आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आज भारताला पोलियोमुक्त होऊन सात वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. पोलियोमुळे भारताची एक पिढीच विकलांगतेच्या अंध:कारात ढकलली गेली होती. एक वेळ अशी होती की देशातील कित्येक लहान मुलं या आजाराने ग्रासली होती. २०११ साली भारताने मोठ्या प्रयत्नपूर्वक या आजारावर विजय प्राप्त केला.
सत्तर वर्षांपूर्वी एक महिला होती जिने पोलियोमुक्त भारताचे स्वप्न पहिल्यांदा पाहिले होते. हे यश त्या महिलेने घातलेल्या पायामुळेच आज आपल्याला मिळवता आलं आहे. या महिलेचे नाव होते फातिमा इस्माईल.
फातिमा यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९०३ रोजी झाला. त्या प्रसिद्ध गांधीवादी नेते उमर सोभानी यांच्या भगिनी होत्या. लहानपणापासून त्यांच्या घरात एक राजकीय वातावरण होते. याचा परिणाम त्यांच्यावर झाला आणि अगदी कमी वयातच त्या समाजसुधारणेचा विचार करू लागल्या.
सुरुवातीला त्यांनी महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यांनी महिलांसाठी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र चालवले. १९३६ साली त्या अखिल भारतीय महिला संमेलनाच्या शिमला शाखेच्या सचिव बनल्या.
याच काळात देशभरात स्वातंत्र्य आंदोलनाने वेग पकडला होता. फातिमाने देखील यात सहभाग नोंदवला. त्यांच्या मुंबईच्या घरात काँग्रेसचे अनेक नेते नेहमी नाव बदलून निवासाला येत होते. त्याठिकाणी ते इंग्रजांच्या विरोधात रणनीती तयार करत होते. या नेत्यांमध्ये जयप्रकाश नारायण आणि अरुणा असफ अली यांचा देखील समावेश होता.
इंग्रजांच्या विरोधातील स्वातंत्र्य संग्राम १९४२ च्या छोडो भारत चळवळीमुळे अजून तीव्र झाला होता. याच वेळी फातिमा यांनी लग्न केले व पुढे त्यांनी एका मुलीला जन्म दिला. १९४५ साली त्यांना त्यांची मुलगी पोलियोग्रस्त असल्याची माहिती मिळाली आणि लवकरच काही पावलं टाकले नाहीतर त्यांच्या मुलीच्या आयुष्याला धोका असण्याची शक्यता निर्माण झाली होती. यासाठी फातिमा यांनी संपूर्ण देश पालथा घातला. परंतु त्यांचा मुलीच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी काहीच केलं जाऊ शकत नाही, असे त्यांना सांगण्यात आले. परंतु फातिमा यांनी हिंमत हारली नाही.
स्वतःच्या मुलीसाठी त्या ज्यावेळी भारत भ्रमण करत होत्या त्यावेळी त्यांना पोलियोशी लढा देणारे अनेक मुलं आढळली. त्यावेळी त्यांनी निश्चय केला की त्या केवळ त्यांच्या मुलीचे प्राण रक्षण करणार नाहीत तर सर्व पोलियोग्रस्त मुलांना शक्य तितकी मदत करतील.
याच काळात त्यांच्या नवऱ्याची इराणला बदली झाली. परंतु फातिमा यांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. पुढे मद्रासमध्ये असलेल्या एम जी केनी नावाच्या डॉक्टरची त्यांना माहिती मिळाली आणि त्या मद्रासला गेल्या.
त्या ज्यावेळी मद्रासला गेल्या तेव्हा डॉक्टरने त्यांच्या मुलीवर उपचार करण्यास नकार दिला. परंतु फातिमा यांनी वारंवार विनंती केल्यावर ते उपचार करण्यासाठी तयार झाले. पुढच्या आठ महिन्यांत त्यांची मुलगी पूर्ववत चालू लागली होती. या उपचाराने आणि फिजियोथेरपीने त्यांच्या मुलीला अगदी स्वस्थ केले होते.
त्यानंतर फातिमा पुण्याला आल्या. पुण्यात त्यावेळी एक फिजियोथेरपी केंद्र होते ज्यात सैनिकांवर उपचार केले जात होते. पुढे फातिमा यांनी आग्रहाने त्यांच्या मुलीच्या फिजियोथेरपीसाठी हे केंद्र वापरण्यास त्यांनी सुरुवात केली.
याआधी १९२० साली फातिमा यांनी व्हिएन्ना येथे मेडिकलचे शिक्षण घेतले. परंतु परिवाराच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना गावी परत यावे लागले होते. त्यांनी आपल्या मेडिकलच्या ज्ञानाच्या बळावर आणि फिजीयोथेरपीच्या मदतीने आपल्या मुलीच्या परिस्थितीत सुधारणा आणण्यास मोठे यश प्राप्त केले. पुढे यातून प्रेरणा घेत त्यांनी इतर पोलियोग्रस्त मुलांसाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला.
१९४७ साली देश एकीकडे स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर होता आणि फातिमा मुंबईच्या आरोग्य विभागाला पोलियोग्रस्तांसाठी क्लिनिक उघडण्याची मागणी करत होत्या. परंतु आर्थिक संसाधनाच्या कमतरतेमुळे ते शक्य होत नव्हते. पुढे मुंबईच्या एका डॉक्टरने त्यांना पोलियोग्रस्तांच्या उपचारासाठी आपले क्लिनिक देऊ केले. पुढे पुण्याचे फिजियोथेरपीचे डॉक्टर आणि कर्मचारी फातिमा यांच्या मुंबईच्या क्लिनिकमध्ये आले. इंग्रज गेल्यामुळे पुण्याचे ते केंद्र बंद झाले होते.
मे १९४७ साली त्यांनी या क्लिनिकमध्ये काम करायला सुरुवात केली आणि एक वर्षात तब्बल ८० मुलांवर यशस्वी उपचार केले. फातिमा यांच्या क्लिनिकच्या चर्चा सर्वदूर पसरल्या. मुंबई सरकारने फातिमा यांच्या क्लिनिकचा विस्तार करण्यासाठी निधी व जागा मंजूर केली.
फातिमा यांनी इंग्लंड व अमेरिकेत भारताच्या पोलियो परिस्थितीवर भाषण केले यामुळे भारत सरकारने हा विषय गंभीरतेने घेतला. यानंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९५३ साली यांनी पोलियो रुग्णांना समर्पित रुग्णालयाचे उद्घाटन केले. १९५९ साली फातिमा यांनी पोलियोग्रस्त मुलांसाठी शाळा सुरु केली. पुढे आशा अनेक शाळा त्यांनी सुरू केल्या व ३०० हून अधिक मुलांना शिक्षण दिले.
फातिमा यांच्या नि:स्वार्थ सेवेसाठी १९५८ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी आपली मुलगीच नाही तर हजारो पोलियोग्रस्त मुलांना पोलियोतून बाहेर काढले. त्यांच्या प्रयत्नामुळेच भारत २०११ साली पोलियोमुक्त झाला. ४ फेब्रुवारी १९८७ रोजी फातिमा इस्माईल यांचे निधन झाले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.