आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
पहिलं महायुद्ध झालं तेव्हा भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. साहजिकच, भारतातुन ब्रिटिशांच्या बाजूने लढायला अनेक तुकड्या युरोपला रवाना झाल्या होत्या.अनेक भारतीय सैनिकांना तिथे प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. त्या भारतीय सैनिकांपैकी एक होते सिसिर सर्बाधिकारी.
‘ऑन टू बगदाद’ या त्यांच्या पुस्तकात त्यांनी आपल्या पहिल्या महायुद्धाच्या आठवणी टिपून ठेवल्या आहेत. सिसिर सर्बाधिकारी कोण होते आणि त्यांनी युध्दावेळी काय भोगले याचे वर्णन त्यांच्या पुस्तकात करण्यात आले आहे.
१९१४ साली ब्रिटनने जर्मनी आणि ऑस्ट्रियाच्या सैन्यावर हल्ला चढवला. हे युद्ध सुरू होताच भारतात सैन्य दलाची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. यासाठीच व्हॉइसरायच्या परवानगीने एक अँब्युलन्स कॉर्पोरेशन तयार करण्यात आली.
यातल्याच एका अँब्युलन्स कॉर्प्समध्ये सिसिर सर्बाधिकारी हे सामील होते. भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मेजर जनरल चार्ल्स टाऊनशेंड यांच्या सहाव्या पुना तुकडीसोबत सिसिर यांची मुंबई मार्गे इराकला रवानगी करण्यात आली. एका आठवड्यात ते त्या ठिकाणी पोहचले.
३ नोव्हेंबर १९१५ ला त्यांच्या सैन्याने इराकसोबत साहिल, कुर्ना आणि कुत-अल-अमारा वर ताबा मिळवला. त्यांना वाटत होतं की बगदाद सहजपणे हस्तगत करता येईल. याशिवाय अजून काही घडेल याची साधी आशंका देखील त्यांच्या मनात उत्पन्न झालेली नव्हती. त्यांच्या तुकडीतले ब्रिटिश अधिकारी गप्पागोष्टीत पुढचा नाताळ बगदादमध्ये साजरा करणार अशा आविर्भावात वावरत होते. परंतु झाले मात्र भलतेच त्यांच्या सैन्य दलाचा दारुण पराभव झाला. त्यांच्या मेजर टाऊनशेंडने ऑटोमन तुर्कांच्या समोर सपशेल नांगी टाकली.
हे भीषण युद्ध सुरू होते त्यावेळी अनेक लोक जखमी होत, अशावेळी त्यांची सेवा शुश्रूषा करण्याचा कार्यात सिसिर यांना सहभागी व्हावे लागले.
त्यावेळी त्यांनी बघितलं की एक शीख सैनिक त्यांच्यासमोर बसून हसत होता. अशा तणावाच्या परिस्थितीत तो का हसतोय अशी संतप्त विचारणा सिसिर यांनी त्याला केली पण सिसिर त्याच्या जवळ पोहचायच्या आत त्या शीख सैनिकाने आपले प्राण त्यागले होते.
युद्धादरम्यान घायळ झालेल्या लोकांची सेवा करताना त्यांना एका घायाळ सुभेदाराला उचलून कॅम्पमध्ये नेण्याची आज्ञा मिळाली. तेव्हा त्यांच्या तोंडून शब्द निघाले किती जड आहे. एवढ्या बिकट परिस्थितीही तो सुभेदार गंमतीने म्हणाला, “जास्त जड नाही हो फक्त १०८ किलो इतकाच आहे!” यानंतर सिसिर आणि सुभेदार यांच्यात चांगली गट्टी जमली.
सुभेदारला सिसिर यांचे दल हे भुकेलं असल्याची सूचना मिळताच त्यांच्या जेवणाची व्यवस्था सुभेदाराने केली. सुभेदार एक मुस्लिम असून देखील हिंदू प्रति त्याचं स्नेह बघून प्रभावित झालेल्या सिसिर यांनी त्याचे खूप भरभरून वर्णन केले आहे.
सिसिर यांनी आपल्या त्या पुस्तकात आर्मेनियाच्या लोकांचा झालेला नरसंहार आणि तुर्कांच्या दयनीय अवस्थेचे वर्णन केले आहे. त्यांनी लिहलं आहे की, शत्रूपक्ष ब्रिटिश सैनिकांना बंदी बनवून रणरणत्या उन्हात अनेक मैल पायदळी चालायला लावत असे, अत्यंत क्रूरपणे त्यांना वागणूक देत असे.
‘रास अल ऐन’ला रेल्वे मार्ग निर्मितीच्या कामात गुलाम म्हणून ब्रिटिश सैनिक राबवून घेतले जात होते, यासाठी त्यांना मोठा पल्ला ओलांडून तेथे पोहचावे लागले होते. ब्रिटिश सैनिकांतदेखील प्रचंड भेदभाव तुर्की लोक करत होते.
