आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आपण शाळेत असतांना खूब लढी मर्दानी थी वो झाशीवाली राणी थी, ही कविता ऐकली असेलच. या हिंदी कवितेची रचना सुभद्रा कुमारी चौहान यांनी केली असून त्या एक स्वातंत्र्यसेनानी होत्या. खरंतर झाशीच्या राणीच्या आयुष्यावर बेतलेल्या या कवितेतून सुभद्रा कुमारी चौहानने १८५७ साली झाशीच्या राणीने ब्रिटिशांशी केलेला संघर्ष तर चितारलाच पण, त्यांनी लोकांमध्ये स्वातंत्र्याची उर्मी जागृत करण्याचे काम केले आहे.
खरंतर सुभद्रा कुमारी चौहान यांचे देखील आयुष्य अशाच संघर्षानी व्यापलेले होते, ज्याबद्दल फार थोडी माहिती लोकांना आहे. त्यांनी स्वतःच्या संघर्षाबद्दल ना कुठे लिहलं ना साधा उल्लेख केला पण त्यांनी स्वत:ला स्वातंत्र्यता संग्रामासाठी झोकून दिले होते. यासाठी त्यांना खूप मोठी किंमत देखील मोजावी लागली होती.
सुभद्रा यांचा जन्म १६ ऑगस्ट १९०४ साली जन्म प्रयागराज जिल्ह्यातील निहालपूर येथील एका जमीनदार कुटुंबात झाला होता. त्यांच्या घरचे अस्पृश्यता पाळत असले तरी त्यांनी ती कधीच पाळली नाही. त्या साफ सफाईच्या कामात आपल्या नोकरांना मदत करत असत.
वयाच्या नवव्या वर्षांपासून त्यांनी कविता लेखन करायला सुरुवात केली होती. महत्वाची गोष्ट म्हणजे हिंदीतील सुप्रसिद्ध कवियत्री महादेवी वर्मा यांच्यासोबतच त्यांनी शिक्षण घेतलं होतं.
त्या त्यांच्या एका इयत्तेपुढे होत्या. अखेरपर्यंत दोघांची मैत्री कायम राहिली होती. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर वयाच्या १५ व्या वर्षी लक्ष्मणसिंह चौहान यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. लक्ष्मणसिंह हे जबलपूर परिसरातील सामाजिक चळवळीचे अग्रणी होते, त्यांनी घुंगट प्रथेविरोधात आवाज उठवला होता. त्यांच्या मताने बायकांना घुंगटने तोंड झाकण्याची जबरदस्ती ही पुरुषप्रधान संस्कृतीकडून केली जाणारी स्त्री स्वातंत्र्याची गळचेपी होती.त्यांनी सुभद्रा यांना घुंगट वापरण्यास मज्जाव केला. सुभद्रा देखील मोठया हिररीने ह्यात सहभागी झाल्या होत्या.
सुभद्रा यांच्या सासरच्या व माहेरच्या लोकांना हा दृष्टिकोन पटला नाही त्यांनी घुंगट प्रथेच्या समर्थनार्थ कठोर भूमिका घेतल्या पण हा सर्वच दबाव सुभद्रा ह्यांनी झुगारून लावला आणि घुंगट प्रथेला रजा दिली.
१९२१ साली ह्या जोडप्याने स्वतंत्रता संग्रामात उडी घेतली. त्यांनी जबलपूरच्या झेंडा सत्याग्रहात सहभाग नोंदवला. त्यांनी ब्रिटिश राजसत्तेचा निषेध म्हणून संपूर्ण शहरात भारतीय झेंडे उभारले. १९२३ साली गर्भवती अवस्थेत त्यांना ब्रिटिशांनी तुरुंगात डांबले. पण त्याच कारणामुळे त्यांची सुटका देखील ब्रिटिश प्रशासनाला करावी लागली.
