आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
एकेकाळी वाल्या कोळी नावाचा दरोडेखोर होता. तो रस्त्यानं येणाऱ्या-जाणाऱ्या वाटसरूंना मारून त्यांचे पैसे आणि दागदागिने लुटत असे. प्रत्येक व्यक्तीला मारल्यानंतर तो एक खडा उचलून रांजणात टाकत असे. अशा प्रकारे त्याच्याकडे खड्यांनी कित्येक रांजण भरले होते. पुढे नारदमुनींच्या सल्ल्यानं त्यानं देवाचं नामस्मरण केलं. देवानं प्रसन्न होऊन त्याचे सर्व अपराध माफ केले. हाच वाल्या कोळी वाल्मिकी ऋषी झाला आणि त्यांनी ‘रामायण’ हे महाकाव्य लिहिलं.
चांगल्या वर्तणुकीचं महत्त्व पटवून देताना लहान असताना आमच्या शाळेत ‘वाल्या कोळ्या’ची गोष्ट आवर्जून सांगितली जाई. वाल्या कोळ्यानं मोजता येणार नाही इतक्या लोकांचा जीव घेतला होता. अशीच एक गोष्ट स्कॉटलंडमधील लहान मुलांना देखील कित्येक शतकांपासून सांगितली जाते. फक्त त्यांच्या गोष्टीतील व्यक्ती शेवटपर्यंत चांगला झालाच नाही. स्वॅनी बीन, असं त्या व्यक्तीचं नाव होतं. त्याच्या नावानं लहान मुलंच काय मोठी माणसंही भीतीनं थरथर कापत होती.
कोण होता हा स्वॅनी बीन आणि काय होती त्याची गोष्टं?
अलेक्झांडर स्वॅनी बीन हा स्कॉटलंडमधील एका गुहेमध्ये वास्तव्याला होता. तो ४५ ते ५० जणांच्या टोळीचा म्होरक्या होता. यातील बहुतेक जण त्याचेच कुटुंबिय होते.
त्यांनी सर्वांनी मिळून २५ वर्षांच्या काळात एक हजारपेक्षा जास्त व्यक्तींचे खून केले होते. सर्वात भयानक गोष्ट म्हणजे खून केल्यानंतर ते मृत व्यक्तीचं मांस खात असतं.
त्याचा जन्म १६ व्या शतकात स्कॉटलंडमधील एडिनबर्गमध्ये झाला असावा, अशी शक्यता आहे. त्याच्या जन्मानंतरची फारशी माहिती उपलब्ध नाही. त्याच्या वास्तव्याच्या कालखंडांबाबत देखील इतिहासकारांमध्ये एक वाक्यता नाही. स्कॉटिश इतिहासकार डॉ. लुईस योमन यांच्या म्हणण्यानुसार, बीनची गोष्ट १७व्या शतकाच्या शेवटी सुरू झाली होती. मात्र, १७५५ नंतरच्या ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये त्याचा कुठेही उल्लेख आढळत नाही. कुठल्याही कालखंडात तो अस्तित्त्वात असो, निर्दयीपणाचा चेहरा म्हणूनचं त्याच्याकडे पाहिलं जातं.
बीन मूळत: व्यवसायानं एक टॅनर (कातडी कमवणारा) असल्याचं सांगितलं जात तर काही म्हणतात तो एक व्यापारी होता. त्यानं आपला व्यवसाय सोडून ब्लॅक अॅग्नेस डग्लस नावाच्या स्त्रीसोबत लग्न केलं. त्यानंतर आपल्या पत्नीसोबत तो एका निर्जन गुहेमध्ये राहण्यासाठी केला. या ठिकाणाला आता ‘बेनॉन केव’ या नावानं ओळखलं जातं. ही गुहा भरतीचं पाणी खडकावर आदळून तयार झाली होती. त्यात एक मैल लांबीपर्यंतची अनेक भुयारं देखील होती. याचं ठिकाणी स्वॅनी आणि त्यानी त्याच्या पत्नीनं कुटुंब वाढवलं, असं सांगितलं जातं.
स्वॅनीच्या पत्नीनं १४ मुलांना जन्म दिल्यानं साहजिकचं खाणाऱ्यांची तोंडं वाढली. आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी त्यानं दरोडेखोरी आणि खून सुरू केले. या कामात त्याच्या कुटुंबियांनी त्याची मदत सुरू केली. संपूर्ण कुटुंब वाटसरूंना लुटत, त्यांना जीवे मारत आणि त्यांचं मांस खात. अशा पद्धतीनं संपूर्ण कुटुंब नरभक्षक झालं. काही लोकं तर असंही सांगतात, मृत लोकांचं मांस जास्त काळ टिकून राहावं म्हणून स्वॅनी त्याचं लोणचं तयार करत असे.
