आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आधुनिक भारताचा भक्कम पाया रचणाऱ्या अनेक महान विभूतींमध्ये महर्षी दयानंद सरस्वती यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मोगल सत्तेच्या अस्तानंतरच्या इतिहासाचे जर अवलोकन केले तर मराठा साम्राज्याचा अस्त आणि पाश्चात्त्य इंग्रजी सत्तेचा पाया भारतामध्ये दृढ झालेला असताना भारतवर्षामध्ये विविध धार्मिक सांप्रदायिक समस्या याबरोबरच राजकीय समस्या व त्यातून निर्माण झालेली सामाजिक परिस्थिती अत्यंत बिकट तसेच गुलामगिरीची निदर्शक बनलेली होती.
हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवराय, हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांनी जागवलेला राष्ट्राभिमान पुनश्च भारत वर्षाच्या रोमारोमात त्याच जोमाने वाहता करण्यामध्ये महर्षी दयानंद सरस्वती हे एक अलौकिक व्यक्तित्व म्हणून उदयास आले.
गुजरात येथील काठेवाडी प्रांतातील मोरवी संस्थानांमध्ये असलेल्या टंकारा या गावी महर्षी दयानंद सरस्वती यांचा 1824 मध्ये जन्म झाला. वडील करसनजी तिवारी यांचे पोटी जन्मलेला बालक शंकर, पुढे महर्षी दयानंद सरस्वती म्हणून प्रसिद्ध झाला. महर्षी दयानंद यांच्या जन्माच्या वेळी देश अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा, मूर्तिपूजा तसेच जाती आधारित भेदभाव, स्त्रियांची दुय्यम सामाजिक स्थिती, शिक्षणाचा अभाव, शिवाय इंग्रजांची गुलामगिरी अशा अनेक समस्यांनी ग्रस्त होता. भारतमातेचे दुःख दूर करण्यासाठी महर्षी दयानंद यांनी कठोर तपस्या अध्ययन करून भारतवर्षाचा मूळ धर्म असलेल्या हिंदू धर्माचे सर्वप्रथम अध्ययन व परीक्षण केले.
हिंदू धर्माच्या ऱ्हासासाठी कारणीभूत असलेल्या अनेक गोष्टींवर त्यांनी प्रहार केला. स्त्री आणि यांना वेदांचा अध्ययन करण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी जग जाहीर केले. त्यामुळे धार्मिक वर्तुळामध्ये प्रचंड खळबळ माजली.
मात्र राष्ट्र उद्धाराच्या कार्यात त्यांनी तडजोडीची भूमिका मुळीच स्वीकारली नाही. हिंदू धर्मातील मूर्तिपूजा सर्वांत त्याज्य असल्याचे महर्षी दयानंदांनी निक्षून सांगितले. ईश्वर एकच तथा सर्वव्यापी असून तो सृष्टीकर्ता, दयाळू, निराकार तसेच कर्मफलप्रदाता असल्याचे सांगितले. वेद हे ईश्वरीय ज्ञान असून ते सर्व प्राणिमात्रांच्या तसेच सर्व मानवी समाजाच्या हिताचे असल्याचे त्यांनी घोषणा केली व भारतवर्षाला वेदांकडे वळण्याच आवाहन केलं. आणि आधुनिक धर्मक्रांतीला सुरुवात झाली.
अनेकानेक धर्ममार्तंड तसेच कर्मठ वर्गाने महर्षी दयानंद यांना तीव्र विरोध केला त्यांच्यावर प्राणघातक हल्ले सुद्धा केले. यात अनेक विधर्मी तसेच राजकीय इंग्रजी सत्तेचा सुद्धा हस्तक्षेप होता. महर्षी दयानंद सरस्वती यांनी हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठी जातीप्रथा नाकारून वेदाध्ययन करण्यासाठी संपूर्ण देशात गुरुकुल यांची स्थापना करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
इसवीसन 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. आर्य समाजाचे माध्यमातून जाती प्रथेवर बहिष्कार घातला आर्य समाजाची दारे सर्व जाती संप्रदाययांसाठी खुली करून दिली. त्यामुळे आर्य समाजात अनेक विद्वान जोडले गेले. आर्य समाज युवकांचा आकर्षण बनला आणि यातूनच इंग्रजी सत्तेला हादरा देणारे युवक पुढे आले.
पंडित रामप्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आजाद, भगतसिंग, राजगुरू, अश्फाकउल्ला खान पंडित लेखराम, स्वामी श्रद्धानंद यांसारखे अनेक नररत्ने आर्य समाजाने भारताला दिली.
पुढे यांच्या प्रेरणेतूनच हजारो क्रांतिकारक निर्माण झाले व त्यांनी 1857 च्या संग्रामामध्येसुद्धा भव्य दिव्य कार्य केले. इंग्रजांनी महर्षी दयानंद सरस्वती यांचे साहित्य व त्यांचं कार्य यावर नियंत्रण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र महर्षी दयानंद यांना रोखण्यात त्यांना यश आले नाही. महर्षी दयानंद यांनी श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुसूर्य महाराणा प्रताप यांचा आदर्श पुनश्च स्थापन करण्याचे संपूर्ण भारत वर्षाला आवाहन केले. हिंदू धर्माचे वैदिक स्वरूप त्यांनी विशद केले आणि वैदिक धर्माचा प्रचार आणि प्रसार आर्य समाजाच्या माध्यमातून करून परधर्मात गेलेले लाखो हिंदू यांना स्वधर्मात घेतले.
