आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
जनरल नॉलेजच्या बळावर सामान्य माणसाला कोट्याधीश बनवणारा ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो कुणाला ठाऊक नसेल तर नवलच. बीग बींच्या बहारदार व्यक्तिमत्त्वामुळे आजही हा शो प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान टिकवून आहे. या शोमुळे अनेकजण कोट्याधीश, लक्षाधीश बनले.
बिहारचा सुशील कुमार हा त्यापैकीच एक. केबीसीचं पाचवं सीझन त्यानं जिंकलं होतं. कोटींमध्ये पैसा कमावल्यानंतर सामान्य माणसाच्या बऱ्याच समस्या चुटकीसरशी सुटतात. मात्र, सुशीलच्या बाबतीत भलतंच घडलं. कोट्याधीश झाल्यानंतर जीवनातला वाईट काळ सुरु झाल्याच्या आशयाची फेसबुक पोस्ट त्यानं केली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या.
सुशील कुमारला कोट्याधीश झाल्यानंतर वैयक्तिक समस्या, फसवणूक आणि भावनिक चढउतारांचा सामना करावा लागला. ५ कोटी जिंकल्यानंतर सर्व माध्यमांसाठी तो हेडलाईन बनला होता. बिहारच्या छोट्याश्या गावातून आलेला सुशील कुमार प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला होता. या प्रसिद्धीला पुढे उतरती कळा तर लागलीच, शिवाय सुशील दिवाळखोरही बनला. गरिबीतील संघर्ष, बुद्धिमत्तेच्या बळावर कोट्याधीश, प्रसिद्ध सेलिब्रिटी ते दिवाळखोर, असं सुशील कुमारचं आयुष्य एखादा चित्रपटच आहे की काय असं वाटेल.
त्याच्या आयुष्यातला हा संघर्ष त्यानं फेसबुकवर पोस्ट करुन मांडला. ‘कौन बनेगा करोडपती जिंकल्यानंतर आयुष्यातला सर्वात वाईट काळ’, या शिर्षकाची ही पोस्ट खूप व्हायरल झाली होती. ‘२०१५-१६ हा माझ्या आयुष्यातला सर्वात आव्हानात्मक काळ होता. या काळात काय करावं मला समजत नव्हतं.
लोकल सेलिब्रिटी झाल्यानं महिन्यातून १० ते १५ दिवस देशातल्या विविध ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती लावायचो. त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत गेलं. त्या काळात सेलिब्रिटी असल्यानं माध्यमांना मी खूप गंभीरतेनं घ्यायचो. अनेक पत्रकारांनी मुलाखती घेतल्या. माझ्यावर लेख छापून येऊ लागले. पत्रकारांना मी बेरोजगार वाटू नये, यासाठी मी करीत असलेल्या व्यवसायाविषयीची माहितीही मी त्यांना दिली होती. काही दिवसातच हे सर्व व्यवसाय बंद झाले’, असं सुशील यानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
केबीसीतून मिळालेल्या पैशातून त्यानं अनेकदा गुप्तदान केलं. त्यातून त्याची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाली. या सर्व प्रकारामुळे सुशीलच्या वैवाहिक जीवनात बऱ्याच समस्या निर्माण झाल्या. पत्नीसोबत सारखे वाद होऊ लागले. माणसांची पारख नसल्यानं भविष्यात मोठं नुकसान होईल, अशी भीती सुशील कुमारच्या पत्नीला वाटत होती.
दरम्यानच्या काळात सुशीलनं दिल्लीत एका मित्राच्या मदतीनं कार राईड्सचा व्यवसाय सुरु केला. व्यवसायाच्या निमित्तानं वारंवार त्याला दिल्लीला जावं लागत होतं. याच काळात जामिया मिलीया, आयआयएमसीमध्ये पत्रकारीतेचं शिक्षण घेणारी काही मुलं त्याच्या संपर्कात आली. या विद्यार्थ्यांबरोबर विविध विषयांवर त्याची चर्चा व्हायची.
मात्र, या चर्चासत्रात सहभागी होत असताना आपलं ज्ञान कमी पडत असल्याची त्याला जाणीव झाली. काही कारणांमुळे पुढे त्याला दारु आणि सिगारेटचं व्यसन ज़डलं. याकाळात सिनेमा बघण्याची लतही सुशीलला लागली. दिवसभर दारु, सिगारेट आणि सिनेमा हे त्याचं रुटीन बनलं.
