आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
जन्माला येताना आपण कुठल्या परिस्थितीत जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसते. पण, नंतर आपल्या जिद्दीने, परिश्रमाने आणि विश्वासाने आपण आपली परिस्थिती नक्कीच बदलू शकतो. आज जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीवर नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की यातील कितीतरी व्यक्तींनी फक्त आपल्या कष्टाच्या आणि कौशल्याच्या जोरावरच ही संपत्ती आणि यश मिळवले आहे. खरे तर आपापली परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न तर सर्वच लोक करतात पण, काहीजण अर्ध्यातच हार मानतात तर काही जण यश मिळेपर्यंत प्रयत्न सोडत नाहीत.
भारतातील अंबानी उद्योगसमूहाने जगभरात आपला उद्योगाचा विस्तार केला आहे. स्वतःसोबतच या कुटुंबाने देशाचाही नावलौकिक वाढवला आहे. अंबानी उद्योग समूहाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या धीरूभाई अंबानी यांचा जन्म २८ डिसेंबर १९३२ रोजी गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातील चोरवाडा गावात झाला. त्यांचे वडील हिराचंद गोवर्धनदास अंबानी हे शिक्षक होते आणि आई जमनाबेन ही गृहिणी होती. जमानाबेन आणि हिराचंद यांचे हे तिसरे आपत्य.
जुनागढमध्येच धीरूभाईंचे शिक्षण पूर्ण झाले. कॉलेजमध्ये असताना ते महाविद्यालयीन राजकारणात प्रचंड सक्रीय होते. सामाजिक आणि राजकीय कामात ते हिरीरीने भाग घेत. अनेक सभासंमेलनांमध्ये सहभागी होत, त्यांचे आयोजन करत. राजकीय क्षेत्रात काम करण्याचा त्यांचा उत्साह पाहून अनेक राजकीय पक्षांनीही त्यांना आपल्या पक्षात येण्याचे आमंत्रण दिले.
जुनागढमध्ये एकदा महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या. या निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या एका उमेदवाराचा त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार केला. त्यांनी प्रचार केलेला उमेदवार निवडूनही आला. हे पाहिल्यानंतर तर त्यांना आपल्याच पक्षात आणण्यासाठी राजकीय पक्षांतही स्पर्धा सुरु झाली.
पण, धीरूभाईंना त्यावेळी राजकारणात प्रवेश करणे परवडणारे नव्हते. वडिलांची तब्येत बरी नसल्याने घराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेणे त्यांना भाग होते.
धीरूभाई अंबानींचे वडील शिक्षक होते. त्यांची कमाई अगदी तुटपुंजी होती. या तुटपुंज्या कमाईतच ते आपल्या कुटुंबाचा खर्च चालवायचे. तुटपुंज्या कमाईमुळे अनेकदा अगदी अत्यावश्यक गरजा भागवणे देखील जिकीरीचे होत असे. धीरूभाईंना घराला हातभार लावण्यासाठी छोटी-मोठी कामे करावी लागत होती. घराच्या जबाबदारीमुळे त्यांना उच्चशिक्षण घेण्याच्या आपल्या स्वप्नांवरही पाणी सोडावे लागले. चांगली नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने ते येमेनच्या इडन शहरात गेले. तेव्हा ते फक्त सोळा वर्षांचे होते. दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांना एका तेलाच्या कंपनीत क्लार्कची नोकरी मिळाली. या संधीचा पुरेपूर फायदा उठवत धीरुभाईंनी आयात-निर्यातीतील सगळे बारकावे शिकून घेतले.
१९५४ साली कोकिलाबेन यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्याचवेळी त्यांच्या कंपनीने त्यांना रिफायनरी विभागात बढती दिली. या उद्योगातील नफा-तोटा याचे त्यांनी बारकाईने निरीक्षण सुरु केले. भविष्यात आपणही अशीच स्वतःची कंपनी सुरु करू अशी स्वप्ने त्यांनी याच काळात पहिली.
भारतात परतल्यानंतर आपण स्वतंत्र व्यवसाय सुरु करू हे त्यांनी मनाशी पक्के ठरवले होते. आणखी काही दिवस इथे काम केल्यानंतर त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याच्या जिद्दीने ते भारतात परत आले असले तरी व्यवसाय उभा करण्यासाठी लागणारे भांडवल त्यांच्याजवळ नव्हते. एखादे किराणा मालाचे किंवा कपड्याचे दुकान टाकता येईल एवढे भांडवल तर त्यांच्याकडे होते, मात्र अशा छोट्या व्यवसायात गुंतवणूक करण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यांची स्वप्ने मोठी होती.