काळाच्या ओघात १८ नातू आणि १४ नातींसह स्वॅनीच्या कुटुंबातील लोकांची संख्या ४५ पेक्षा जास्त झाली होती. सर्वच्या सर्वजण नरभक्षक झाले होते.
आसपासच्या प्रदेशातून बेपत्ता झालेल्यांची यादी दिवसेंदिवस वाढत गेली. मात्र, बीन कुटुंबिय कुणाच्याही पाहण्यात नसल्यामुळं बेपत्ता लोकांच्या मागे कोण आहे याचा शोध लागला नाही. याउलट अनेक खाणावळ मालक संशयाच्या भोवऱ्यात अडकले. कारण, बेपत्ता झालेल्या लोकांशी खाणावळ चालकांचाच शेवटचा संबंध आलेला असायचा. खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकण्याच्या भीतीनं काही खाणावळ मालकांनी तर हा व्यवसाय सोडून दुसरा व्यवसाय पत्करला होता, इतकी दहशत स्वॅनी बीनच्या टोळक्यानं निर्माण केली होती.
एक दिवस, बीनच्या टोळक्यानं स्थानिक जत्रेतून घोड्यावर परत येणाऱ्या पती-पत्नीला घेरलं. त्यांनी मागच्या बाजूनं त्या जोडप्यावर हल्ला केला. टोळक्यातील पुरुष क्षणात त्या महिलेवर जनावरासारखे तुटून पडले. तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असताना तिच्या शरीरातील आतडे देखील बाहेर ओढून काढली. हे भयानक दृश्य तिच्या पतीनं पाहिलं. त्यानं जोरदार प्रतिकार केला. स्वत:कडे असलेली तलवार व पिस्तूलाच्या सहाय्यानं त्यानं आपला जीव वाचवला. त्याच वेळी आणखी तीन जणांचा एक घोळका जत्रेतून परत येत होता. त्यामुळं बीनच्या टोळक्याला त्या महिलेच्या पतीचा पाठलाग सोडून द्यावा लागला.
दरम्यान, आपला जीव वाचवून पळून जाण्यात यशस्वी झालेला व्यक्ती ग्लासग्लोला गेला. राजा जेम्स पाचवा याला त्यानं बीन टोळक्याबद्दल माहिती दिली आणि त्यांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली. असं म्हटलं जातं की, त्यावेळी राजाने स्वत: ४०० जणांच्या तुकडीचं नेतृत्व केलं आणि बीनचा शोध घेतला.
जेव्हा राजा आणि त्याची तुकडी बेनॉन गुहेत पोहचली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. गुहेमध्ये शेकडो सांगाडे, काही मृतदेह आणि लुटलेल्या संपत्तीचा ठीग साचलेला होता.
त्यानंतर बीन कुटुंबाला अटक करून ‘लेईथ’ला नेण्यात आलं. तिथे त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, स्वॅनी बीनच्या हिंसाचारामुळे लोकांच्या मनात प्रचंड भीती आणि राग निर्माण झालेला होता. त्यांनी फाशीच्या शिक्षेपेक्षा जास्त भयानक मृत्यू देण्याची विनंती राजाला केली. त्याप्रमाणं कुटुंबातील २१ महिलांना जिवंत जाळण्यात आलं तर पुरुषांचे तुकडे करण्यात आले.
या गोष्टी तसेच स्वॅनी बीन आणि त्याच्या कुटुंबाचं अस्तित्व सिद्ध करणारे काहीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत. बेपत्ता झालेल्या व्यक्ती, व्यवसाय सोडून दिलेले खाणावल मालक आणि खुद्द राजानं नेतृत्व केलेल्या मोहिमेबाबत देखील काहीही पुरावे सापडलेले नाहीत. काही इतिहासतज्ज्ञांच्या मते, ही गोष्ट म्हणजे इंग्लिश लोकांनी स्कॉटीश लोकांना बदनाम करण्यासाठी रचलेला बनाव आहे. इंग्रजी माध्यमांनी १७व्या आणि १८व्या शतकात स्कॉटिश लोकांना क्रूर दावण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण स्कॉट्स ब्रिटिश गादीवरील आपला हक्क परत मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळं स्वॅनी नावाचा हा नरभक्षक खरंच अस्तित्त्वात होता का? हा प्रश्न आजही कायम आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.