आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारताचा ज्ञात इतिहास सुमारे ५ ते ६ हजार वर्षे जुना असून या इतिहासामध्ये साहित्य, कला, संस्कृती, विज्ञान-तंत्रज्ञान आणि तत्वज्ञान इत्यादींचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. ऐतिहासिक भारतात सर्वच बाबतीत भरभराटी होती. ज्ञान, संपत्ती, वास्तुकला या क्षेत्रांमध्ये तर जगभरात भारतीयांचा मोठा वाटा राहिला आहे. भरभराटीच्या याच काळात अनेक वास्तू, विद्यापीठे आणि तपश्चर्या करण्याच्या जागांची निर्मिती करण्यात आली. यांच्यामध्येच एक महत्वाचा प्रकार येतो, तो म्हणजे लेणी.
पर्यटक, इतिहासतज्ज्ञ, विविध विषयांचे अभ्यासक यांचा नेहमीच बोलण्याचा आणि साहित्यातून लिखाण करण्याचा आवडीचा विषय म्हणजे ‘लेण्या’. काही वेळा लेण्यांच्या गुप्त कथांमुळे, त्यांनी प्रवासी, संशोधक आणि इतिहासकारांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतातही अशा अनेक लेण्या आहेत. काही लेण्या तर अजूनही न सापडलेल्या आणि डोंगरांच्या पोटात कुठेतरी लपलेल्या आहेत. अशा अनेक रहस्यमयी लेण्यांपैकी एक म्हणजे बिहार राज्यातील राजगीर मधील ‘सोन भंडार’ लेणी. सोन भंडार लेणी ‘वैबर’ डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या दोन कृत्रिम गुहा आहेत. ही लेणी इसवी सन पूर्व तिसऱ्या किंवा चौथ्या शतकातील आहे.
प्रवेशद्वारावरील एका खडकावर गुप्त साम्राज्यातील भाषेत/अक्षरांमध्ये लिहिलेल्या शिलालेखानुसार, या लेण्या जैन मुनींनी बांधल्या होत्या. म्हणजेच या लेण्या सुमारे इसवी सन पूर्व चौथ्या शतकात बांधल्या गेल्या आहेत. शिवाय, येथे सापडलेल्या भगवान विष्णूच्या एका शिल्पाने जैन धर्माशी त्याचा संबंध निश्चित केला आहे.
प्रवेशद्वारावरील शिलालेखात, “मुनी वैरदेव, आचार्यांमधील रत्न आणि महान तेजाने दोन शुभ लेण्या बनविल्या गेल्या, ज्या संन्यासींना पात्र आहेत आणि ज्यात अर्हतांची प्रतिमा (म्हणजे तीर्थंकर) ठेवण्यात आली आहे.”असा उल्लेख येतो. तथापि ब्रिटीश राजवटीतील, कनिंघम या भारताच्या ब्रिटिश पुरातत्व सर्वेक्षणकर्त्याने या लेण्यांची कसून तपासणी केली आणि सविस्तर ऐतिहासिक संशोधनानंतर त्यांनी या लेण्या बौद्ध धर्माशी संबंधित आहेत असे एका अहवालात नमूद केले.
मग या लेणीबद्दल इतके रहस्यमय आहे तरी काय? याचं उत्तर लेण्यांच्या नावातच आहे. सोन भंडार अर्थात, ‘सोन्याचा साठा!’ या लेणी म्हणजे सोन्याच्या मोठ्या खजिन्याचे गुप्त घर आहे असेही मानले जाते. लेण्यांच्या भिंतीमध्ये मोठ्या प्रमाणात सोने दडलेले असल्याचीही आख्यायिका आहे. गुहेच्या आत खजिन्याकडे घेऊन जाणारा एक रस्ता आहे, परंतु आजवर तो कोणालाही ते सापडला नाही.
तसेच, गुहेच्या एका भिंतीवर तुम्हाला दरवाजासारखी रचना दिसेल आणि त्याच्या पुढे काहीही न वाचता येणारा शिलालेख आहे. हा एक प्रकारचा ‘गुप्त शब्द’ आहे आणि ज्याला तो शब्द वाचता येईल, तो उताऱ्याचा दरवाजा उघडेल. परंतु आजपर्यंत, कोणीही या शिलालेखाचा उलगडा करू शकला नाही.
‘कथितपणे’ लपवलेला खजिना शोधण्याचे अनेक प्रयत्न केले गेले परंतु व्यर्थ. खरं तर, एकदा ब्रिटीश सरकारच्या अधिकाऱ्यांनी गुहेच्या भिंतींना स्फोटके लावून उडवण्याचा प्रयत्न केला पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत. या स्फोटांमुळे लेण्याच्या काही रचनेचे मात्र नुकसान झाले. या सर्व घडामोडींमुळे या लेण्यांभोवतीचे गूढ अधिकच वाढले आहे.
या लेण्यांचे चेंबर्स अतिशय सुंदर रीतीने पॉलिश केलेले आहेत. हे चेम्बर्स या लेण्यांच्या सौंदर्यात आणि वेगळेपणात भर घालतात. लेण्यांमध्ये आणि आजूबाजूला अनेक शिलालेख आहेत. हे शिलालेख या ठिकाणी यात्रेकरूंनी सोडले असावेत असाही एक समज आहे. शिवाय, गुहेचे संपूर्ण बांधकाम मौर्यन रॉक कट स्ट्रक्चर्ससारखे आहे. तसेच भारतातील शेवटच्या काही उपलब्ध रॉक कट लेण्यांमध्ये, सोन भंडार हे एक आहे. तसेच बिहार राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी हे एक महत्वाचे ठिकाण आहे. या लेण्यांशी संबंधित रहस्य उलगडण्यासाठी जगभरातील प्रवासी त्याला भेट देतात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.