगे जंगल सोडून मानवी वस्तीत का घुसले? त्यांना जंगलातून बाहेर का यायला लागले? याचा काहीही अभ्यास न करता लांडग्यांना दुष्ट ठरवून माणसांनी आपले हात झटकले.
युरोपमध्ये कडाक्याची थंडी पडली असताना लांडग्यांचे कळपच्या कळप मानवी वस्तीत घुसत होते. माणसाला ओढून नेऊन त्याला फाडून खात होते.
शेत, शेतातील जनावरे, यांच्यावरही त्यांचा डोळा होताच. जंगलात त्यांना पुरेसे अन्न मिळत नव्हते म्हणूनच ते जंगल सोडून मानवी वस्तीत घुसले. जंगलात अन्न मिळण्याची शाश्वती राहिली नाही तेव्हा लांडगे कळपा कळपाने सपाट प्रदेशात येऊ लागले. मात्र लांडग्यांच्या या कळपांनी माणसांच्या वस्तीत प्रवेश करण्यास सुरुवात केली.
जंगलात जर त्याचे पोट भरत नसेल तर तो मानवी वस्तीत येणे स्वाभाविकच होते. पण लांडगा दिसताच लोक त्याला ठार करण्यासाठी धावत असत.
याच काळात माणसाची लांडग्याबद्दलची भीती आणखीन वाढत गेली. अनेक संतांनी लाडग्यांना कशा प्रकारे माणसाळले त्याही कथा प्रसिद्ध आहेत. या लांडग्यांना त्यांनी माणसाळले, अशा कथा असल्या तरी खूपच तुरळक होत्या.
१४३८ सालीही युरोपात लांडग्यांच्या कळपांनी खूपच उच्छाद मांडला होता. अनेक गावांत हे लांडगे कळपाने शिरत होते. हे लांडगे अचानक मानवी वस्तीत घुसत आणि जे काही वाटेत दिसेल त्याला ओढून नेत असत. कधी कधी प्रौढ व्यक्ती तर कधी लहान मुलं देखील. लांडग्यांच्या अचानक बदलेल्या या वर्तनामुळे मानवी वस्तीत हाहा:कार माजला होता. लांडगे कधी येतील आणि कधी कोणाला धरून नेतील नेम नाही. शिवाय लांडग्यांची शिकार करणेही सोपे नव्हते कारण ते कळपाने येत. चारी बाजूंनी त्यांच्या होणाऱ्या ह*ल्ल्याला प्रतिकार करणे शक्यच नव्हते.
लांडग्यांच्या या द*हश*तीला घाबरून कोणी घरातून बाहेरच पडत नसे. घरातून बाहेर पडलो तर सुरक्षित घरी परतू याची कुणालाच शाश्वती नव्हती. सगळ्यांनी आपापल्या घराभोवती काही ना काही सरंक्षक तरतुदी करून घेतल्या होत्या. तरीही दूर रानात, शेतात राहणारे शेतकरी आणि त्यांची जनावरे असुरक्षितच होती.
एकीकडे लांडग्यांची द*हश*त आणि दुसरीकडे लांडग्यांबद्दलच्या गैरसमजुती यामुळे आणखीनच भीतीचे वातावरण पसरले. संत कसे आपल्या अंगच्या दैवी सामर्थ्याने या लांडग्यांना शांत करत वगैरे वगैरे काल्पनिक कथाही पसरू लागल्या होत्या.
लोकांनी स्वसंरक्षणासाठी वेगवेगळे उपाय शोधले. हळूहळू लांडग्यांचा त्रासही कमी झाला. आज मात्र अनेक ठिकाणी अक्षरशः हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच लांडगे उरलेत. भारतातील लांडग्यांची संख्याही कमी झाली आहे. जीवशास्त्रज्ञांना आता ही प्रजाती देखील नष्ट होईल की काय अशी भीती वाटू लागली आहे.
पण, आता तरी लांडग्यांबद्दलचे गैरसमज आणि त्यांची ठरलेली दुष्ट प्रतिमा बदलेल का? हा प्रश्न कायम आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.