आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
सुधा मूर्ती या एक प्रख्यात लेखिका आहेत. सुधा मूर्ती मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेमधून लिखाण करतात.
पण यापेक्षा ही महत्वाची बाब म्हणजे त्या एक उत्तम समाजसेविका आहेत.
इन्फोसीस फाउंडेशनच्या अध्यक्ष म्हणून काम करत असतांना त्या दरवर्षी भारतातील गरीब लोकांसाठी २५० कोटीची मदत करतात.
नैसर्गिक आपत्ती दरम्यान नुकसानग्रस्त भागातील अनेकांना घरे बांधुन देत माणुसकीचे दर्शन त्यांनी घडवले आहे.
केवळ गरिबी निर्मूलन नव्हे तर, शिक्षण,आरोग्य,महिला सबलीकरण असे अनेक उपक्रम त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून राबवले जातात, या साठी अनेक सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
सुधा मूर्ती मूळच्या मराठी कुटुंबातील त्यांचे नाव सुधा रामचंद्र कुलकर्णी. त्या बालपणासून अत्यंत चंचल स्वभावाच्या होत्या. त्यांनी बी.व. कॉलेजातून आले इंजिनिअरिंग पूर्ण करत सुवर्ण पदक मिळवले.
पुढे कॉम्पुटर सायन्स मध्ये एम.टेक केले. सुधा मूर्तींनी संगणक शस्त्रज्ञा व अभियंता म्हणून आपल्या करिअरची सुरवात केली. टेल्को या कंपनीत निवड झालेल्या त्या पहिल्या महिला अभियंत्या होत्या.
सुरुवातीच्या काळात पुणे, मुंबई आणि जमशेदपूर येथे त्यांनी काम केले. त्या भारतातील आय.टी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या इन्फोसिसच्या विश्वस्त असून देखील आज ही बंगळुरूतील विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत.
आपल्याकडे असलेली संपत्ती, ज्ञान हे समाज उपयोगी लागणे गरजेचे आहे,असे त्या नेहमी सांगतात.
उपलब्ध साधन सामग्रीचा जर नियोजना पूर्ण या वापर केला तर या सर्व गोष्टी शक्य होतात हे त्यांनी सिद्ध केला आहे.
एवढ्या मोठी कंपनी व व्यवहार हातात असताना देखील सुधा मूर्ती साधं राहणीमान पसंत करतात. आजच्या फॅशनेबल दुनियेत सुद्धा त्या साडी परिधान करून आपली संस्कृत जपतात. विशेष म्हणजे त्यांच्या साड्याही इतर व्यक्तींप्रमाणे अति महागड्या नसतात.
श्रीमंत व्यक्तींनी महागडे डिझायनर कपडे वापरणे हे योगाने आलेच. पण भारतातील श्रीमंत महिलांपैकी एक असलेल्या सुधा मूर्ती यांनी तब्बल २१ वर्षे नवीन साडीच विकत घेतली नाही, असे कोणी सांगितले तर खरे वाटणार नाही. मात्र स्वत: सुधा मूर्ती यांनी हे एका मुलाखती दरम्यान सांगितले होते .
इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्ष असलेल्या सुधा मूर्ती २१ वर्षांपूर्वी काशी येथे गेल्या होत्या. तिथे त्यांना त्यांच्या आवडीची वस्तू त्यागायला सांगण्यात आले. मूर्ती यांनी खरेदीचा व त्यातही साडी खरेदीचा त्याग केला.
आता केवळ अत्यावश्यक वस्तूच त्या विकत घेतात, असे त्यांनी नमूद केले. या निर्णयामुळे खूप आनंदी व मोकळे वाटते असेही त्या म्हणाल्या.
अनावश्यक खर्चावरील कात्रीतून जमा होणारे पैसे समाजकार्यासाठी उपयोगी पडतात.अशाच पैशांतून पुरग्रस्तांसाठी दोन हजार तीनशे घरे बांधली गेली व गुजरातमधील भूकंपग्रस्तांनाही मदत केली गेली, असे मूर्ती यांनी सांगितले.
इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून मूर्ती यांनी समाजाच्या विविध क्षेत्रात विकासकामांना प्रोत्साहन दिलं आहे.
कर्नाटक सरकारच्या सर्व शाळात त्यांनी संगणक आणि ग्रंथालय उपलब्ध करून दिले आहे. सुधा मूर्ती यांनी भारतामध्ये ६०,००० ग्रंथालयं उभारली आहेत. यातून ज्ञान प्रसाराबरोबर व्यक्ती विकासास चालना मिळेल असे त्यांचे मत आहे.
मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया या नावाचे ग्रंथालय त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात सुरु केलेले आहे.
कर्नाटकातील ग्रामीण भागात आणि बंगळुरू शहर व परिसरात त्यांनी सुमारे १०,००० शौचालये संस्थेच्या माध्यमातून बांधलेली आहेत.
तमिळनाडू आणि अंदमान येथे त्सुनामीच्या काळात त्यांनी विशेष सेवाकार्य केले आहे.महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील लोकांनाही संस्थेने मदत दिलेली आहे.
त्या विख्यात सामाजिक कार्यकर्त्या आणि कुशल लेखिका आहेत. डॉलर बहू, अस्तित्व, गोष्टी माणसांच्या, स्वर्गाच्या वाटेवर, सामन्यातील असामान्य, व पुण्यभूमी भारत असे अनेक पुस्तक प्रसिद्ध आहेत. या पुस्तकांच्या माध्यमातून येणार निधी त्या समाजसेवेत वापरतात.
मध्यंतरी त्या एका पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या निमिताने सातारा-सांगलीत आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मुलींसाठी अनाथालय उभारण्याचा विचार मांडला होता.
त्यांना पुरस्कारात मिळालेली अडीच लाख रक्कम व त्यात साडे सात लाखांची भर घालून मुलींसाठी अनाथालयाच्या निधी उभारणीस सुरुवात करून दिली.
आपण केवळ बोललोच नाही तर करूनही दाखवले पाहिजे, हे त्यांच्या कृतीतून समजले.
या कार्यक्रमात त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादांनी केलेल्या एका भविष्यवाणीची आठवण सांगितली होती.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची आठवण सांगताना सुधा मूर्ती म्हणाल्या, ‘ नारायण मूर्ती यांना वसंतदादा पाटील यांनी मुलाखतीसाठी बोलावले होते. दादांना इंग्रजी येत नव्हते, तर नारायण मूर्तींना मराठी येत नव्हते. त्यामुळे मी त्यांच्याबरोबर दुभाषी म्हणून गेले होते. आमचे लग्न झाले नव्हते.
मुलाखत झाल्यानंतर वसंतदादांनी मला विचारले तू कोण? मी नारायण मूर्तींची मैत्रीण असे सांगितले.
त्यावर वसंतदादांनी मैत्रीण वगैर नाही, तू तर त्यांची बायको होणार आहेस. त्यांना सोडू नका, खूप हुशार माणूस असून, त्यांना मोठे भविष्य आहे. एक दिवस हा मोठा माणूस होईल, असे सांगितले. वसंतदादानी आमचे भविष्य अचूक वर्तिवले होते.’
पुढे सुधा यांचा नारायण मूर्थी यांच्याशी विवाह झाला आणि त्या कुलकर्णीच्या मूर्ती बनल्या.
सुधा मूर्ति या अगदी मनमोकळ्या व सुस्वभावी व्यक्तित्व आहेत. देशाच्या विकासात आपले योगदान कामी येत असेल तर आपण ते काम केले पाहिजे असे त्या मानतात.
त्यांनी आजवर केलेले काम हे खरंच प्रेरणादायी व आदर्शवत आहे. त्यांनी समाजकार्यात दिलेले योगदान व निस्वार्थ पणे केलेली सेवा यासाठी भारत सरकारने २००६ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले.
समाज उद्धाराच्या कार्यात सुधा ताई या नेहमी अग्रेसर असतात.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.