आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब
मार्च २०२१ मध्ये सुएझ कालव्यात अडकलेल्या एव्हर गिव्हन या मालवाहतूक करणाऱ्या जहाजामुळे ट्रॅफिक जाम झाले आहे. या कालव्यातील ट्रॅफिक जामचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम दिसून येईल असे तज्ज्ञांचे मत आहे. १९३ किमी लांबीचा हा कालवा युरोप आणि आशियाला जोडणारा एकमेव मार्ग आहे.
भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र यांना जोडणारा इजिप्तमधील हा कालवा १८५९ ते १८६९ या दरम्यान बांधण्यात आला. या कालव्यामुळे आफ्रिकेतील ‘केप ऑफ गुड होप’ला वळसा घालून येण्याऐवजी थेट येता येते. त्यामुळे तब्बल सात हजार किमी अंतराचा प्रवास वाचतो. या कालव्यामुळे मध्ययुगीन काळापासून युरोप आणि आशियातील व्यापार सुकर आणि जलद केला आहे. म्हणूनच हा एक जगातील महत्त्वाचा व्यापारी मार्ग आहे.
गेल्या १५० वर्षात या कालव्यामुळे दोन खंडातील प्रवास अगदी सुरळीत होण्यास मदत झाली. या कालव्यामुळे कधी राजकीय, कधी आर्थिक आणि तांत्रिक वादही उफाळून आले, ज्यामुळे किमान पाच वेळा तरी या कालव्यातून होणारी वाहतूक बंद करावी लागली होती.
यातील शेवटच्या वेळी तर तब्बल आठ वर्षे या कालव्यातून होणाऱ्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली होती. आठ वर्षानंतर जून १९७५ साली या कालव्यातून पुन्हा एकदा वाहतूक सुरू करण्यात आली.
इजिप्तचा राजा तिसरा सेनुसस्ट्रेट याच्या काळात या कालव्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. त्यानंतर इजिप्तच्या गादीवर आलेल्या प्रत्येक राजाने या कालव्याचे बांधकाम वाढवत नेले. शेवटी युरोप आणि आशिया दरम्यानचा व्यापार अनेक राज्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे लक्षात आले तेव्हा याच्या बांधकामाची गती वाढवण्यात आली.
१८५८ साली युनिव्हर्सल सुएझ कॅनल कंपनीकडे याच्या बांधकामाची जबाबदारी सोपवण्यात आली आणि पुढील ९९ वर्षे या कॅनालच्या देखभालीची जबाबदारीही याच कंपनीकडे सोपवण्यात आली. ९९ वर्षानंतर या कॅनलचे अधिकार इजिप्त सरकारकडे जातील असा ठराव करण्यात आला. ब्रिटीश आणि तुर्की व्यापाऱ्यांनी या कॅनलच्या बांधकामात अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न केला.
कधी आर्थिक टंचाई देखील निर्माण झाली, पण शेवटी एकदा याचे बांधकाम पूर्ण झालेच. १८६९ साली हा कालवा आंतरराष्ट्रीय जलमार्ग म्हणून वापरण्यासाठी खुला करण्यात आला.
ज्या कंपनीने या कॅनलचे बांधकाम केले त्या कंपनीचे सर्वात जास्त शेअर्स हे फ्रेंच आणि ब्रिटिशांच्या मालकीचे होते. त्यामुळे ब्रिटिशांनी आपला वसाहतिक हितसंबध आणि सामुद्रिक शक्ती टिकवून ठेवण्यासाठी सुएझ कालव्यात एक बचावात्मक दल तैनात केले. यासाठी त्यांनी १९३६ सालच्या कराराचा दाखला दिला. पुढे इजिप्तच्या राष्ट्रावाद्यांचा दबाव वाढल्याने दोन्ही देशांनी १९५४ मध्ये सात वर्षांचा करार संमत केला आणि या करारामुळे ब्रिटिशांना त्यांचे सैन्य माघारी घ्यावे लागले.
