आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब
१८९७ सालची गोष्ट, पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. पण इंग्रजांसाठी ही साथ एखाद्या संधीसमान होती. त्यांच्या राज्यकारभाराला बळकटी देण्याचे काम या साथीने केले होते. प्लेगचे कारण देऊन ब्रिटिशांनी सामान्य जनतेवर अत्याचार करण्याची परिसीमा गाठली होती. लोकांना विनाकारण मारून आपली सत्ता कायम ठेवणे ब्रिटिशांचा धंदा बनला होता.
ब्रिटिशांच्या या कृष्णकृत्यांना विरोध म्हणून भारताच्या भूमीवर अनेक क्रांतिकारक जन्माला आले, ज्यांनी ब्रिटिशांकडून करण्यात येणाऱ्या जुलुमाला विरोधात बंड पुकारले आणि मातृभूमीसाठी आपले प्राण अर्पण केले.
अशाच क्रांतिकारकांमध्ये चापेकर बंधूंचा समावेश होतो. या तीन भावंडांनी इंग्रजांची एकेकाळी झोप उडवली होती. आज या वीर चापेकर बंधूंच्या अजरामर बलिदानाची गाथा जाणून घेऊया…
इतिहासात दामोदर हरी चापेकर, बाळकृष्ण हरी चापेकर आणि वासुदेव हरी चापेकर या तीन बंधूंचे नाव स्वर्णाक्षरांनी लिहिण्यात आले आहे. मूळचे चिंचवडचे रहिवासी असलेले कीर्तनकार हरीपंत चापेकर आणि त्यांची पत्नी द्वारका यांच्या पोटी या तीन वीर बंधूंचा जन्म झाला.
२५ जून १८८८साली सर्वात मोठ्या दामोदर हरी चापेकर यांचा जन्म झाला. दामोदर चापेकर यांच्यात सुरुवातीपासूनच देशासाठी काहीतरी करण्याची इच्छाशक्ती होती. त्याकाळी पुण्यात लोकमान्य टिळकांचे मोठे प्रस्थ होते. त्यांचा प्रभाव चापेकर बंधूंवर देखील पडला आणि त्यांच्या मनात देखील इंग्रजी राजसत्तेची एक चीड निर्माण झाली.
एकदा तर ब्रिटिशांच्या रागातून दामोदर चापेकरांनी महाराणी व्हिक्टोरियाच्या पुतळ्याला काळे फासले होते. दामोदर चापेकर एकीकडे ज्वलंत देशभक्तीच्या वाटेवर असतांना त्यांचे बंधू बाळकृष्ण आणि वासुदेव मात्र आपल्या पित्याप्रमाणे कीर्तन व भजन करण्यात आपला वेळ घालवत होते.
१८९७ साली पुण्यात प्लेगची साथ पसरली. प्लेगचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता एक प्लेग समिती गठीत करण्यात आली. या समितीने मात्र आखून दिलेल्या कामाच्या उलटंच काम केले. या समितीचा प्रमुख असलेला रँड प्रचंड क्रूर होता.
त्याने उपाययोजनांच्या आडून भारतीयंवर जुलूम करण्यास सुरुवात केली. जोवर भारतीयांवर अत्याचार करत नसे तोवर रँडचे मन भरत नसे. त्याच्या क्रूरतेने असंख्य लोक पीडित होते. त्याच्या या वागणुकीमुळे लोकमान्य टिळक आणि त्यांचे सहकारी त्रस्त होते. भारतीय लोकांचा अपमान करण्यासाठी रँड आणि इतर इंग्रज अधिकाऱ्यांनी लोकांच्या घरात घुसून त्यांची पूजाघरे उध्वस्त केली आणि त्यांच्या घरातील स्त्रियांच्या अब्रूवर देखील हात टाकला.
लोकमान्य टिळकांनी याविरोधात संतापून एक झणझणीत अग्रलेख केसरीमध्ये लिहिला. हा अग्रलेख वाचून दामोदर चापेकरांनी आपल्या दोन्ही भावांना सोबत घेऊन काही तरुणांची टोळी बनवली आणि त्यांना सैन्य प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. सगळे तरुण तयार झाल्यावर दामोदर चापेकरांनी कट आखण्यास सुरुवात केली.
दरम्यानच्या काळात एका खटल्यात इंग्रजांनी लोकमान्य टिळकांची पुण्याच्या येरवडा तुरुंगात रवानगी केली होती. यामुळे दामोदर चापेकर अजून संतापले होते. त्यामुळे त्यांनी इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी कंबर कसली.
