आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
पापड म्हटलं की ज्याच्या मनात ‘लिज्जत’ येणार नाही, असा माणूस सापडणं अशक्यच! पापड म्हटलं की तो लिज्जतचाच असणार हे समीकरणच देशातील प्रत्येकाच्या मनात तयार झालं आहे. महिन्याच्या किराणा सामानाच्या यादीमध्ये लिज्जत पापडाला ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ स्थान आहे. लिज्जत पापडच्या जाहिरातीमधले ते ससे, आणि त्यांचा ‘कर्रम कुर्रम’ आवाज – हे सगळं आपल्याला नॉस्टॅल्जिक बनवतं. विशेष म्हणजे आजही ती जाहिरात चालते.
लिज्जतला आपला प्रॉडक्ट घराघरांमध्ये पोहोचवण्यासाठी आता नव्या जाहिरातीचीही गरज नाही. आज ‘लिज्जत’ एवढा मोठा ब्रँड आहे, की त्यांचा वर्षाचा टर्नओव्हर हा तब्बल १६०० कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे.
हीच कंपनी जेव्हा सुरू केली गेली, तेव्हा त्यासाठी चक्क ८० रुपयांचं कर्ज घेण्यात आलं होतं. मग ८० रुपयांमध्ये सुरू झालेली ही कंपनी आज हजारो कोटी रुपयांची उलाढाल करण्यापर्यंत कशी पोहोचली?
‘लिज्जत’ची सुरुवात ही मोठी कंपनी थाटायच्या उद्देशाने करण्यात आली नव्हती. मुंबईत राहणाऱ्या जसवंतीबेन यांनी आपल्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी म्हणून पापड लाटायच्या कामाची सुरुवात केली. त्यांच्यासोबत आणखी सहा महिलाही होत्या. या सर्वांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. काहींना शिक्षण नसल्यामुळे नोकरी करता येत नव्हती, तर काहींना थोडंफार लिहिता-वाचता येत असूनही घरुन होणाऱ्या विरोधामुळे नोकरी करता येत नव्हती. या महिलांकडे घराचं काम उरकल्यानंतर भरपूर मोकळा वेळ राहत होता. मात्र, या वेळात करायचं काय हेच त्यांना माहिती नव्हतं.
या सर्व महिला गुजराती होत्या. त्यामुळे पापड-खाखरा असे पदार्थ बनवणं त्यांना लहानपणापासूनच येत होतं. त्यामुळं मग जसवंतीबेन यांनी पापडाचा उद्योग करण्याचं पक्कं केलं.
काय करायचं हे ठरलं होतं. पापड बनवता तर सर्वांनाच येत होतं. तसंच हे ‘बायकांचं’ काम असल्यामुळे कोणाच्याही घरुन विरोध होणार नव्हता. आता प्रश्न उरला होता तो केवळ भांडवलाचा. यासाठी या सातही महिला ‘सर्व्हंट ऑफ इंडिया सोसायटी’चे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ता असलेले छगनलाल पारेख यांच्याकडे गेल्या. छगनलाल यांना या सर्व महिलांचा निर्धार आणि हिंमत आवडली. त्यांनी तातडीने त्यांना ८० रुपये उधार दिले. एवढंच नाही, तर त्यांनी या महिलांना एका फर्मबद्दल सांगितलं, जी तोट्यात असल्यामुळे आपल्याकडची यंत्रं स्वस्तात विकत होती.
छगनलाल यांनी सांगितल्याप्रमाणे तिथे जाऊन या महिलांनी पापड बनवण्याची एक मशीन विकत घेतली. सोबतच त्यांनी पापड बनवण्यासाठी लागणारं इतर सामानही विकत घेतलं. ही मशीन महिलांनी आपल्या घराच्या छतावर नेली. दोघी जणी मशीन सेट करत होत्या, एक महिला पॅकिंगसाठी पॉलिथिन तयार करत होती, तर बाकी महिला पीठ मळण्याच्या कामाला लागल्या.
दोन तासांमध्ये हे सगळं काम उरकल्यानंतर कणकेचा पहिला गोळा मशीनमध्ये ठेवण्यात आला. पुढे एका मिनिटाच्या आतच मशीनमध्ये पहिला पापड तयार झाला होता. अशा रितीने १५ मार्च १९५९मध्ये लिज्जतचा पहिला पापड लाटण्यात आला.