१९५६ साली इजिप्तचे अध्यक्ष अब्देल नासेर यांनी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले. नाईल नदीवर बांधला जाणाऱ्या बंधाऱ्याचा खर्च सुएझ कालव्यातून होणाऱ्या वाहतुकीद्वारे काढला जाईल असे आदेश त्यांनी दिले. यामुळे अमेरिका, फ्रांस आणि इस्राइलविरुद्ध इजिप्त असा वाद उफाळून आला. यातूनच या तिन्ही देशांनी इजिप्तवर ह*ल्ला चढवला.
या संघर्षासाठी फक्त सुएझ कालव्यातील वाहतूक हा एकच मुद्दा कारणीभूत होता असे नाही. तर अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम म्हणून या यु*द्धाला सुरूवात झाली होती. सुरुवातीला अमेरिकेने स्वतःला या यु*द्धापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. अमेरिका आणि सोव्हिएत संघाचे इस्राईलबाबत असणारे मतभेद, अरबांचे सोव्हिएत युनियनशी असणारे संबंध, फ्रांस आणि इंग्लंडचा या प्रदेशावरील प्रभाव, अशा अनेक घटकांमुळे हा वाद दिवसेंदिवस आणखी चिघळत गेला.
१९५७ साली हा संघर्ष मिटवण्यात आला असला तरी, मध्य आशियात सुएझ कालव्यामुळे शीतयु*द्धाला तोंड फुटले. १९५७ साली संयुक्त राष्ट्राने या वादात मध्यस्थी केली. संयुक्त राष्ट्रातर्फे शांतता दलाचे सैन्य तैनात करण्याची ही पहिलीच वेळ होती.
१९६७ साली नासेर यांनी सिनाईमधून शांती सेना हटवण्याची मागणी केली. त्यामुळे पुन्हा एकदा इस्राईल आणि इजिप्त या दोन देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. इस्राईलने सिनाईवर कब्जा केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इजिप्तने सुएझ कालव्यातील वाहतूक बंद केली. १९७५ पर्यंत ही वाहतूक बंद होती. १९७५ साली या दोन देशांनी विच्छेदन करार संमत केला.
१९७३ साली झालेल्या अरब-इस्राईली यु*द्धातही सुएझ कालवा हे एक प्रमुख कारण होते.
हा कालवा म्हणजे पूर्व आणि पश्चिमी देशांच्या व्यापाराचा एक पूल आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारातील १०% वाहतूक याच मार्गाने केली जाते. या जलमार्गातून दररोज सुमारे ५० जहाजांची येजा होते. दररोज सुमारे ९.५ अब्ज डॉलर्स किमतीच्या मालाची वाहतूक या मार्गाने होते. या जहाजांवर अगदी कच्च्या तेलापासून ते खाद्यपदार्थासारखा नाशवंत माल देखील जहाजावरून वाहून आणला जातो.
२०२१ मध्ये २३ मार्च रोजी एमव्ही एव्हर गिव्हन नावाचे एक महाकाय जहाज या कालव्यात अडकल्याने पुन्हा एकदा या कालव्यातील वाहतूक ठप्प झाली होती. चीनकडून नेदरलँडकडे मालवाहतूक करणारे हे जहाज अरुंद जागेत रुतून बसले होते. ज्यामुळे इतर छोट्या-मोठ्या जहाजांनाही या ठिकाणाहून वाहतूक करणे पूर्णतः अशक्य झाले. या जहाजाच्या दोन्ही बाजूला सुमारे २०० छोटी-मोठी जहाजे अडकून पडली होती. जागतिक वितरण साखळीत यामुळे मोठा अडथळा निर्माण झाला आहे. काही देशामध्ये तर तेलाच्या किमती दोनच दिवसात प्रचंड वाढल्या होत्या. इजिप्तच्या वेळेनुसार दुपारी सुमारे तीन वाजताच जहाजाची सुटका करण्यात आली आणि पुढील तपासण्यांसाठी हे जहाज ग्रेट बिटर लेकच्या दिशेने पुढे जाऊ लागले.
मध्ययुगीन काळापासूनच हा कालवा आर्थिक, सामरिक आणि राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाचा राहिला आहे. येत्या काळातही या जलमार्गाचे महत्त्व आणखीन वाढत जाईल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.