स्वातंत्र्यता संग्रामातील विविध कार्यात सहभागी होत असतांनाच त्यांनी १०० कवितांची रचना देखील केली. ५० लघुकथांचे देखील लेखन त्यांनी केले. १९३० पर्यंत त्यांनी ही सर्व साहित्य निर्मिती केली. ह्या साहित्यातून त्यांनी जातिभेदाचा प्रथेचा, हुंडा प्रथेचा, घुंगट प्रथेचा आणि लिंग भेदभावाचा तीव्र शब्दात धिक्कार केला.
१९३० साली मुकुल नावाचा त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. ह्यातच त्यांची झाशीच्या राणी वरची कविता आहे. त्या राजकारणात देखील सक्रिय होत्या. मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महिला विभागाच्या त्या सदस्य होत्या. १९३६ साली त्या मध्य प्रांताच्या विधानसभेत निवडून देखील आल्या होत्या. पण त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात तेव्हा झाली ज्यावेळी त्यांनी १९४२ सालच्या छोडो भारत चळवळीत सहभाग नोंदवला. त्यांच्या पतीला ब्रिटिशांनी आत टाकलं, अशा परिस्थितीत देखील आपल्या पाच मुलांना घेऊन त्या मुंबईला जाऊन राहू लागल्या, तिथे त्या स्वातंत्र्यता संग्रामातील इतर सेनानीना मदत करत होत्या व अनेक कारवायत सहभागी होत होत्या. पुढे त्यांना देखील अटक करण्यात आली. पण ही वेळ एक न एक दिवस येईल म्हणून त्यांनी आपली जेष्ठ कन्या सुधाला आपल्या लहान भावंडांची काळजी घेण्यासाठी तयार केले होते.
जेलमध्ये असतांना देखील त्या स्वतः उपाशी राहत पण आपल्या सोबतचा इतर कैद्यांची काळजी घेत असत. त्यांना प्रसंगी आपल्या ताटातील पोळी देखील देत असत. पण पुढे त्यांना एक आजार जडला व त्यांची तुरुंगातुन मुक्तता करण्यात आली. त्या पुन्हा मध्य प्रांताच्या निवडणुकीत निवडून आल्या होत्या. त्यांनी आपलं काम व्यवस्थितपणे चालू ठेवलं.
एकदा त्या त्यांच्या अस्पृश्य कामगाराच्या मुलीच्या लग्नात त्यांच्या पंक्तीत बसून जेवल्या, ज्याची अनेक उच्च कुलीन निंदा करत होते पण त्या मागे हटल्या नाहीत. इतकंच नाही तर आपली मोठी मुलगी सुधाला प्रेमचंद यांचा मुलगा अमृत राय आवडतो हे लक्षात येताच त्यांनी त्या दोघांचा विवाह सुद्धा केला. वेगवेगळ्या जातीचे असल्यामुळे ह्या विवाहाला होणारा प्रचंड विरोध त्यांनी झुगारून लावला व आपल्या मुलीच्या पाठीशी त्या भक्कमपणे उभ्या राहिल्या.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर घडलेल्या दोन दुर्दैवी घटनांनी त्यांना व्यथित केले. पहिला धक्का होता फाळणीच्या वेळी झालेल्या हिंसाचाराचा आणि दुसरा होता महात्मा गांधी यांच्या हत्येचा, ह्या दोन गोष्टींनी त्यांच्यावर परिणाम केला होता. गांधी हत्येनंतर एका महिन्याने एका अपघातात सुभद्रा यांचा वयाच्या केवळ ४४ व्या वर्षी दुर्दैवी मृत्यू झाला.
आज भारत सरकारने त्यांच्या नावाचे पोस्ट स्टॅम्प छापले आहे. त्यांच्या झाशीच्या राणीच्या कवितेच्या माध्यमातून आजही त्या स्मरणात आहे. त्यांनी २० व्या शतकात दिलेला संघर्ष देखील झाशीच्या राणीने १९ व्या शतकात दिलेल्या संघर्षा इतकंच महान आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.