आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आपल्या देशावर जे बरेच राज्यकर्ते राज्य करून गेले त्यांच्यापैकीच एक मुघल बादशहा अकबर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. अकबराविषयी बऱ्याच रंजक गोष्टी सांगितल्या जातात आणि अकबर बिरबलाच्या कथा तर कोणाला माहिती नाहीत.
हा अकबर बादशहा खूप वेगळ्या स्वभावाचा होता. त्याची राज्यकारभार हाताळण्याची पद्धतसुद्धा वेगळी होती. त्याने आपल्या दरबारात ९ वेगवेगळ्या क्षेत्रात पारंगत लोक ठेवली होती ज्यांना अकबराची नवरत्ने म्हणून ओळखलं जातं
या नवरत्नांपैकी आपल्याला किती माहिती आहेत? कदाचित बिरबल माहिती असेल तानसेन माहिती असेल आणि फैजीबद्दलसुद्धा ऐकून असाल. पण या नवरत्नातलं ‘मुल्ला दो प्याजा’ हे नावसुद्धा तितकंच प्रसिद्ध आहे बरं. तर आता आपण या मुल्ला दो प्याजाच्या जीवनपटावर थोडासा प्रकाश टाकूया.
आपण या व्यक्तीला जुगाडू प्रकारची व्यक्ती देखील म्हणू शकता, कारण इतर नवरत्नांच्या तुलनेत तो कोणत्याही प्रकारे सेलिब्रिटी नव्हता. परंतु त्याने आपल्या युक्तीने सम्राट अकबरला प्रभावित केले होते.
त्याने मोठ्या शिताफीने शाही खुराड्यावर आपला वचक ठेवला आणि मग येथून जुगाड करत करत त्याने अकबराच्या मनात घर केलं. आणि असंच मग पुढे जाऊन त्याने आपल्या हुशारीचं प्रदर्शन करत अकबर बादशहाच्या नवरत्नांत स्थान मिळवलं.
लहानपणी हा मुल्ला दो प्याजा म्हणजे खूप कुटानेखोर आणि खोडकर मुलगा. त्याचं नाव अबुल हसन असं होतं आणि त्याचे वडील मोहसिन एक शिक्षक होते. त्याच्या वडिलांना आपल्या मुलास चांगले प्रशिक्षण द्यायचे होते. पण अबुलला काहीतरी वेगळंच आवडलं. तो नक्कीच खोडकर होता, परंतु त्याच्या मनात नेहमी काहीतरी शिजत असायचं.
तो पुस्तके घेऊन तासंतास वेळ घालवत असे. पण जेव्हा आई ओरडायची तेव्हा तो काही कुरानातील पाने वाचत असायचा.
अबुल हसन ९ वर्षांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले. यानंतर अबुलवर संकटांचा खूप मोठा डोंगरच कोसळला. आईच्या निधनानंतर त्याच्या वडिलांचे दुसरे लग्न झाले आणि सावत्र आई घरात आली.
वर म्हटल्याप्रमाणे हा मुलगा होता प्रचंड खोडकर. एकदा त्याने चेष्टा करण्यासाठी एका महिलेला त्याच्या घरात बंदिस्त केले. आता यानंतर त्याचे वडील आणि सावत्र आई यांच्यात भांडण झाले आणि या गोष्टीला कंटाळून त्याचे वडील घर सोडून गेले.
एवढे सगळे परिणाम झाल्याने अबुल हसनला नंतर या कृत्याबद्दल पश्चाताप झाला. त्याला लोकांचे बोलणे देखील ऐकावे लागले. शेवटी तो वडिलांचा शोध घेण्यासाठी निघाला. त्याने जवळपासच्या गावात बरेच शोधले पण त्याला वडिल काही सापडले नाही.
काही दिवस तिच्या नवऱ्याची वाट पाहिल्यानंतर त्याची सावत्र आईसुद्धा तिच्या माहेरी गेली. इकडे अबुल हसन देखील आपल्या वडिलांच्या शोधात मक्का शहरात आला, त्याने आपल्या वडिलांचा इथे खूप शोध घेतला पण काही सापडले नाहीत.
पण त्याला मक्केत एक इराणी टोळी सापडली. या टोळीचा सरदार अकबर अली नावाचा एक माणूस होता. त्याची ही अवस्था पाहून त्याने संपूर्ण परिस्थिती विचारली. त्याने सांगितलेली परिस्थिती ऐकून सरदारला त्याच्याबद्दल वाईट वाटले आणि त्याने अबुल हसनला आपल्याबरोबर इराणच्या तेहरान शहरात आणले.
जेव्हा तो इराणला पोहोचला त्याच वेळी शेरशाह सुरीकडून पराभूत होऊन हुमायूनेही मदतीसाठी तेहरान गाठले. त्यावेळी हुमायूंचा सर्वांत खास साथीदार यो*द्धा मिर्झा बख्श होता. सरदार अकबर अलीमुळे मिर्झा बख्श हेसुद्धा त्याचे जवळचे मित्र झाले.
भारताला जिंकण्याच्या उद्देशाने हुमायून इराणकडून मदत घेऊन परत येत असताना त्यानी मिर्झा बख्शलासुद्धा आपल्याबरोबर घेतले. हुमायूच्या सैन्याने काबूल आणि अफगाणिस्तानवर आपला विजयी ध्वज फडकावला. तोपर्यंत त्याचा प्रतिस्पर्धी शेरशाह सूरी भारतात मेला होता आणि हुमायूंसाठी आता भारताचा रस्ता साफ झाला होता.
