आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
एका संकटातून सुटका झाल्यानंतर आता तरी थोडा सुखाचा श्वास घेऊ असे वाटत असते. पण, थोडी उसंत मिळाली असे वाटेपर्यंत दुसरे संकट आ वासून उभे राहते. १७व्या शतकात लंडनवासियांनाही काहीसा असाच अनुभव आला. १६६५ साली लंडनमधे प्लेगची भयावह साथ आली होती. यालाच इतिहासात ग्रेट प्लेग म्हणून ओळखले जाते. या साथीतून जे वाचले ते सुदैवीच म्हणावे लागतील. १६६५चे वर्ष सरल्यानंतर किमान १६६६चे वर्ष तरी आशादायी असेल अशीच सर्व लंडनवासीयांची अपेक्षा होती, पण झाले उलटेच.
१६६६ साली एक नवेच संकट त्यांची वाट पाहत होते.
२ सप्टेंबर १६६६ रोजी लंडन ब्रिजजवळील किंग्ज बेकरी येथे आग लागली आणि बघता बघता हा वणवा संपूर्ण शहरभर पसरला. या आगीत लंडनमधील एकही घर वाचले नाही. एकही इमारत वाचली नाही.
प्लेगच्या साथीतून बचावल्यानंतर जे काही उरले होते ते सगळे या आगीने धुवून नेले. जी कसर प्लेगने सोडली होती, ती कसर या आगीने पूर्ण केली. आग लागण्याच्या घटना त्याकाळी सर्रास घडत असत, पण ही आग लगेचच आटोक्यातही येत होती. मात्र त्यादिवशी जी आग लागली ती संपूर्ण शहर गिळंकृत करून मगच शांत झाली.
लंडनचे मेयर सर थॉमस ब्लडवर्थ यांना जेव्हा आग लागल्याची वर्दी देण्यात आली तेव्हा ते म्हणाले त्यात काय एवढं, ‘चार थेंब पाणी टाकलं तरी आग विझून जाईल.’ परंतु ही आग अशी थोड्याथोडक्या पाण्याने आटोक्यात येणारी नव्हती. एकतर ते कडकडीत उन्हाळ्याचे दिवस होते. कित्येक आठवडे पाऊस पडला नव्हता. वातावरणात उष्मा होता. त्याकाळी घरांचे बांधकाम हे लाकडापासून केलेले असे. घराचे बांधकाम करण्यासाठी वापरलेले लाकूड पूर्णत: वाळून गेले होते.
अशातच एका बेकरीला आग लागली आणि ती बघता बघता संपूर्ण शहरभर पसरू लागली.
आग चहुबाजूंनी पसरू लागली. एका घरातून दुसऱ्या घरात असे करत हळूहळू लंडनमधील ३०० घरे या आगीच्या जबड्यात सापडली. लोक घरातून बाहेर पडून नदीच्या दिशेने पळू लागले, कोणी बदलीने पाणी ओतून आग विझवण्याचा प्रयत्न करू लागले. तरीही आग आटोक्यात येत नव्हती. ३०० घरांची राख झाल्यानंतरही आग पसरतच राहिली. अशातच जोराचा वारा सुटला आणि आगीला आणखीनच चेव चढला.
संपूर्ण शहरावर दुखाचा डोंगर कोसळला. लोक घाबरू लागले. संपूर्ण शहरच भयभीत झाले होते. अशात नको त्या अफवा पसरू लागल्या. आग आटोक्यात येणार नाही असे दिसताच लोकं शहर सोडून पळून जाण्याचाही विचार करू लागले. काहीजण तर थेम्स नदीच्या दिशेने पळाले देखील.
सगळीकडेच गोंधळ माजला. कुणालाच नेमके काय करावे सुचत नव्हते. शहरातील अनेक बघे आग कशी पसरत आहे आणि त्यामुळे काय गोंधळ उडाला आहे हे पाहण्यासाठी गर्दी करू लागले. सम्युएल पेपीज आणि जॉन एव्लीन दोघांनीही या घटनेचे अगदी रसभरीत वर्णन केले आहे. सॅम्युएल पेपीजच्या डायरीला इंग्लिश साहित्यात खूप महत्त्वाचे स्थान आहे. त्याने आपल्या डायरीजमधे या घटनेचे आणि विशेषतः बघे लोकांचे अगदी तंतोतंत वर्णन केलेले आहे.
सॅम्युएल पेपीज त्याकाळी प्रीवी सील यांच्याकडे क्लर्क म्हणून काम करत होता. त्याने गडबडीने इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याच्या कानावर ही आगीची बातमी घातली.
राजाने तातडीने आग विझवण्यासाठी आगीच्या वाटेत येणारी घरेच पडून टाकण्याचे आदेश दिले. राजाच्या आदेशानुसार आग ज्या दिशेने पसरत होती त्या दिशेची घरे पाडण्यात आली, पण तरीही आग पसरतच राहिली.