त्यांनी काही अरब मित्रांशी बोलून भारतीय मसाले, साखर किंवा अशाच काही वस्तूंची निर्यात करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. या व्यवसायात सुरुवातीला तरी फारसा फायदा होणार नव्हता तरीही त्यांनी याच व्यवसायातून सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. हळूहळू त्यांचा व्यापार वाढत गेला आणि ‘रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन’चा पाया घातला गेला.
आपल्या चातुर्याने आणि हुशारीने त्यांनी व्यवसायाची व्याप्ती वाढवत नेली. जेंव्हा केंव्हा त्यांना व्यापारात गुंतवणुकीची गरज भासत असे तेव्हा ते गुजरातमधील मोठमोठ्या व्यापाऱ्यांना मोठ्या फायद्याचे आमिष दाखवून स्वतःसोबत जोडून घेत. या गुंतवणूकदारांना त्यांनी शब्द दिलेला असे की जर फायदा झाला तर तो तुमचा आणि तोटा झालाच तर तो माझा. त्यांचा हा आत्मविश्वास पाहून अनेक उद्योजक त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याची रिस्क घेत असत.
थोड्या दिवसांनी त्यांनी धाग्याच्या व्यवसायाकडे आपला मोर्चा वळवला. या व्यापारात त्यांना भरपूर फायदा होऊ लागला. इथे भरपूर फायदा होऊ शकतो हे लक्षात येताच त्यांनी व्याजाने रक्कम उचलली आणि याच व्यवसायावर लक्ष केंद्रित केले. येत्या काळात पॉलिस्टरच्या वाढत्या मागणीचा अंदाज घेत त्यांनी ‘विमल’ नावाने आपला ब्रँड बाजारात आणला.
हा ब्रँड बाजारात आणताना त्यांनी होलसेल विक्रेत्यांऐवजी थेट किरकोळ विक्रेत्यांशी संपर्क साधला. किरकोळ विक्रेत्यांनीही त्यांना चांगला प्रतिसाद दिला. हा कपडा थेट बाजारात विकला जात असल्याने याची लोकप्रियता देखील वाढली. किरकोळ विक्रेते तर केवळ विमलचीच मागणी करू लागले.
अशा प्रकारे हळूहळू रिलायन्स इंडस्ट्रीजचा विस्तार वाढत चालला होता. १९७० पर्यंत या कंपनीने ७० कोटींचे साम्राज्य उभे केले.
भारत सरकारच्या प्राप्तीकरातून मिळणाऱ्या उत्पन्नात ५% वाटा एकट्या रिलायन्सचा आहे. गेल्या काही वर्षातील प्राप्तीकराचे आकडे पाहिल्यास रिलायन्सने २.८८ लाख कोटी इतकी रक्कम प्राप्तीकर म्हणून भरली आहे. फोर्ब्जच्या यादीत आपले नाव नोंदवणारी रिलायन्स ही पहिलीच भारतीय कंपनी आहे.
या विशाल साम्राज्याची उभारणी करण्यासाठी किमान दोन दशकांचा कालवधी जावा लागला. आपल्या दूरदृष्टीने त्यांनी असा उद्योग समूह निर्माण केला ज्याची भारतातील एक मोठा उद्योग समूह म्हणून ऐतिहासिक नोंद करावी लागेल. या सगळ्यामागे धीरूभाईंची अभेद्य इच्छाशक्ती, दृढनिश्चय आणि कामावरील निष्ठा याच गोष्टींचा महत्वाचा वाटा आहे. ६ जुलै २००२ रोजी हृदयविकारामुळे त्यांचा मृत्यू झाला.
हिंदीमधील गुरु हा चित्रपट धीरुभाई अंबानी यांच्याच जीवनपटावर आधारित आहे. ज्यात अभिषेक बच्चनने धीरूभाईची तर ऐश्वर्या रायने कोकिलाबेन यांची भूमिका साकारली आहे. धीरूभाई अंबानींचे जीवन इतके प्रेरणादायी होते की, बॉलीवूडला देखील त्यांच्या संघर्षाची दाखल घ्यावी लागली.
“आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी काम करा नाहीतर कुणीतरी तुम्हाला त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कामाला लावेल”, ही पंक्ती आपण अनेकदा प्रेरणादायी विचारांच्या सूचित वाचतो, ऐकतो. पण, धीरूभाई अंबानी हे असे व्यक्तिमत्व होते ज्यांनी ही उक्ती आपल्या आयुष्यात जागून दाखवली.
धीरूभाई अंबानी हे नाव आजही ज्यांना आपल्या स्वप्नांचा पाठलाग करायचा आहे अशा अनेक भारतीय तरुणांसाठी प्रेरणा देत आहे. इडनमध्ये अवघ्या २०० रुपये पगारावर काम करणाऱ्या धीरूभाईंनी अशी कंपनी उभारली जी आज भारतातीलच नव्हे तर भारताबाहेरीलही लाखो लोकांना रोजगार देत आहे, त्याच्या स्वप्नांना आकार देत आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.