सुशीलकुमार कोट्याधीशाचा दिवाळखोर कसा झाला त्याचा किस्साही भन्नाट आहे. ‘एकदा मी प्यासा सिनेमा बघत होतो. फिल्मचा क्लायमॅक्स सुरु असताना पत्नी खोलीत आली आणि म्हणाली एकच सिनेमा वारंवार पाहून एके दिवशी वेडे व्हाल. तिच्या या बोलानं मी दुखावलो. आमचं भांडण सुरु असतानाच एका इंग्रजी दैनिकाच्या पत्रकाराचा फोन आला. आमचं बोलणं चालू असताना त्या पत्रकाराच्या एका प्रश्नावर मी चिडलो. केबीसीतून मिळालेले सर्व पैसे संपले असून आता माझ्याकडे फक्त दोन गायी आहे. त्यांचं दूध विकून उदरनिर्वाह करत असल्याचं मी सहज बोललो. त्यानंतर ही बातमी पुढे वाऱ्यासारखी पसरली. मालामाल झाल्यानंतर जी लोक माझ्या अवतीभोवती असायची त्यांनी दुर्लक्ष करणं सुरु केलं. कार्यक्रमांसाठीची निमंत्रणं बंद झाली’, असं सुशील सांगतो.
सुशीलच्या आयुष्यात घडणाऱ्या या गोष्टींचा खुप वाईट प्रभाव त्याच्या वैवाहिक आयुष्यावर झाला. वाद विकोपाला गेल्यानं त्याची पत्नी माहेरी निघून गेली आणि तिनं घटस्फोटाची मागणी केली. या धक्क्यानंतर स्वत:ची नवी ओळख निर्माण करण्याचं सुशीलनं ठरवलं. सिनेमे पाहण्याच्या आवडीतून याच क्षेत्रात चित्रपट दिग्दर्शक व्हायचं त्यानं ठरवलं आणि मुंबई गाठलं. दरम्यानच्या काळात त्यानं एका प्रोडक्शन हाऊससाठी ३ स्क्रिप्ट्स लिहिल्या. त्यासाठी त्याला केवळ २० हजारांचं मानधन देण्यात आलं. त्यानंतर अल्पावधीतच त्यानं गावचा रस्ता धरला.
पाठोपाठ आलेल्या अपयशातून सुशील फार खचला होता. या उतरत्या काळात तो त्याच्या एका मित्राकडे राहू लागला. दिवसभर खोलीत पडून राहायचं, सिनेमे बघायचे, सिगारेट ओढायची हा त्याचा दिनक्रम ६ महिने चालला. या काळात अंतर्मनात डोकावलं असता सुशीलला बऱ्याच गोष्टी समजू लागल्या. एक मोठा सेलिब्रिटी होण्यापेक्षा चांगला माणूस होणं, लहानलहान गोष्टींमध्ये आनंद शोधणं हजार पटींनी चांगलं असल्याचं त्याच्या लक्षात आलं.
प्रसिद्धी, भौतिक सुखाच्यामागे लागण्यापेक्षा समाजासाठी काही करायच्या ध्यासातून सुशील कुमार पुढे शिक्षक झाला. त्याचबरोबर पर्यावरण रक्षणाच्या कार्यातही त्यानं स्वत:ला गुंतवून घेतलं. या कार्यातून समाजाचा फायदा होत असलेलं बघताना खरं समाधान मिळतं, असं सुशील सांगतो.
सुशीलच्या आयुष्यातले घटनाक्रम आपल्याला आत्मचिंतन करायला भाग पाडतात. पैसा नक्कीच आयुष्यातला एक महत्वाचा घटक आहे. पैशांचं सोंग आणता येत नाही हे जरी खरं असलं तरी तो किती मिळाल्यावर आपलं समाधान होईल हेही ठरवता आलं पाहिजे. पैसा मिळाल्यावर अनेकांच्या मोठमोठ्या समस्या सुटतात. मात्र, सुशिलाच्या प्रकरणात हे समिकरण उलटं ठरलं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.