आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
मानव जसजसा प्रगत होऊ लागला तसतसे त्याने आग, धातू, चाक असे अनेक महत्त्वाचे शोध लावले. यातही चाकाच्या शोधामुळे माणसाला दोन फायदे झाले एक म्हणजे दळणवळणासाठी चाकाचा वापर करण्यात आला आणि दुसरं म्हणजे चाकामुळे विविध मातीची भांडी तयार करणे शक्य झाले. हीच मातीची भांडी नंतर अन्न साठवण्यासाठी वापरण्यात आली. पुढे जसे जसे धातूशास्त्र प्रगत झाले मानवाने वेगवेगळ्या धातूंपासून भांडी तयार केली.
कालांतराने मानवाच्या स्वयंपाकघरात काचेची भांडी आली. प्राचीन काळापासून माणूस काचेच्या वस्तू वापरत आला आहे. ज्वालामुखींतील शिलारसापासून नैसर्गिकरित्या तयार झालेल्या काचेचा उपयोग अश्म्युगापासून हत्यारांसाठी होत असे. काचेचा प्रथम शोध हा सीरियात लागला अस रोमन तत्वज्ञ “प्लिनी” (Pliny) यांनी नमूद केलं आहे. सोडा फेल्डस्पारचे (Soda Feldspar) काचेत रूपांतर करण्याच्या शोधाचाही उल्लेख “प्लिनी” (Pliny) यांनी केला आहे.
इसवीसनपूर्व 300-20 या काळात फिनिशीयन लोकांनी फुंकनळ्यांचा शोध लावला आणि या फुंकनळ्या वापरून काचेची पात्रे बनविण्यास सुरुवात केली. पूर्वी सीरिया आणि इजिप्तमध्ये वारंवार युद्ध व्हायचे.
या दोन्ही देशात व्यापार ही भरपूर व्हायचा. त्यामुळे व्यापारी आणि कैद्यांमुळे काच बनविण्याच्या कलेचा प्रचार व प्रसार झाला असणे शक्य आहे. रोमन सम्राट “ऑगस्टस सीझर” (Augustus Caesar) याने इजिप्तवर विजय मिळवल्यावर खंडणी म्हणून काचेच्या कारागिरांची मागणी केली व अशारीतीने रोमन साम्राज्यात काचेचा प्रवेश झाला. नंतर मध्ययुगात “कॉन्स्टंटिनोपोल” (Constantinopole) येथे काचकलेची प्रगती झाली. 10व्या आणि 11व्या शतकात “दमास्कस” (Damascus) येथे “मोझेक” (Mosaic) काचेचे मोठ्या प्रमाणात उतपादन होत असे व त्याची इतर देशांत निर्यात होत असे.
काही पाश्चिमात्य विद्वानांचे असे मत आहे की काचेची कला ही पाश्चात्य देशातून भारतात आली. अँलेझांडरच्या भारतावरील स्वारीनंतर ही काचेची कला भारतात आली. भारतीयांना काचेची माहिती होती याचे उल्लेख जुन्या संस्कृत ग्रंथातुनही मिळतात. कृष्ण यजुर्वेदात, शतपथ ब्राह्मण ग्रंथात, चरक संहिता, कौटिल्य अर्थशास्त्र, हितोपदेश यात काचेची महिती दिली आहे. तक्षशिला येथील भीर टेकडीच्या उत्तखनन करताना काचेच्या बऱ्याच वस्तू मिळाल्या. मौर्योत्तर काळात भारतात काचेचा उद्योज बराच वाढला. हा होता प्राचीन भारतातल्या काचेचा इतिहास.
आधुनिक भारतात 19व्या शतकात 1870 साली काच व्यवसायाची सुरुवात झाली. जपानी आणि जर्मन तंत्रज्ञानाच्या मदतीने मुंबई, हैद्राबाद, जबलपूर या ठिकाणी काच कारखाने सुरू झाले. पहिल्या महायुद्धापूर्वी भारतातील कारखान्यांची आपल्या अस्तित्व रक्षणासाठी धडपड चालू होती.