४ सप्टेंबरचा दिवस उजाडला तरी लंडनमधील आग आटोक्यात आली नव्हती. राजा स्वतः आग विझवण्यासाठी रस्त्यावर उतरला. आग विझवण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्वयंसेवकांना पाण्याच्या बदल्या भरून देऊ लागला. आग विझवणारे आग विझवत होते आणि बघणारे बघत होते.
आगीच्या वाटेत येणारी घरे पाडण्यासाठी काही लोकांनी गनपावडरचा वापर केला. याने आग आटोक्यात येण्याऐवजी ती आणखीनच तीव्रतेने भडकली. गन पावडरमुळे मोठा स्फोट झाल्याचा आवाज येऊ लागला. अशातच अफवा पसरली की लंडनवर फ्रांसने हल्ला केला आहे. या अफवेने आधीच घाबरलेली लोकं आणखीनच घाबरून गेलीत.
या आगीत लंडन शहराचा पूर्ण कोळसा झाला होता. शहराचा फक्त एक पंचमांश हिस्सा तेवढा शाबूत राहिला. प्रशासकीय इमारती, १३,००० घरांची राखरांगोळी झाली होती. आश्चर्याची आणि तितकीच दिलासादायक गोष्ट म्हणजे या भयानक आगीत जीवितहानी मात्र फारशी झाली नव्हती.
पण हजारो लोक निराधार झाले होते. त्यांचे होते नव्हते सगळे जळून खाक झाले होते. एकोणनव्वद पॅरिश चर्चेस, गाईडहॉल, अनेक सार्वजनिक इमारती, जेल, बाजारपेठ, सत्तावन्न हॉल्स, हे सगळे जाळून खाक झाले होते. या आगीत एकूण ५ ते ७ अब्ज पौंडची वित्तहानी झाली होती. राजा चार्ल्सने ही आग विझवण्यासाठी धडपडलेल्या सैनिकांमध्ये १०० गिनीज वाटून दिले होते. इतकेच नाहीतर आगीशी लढणाऱ्या या योद्ध्यांना राजाने शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
आगीची ही भीषण दुर्घटना घडल्यानंतर एका गरीब व्यापाराने ही आग आपणच मुद्दामहून लावल्याचा धक्कादायक खुलासा केला.
त्याचा हा खुलासा ऐकून राजा इतका संतापला की त्याची मागची-पुढची काहीच चौकशी न करता सरळ त्याला फासावर लटकवण्याची शिक्षा दिली गेली आणि तातडीने तिची अंमलबजावणीही करण्यात आली. परंतु काही काळानंतर हे उघड झाले की ज्यावेळी लंडनमधे आग लागली होती त्या दिवसात तर हा व्यापारी इंग्लंडमधे नव्हताच, पण मग त्याने स्वतःहून असा कबुलीजबाब का दिला? तेही याचे किती गंभीर परिणाम होतील याचा अंदाज असताना? यामागील सत्य मात्र स्पष्ट झाले नाही.
शहरात लागलेल्या या भीषण आगीने संपूर्ण शहर गिळंकृत केले होते. आगीने जो काही विध्वंस केला होता त्याच्या खाणाखुणा पुसून टाकण्यात आल्या आणि पुन्हा एका नव्या आशेने शहराच्या पुनर्बांधणीला सुरुवात करण्यात आली. ज्या ठिकाणी या आगीला सुरुवात झाली त्या पुडिंग लेनमधे या भीषण दुर्घटनेची आठवण म्हणून एक स्मारक बांधण्यात आले.
लंडनच्या पुनर्बांधणीची जबाबदारी सर ख्रिस्तोफर व्रेन यांच्याकडे सोपवण्यात आली. ख्रिस्तोफर व्रेन यांनी संपूर्ण लंडन शहर आज जसे आहे तसे त्याकाळी उभे केले. त्यांच्या या उभारणीतील मास्टरपीस म्हणून सेंट पॉल्स कॅथेड्रल या चर्चकडे पहिले जाते. या चर्चचे बांधकाम १६७५ मधे सुरु झाले आणि १७११ साली ते पूर्ण झाले. या चर्चचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सर ख्रिस्तोफर व्रेन यांना आदरांजली म्हणून त्या चर्चमध्ये एक शिलालेख बसवण्यात आला आहे.
व्रेन यांनी त्याचवेळी शहातील आणखीन बावन्न चर्चेसचे बांधकाम पूर्ण केले. आज जे लंडन शहर आपण पाहतो ते ख्रिस्तोफर व्रेन यांनीच उभालेले आहे. या आगीच्या झपाट्यातून ज्या काही मोजक्या इमारती शिल्लक राहिल्या त्या देखील आज लंडनमध्ये पाहायला मिळतात.
थोडक्यात काय तर, कितीही संकटे आली काय किंवा संकटांची मालिका आली काय, मनुष्य जातीने नेहमीच त्यातून धडे घेत पुन्हा भरारी घेतलेली आहे. जसे लंडन शहर राखेतूनही पुन्हा उभे राहिले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.