आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
महाराजा रणजीत सिंह यांच्या सेनेतील प्रमुख स्तंभ समजले जाणारे हरी सिंह नलवा हे असेच होते. त्यांचे नाव ऐकताच अफगाणी सैन्याचा थरकाप उडत होता.
शूरता, पराक्रम, धाडस हे गुण कुणालाही शिकता किंवा शिकवता येत नाहीत. हे गुण व्यक्ती जन्माला येताना सोबतच घेऊन येत असते. भारतात असे कित्येक नरवीर होऊन गेले, ज्यांनी आपल्या शौर्याने कायम स्वरूपी ठसा उमटवला आहे.
महाराजा रणजीत सिंह यांच्या सेनेतील प्रमुख स्तंभ समजले जाणारे हरी सिंह नलवा हे असेच होते. त्यांचे नाव ऐकताच अफगाणी सैन्याचा थरकाप उडत होता.
अवघ्या १४ व्या वर्षातच त्यांनी आपल्या विरतेचे असे प्रदर्शन केले होते की पाहणारे अगदी आवाक झाले होते. महाराजा रणजीत सिंह याने हरी सिंह नलवा यांच्या पराक्रमावर प्रसन्न होऊन त्यांना आपल्या सैन्यातील एका तुकडीचा प्रमुख बनवले होते.
अवघ्या १४ वर्षाच्या मुलाच्या हातात त्यांनी ८०० सैनिकांचे नेतृत्व सोपवले. इतक्या लहान वयात आलेली जबाबदारी पण संपूर्ण ताकदीनिशी निभावली.
हरी सिंह यांचा जन्म १७९१ साली पंजाबमधील गुजरांवाला येथे झाला. वडील गुरुदायाल सिंह उप्पल आणि आई धरम कौर यांच्या पोटी जन्मलेले हे एकुलते एक अपत्य. एकुलते एक असल्याने त्यांचे बालपण अगदीच आनंदात गेले. पण, हा आनंद नियतीला बघवला नसावा म्हणूनच वयाच्या ७व्या वर्षीच त्यांचे पितृछत्र हरपले.
खेळण्याबागडण्याच्या वयात त्यांनी अस्त्र-शास्त्रांचे धडे घ्यायला सुरुवात केली. मार्शल आर्ट आणि घोडेस्वारीचेही शिक्षण त्यांनी घेतले.
१८०५ मध्ये महाराजा रणजीत सिंह यांनी वसंतोत्सवाच्या काळात राज्यातील शूरवीरांना त्यांच्या शौर्याचे प्रदर्शन करता यावे म्हणून स्पर्धा ठेवल्या होत्या. या स्पर्धेत हरी सिंह यांनी भाग घेतला. भला फेक, तिरंदाज, घोडेस्वारी अशा अनेक खेळात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांची ही कामगिरी पाहून महाराजा रणजीत सिंह त्यांच्यावर प्रचंड खुश झाले. महाराजांनी लगेचच त्यांना आपला सहाय्यक घोषित केले. त्याच्या पुढच्याच वर्षी हरी सिंह यांच्याकडे सैन्याच्या एका तुकडीचे नेतृत्व सोपवले.
सैन्यात गेल्यावर तर हरी सिंह यांच्या युद्धकौशल्याला जणू नवे धुमारेच फुटले. त्यांनी दिवसेंदिवस नवनवीन पराक्रम गाजवून चारी बाजूला दहशत निर्माण केली.
महाराजा रणजीत सिंह यांना शिकारीचा छंद होता. एकदा ते हरी सिंह यांना सोबत घेऊन शिकारीसाठी जंगलात गेले होते. त्यांचा तांडा जंगलातून चाललाच होता इतक्यात एक वाघ अचानकच समोर आला आणि त्याने घोड्यावर बसलेल्या हरी सिंह यांच्यावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्याने कोणीही असते तर बावचळून गेले असते. पण, हरी सिंह त्या वाघासमोर असे काही उभे राहिले की, वाटावे भीती म्हणजे काय असते हे त्यांना ठावूकच नाही.
वाघाने झेप घेण्याअगोदरच त्यांनी त्या वाघाच्या जबडा असा काही ताणला की, जबडा फाटून तो वाघ जागीच मरण पावला.
हे साहस पाहून तर महाराजा रणजीत सिंह त्यांच्यावर अजूनच खुश झाले. या घटनेनंतर राजा नल, जो वाघांची शिकार करण्यात तरबेज होता असे मानले जाते, याच्या नावावरुन त्यांचे नाव हरी सिंह ‘नलवा’ असे पडले.
हरी सिंह यांच्या शौर्याची दाखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली आहे. पण, आपल्याच देशातील लोकांना अजूनही या नावाचा फारसा परिचय नाही. ‘बिलीनियर अस्ट्रेलियनस’ ही इतिहासातील सर्वात महान दहा विजेत्यांची यादी जाहीर आहे, ज्यामध्ये पहिल्या क्रमांकाचे नाव आहे राजा हरी सिंह ‘नलवा’.
