आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारतीय रेल्वेच्या जाळ्याने एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत संपूर्ण देश जोडला आहे. जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हे जाळे पसरले आहे. आधुनिक आणि जलद गतीने धावणाऱ्या वाहनांचा शोध लागण्यापूर्वी भारतीय रेल्वेने दळणवळण क्षेत्रात एक अभूतपूर्व क्रांती घडवून आणली होती.
ब्रिटिशांनी आपल्या व्यापार वाढवण्यासाठी या भल्यामोठ्या रेल्वेमार्गाची निर्मिती केली असली तरी, यामुळे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यालाही गती मिळाली. भारताच्या प्रगतीत भारतीय रेल्वेने दिलेले योगदान खूपच प्रभावी राहिले आहे. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पसरलेल्या या रेल्वेच्या जाळ्यामुळेच देशांतर्गत व्यापार सुकर झाला.
आजही दळणवळणाच्या क्षेत्रात भारतीय रेल्वेचे महत्व अनन्यसाधारण आहे. भारतात रेल्वे धावू लागल्या नंतर भारताचा चेहरा मोहराच बदलून गेला. भारताचा कायापालट करण्यात रेल्वेने महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे.
अलीकडेच भारतीय रेल्वेने आणखी एक नवा प्रयोग करून इतिहास रचला आहे. भारतीय रेल्वेने दक्षिण भारतात एक भली मोठी मालगाडी चालवली आहे. या मालगाडीला १७७ डब्बे जोडण्यात आले होते.
एवढी मोठी रेल्वे चालवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. पण, यावेळी जे तंत्रज्ञान वापरण्यात आले ते निश्चितच खास आहे.
या मालगाडीला सुपर अॅनाकोंडा असे नाव देण्यात आले आहे. यामागे कारणही तसेच आहे. अॅनाकोंडाप्रमाणेच भली मोठी असणारी ही रेल्वे तब्बल दोन किलोमीटर लांब आहे.
ही रेल्वे स्टेशनवरून जाते तेंव्हा लोक नुसते तोंडात बोटे घालून पहात राहतात. या रेल्वेत तीन इंजिन जोडण्यात आले आहेत. ज्यामुळे पुढच्या इंजिनवर डब्यांना ओढण्याचा जास्त ताण येत नाही.
तीन मालगाड्या एकमेकांना जोडून दोन किमी लांबीची ही मालगाडी बनवण्यात आली असून याला ‘सुपर अनाकोंडा फ्रेट ट्रेन’ असे नाव देण्यात आले आहे.
या आधीही अशाप्रकारची भल्या मोठ्या लांबीची मालगाडी भारतीय रेल्वे रुळावरून धावली आहे. परंतु त्या ट्रेनमध्ये आणि या ट्रेनमध्ये असलेला वेगळी वैशिष्ट्ये कोणती आहेत जाणून घेऊया या लेखातून.
ही मालगाडी पहिल्यांदा रुळावरून धावली तेंव्हा संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली होती. या मालगाडीची आणखीही काही वैशिष्ट्ये आहेत. याच पद्धतीची रेल्वे आधीही भारतीय रुळांवरून चालवली गेली आहे. तरीही या रेल्वेमध्ये वापरण्यात आलेल्या काही विशिष्ट आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे ही रेल्वे विशेष वाटते, यात काही वाद नाही.
या मालगाडीने पहिला प्रवास लाजकुरा ते राऊरकेला दरम्यान केला. लाजकुरा ते राऊरकेला दरम्यानचे १२० किमीचे अंतर या मालगाडीने केवळ २ तासात पूर्ण केले.
या मालगाडीत ६००० एचपीच्या तीन इलेक्ट्रिक इंजिनचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये डिस्ट्रीब्यूटेड पॉवर कंट्रोल सिस्टम (DPCS) या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संपूर्ण ट्रेन नियंत्रित केली जाते.
साधारण एका मालगाडीत ५८ BOXN किंवा ४० BCN प्रकारचे डबे जोडलेले असतात. या डब्यांची लांबी ७०० मीटर असते. परंतु डीपीसीएस तंत्राच्या सहाय्याने चार मालगाड्याही जोडता येऊ शकतात. यामध्ये ५८ BOXN असलेल्या तीन गाड्या एकमेकांना जोडल्या जातात आणि सगळ्यात शेवटी एक ब्रेक गाडी जोडली जाते.