आर्यसमाज प्रणित वैदिक विचारांचा प्रसार झाल्याने हिंदुधर्मातील अनेक भ्रामक रूढींवर आघात झाला महर्षी दयानंदांनी वेदांचे भाष्य, संस्कार विधी आणि प्रसिद्ध ग्रंथ “सत्यार्थप्रकाश” यांचे लिखाण केले. त्यांचे गुरु विरजानंद सरस्वती यांनी त्यांना संपूर्ण जीवन भारतवर्षातील दैन्य दारिद्र्य व गुलामगिरी नष्ट करण्यासाठी समर्पित करण्याचे आवाहन केले आणि महर्षी दयानंदांनी ते अतिशय विनम्रतेने स्वीकारले. संपूर्ण भारतभर भ्रमण करून अनेक राजे महाराजे यांना राष्ट्र कार्यामध्ये जोडले आणि 1857 चा उठावामध्ये राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांसारख्या अनेक वीरांना राष्ट्र कार्याची प्रेरणा दिली.
भारतीय समाजात सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्रांतीचा सूर्योदय झाला. समाजात आर्य समाजाच्या प्रेरणेने हजारो क्रांतिकारक तयार झाले. महर्षी दयानंद सरस्वती यांनी त्या काळामध्ये विविध धार्मिक मतांचे परीक्षण केले. ख्रिश्चन, इस्लाम, बौद्ध, जैन या संप्रदायासोबत हिंदूधर्माअंतर्गत असलेल्या बुवाबाजी, पाखंड, मूर्तिपूजा अशा अनेक विषयांची समीक्षा केली.
सत्यार्थप्रकाश या ग्रंथामध्ये त्यांनी या सर्व बाबींवर यथायोग्य प्रकाश टाकला व त्यातून प्रेरणा घेऊन लाखो लोक हिंदू धर्मामध्ये परत आले. त्यांचे शिष्य स्वामी श्रद्धानंद यांनी धार्मिक शुद्धीकरणाचे फार मोठे आंदोलन उभे करून हिंदू धर्माला बळकट स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातच त्यांना प्राण गमवावे लागले.
अनेक आर्यसमाजी क्रांतिकारक फासावर चढले व भारत मातेच्या चरणी आपले बलिदान समर्पित केले. महर्षी दयानंदांनी हिंदू धर्माचे निरपेक्ष आणि कठोर परीक्षण करून वैदिक धर्माची भक्कम पायाभरणी केली. यज्ञाचे महत्त्व त्यामागील विज्ञान आणि मानवकल्याणाची महती सांगितली.
लाखो आर्यसमाजी लोकांनी जातीभेद नाकारून आंतरजातीय विवाह सुद्धा घडवून आणले. हे कार्य आजतागायत सुरू आहे.
माणसामाणसात कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व ईश्वराची संतती असल्याचे आर्य समाजाने ठासून सांगितले. कोणताही व्यक्ती जन्माने ब्राह्मण वैश्य क्षत्रिय व शुद्र असू शकत नाही तर त्याचे गुणकर्म स्वभाव यानुसार त्याचा वर्ण ठरतो. त्यामुळे एकाच कुटुंबात सर्व वर्णाचे लोक असु शकतात असे परखडपणे सांगितले. त्यामुळे आधुनिक भारताचा पाया मजबूत होण्यासाठी फार मोलाची मदत झाली.
महर्षी दयानंद यांच्या कार्यामुळे चिडून इंग्रज सरकारने तसेच विधर्मी लोकांनी षडयंत्र रचून महर्षी दयानंद यांचेवर विषप्रयोग केला आणि 30 ऑक्टोबर 1883 भर दीपावलीला महर्षी दयानंद यांची प्राणज्योत मालवली.
महर्षी दयानंदांनी स्त्री जातीचा उद्धार, अस्पृश्यता निवारण, धार्मिक भेदभाव याबाबत मानव कल्याणाच्या हितार्थ आपले आयुष्य वेचले. मात्र यातूनच आजच्या भारत वर्षाची निर्मितीचा पाया घातला गेला. महर्षी दयानंद यांचे राष्ट्रकार्य त्यांचे धर्म कार्य भारताला एक दिवस संपूर्ण जगाचे आणि अखिल विश्वामध्ये शांतता व सौहार्द निर्माण करण्यासाठी नेतृत्व करण्याची क्षमता निश्चितच प्रदान करेल यात शंकाच नाही!
असा राष्ट्रपुरुष हाच आधुनिक भारताचा पितामह आहे यात कोणत्याही सूज्ञास शंका नसावी!
वंदे मातरम!
लेखक- निवृत्ती ज्ञानेश्वर शेडगे (आर्य)
बुलढाणा, महाराष्ट्र
9764057837
nivruttishedge20@gmail. com
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.