ही बाब लक्षात घेऊन 1908 मध्ये महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली तळेगांव येथे पैसाफंड काचशाळेची स्थापना करण्यात आली. यानंतर भारतात देशी काचकारखाने वाढू लागले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळी काचसामानाची आयात कमी झाली आणि यामुळे भारतीय काच व्यवसायाची प्रगती झाली.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आर्थिक प्रगतीच्यादृष्टीने पंचवार्षिक योजना आखण्यात आल्या आणि या योजनेत काच व्यवसायाची प्रगती होण्यासाठी तरतुदी केल्या गेल्या. 1955 नंतर काच उत्पादन प्रक्रियेत नवीन तंत्रज्ञानामुळे बरेच बदल झाले व भारत चांगल्या दर्जाची काच उत्पन्न करून त्याची निर्यात करू लागला.
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात टाटा, बिर्ला, अशा उद्योग समूहांनी यशस्वीरित्या उद्योग स्थापन करून भारतीय माणूस यशस्वी उद्योजक होऊ शकतो हे जगाला दाखवून दिलं. भारतात काचेची निर्मिती व्हायची पण अजून ही कोणत्याही उद्योजकाने काच व्यवसायात पदार्पण केले नव्हते. तर आज आपण अशा एका भारतीय उद्योग समूहाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी काच व्यवसायात भारतात सर्वोच्च स्थान निर्माण केले आहे, याचे नाव तुम्हालाही माहिती असेल. तुम्ही त्या कंपनीची भांडी वापरतही असाल. त्या कंपनीचे नाव आहे बोरोसिल. तर चला जाणून घेऊयात बोरोसिल (Borosil) या उद्योग समूहाची गोष्ट!
1950 रोजी कलकत्ता मध्ये बजरंग लाल खेरूका यांचे वडील हे तागाचे व्यापारी आणि दलाल म्हणून काम करायचे. काही वर्षांत बजरंग लाल खेरूकाही वडिलांच्या व्यवसायात उतरले. अत्यंत मेहनती असल्यामुळे त्यांना व्यापारामध्ये फायदा होऊ लागला. पण कलकत्तामधील ज्यूट एक्सचेंज बंद झालं आणि बजरंग लाल खेरूका यांच्या व्यापाराला उतरती कळा लागली. पण यामुळे बजरंग लाल खेरूका यांनी निराश न होता आपले हात पाय मारायला सुरुवात केली. आता कोणता व्यवसाय करायचा याच्या शोधात त्यांनी भारतभ्रमण केलं व जर्मनी आणि जपान या देशात ही जाऊन आले.
संशोधन आणि बराच विचार केल्यानतंर त्यांनी कागद किंवा काचेचा व्यापार सुरू करायचा असे ठरवले. पण तो काळ होता “लायसन्स राजचा”! म्हणजे त्याकाळी जर कोणत्या माणसाला भारतात उद्योग सुरू करायचा असेल तर त्याला सरकारकडून परवाना म्हणजेच लायसन्स लागायचं. बजरंग लाल खेरूका यांनी कागद आणि काच या दोन्ही व्यवसायाच्या परवान्यासाठी अर्ज केला.
बजरंग लाल खेरूका यांना काचेचा व्यापार करण्यासाठीचा परवाना मिळाला आणि त्यांनी विंडो ग्लास लिमिटेड (Window Glass Limited) या कंपनीची सुरुवात केली. 1962 साली विंडो ग्लास लिमिटेड (Window Glass Limited) या कंपनीचं नाव बदलून “बोरोसिल” (Borosil) असं ठेवण्यात आलं. याच वर्षी बोरोसिल कंपनी व “कॉर्निंग ग्लास वर्क्स” (Corning Glass Works) या अमेरिकन कंपनीने भारतात एकत्रितपणे काचेचं उत्पादन व व्यवसाय करायचं ठरवलं.