अमेरिका आणि अफगाण युद्धात अमेरिकन जनरल आपल्या सैनिकांना हरी सिंह ‘नलवा’ यांच्या पराक्रमाच्या कथा ऐकवत असत असे म्हटले जाते. या कथा ऐकून अमेरिकन सैन्याच्या मनात पराक्रमाची स्फूर्ती संचारत असे.
हरी सिंह यांनी अफगाणी सैन्याला असा काही धडा शिकवला होता की, त्यांच्या मनात हरी सिंहबद्दल जबरदस्त दहशत निर्माण झाली होती.
शत्रूंना त्यांच्या दोन्ही हातात तलवारी नाही तर साक्षात आपला मृत्यूच दिसत असे.
१८१३ सालच्या अटक युद्धात, १८१४ सालच्या कश्मीर युद्धात, १८१६च्या महमूदकोट युद्धात, १८१८ सालच्या मुलतान युद्धात, १८२२ मध्ये मनकेरा, १८२३ मध्ये नौशेरा, सगळ्याच युद्धांंत त्यांनी शत्रूला सळो की पळो करुन सोडले होते. जवळपास वीस युद्धात त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता.
तलवारीच्या एका घावतच ते शत्रूचे धड मस्तकापासून अलग करुन टाकत. एकटे हरी सिंह शत्रू सैन्याच्या सैनिकांसाठी भारी पडत.
१८३६ साली महाराजा रणजीत सिंह यांचा नातू निहाल सिंह याचे लग्न ठरले होते. या लग्नासाठी ब्रिटीश कमांडर इन चीफला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महाराजांनी आपले संपूर्ण सैन्यही पंजाबमध्ये बोलावून घेतले होते. याच संधीचा फायदा घेत शत्रू सैन्याने जमरूदवर हल्ला करण्याचे नियोजन आखले. हरी सिंह ‘नलवा’ यांना शत्रूच्या या कटाची आधीच खबर लागली होती. म्हणून हरी सिंह पंजाबला न जाता पेशावरमध्येच थांबले.
शत्रू सैन्याने मात्र याच संधीचा फायदा उठवत जमरूदवर हल्ला चढवला. अफगाणच्या सैन्याने या शीख सैनिकांना अक्षरश: जेरीस आणले. जमरूदच्या किल्ल्याभोवती अफगाणी सैन्यांनी कडक पहारा दिला होता. या पहाऱ्यात शीख सैन्य अन्नधान्याविना अडकून पडले होते. हरी सिंह लागलीच पेशावरमधून निघाले आणि ते जमरूदमध्ये पोहोचले.
अफगाण सैन्याला हरी सिंह यांच्या येण्याची खबर लागताच त्यांच्यात एकच खळबळ माजली. काही करून यावेळी हरी सिंह यांचा काटा काढायचाच असा चंगच त्यांनी बांधला आणि ते हरी सिंह यांच्यावर तुटून पडले.
हरी सिंह जिवंत राहिले तर आपण कधीच विजयी होऊ शकणार नाही हे त्यांना चांगलेच ठावूक होते.
हरी सिंह आणि अफगाणी सैन्य यांच्यात तुंबळ युद्ध जुंपले. दोन्ही सैन्य एकमेकांवर तुटून पडले होते. हरी सिंह यांच्यावर कुणीतरी पाठीमागून वार केला ज्यात ते गंभीर जखमी झाले होते. परंतु, उपचार घेण्याऐवजी ते युद्धभूमीतच निश्चयाने लढत राहिले. अशा जखमी अवस्थेतही त्यांनी शत्रू सैन्याचा दारू-गोळा लुटला. शत्रू सैन्याच्या सैनिकांवर वार करतच राहिले.
अखेर या युद्धातच त्यांना वीरगती प्राप्त झाली. पण, आपल्या मृत्यूची बातमी जर शत्रूच्या गोटात पोहोचली तर त्यांचे बळ वाढेल म्हणून त्यांनी आपल्या मृत्यूची शत्रूला अजिबात खबर होणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना सैनिकांना दिली. सैनिकांनीही त्यांचा आदेश पाळला. शत्रूला अखेरपर्यंत कळलेनाही की हरी सिंह युद्धात मारले गेले होते.
शेवटी पंजाबच्या सैनिकांनी अफगाण सैन्याला धूळ चारलीच. कारण, अफगाण सैन्याला फक्त एवढीच हरी सिंह यांचीच दहशत होती आणि शेवटपर्यंत ते हेच समजत होते की हरी सिंह जिवंत असून ते सैन्याला मार्गदर्शन करत आहेत. या भीतीनेच त्यांचा पराभव निश्चित केला होता.
म्हणूनच हरी सिंह नलवा यांना शत्रूच्या मनात धडकी भरवणारा अमर योद्धा म्हटले जात होते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.