आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
वर्तमानकाळाला सगळ्यात जास्त आकर्षण असते ते भुतकाळाचे. भुतकाळ समजून घेण्यासाठी इतिहासाशिवाय दुसरा पर्याय नाही. इतिहास जसाजसा उलगडत जातो तसे अनेक रंजक गोष्टींचा शोध लागत जातो.
अशाच काही अजब गोष्टींपैकी एक म्हणजे तो चीनची टेराकोटा सेना. चीनच्या इतिहासातील सगळ्यात रंजक पान असलेल्या या सेनेबद्दल जगात फारच कुतुहूल आहे. पुनर्जन्मावर विश्वास ठेवून मृत व्यक्तीच्या देहाबरोबर अन्नधान्य, सोने-चांदी ठेवणे हे आपण इजिप्तच्या इतिहासात शिकलेलो आहोतच.
परंतू मृत्युनंतरही स्वत:बरोबर आठ हजारपेक्षाही जास्त सैन्याची फौज असावी असं म्हणणारा चिनी शासक किन शी हुआंग अजबच!
आज आपण याच किन शी हुआंगच्या राजनितीबद्दल आणि त्याच्या या गुढ सैन्याबद्दल जाणुन घेणार आहोत.
चीनच्या शानक्सी प्रांतात तेरा वर्षांचा असताना एका राजाने आपल्या कबरीचे काम हाती घेण्यास सांगितले. या राजाचे नाव होते यिंग झेंग. पुढे, ३८ व्या वर्षी या राजाने सगळ्या राज्यांना एकत्र आणले. त्यानंतर तो सम्राट किन शी हुआंग म्हणून ओळखला जाऊ लागला.
इ. सन पुर्व २२१- २०७ इ. सन पुर्वपर्यंत किन शी हुआंगने चीनवर राज्य केले. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या चीनच्या भिंतीची निर्मितीसुध्दा याच काळात झाली. साम्राज्याच्या विस्ताराबरोबरच राज्याच्या धनसंपदेतही वाढ होऊ लागली.
सुरुवातीला किन शी हुआंग एक साम्राज्यवादी आणि क्रूर सम्राट असेल असंच वाटतं. परंतू, काही इतिहासतज्ज्ञांचं मात्र याबाबतीत दुमत आहे. चीनवर साम्राज्य स्थापन केलेले साम्राज्य किन शी हुआंगने टिकवले ते अतिशय कुशल प्रशासकीय नेतृत्वाच्या जोरावर. याच राजाने चीनमध्ये वजनकाट्याची पध्दत सुरु केली. तसेच एकाच लिपीमध्ये लिहिण्याची सुरुवातही याच्याच काळात अस्तित्वात आली.
किन शी हुआंगची पहिली राजधानी शिआंग शहरात त्याने २७०पेक्षा जास्त राजवाडे उभारले होते असे म्हटले जाते. त्यातील एकच आता अस्तित्वात आहे असे म्हटले जाते. एक अजब बाब म्हणजे ज्या राज्याला तो हरवत असे त्या राज्याच्या राजघराण्यास त्यांच्या राजवाड्याची हुबेहूब प्रतिकृती असलेल्या घरात राहण्यासाठी तो शिआंग शहरात घेऊन येत असे.
किन शी हुआंगने राज्यातील सोयीसुविधांवर विशेष लक्ष दिले होते. मोठ्या भिंती उभारून राज्याभोवती कडेकोट सुरक्षा उभी केली.
साम्राज्य वाढत असताना किन शी हुआंगला दीर्घायुषी कसं होता येईल याची चिंता भेडसावत होती. त्यावेळच्या काही तज्ञांच्या मते पुर्व चीनच्या समुद्री भागातील बेटांवर अशा काही जादूई वनस्पती होत्या ज्या दीर्घायुष्य मिळवण्यासाठी उपयोगी होत्या. त्याने अनेक युवकांना या बेटांच्या शोधात पाठवले होते असे म्हणतात. पण त्याचे हे प्रयत्न फोल गेले.
मृत्यूनंतर आयुष्यात येणार असलेल्या निरसतेने त्यावेळी सम्राटाला ग्रासले. जिवंतपणी उपभोगत असलेल्या सुखसोयी आणि सुरक्षितता मृत्यूनंतर नसल्याची कल्पना त्याला पटत नव्हती.
तेव्हाच त्याने स्वत:ची एक भली मोठी आलिशान कबर बनवण्याचा आदेश दिला. त्याचवेळी आपल्या सैन्याचे मातीचे पुतळे बनवण्याचा आदेश त्याने दिला. त्यावेळी बांधली गेलेली ही जगातील सर्वात मोठी कबर होती.
त्याच्या कबरीसाठी शिआन शहराजवळ उत्तरी भागातील एका डोंगराच्या पलीकडे वाळवंटातील जागा निवडण्यात आली. जमिनीच्या आत खोदून राजाच्या कबरीचे काम सुरु करण्यात आले. त्याबरोबर सैन्यातील योध्दे आणि त्यांच्या घोड्यांचेसुध्दा पुतळे बनवण्यात आले.
राजाच्या मृत्यूनंतर त्याला याच कबरीमध्ये पुरण्यात आले. त्यानंतर २२०० वर्ष ही कबर जमिनीतच लपुन राहिली.