बोरोसिल कंपनी स्थापन करून 12 वर्षे झाली होती पण म्हणावा तेवढा प्रतिसाद न मिळाल्याने कंपनीचं आर्थिक नुकसान होत होतं. 1988 साली बोरोसिल कंपनीने त्यांची कॉर्निंग ग्लास वर्क्ससोबत असलेली आपली व्यवसायिक भागीदारी संपुष्टात आणून भारतात स्वतंत्रपणे काच निर्मिती व व्यापार करायचं ठरवलं.
बोरोसिल आत्तापर्यंत वेगवेगळ्या काचेची उत्पादन बाजारात विकत होते, पण आता त्यांनी एक नवीन शक्कल लढवली. बोरोसिलने आता प्रदीप खेरूका यांच्या नेतृत्वाखाली बोरोसिलकेट काचेची उत्पादन तयार करायचे ठरवले. बोरोसिलकेट काचेला अतिउच्च तापमानात ही तडा जात नाही व या काचेचा वापर वेगवेगळ्या उद्योगात आणि प्रयोगशाळेत करता येऊ शकतो. बोरोसिलच्या या धोरणामुळे त्यांना भरपूर नफा झाला.
2006 साली प्रदीप खेरूका यांचा मुलगा श्रीवर खेरूका याने कंपनीत प्रवेश केला. त्यावेळी श्रीवर खेरूका कंपनीत आले त्यावेळी कंपनी फार नाजूक स्थितीत होती. श्रीवर खेरूका यांना सुरुवातीच्या 5 वर्षांत रोज एक प्रश्न पडायचा की आपण बोरोसिलमध्ये येऊन चूक तर नाही ना केली? बोरोसिलला त्या काळात आपले नवीन कारखाने उभारून व्यवसायाचा विस्तार करायचा होता पण कामगार संघटनेच्या व काही स्थानिक लोकांच्या विरोधामुळे त्यांना कारखाने उभारण शक्य होत नव्हतं. हे सगळं करण्यासाठी स्थानिक पातळीवरच्या सरकारी कार्यालयांची परवानगी असणे गरजेचे होते, त्या परवानग्या ही सहजपणे मिळत नव्हत्या.
या सगळ्यामुळे कंपनीचं आर्थिक नुकसान भरपूर झालं. एकवेळ तर अशी होती की बोरोसिलकडे त्यांच्या कामगारांना पगार द्यायला पैसे नव्हते. आता बोरोसिल कंपनीने या नुकसानातून बाहेर येण्यासाठी बोरोसिलीकेट काचेचा वापर करून घरगुती वापरासाठी कपबशा, ताट वाट्या आणि अन्य स्वयंपाक घरात लागणारी काचेची भांडी तयार केली. यामुळे त्यांच्या उत्पादनाला बाजारात चांगला प्रतिसाद मिळाला. इथवर न थांबता त्यांनी मिक्सर-ग्राइंडरचे उत्पादन ही केले.
आज स्टॉक एक्सचेंजमध्ये बोरोसिल लिमिटेड आणि बोरोसिल रिनीवेबल्स लिमिटेड या दोन्ही झळकल्या आहेत.
माणसाचं आयुष्य हे आव्हानांनी भरलेलं आहे. प्रत्येक क्षणाला एक नवीन आव्हान समोर उभं असतं. बोरोसिलचा प्रवासात सुरुवातीला 12 वर्षात आर्थिक नुकसान होत आहे म्हणून किंवा आपल्या उत्पादनाला चांगला प्रतिसाद मिळत नाही म्हणून जर खेरूका कुटुंबाने हार मानली असती तर आज घरोघरी पोचलेली बोरोसिल ही कंपनी अस्तित्वात तरी असती का? याबद्दल आपण विचार केला पाहिजे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.