आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
लॉकडाऊनच्या या दुष्कर काळात आयुष्य अगदी कंटाळवाणे, निरस, अनिश्चित झालेले असताना, आणि काहीसे असुरक्षेच्या आणि भीतीच्या सावटाखाली जात असताना, या स्थितीतून थोडेसे सावरण्यासाठी आपल्याला खरी मदत कुणाची झाली असेल तर ती दूरदर्शनची. हो! ज्या दूरदर्शनच्या काळ्या-पांढऱ्या आणि नंतर रंगीत झालेल्या पडद्यावरील दर्जेदार मालिका, कार्यक्रम, सिरियल्स पाहत ८०-९०च्या दशकातील पिढी मोठी झाली त्याच दूरदर्शनने या पिढीला पुन्हा एकदा बालपणीचा काळ अनुभवण्याची संधी दिली.
लॉकडाऊनच्या काळात मालिका, चित्रपटांचे चित्रीकरण बंद झाले आणि बहुतांश टीव्ही चॅनेल्सवर आपल्या मालिका बंद करण्याची वेळ आली. अशावेळी दूरदर्शनवर काही जुन्या मालिकांचे रिपीट टेलिकास्ट दाखवणे सुरु झाले. यात पहिली सुरुवात झाली ती रामायणपासून. मग हळूहळू प्रेक्षकांना तो काळ आठवू लागल्या आणि त्या काळच्या एकापेक्षा एक दर्जेदार मालिका. ज्यात कुठलाही इमोशनल, पॉलिटीकल मसाला नव्हता आणि भयंकर बॅकग्राउंड म्युझिकचे झटके नव्हते. या मालिकांनी भारतीय प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन तर केलेच शिवाय काही काही मालिकांनी तर प्रेक्षकांच्या ज्ञानात मौल्यवान भरही घातली.
असाच एक कार्यक्रम ज्याची त्याकाळी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहायचे तो म्हणजे सुरभी!
रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ काक यांच्या साध्यासुध्या निवेदनाने या कार्यक्रमाला अक्षरश: चारचांद लावले. रेणुका शहाणेचा चार्मिंग लुक आणि तिची साधी पारंपारिक वेशभूषा यासोबत तिचं मनमोहक खुमासदार हसू ही या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते.
भारताचा विविधांगी सांस्कृतिक पटल भारतीय प्रेक्षकांसमोर मांडणे याच एकमेव उद्देशाने हा कार्यक्रम सुरु करण्यात आला होता आणि हा कार्यक्रम यशस्वीही ठरला. भारत, इंडिया किंवा हिंदुस्तान काहीही म्हणा पण, याची एक विविधांगी आणि बहुरंगी-बहुढंगी संस्कृती आहे, तिचा पोत सरळसोट एकरंगी अजिबात नाही.
एखाद्या नियतकालिकातून ज्याप्रकारे भारताच्या या विविधांगी संस्कृतीचा, त्यातील बहुविध रंगांचा आढावा घेतला जावा अगदी त्याच पद्धतीने या कार्यक्रमात तो घेतला जायचा. भारतीय परंपरा, रीतीरिवाज म्हणजे काही तरी जुनाट, बुरसटलेल्या, प्रथा असा जो एक संकुचित समज आजच्या काळात तयार झाला आहे, त्याला छेद देण्याचे काम या कार्यक्रमाने निश्चितच केले.
प्रत्येक भारतीयाला भारताच्या विविधतेत एकता या सांस्कृतिक ब्रीदवाक्याचा अभिमान नेहमीच वाटत आला आहे. भारताची ही विविधता म्हणजे नेमके काय, तिचे खरे स्वरूप काय आहे, तिला स्वतःची एक वेगळी चव आहे, स्वतःचा वेगळा गंध आहे, ही सगळी वैशिष्ट्ये या कार्यक्रमाने भारतीय प्रेक्षकांसमोर मांडली आणि खऱ्या अर्थाने भारतातील ही विविधता एकतेत परावर्तीत करण्यात हातभार लावला.
हा कार्यक्रम सलग ११ वर्षे लोकप्रिय ठरला तो त्यातून दाखवण्यात येणाऱ्या अशा सांस्कृतिक प्रवाहांच्या विविधतेच्या गोष्टींमुळेच. या कार्यक्रमाच्या पहिल्याच एपिसोडमध्ये काक यांनी सुरभीचा अर्थ विषद केला होता. सुरभी म्हणजे सुगंध! संस्कृतीच्या या दरवळणाऱ्या सुगंधाशी परीचय करून देण्यासाठीच या कार्यक्रम सुरु करण्यात आला होता.
परंपरा, संस्कृती, कौशल्य हे सगळे आयुष्याचे असे पैलू आहेत ज्यामुळे आपले आयुष्य समृद्ध होते. आपला सांस्कृतिक वारसा समजून घेतल्याने आणि त्याच्याशी आपली नाळ जोडल्याने आपल्या आयुष्याला सार्थकता लाभते.
सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्कृती या शब्दाचा खरा अर्थ उलगडून दाखवला. भारतातील वर्ग-जाती-धर्म भेदाच्या पलीकडे जात, देशाच्या कानाकोपऱ्यातील संगीत, हस्तकला, नृत्यकला शिल्पकला इथपासून ते सिनेमा, इतिहास, पर्यावरण, खाद्यसंस्कृती आणि अशा बऱ्याच गोष्टींची मेजवानी या कार्यक्रमातून प्रेक्षकांना मिळत राहिली.
एकाच एपिसोडमध्ये केरळच्या जुन्या मार्शल आर्ट पासून कालारीपायत्तुच्या सिरामिक ग्लेझिंग पर्यंत कित्येक गोष्टींविषयी माहिती दिली जात असे. भारताच्या कानाकोपऱ्यातील सांस्कृतिक वैशिष्ट्ये शोधून त्यावर संवाद स्वरुपात तेही अतिशय रंजक पद्धतीने माहिती देता येते हे पहिल्यांदा या कार्यक्रमातून दाखवून दिले. या कार्यक्रमाच्या निवेदकांची भाषा, त्यांची वेशभूषा आणि देहबोली या सगळ्याचा प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळाच ठसा उमटत असे. या कार्यक्रमात कुठकुठल्या गोष्टींची रेलचेल होती हे सांगायचे म्हंटले तर ही यादी कधीच संपणार नाही.
दूरदर्शनसारख्या सार्वजनिक व्यासपीठावर प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाला देशभरातून तर चांगला प्रतिसाद मिळालाच पण, देशाबाहेरही अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. भारतीय संस्कृती म्हणजे फक्त देव-धर्म-देवळे आणि कर्मठ रूढी, असे जे चित्र होते, ते बदलण्यास सुरुवात झाली. भारताचा एक अनोखा, उमदा, प्रसन्न चेहरा या कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर आला. असा भारत ज्याबद्दल प्रत्येक देशवासीयाला अभिमान वाटेल. यातील दोन्ही निवेदकांचे संवाद हे संस्कृत प्रचुर हिंदीतील असत, तरीही ते सामान्य पेक्षकाला बोजड वाटत नव्हते, कारण त्यात एक सहजता होती, नर्म खुमासदार विनोद होता, ज्यामुळे प्रेक्षकाला या कार्यक्रमाने आकर्षित केले. या कार्यक्रमामुळे भारतीय प्रेक्षक आणि विविधांगी भारतीय संस्कृती यांच्यातील संबंध आणखी दृढ झाले.
सिद्धार्थ काक हे या कार्यक्रमाचे निर्माते होते. त्यांनी याआधी बऱ्याच डॉक्युमेंटरी फिल्म बनवल्या होत्या. त्यामुळे या कार्यक्रमाची निर्मिती करतानाही एक डॉक्युमेंटरी टाइप सिरीयल बनवण्याचीच कल्पना त्यांच्या डोक्यात होती. अशी डॉक्युमेंटरी ज्यात शास्त्रीय संगीत आणि शास्त्रीय नृत्याबद्दल काही विशेष आणि आकर्षक माहिती असेल. परंतु माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या तत्कालीन सचिवांनी त्यांना असे सुचवले की, या कार्यक्रमाच्या माधमातून भारतभर फिरून भारतातील वेगवेगळ्या प्रांताची माहिती संकलित करावी. ही माहिती एखाद्या इंद्रधनूसारखीच आकर्षक होईल.
देशाच्या विविध भागातील विविध प्रकारच्या संस्कृतीचे दर्शन घडण्याची खात्री झाल्यावर या कार्यक्रमाला देशभर प्रचंड लोकप्रियता लाभली. या संदर्भातील एका आठवणी सांगताना काक अजूनही हरवून जातात.
असेच एकदा ते अंदमानच्या बेटावर शुटींग करत असताना तिथे लाकूडफाटा वेचण्यासाठी आलेल्या एका आदिवासी बाईने त्यांच्याकडे बोट केले आणि म्हणाली, “सुरभी?”म्हणजे या कार्यक्रमाला किती लोकप्रियता लाभली असेल याची कल्पना तुम्हाला आलीच असेल.
सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे यांच्या प्रसन्नचित्त वावराने जितका हा कार्यक्रम यशस्वी झाला तितकेच श्रेय या कार्यक्रमाच्या रिसर्च टीमलाही दिले पाहिजे. किंबहुना काक तर अगदी नम्रपणे हे मान्य करतात की या टीमच्या दर्जेदार कामामुळेच हा कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर पोहोचला आणि त्याबद्दल या टीमचे आभार मानायलाच हवेत.
आज सोशल मिडीया, इंटरनेटच्या आणि वेगवेगळ्या वेबसिरीज आणणारे स्ट्रीमींग चॅनेल्सच्या काळातही सुरभीसारख्या एका दर्जेदार कार्यक्रमासाठी प्रेक्षकवर्ग आसुसलेला आहे, यावरूनच या कार्यक्रमाने मिळवलेल्या यशाचा अंदाज बांधला जाऊ शकतो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.