१९७४मध्ये एका शेतकऱ्याने आपल्या विहिरीचे काम हाती घेतले असता खोदकामात त्याला जमिनीत गाडलेल्या या कबरीचे अवशेष सापडले. चिनी पुरातत्व विभागाने या भागात उत्खननाचे काम हाती घेऊन इतिहासाचा हा अजब नमुना जगासमोर आणला. त्यानंतर तब्बल १० वर्ष इथे उत्खनन चालूच होते.
या उत्खननात जवळजवळ ८००० शिपायांचे पुतळे सापडले. या पुतळ्यांना अतिशय सुंदरपणे आणि नाजुकपणे रंगवले होते. उत्खननानंतर सम्राट किन शी हुआंगच्या कबरीचे अवशेषसुध्दा इथेच सापडले. तसेच काही रथ आणि ४ पितळाच्या घोड्यांचे अवशेषही सापडले आहेत.
३८ वर्गमैल एवढ्या मोठ्या परिसरात पसरलेल्या या कबरीचे अवशेष सम्राटाचे मृत्यूपुर्वीचे आयुष्य दाखवतात. सम्राटाने अनुभवलेल्या सगळ्या सुखसोयींचे वर्णन आणि पुतळे आपल्याला इथे बघायला मिळतात.
मृत्यूनंतरही आपल्या देहाला सुरक्षित ठेवण्यासाठी या टेराकोटा सेनेची निर्मिती केली होती अशी मान्यता आहे. सुमारे ७,२०,००० लोकांनी या वास्तूचे काम केले असे म्हणतात.
या सेनेचे वैशिष्ट म्हणजे या चीनमधील वेगवेगळ्या भागातील सेनेचे प्रतिनिधित्व करतात. वेगवेगळे अववय बनवुन त्यांना एकत्र जोडले गेले आणि मग रंग दिला गेला.
या अद्भुत कबरीच्या निर्मितीच्या वेळेबाबत मात्र इतिहासकारांत वाद आहे. काहींच्या मते याला बनवण्यासाठी ४० वर्षाचा कालावधी लागला तर काहींच्या मते फक्त १० वर्ष.
इ.स.पुर्व २२१ मध्ये राजा किन शी हुआंगने संपूर्ण चीनवर जेव्हा आपले साम्राज्य प्रस्थापित केले तेव्हा त्याने या कामास सुरुवात केली आणि इ.स.पुर्व २०९ मध्ये त्याने हे काम थांबवले असे म्हटले जाते.
या पुतळ्यांचे परिक्षण केले तेव्हा या पुतळ्यांनी काही नैसर्गिक आपत्तींनाही तोंड दिले असल्याचे लक्षात आले. या कबरीच्या भोवताली असलेल्या भिंतीची रुंदी ३.५ मीटर इतकी होती परंतु, महापुरामुळे तिची झीज होऊन १.७ मीटर इतक्याच रुंदीची भिंत उरली. पुतळ्यांना पडलेल्या तड्यांवरुन पुतळ्यांवर पुराचा अनेक वेळा सामना करण्याची वेळ आली आहे असे दिसते.
तसेच या कबरीला इजा पोहचवण्याचा अजुन एक प्रयत्न झाला होता आणि तो म्हणजे पश्चिम भागातील चू शिआंग यू या राजाकडून. किन शी हुआंगने चू शिआंगच्या राज्याला उध्वस्त केले आणि त्याच्या पूर्वजांनाही मारले असा उल्लेख चिनी ऐतिहासिक हस्तलिखितांमध्ये आढळतो. या कबरीमध्ये ठेवलेली तांब्याची तलवारे आणि इतर हत्यार मिळवण्याचा हा प्रयत्न असू शकतो असे म्हटले जाते.
खोदकाम करत असताना जळलेल्या मातीचे काही अवशेष सापडले आहेत. त्यावरुन या वास्तूला जाळुन टाकण्याचा प्रयत्न केला गेला असे समजते.
नंतर या स्थळाला चीनने राज्याची खाजगी संपत्ती म्हणुन जाहीर केले. २००५मध्ये चीनने या ठिकाणचे सगळे हक्क आपल्याकडे घेत देशाच्या सांस्कृतिक अवशेष विभागाकडे याच्या देखरेखीची जबाबदारी सोपवली.
या जागेची योग्य काळजी घेण्यासाठी चीनमध्ये किन शी हुआंग नामक एक विभाग बनवला गेला. २००९मध्ये या ठिकाणाचे रुपांतर एका संग्रहालयात करण्यात आले. या ठिकाणाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन युनेस्कोने १९८७मध्ये त्याला जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले.
आजही ही कबर किन शी हुआंगच्या साम्राज्याच्या भव्यतेची साक्ष देत उभी आहे. मृत्यूनंतरही आपले अस्तित्व अबाधित ठेवण्याची मानवी मनाची शोकांतिका त्या कबरीतुन दिसून येते. त्याबरोबरच त्या काळातील लोकांची कलात्मकता आणि जीव झोकून काम करण्याची वृत्ती पुतळ्यांवरील कोरीव कामातुन आपल्याला दिसते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.