त्यानंतर अबुल हसनही आपल्या सैन्यासह भारतात आला. पण त्याचा जवळचा मित्र मिर्झा बख्श काबुलच्या यु*द्धात मरण पावला.
अबुल हसन हुमायूंसह इराणहून भारतात आला आणि हुमायूने दिल्ली ताब्यात घेतल्यानंतर तो एका मशिदीत राहू लागला. तिथेच तो इमामतसुद्धा (धार्मिक कार्य) करू लागला. आता सामान्य मुलगा असणारा अबुल हसन, ‘इमाम अबुल हसन’ झाला होता. तो लवकरच आपल्या सुंदर आवाजासाठी प्रसिद्ध झाला. आता लोक त्याचा सल्ला घेण्यासाठी येऊ लागले. त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढू लागली. याच कारणामुळे त्यानी राजदरबारांनाही भेटण्यास सुरवात केली.
अशातच एके दिवशी त्यांना अकबरच्या नवरत्नांपैकी एक असणारे फैज फैजी भेटले. मग काय इथून पुढे दोघांमध्ये घनिष्ट मैत्री निर्माण झाली. यांच्यानंतर एकदा फैझीला त्याच्या घरी मेजवानीसाठी आमंत्रित केले.
अबुलच्या घरी त्यांनी शाही मेजवानीचा आनंद लुटला. इथे फैजीला एक डिश खूप आवडली. मग रात्रीचे जेवण झाल्यावर फैझीने अबुल हसनला या स्वादिष्ट डिशबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी त्या पदार्थाला ‘मुर्गा दो प्याझा’ असे संबोधले. त्यांना ही डिश इतकी आवडली की यानंतर त्यांना कोणीही जेवणासाठी आमंत्रण दिलं की ते ‘मुर्गा दो प्याझा’ तयार करायला सांगायचा.
जेव्हा तो दिल्लीमध्ये प्रसिद्ध झाला तेव्हा त्यांचे नाव सम्राट अकबरापर्यंत पोचले. त्यांची फैझीशी, राजघराण्याशी जवळीक जडली आणि नंतर अबुल हसनसुद्धा सोबतच्या मंडळींसोबत अकबराच्या दरबारात जाऊ लागला. सुरुवातीला अबुल हसनला स्वयंपाकघराची जबाबदारी देण्यात आली होती आणि त्यातल्या त्यात कोंबड्याच्या खुराड्याचे हक्क त्याला देण्यात आले होते.
असे म्हटले जाते, जेव्हा अकबराला त्याच्या आवडत्या पदार्थाबद्दल म्हणजेच मुर्गा दो प्याझा बद्दल कळले, तेव्हा सम्राटाने त्याला दो प्याजा असं टोपणनाव दिलं आणि त्यानंतर तो ‘मुल्ला दो प्याजा’ म्हणून प्रसिद्ध झाला. पण अकबरच्या दरबारात जाण्याची त्याची तीव्र इच्छा होती. आणि त्यासाठी अकबरला आधी आपल्या कामामुळे आपल्यावर प्रसन्न करावे लागेल याची त्याला कल्पना होती. तो कामाला लागला.
एकदा अकबर जेव्हा कोंबडीखान्याचे खाते पाहत होता तेव्हा त्याला धक्का बसला. त्याच्या खर्चामध्ये बरीच घट झाली होती. अशा परिस्थितीत अकबराने मुल्लाला बोलावून विचारले की हे कसे घडले? मुल्ला म्हणाला तो रॉयल किचनमधलं उर्वरित अन्न कोंबड्यांना खायला घालतो, ज्याने खूप बचत होते. यावर अकबर आनंदी झाला आणि त्याने मुल्लाला शाही ग्रंथालयाची जबाबदारी सोपविली.
मुल्लाला अकबराच्या नवरत्नांमध्ये सामील व्हायचे असल्याने तो आपले काम संयमाने करत राहिला. तरीही तो शाही ग्रंथालयाच्या कामामुळे खूष नव्हता. पण नंतर एकदा अकबर शाही ग्रंथालयात गेला तेव्हा त्याने जरी आणि मखमलीने झाकलेली पुस्तके पाहिली तेव्हा त्याला फार आनंद झाला आणि त्याने पुन्हा मुल्ला दो प्याजला बोलावले. मुल्ला दो प्याजाने तेव्हा सांगितले की तो लोकांनी आणलेल्या कपड्यांचा वापर करून शाही टेलरने पुस्तकांचे कव्हर तयार केले.
मुल्लाच्या बुद्धिमत्तेमुळे प्रभावित होऊन अकबराने त्याला राजदरबारात जागा दिली. पुढे तो आपल्या चातुर्याने अकबराच्या नवरत्नांमध्ये सामील झाला.
कधीकधी त्याला अकबराच्या दरबारचे गृहमंत्री म्हटले जाते. असं म्हटलं जातं की अकबराच्या राज्याच्या सुरक्षेची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. परंतु याबद्दल इतिहासकारांमध्ये बरेच वादविवाद आहेत
नंतर मुल्ला दो प्याजा अकबरासोबत दक्खन येथे गेला तेव्हा त्याची तब्येत अहमदाबादमध्ये खराब होऊ लागली. हैदराबादजवळ पोहचल्यावर त्याचा आजार आणखीनच वाढला.
शेवटी त्याच ठिकाणी त्याने या जगाचा निरोप घेतला. तर असा होता अबुल हसन उर्फ मुल्ला दो प्याजा नावाच्या चतुर व्यक्तीचा जीवनपट. आजही इतिहासात या मुल्ला दो प्याजाचा बऱ्याच ठिकाणी उल्लेख आढळतो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.