या मालगाडीत मध्यभागीही एक इंजिन बसवले जाते. जे रेल्वेला जोडलेल्या मागच्या डब्यांना पुढे ओढण्यास मदत करते. मध्यभागी इंजिन बसवल्याने संपूर्ण रेल्वे एका गतीत धावण्यास मदत होते. पुढच्या इंजिनवर मागच्या डब्यांना ओढण्याचा जास्त ताण येत नाही. त्यामुळे वळणाच्या ठिकाणी किंवा चढ असेल तेंव्हा या मधल्या इंजिनचा विशेष फायदा होतो.
या ट्रेनची ब्रेक सिस्टीमही आधुनिक पद्धतीची आहे. एकाच वेळी संपूर्ण रेल्वेवर एकाच दाबाने ब्रेक लावता यावा यासाठी संपूर्ण ट्रेनमध्ये ब्रेक पाईप प्रेशर बसवलेली असते. संपूर्ण ट्रेनमधील ब्रेक पाईपवरील दबाव समान राहावा यासाठी तीन ठिकाणी कॉम्प्रेसर बसवलेले असतात. पुढच्या इंजिनमध्ये आणि मधल्या इंजिनमध्येही एक प्रेशर युनिट बसवलेले असते. त्यामुळे एकाच वेळी संपूर्ण ट्रेन नियंत्रणात आणली जाऊ शकते.
या रेल्वेचे काही फायदे आहेत तसेच काही धोकेही आहेत. एवढ्या मोठ्या रेल्वेची जोडणी करणे हे एक तर खूप वेळ खाऊ काम आहे. या रेल्वेच्या जोडणीसाठी बरेच दिवस लागतात. एकावेळी एवढ्या डब्यांना जोडण्यासाठीही खूप वेळ लागतो.
ही रेल्वे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना कुठेही मध्ये थांबू शकत नाही. एखाद्या फलाटावर हिला बाजूला थांबवून मागून येणाऱ्या जलद रेल्वेला मार्ग करून देणे निव्वळ अशक्य आहे.
कारण, ही रेल्वे लांबीने जितकी मोठी असते तितक्या लांबीचे साईड रूळ कुठल्याच फलाटावर उपलब्ध नाहीत. त्यामुळे एकदा एका ठिकाणाहून सुटली की गंतव्य ठिकाणी पोहोचेपर्यंत ही रेल्वे अधेमध्ये कुठेही थांबू शकत नाही.
भल्या मोठ्या लांबीची रेल्वे चालवण्याचा हा काही भारतीय रेल्वेचा पहिलाच प्रयोग नाही. यापूर्वीही दक्षिण पूर्व रेल्वेने १७७ डब्यांची मालवाहतूक गाडी चालवली होती.
२०१९ सालच्या मे मध्ये अशा प्रकारची भली मोठी मालगाडी चालवण्याचा प्रयोग यशस्वी रित्या पूर्ण करण्यात आला होता. परंतु त्यावेळी मालगाडीला जोडण्यात आलेले इंजिन हे डीझेलवर चालणारे होते. यावेळी मात्र इलेक्ट्रॉनिक इंजिनचा वापर करण्यात आला होता.
इलेक्ट्रिक इंजिनचा वापर करून चालवली गेलेली ही भारतातील पहिलीच ट्रेन आहे, म्हणूनच भारतीय रेल्वेचा हा प्रयोग खूपच कुतूहलाचा विषय ठरतो आहे.
मालवाहतूक करण्यासाठी या प्रकारच्या गाड्या फायदेशीर ठरत असल्या तरी याच्यातील काही त्रुटींवर काम करणे गरजेचे आहे. लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी याप्रकारच्या मालगाड्या कितीपत उपयोगी ठरू शकतील हाही एक प्रश्न आहे.
या गाड्या अधेमध्ये कुठेच थांबवता येऊ शकत नाहीत. त्यामुळे सध्यातरी कमी अंतरावरच्या मालवाहतुकीसाठीच याचा उपयोग होऊ शकतो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.