यानंतर काही तासांमध्ये त्यांनी चार पाकिटं भरतील एवढे पापड बनवले. पहिलाच दिवस आणि पहिलाच प्रयत्न होता, त्यामुळे एवढ्यावरच काम थांबवण्यात आलं. आता हे पापड लोकांपर्यंत पोहोचवायचे होते. त्यासाठी त्यांनी प्रसिद्ध व्यापारी भुलेश्वर यांना ही पाकिटं विकली. भुलेश्वर यांनी सांगितलं, की ही चार पाकिटं विकली गेल्यानंतर जर मागणी वाढली, तर पहिली ऑर्डर आपणच देऊ. ही पाकिटं हातोहात विकली गेली.
मग चारऐवजी चाळीस, चाळीसऐवजी चारशे आणि कालांतराने पुढे चार हजार पाकिटं विकली जाऊ लागली.
विशेष म्हणजे, या महिलांनी काही महिन्यांमध्येच आपलं ८० रुपयांचं कर्ज फेडलं; आणि इथून पुढे कोणतीही आर्थिक मदत न घेता हा व्यवसाय पुढे न्यायचा असं ठरवलं. वेळप्रसंगी तोट्यात उद्योग चालवू, मात्र कोणापुढे हात पसरणार नाही असं या महिलांनी ठरवलं होतं. मात्र, तशी कधी वेळच आली नाही. व्यवसाय इतका चांगला चालला होता, की काही महिन्यांमध्येच त्यांनी पापड बनवण्यासाठी आणखी साहित्य विकत घेतलं.
सुरुवातील आर्थिक मदत केलेले छगनलाल हे या महिलांना पुढेही मार्गदर्शन करत राहिले. व्यवसाय कसा करावा, ग्राहकांशी किंवा व्यापाऱ्यांशी कसं बोलावं हे त्यांनीच या महिलांना शिकवलं. यासोबतच, त्यांनी या महिलांना महाग, आणि स्वस्त अशा दोन प्रकारचे पापड बनवण्यास सांगितलं. हे झाल्यानंतर त्यांनी या महिलांना ‘स्टँडर्ड’ पापड बनवायला शिकवलं. म्हणजे काही जरी झालं, तरी पापडांची ‘क्वालिटी’ ही कायम राहिली पाहिजे. सुरुवातीच्या काळात या महिलांच्या व्यवसायाचा जमाखर्चही त्यांनीच पाहिला.
अवघ्या तीन महिन्यांमध्ये या महिलांनी सुरू केलेलं हे काम ‘गृह उद्योग’ झालं होतं. यामध्ये त्यांनी आणखी महिलांनाही रोजगार उपलब्ध करुन दिला होता. याठिकाणी काम करण्यासाठी वयाची अट ही कमीत कमी १८ ठेवण्यात आली होती. त्यापुढे वयाचं कोणतंही बंधन नव्हतं. त्यामुळे अगदी कॉलेजला जाणाऱ्या तरुणींपासून ते नातवंडं खेळवणाऱ्या आजींपर्यंत सर्व महिला याठिकाणी काम करत. याठिकाणी काम करणाऱ्या सर्व जणी एकमेकांना ‘बेन’ म्हणून हाक मारत. ज्याचा गुजराती अर्थ बहीण असा होतो. विशेष म्हणजे कंपनीने आजतागायत ही परंपरा कायम ठेवली आहे.
पहिल्या वर्षाच्या शेवटी या गृहउद्योगाचं उत्पन्न ६,१९६ रुपये झालं होतं. ६०च्या दशकामध्ये ही नक्कीच मोठी रक्कम होती.
पहिल्या वर्षी आठ महिने काम झालं. मधले चार महिने पावसाळा असल्यामुळं पापड वाळलेच नाहीत, त्यामुळं मग काम बंद ठेवावं लागलं होतं. दुसऱ्या वर्षीही तीच समस्या येणार हे सगळ्यांना कळलं होतं. मात्र, पावसाळा येण्याआधीच महिलांनी त्यावर उपाय शोधला. वेताच्या टोपल्यांना उलटं करुन त्यावर, किंवा बाजेवर या महिला पापड पसरवत होत्या. याच्या शेजारीच स्टोव्ह पेटवून त्या पापड वाळवत. दुसऱ्या वर्षी मग त्यांनी पूर्ण १२ महिने काम केलं.
दोन वर्षांमध्येच हा पापड मुंबईच्या बाहेरपर्यंत पोहोचला होता. पाहता पाहता या गृहउद्योगामध्ये हजारहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. काम आणि सदस्य एवढे वाढले होते, की एका इमारतीमध्ये जागा पुरेना झाली. त्यामुळं मग सदस्य महिलांना घरुनच काम करण्याचा सल्ला देण्यात आला.
