आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
वाहनातून होणाऱ्या विषारी वायूंच्या उत्सर्जनामुळे आज भारतात सरासरी तीन लाख लोक आपला जीव गमावतात, असा एक रिसर्च नुकताच पब्लिश करण्यात आला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे १९५१ सालापासून आपल्या देशातील वाहन खरेदीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. १९५१ साली वाहनांची संख्या ३ लाख इतकी होती.
आज ती संख्या २१ कोटींच्या घरात आहे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणारा वर्ग जरी मोठा असला तरी प्रत्येकाला आपल्याजवळ एक वहान असलं पाहिजे, असं वाटत राहतं. यातून लोक मोठ्या प्रमाणावर वाहन खरेदी करतात. वाहनांचे कमी झालेले दर हे वाहन खरेदीला मोठ्या प्रमाणात चालना देत आहेत.
गेल्या दशकभरात वाहन खरेदी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परंतु या वाहन खरेदीमुळे प्रदूषणाच्या राक्षसाने आपले डोकेवर काढले आहे.
दिल्लीत प्रदूषणामुळे आज एकदा श्वास घेतल्यामुळे १० पाकीट सिगारेट ओढून होईल इतकं नुकसान फुफ्फुसांचं होत आहे. भारताची तब्बल १३ शहरं ही द इकॉनॉमिस्टच्या १५ सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत आहे, यावरून भारतात प्रदूषणाच्या गंभीर स्थितीची जाणीव होते.
शिवाय वाहनांचा वापर कमी करणे अथवा वाहनांची विक्री थांबवणे असे तुघलकी उपाय करणे भारताला परवडणारे नाही तेवढी सक्षम सार्वजनिक वाहतूक यंत्रणा या देशात अस्तित्वात नाही.
अशावेळी असंख्य पर्यावरणपूरक योजना प्रदूषणनियंत्रण महामंडळ राबवत असलं तरी त्याला मिळणारं यश हे अत्यल्प स्वरूपाचं आहे.
पर्यावरणपूरक वाहनांच्या निर्मितीला आजकल मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळायला सुरुवात झाली आहे. पाण्यावर, विजेवर आणि सौर उर्जेवर चालणाऱ्या असंख्य वाहनांच्या निर्मितीचे प्रयत्न होत असले आणि ते विविध विज्ञान प्रदर्शनात सादर केले जात असले तरी आज प्रत्यक्ष वापरासाठी मात्र ते वाहन उपलब्ध होऊ शकलेले नाहीत.
परंतु या सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून नागपूरच्या दिलीप चित्रे या व्यक्तीने सोलर कारच्या निर्मितीचं स्वप्न नुसतं साकारच केलेलं नाही तर त्या व्यक्तीने तब्बल ३,५०० किलोमीटर इतका प्रवास या सोलर कारच्या मदतीने केला आहे. हे यश प्राप्त करण्यासाठी त्यांना तब्बल २५ वर्ष संघर्ष करावा लागला होता.
लहानपणापासूनच चित्रे यांना गाड्यांची, खेळण्यांची मोडतोड करून त्याचा अंतर्गत भागात असलेली मशिनरी समजून घ्यायची इच्छा होती. यातूनच पुढे चित्रे यांना विविध प्रयोग करून बघण्याची सवय लागली आणि यातूनच ही सोलर कर आकारास येऊ शकली.
चित्रे यांनी सोलर कारच्या आधी असंख्य नवनविन यंत्रांची निर्मिती केली. यात प्रामुख्याने गाडीतील पेट्रोल चोरीला जाऊ नये म्हणून विकसित केलेल्या यंत्रणेचे श्रेय देखील चित्रे यांचेच होते.
१९९५ च्या आसपास चित्रे यांना सौर ऊर्जेचं महत्व लक्षात आलं आणि त्यांनी विविध सौर ऊर्जेवर चालणाऱ्या यंत्रांच्या निर्मतीचे कार्य हाती घेतले. सोलर कारचा देखील यात समावेश होता. आपल्या देशात पर्यावरणपूरक वाहनांच्या वापराला अपेक्षित असं प्रोत्साहन दिलं जात नाही, हे माझ्या लक्षात आल्यावर मी सौर उर्जेवर अथवा वीजेवर चालणाऱ्या गाडीच्या निर्मितीचा संकल्प सोडला असं चित्रे म्हणतात.
चित्रे यांनी २००३ साली पहिल्यांदा एका ऑटोरिक्षाच्या इंजिनाऐवजी बॅटरी लावून बघितली आणि त्याला टेस्टिंगसाठी नागपूरच्या आरटीओ कार्यालयात नेलं. पण त्यांचा या प्रयोगाला यश आलं नाही. त्यांनी आपल्या इलेक्ट्रिक रिक्षाचे सादरीकरण पेट्रोलियम महामंडळासमोर देखील केले होते. परंतु त्यांना तिथेदेखील निराशाच पदरी पडली. शेवटी त्यांनी पर्यावरणपूरक वाहन निर्मितीचा नाद सोडला.
परंतु २०१४ साली एका मित्राच्या एका दुकानात सोलर दिव्यांची फिटींग करत असताना आणि त्यांची कार्यप्रणाली समजूत घेत असताना त्यांना लक्षात आलं की सौर ऊर्जेचा वापर करून ते वाहन निर्मिती सहजरित्या करू शकतात. मग त्यांनी तीन वर्ष या गोष्टीचा अभ्यास सुरु केला की त्यांना ही वहान निर्मिती कशी शक्य होईल.
२०१७ साली त्यांनी २ महिंद्राच्या इ२० इलेक्ट्रिक कार्सची खरेदी केली आणि त्यांचे सोलर कारमध्ये रूपांतर कसे शक्य होईल यासाठी काम करायाला सुरुवात केली. परंतु त्यांच्या या प्रयोगाला देखील अपयशाचा सामना करावा लागला. त्यांनी हार न मानता आपले प्रयोग चालू ठेवले, त्यांनी एक मारुती ओम्नी विकत घेतली.
त्यांनी त्या ओम्नीच्या इंजिनाच्या जागी एक ४८ व्होल्टची डीसी मोटर, जनरेटर, गीअर बॉक्स, चार्ज कंन्ट्रोलर आणि इलेक्ट्रॉनिक एक्सलेटर यांची जोडणी केली.
त्यांनी वेग मर्यादित करणाऱ्या यंत्रणांची जोडणी केली सोबतच ४०० व्हॅटचे सोलर पॅनल्स गाडीच्या वरच्या भागात बसवले आणि गाडी तयारच केली नाहीतर तिची टेस्ट ड्राइव्ह म्ह्णून त्यांनी तब्बल ३५०० किमीचा प्रवास केला आहे. आज चित्रे एका शाळेच्या विद्यार्थ्यांना सोडायला आणि आणायला या वाहनाचा वापर करतात.
गमतीची बाब म्हणजे चित्रे नेहमी इतरांना सांगत असतात की ज्यावेळी इतर लोक स्वतःच्या वाहनाला पार्क करण्यासाठी ‘सावली’चा शोध घेत असतात, तेव्हा ते मात्र उन्हात आपल्या गाडीला पार्क करतात. चित्रे याना या सोलर कारच्या धर्तीवर रिक्षा आणि बसेसची निर्मिती करण्याची इच्छा आहे. यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
पर्यावरणपूरक वाहनांचा वापर देशात वाढवण्यासाठी व प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या चित्रे यांच्या सारख्या माणसांची देशाला गरज आहे, हे मात्र नक्कीच! त्यांना त्यांच्या पुढील संशोधनासाठी शुभेच्छा !
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.