त्यांनी मुस्लिम सैनिकांसाठी वेगळे आणि हिंदू शीख लोकांसाठी वेगळे शामियाने उभारले होते. हिंदू शीख जेथे वास्तव्यास होते ते ठिकाण अत्यंत गलिच्छ होते. खरंतर हा भेद निर्माण करून ब्रिटिशांच्या सैन्यात फुट पाडण्याचा जर्मनी आणि तुर्कांचा कायम प्रयत्न असायचा.
ते ब्रिटिश सैन्यातील मुस्लिमांना कुराणचा दाखला देऊन त्यांना युद्धात सहभागी होण्यापासून रोखत. ते म्हणत मुस्लिम आणि मुस्लिम काफिरासाठी एकमेकांशी लढणे अनुचित आहे. अनेक मुस्लिम सैनिकांना त्यांनी यशस्वीपणे आपल्या बाजूला वळवल्याची नोंद सिसिर यांनी केली आहे.
रास एल ऐनच्या युद्धातील पराभवामुळे सर्व दुःखी होते. रास अल ऐनच्या क्षतिग्रस्तांची सेवा करत असताना सिसिरना अलेप्पोला जाण्याचा आदेश देण्यात आला. रास अल ऐनला कडाक्याची थंडी होती. ज्यामुळे ७५% भारतीय सैनिकांनी आपला जीव गमावला होता. थंडीचा मुकाबला कसाबसा करत असतानाच त्यांना टायफॉईडची लागण झाली.
ज्याकारणे त्यांना आलेप्पोला इस्पितळात भरती करण्यात आले. याठिकाणी अनेक तुर्की सैनिकांशी गाठ पडली. त्यांनी युद्धात दोन्ही बाजूंच्या सैनिकांची दयनीय अवस्था आपल्या डोळ्यांनी बघितली.
सैनिक युद्धाने दुःखी होते. त्यांना समजत नव्हते की ते वेगवेगळ्या देशांचे आहेत आणि कुठलंही कारण नसताना एकमेकांशी का युद्ध करत आहेत. ते एकमेकांचे का शत्रू बनले आहेत?
युद्धातील अमानुषतेचे वर्णन करताना सिसिर लिहितात,
एक म्हतारा तुर्की सैनिक ज्याला सिगारेट पिण्याची सवय होती, तो सिगारेटच्या शोधात त्यांच्या वॉर्डमध्ये येत होता. कोणाची उरलेली सिगारेट मिळते यासाठी तो आसुसलेला असायचा.
एकदा त्या म्हाताऱ्याची नजर एका तरुणावर पडते आणि दोघेही व्याकुळ होऊन एकमेकांच्या गळ्यात पडून रडतात. ते का रडतात हे नंतर लक्षात येतं जेव्हा ते हा आपला मुलगा असल्याचं सांगतात आणि बऱ्याच कालावधीनंतर एकमेकांना भेटलो आहोत.
आर्मेनियन आणि तुर्की लोकांची अवस्था ह्या काळात फार बिकट होती. जेव्हा १९१७ ला सिसिरला पुन्हा रास अल ऐन ला पाठवण्यात आलं, त्यावेळी परिस्थिती सुधारली होती. पण आर्मेनियन लोकांवर प्रचंड अत्याचार केले जात होते, माणुसकी लयास गेली होती. कुर्द आणि तुर्क यांनी नरसंहार करून आर्मेनियन लोकांचे आयुष्य काळवंडून टाकले होते.
‘रास अल ऐन’ हुन सिसिर निसबिनला रवाना झाला, त्यावेळी इंग्रजांचे पारडे जड होऊन तुर्की व जर्मन सैन्याचा पराभव दृष्टिक्षेपात आला होता. अखेरीस १७ नोव्हेंबर १९१८ ला युद्धाला विराम मिळाला आणि सर्व युद्ध कैदी मायदेशी पाठवण्यात आले. याच काळात युद्धबंदी म्हणून सिसिरना देखील मुक्त करण्यात आले व ते भारतात परतले.
सिसिर यांचे पुस्तक प्रसिद्ध लेखक अमिताव घोष यांनी इंग्रजीत भाषांतरित केले असून युद्धाच्या कटू स्मृती वाचताना अंगावर काटा येतो. युद्ध हे फक्त जय पराजय याची गोष्ट नसते तर रोडावत चाललेल्या माणुसकीचे दर्शन असते. शांततेची आणि कोटी निष्पाप जीवांची झालेली हत्या असते. युद्धाच्या पराक्रमाचा गाथा सर्व सांगतात पण युद्धातील करुण गाथांचे वर्णन सिसिर सर्बाधिकारी सारखे लोकच करू शकतात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.