विशेष म्हणजे एवढं सगळं होईपर्यंत या पापडांना नावच नव्हतं. १९६२मध्ये कंपनीला नाव देण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये ‘लिज्जत पापड’ हे नाव निश्चित करण्यात आलं. हे नाव सुचवलं होतं, धीरजबेन रुपारेल यांनी. त्यांना यासाठी पाच रुपये बक्षीस देण्यात आलं होतं.
लिज्जत हा गुजराती शब्द आहे, ज्याचा अर्थ चविष्ट असा होतो. याचवेळी कंपनीचं नावही ‘श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड़’ असं ठेवण्यात आलं. नावाप्रमाणेच हा पापड खरोखरच चविष्ट होता. त्यामुळे विशेष जाहिरात न करताही महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांच्या सीमा भागांपर्यंत हा पापड पोहोचला होता. १९६२-६३ साली या कंपनीचं वार्षिक उत्पन्न १ लाख ८२ हजारांपर्यंत पोहोचलं होतं. १९६६मध्ये लिज्जत कंपनीचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं. पुढे ७०च्या दशकात लिज्जतने पिठाच्या गिरण्या, प्रिंटिंग डिव्हिजन आणि पॅकिंगच्या मशीन विकत घेतल्या. तसेच, पापडांसोबतच खाखरा, मसाला आणि बेकरी प्रोडक्ट बनवण्याचं कामही सुरू करण्यात आलं. लिज्जतने अगरबत्ती बनवण्याचं कामही सुरू केलं होतं, मात्र हे विशेष चाललं नाही. मात्र, त्याचा लिज्जतवर विशेष असा परिणाम झाला नाही.
८०च्या दशकामध्ये लिज्जतने देशभरातील यात्रांमध्ये आपले स्टॉल लावायला सुरुवात केली. पुढे टीव्ही घराघरात पोहोचल्यानंतर लिज्जतने आपला मॅस्कॉट म्हणजेच तो फेमस ससा जाहिरातींमध्ये वापरला.
बोलक्या बाहुल्यांचा खेळ करण्यासाठी प्रसिद्ध असणारे रामदास पाध्ये यांचीच ही शक्कल होती. खरंतर तेव्हा त्यांनी आपण एका छोट्याशा कंपनीसाठी ही जाहिरात करत आहोत असं समजून यासाठी होकार दिला होता. मात्र, हा ससाच पुढे लिज्जतची ओळख बनला. लिज्जतच्या जाहिरातीमधील फेमस ‘कर्रम कुर्रम’ हा आवाजही रामदास पाध्येंचीच शक्कल होती.
पुढे २००२मध्ये ‘लिज्जत’ची वार्षिक उलाढाल ही दहा कोटींपर्यंत पोहोचली होती. १५ मार्च २००९मध्ये लिज्जतने आपली ५० वर्षं पूर्ण केली. तोपर्यंत लिज्जतच्या भारतात ६२ हजार शाखा तयार झाल्या होत्या, ज्यांमध्ये ४५ हजारांहून अधिक महिला काम करत होत्या. तसेच, भारताच्या बाहेर ब्रिटन, अमेरिका, थायलंड, जपान, हॉंगकॉंग, ऑस्ट्रेलिया आणि मध्य-पूर्व आशियातील काही देशांमध्येही लिज्जतची विक्री होते.
लिज्जत कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या मुलींना शिक्षण घेता यावे यासाठी सोय करण्यात आली आहे. कंपनीतील महिलांच्या मुलींना दहावी आणि बारावीची परीक्षा पास झाल्यानंतर शिष्यवृत्ती देण्यात येते. तसेच, कंपनीतील महिलांना काहीही तारण न ठेवता कमीत कमी व्याजदरावर कर्ज देण्याची तरतूदही करण्यात आली आहे. लिज्जतने अनेक पुरस्कारांवरही आपलं नाव कोरलं आहे. सन १९९८-९९ आणि २०००-२००१मध्ये ‘सर्वोत्कृष्ट कुटीर उद्योग’ पुरस्कार लिज्जतला मिळाला होता. पुढे २००५मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते लिज्जतला ‘ब्रँड इक्विटी अवॉर्ड’ मिळाला होता. पुढे २०१०मध्ये लिज्जत हा ‘पॉवर ब्रँड’ झाला.
‘लिज्जत’ची ही सक्सेस स्टोरी वाचल्यावर तुम्हालाही वाटत असेल ना, की जत्रामधील कानोळेंची पापड लाटायची स्कीम खरंच चांगली होती?
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.