२२ जून १८९७ साली इंग्रजांनी पुण्याच्या गव्हर्नमेंट हाऊसमध्ये राणीच्या राज्यरोहणाचा हीरक मोहत्सव साजरा करण्यासाठी मेजवानीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अनेक ब्रिटिश अधिकारी येणार होते. या गव्हर्नमेंट हाऊसच्या बाहेरील रस्त्यावर घनदाट आरण्यामुळे कायम अंधार असायचा. याचा फायदा चाफेकर बंधूनी घ्यायचे ठरवले.
एकीकडे ब्रिटिश लोकांची पार्टी सुरु असताना चाफेकर बंधू झाडामागे लपून बसले होते, यावेळी त्यांचा सहकारी विनायक रानडे देखील त्यांच्या समवेत होता. पार्टी संपली आणि इंग्रज अधिकारी बाहेर पडू लागले. रँड आल्यावर ‘गोंद्या आला रे आला’ अशी हाळी देण्याची योजना त्यांनी आखली होती. त्यांना एक घोडागाडी येताना दिसली, त्यांनी जोरात आरोळी मारली आणि त्यांनी त्या गाडीला आडवत, आत बसलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्याला गोळ्या झाडल्या.
त्यांना वाटले होते की त्यांनी रँडला गोळ्या झाडल्या आहेत, पण तो आयर्स्ट नावाचा दुसरा इंग्रज अधिकारी होता. त्याच्या गाडीच्या पाठोपाठ अजून एक गाडी या भावंडांच्या दृष्टीस पडली व त्यांना त्यात रँड दिसला. त्यांनी लगेचच गाडी थांबवत रँडला देखील गोळ्या घातल्या, यानंतर ते बाजूच्या जंगलात पसार झाले.
ब्रिटिशांना या दोन अधिकाऱ्यांच्या हत्याकांडाने हादरवून सोडले. आयर्स्टचा जागीच मृत्यू झाला होता तर रँड हा ३ जुलैला इस्पितळात मृत्युमुखी पडला. या हत्याकांडाने हादरलेल्या ब्रिटिशांच्या गुप्तचरांनी मारेकऱ्यांवर २० हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते. ते सर्वत्र चाफेकर बंधूंचा शोध घेत होते.
चापेकर बंधुंवरील इनामाचा आकडा वाचून चाफेकर बंधूंचे सहकारी असलेल्या गणेश शंकर द्रविड आणि रामचंद्र द्रविड या दोन बंधूंनी दामोदर हरी चापेकरांचा ठिकाणा ब्रिटिशांना सांगितला. चिडलेल्या ब्रिटिशांनी दामोदर हरी चापेकरांना अटक केली. काही दिवसांनी बाळकृष्ण हरी चापेकर हे देखील इंग्रजांच्या तावडीत सापडले.
दामोदर हरी चापेकरांना मृत्युदंडाची शिक्षा झाली. दामोदरपंत आणि लोकमान्य टिळक दोन्हीही येरवडा तुरुंगात होते. असं म्हणतात की याठिकाणी दोघांची भेट झाली तेव्हा टिळकांनी चापेकर बंधूंना गीता भेट म्हणून दिली होती. गीतेच्या त्या प्रतीला कवटाळून दामोदर हरी चापेकर यांना १८ एप्रिल १८९८ मध्ये फाशी गेले.
बाळकृष्ण हे देखील ब्रिटिशांच्या ताब्यात होते, फक्त लहानगे वासुदेव बाहेर होते. वासुदेव यांनी आपल्या भावांना ब्रिटिशांच्या तावडीत नेऊन देणाऱ्या द्रविड बंधूंचा काटा काढण्याची योजना आखली आणि विश्वासघात करणाऱ्या द्रविड बंधूंची पुण्यात भर चौकात हत्या केली. यानंतर वासुदेव चापेकरांना देखील अटक करण्यात आली. पाच दिवसांतच, १२ मे रोजी, बाळकृष्ण चापेकरांना देखील इंग्रजांनी फासावर लटकवले. तिन्ही बंधू हसत हसत फासावर गेले. त्यांचा मित्र विनायक रानडेला देखील फाशी देण्यात आली.
चापेकर बंधूंची ही वीरगाथा आणि त्यांचा असीम त्याग सर्वांच्या कायम स्मरणात राहील!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.