आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
अयोध्येतील राम मंदिराच्या जागेचा विवाद भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात एक अतिशय महत्त्वाच्या खटल्यात गणला जाईल यात काही शंकाच नाही.
सर्वप्रथम मंदिर निर्माण कार्यासाठी आणि त्यानंतर देखभालीसाठी ट्रस्ट निर्माण करण्यात आला, श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार या ट्रस्टला राजकीय हस्तक्षेपापासुन दूर ठेवण्याचे सर्व प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरीही मंदिराच्या जागेसाठी लढलेल्या विश्व हिंदू परिषदेने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ट्रस्टमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली होती.
अयोध्या येथील श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची रचना गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या ट्रस्टप्रमाणे असेल असा अंदाज लावण्यात आला होता, ती रचना नेमकी कशी होती याबद्दल आज माहिती घेऊया.
सोमनाथ मंदिर सुरुवातीपासुनच अनेक आक्र*मणांना सामोरे गेले आहे. मंदिरावर पहिले आक्र*मण झाले ते १०२५ साली महमुद गझनीचे.
मंदिराची पुनर्रचना हा मुद्दा बरेचदा गाजला. नंतर या मंदिराच्या जिर्णोध्दार करण्याची घोषणा करण्यात आली तीही ९०० पेक्षा जास्त वर्षांचा काळ उलटून गेल्यावर.
१२ नोव्हेंबर १९४७ रोजी जुनागढ येथील एका सभेत या मंदिराच्या पुनर्रचनेची घोषणा सरदार वल्लभभाई पटेल यांनी केली.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या वेळेत या मंदिराला हिंदू स्वाभिमानाचे बिरुद म्हणून मिरवले गेले. भाजप नेता लालकृष्ण अडवाणी यांनीही आपली रामजन्मभूमी रथयात्रा सुरु केली ती याच सोमनाथ मंदिरापासून.
एका लेखामध्ये त्यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा उल्लेख करताना लिहितात की, दिल्लीला परतल्यावर पटेलांनी गांधीजींचे आशिर्वाद घेतले आणि नेहरूंच्या मदतीने मंदिराच्या नवनिर्मितीचा मुद्दा समोर मांडला.
कॅबिनेटच्या निर्णयानुसार सरकार सगळा खर्च करणार असे ठरवण्यात आले. त्याच संध्याकाळी जेव्हा सरदार पटेल, डॉ. के. एम. मुंशी आणि एन. व्ही. गाडगिळ गांधीजींना या निर्णयाबद्दल सांगण्यास गेले तेव्हा गांधींजींनी या निर्णयाचे स्वागतच केले. त्यांनी यात एक बदल सांगितला: सरकारच्या ऐवजी लोकांच्या आर्थिक मदतीने या मंदिराचे काम करावे.”
अशाप्रकारे गांधीजींच्या सल्ल्यानुसार ट्रस्टची स्थापना करण्यात आली. राजकारणी, लेखक आणि शिक्षणक्षेत्रात मोलाचे योगदान देणारे के. एम. मुंशी यांना या ट्रस्टचे अध्यक्ष बनवण्यात आले.
मुंशींनी लिहिलेल्या ‘सोमनाथा- द इटर्नल श्राईन’ या पुस्तकात सरदार पटेलांनी छापलेली जाहीरात आणि त्याचबरोबर सुरुवातीच्या काही देणग्यांचा उल्लेख केलेला आढळतो.
“नवानगरच्या जाम साहेबांनी नवनिर्माणासाठी एक लाख रुपयांची पहिली देणगी दिली होती, तर जुनागढ संस्थानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या समालदास गांधी यांनी ५१,००० रुपयांची देणगी दिली होती.” असे मुंशींनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे.
परंतु महात्मा गांधींच्या सल्ल्यानंतर सरदार पटेलांनी हे पैसे परत केले आणि तेच पैसे सोमनाथ ट्रस्टला देणगी रुपात देण्याचा सल्ला दिला. १९४९च्या शेवटी पर्यंत ट्रस्टच्या खात्यात २५ लाख रुपये जमा झाले होते. १९५० साली शेवटी ट्रस्टने मंदीराच्या कामास सुरुवात केली. जाम साहेबांच्या हस्ते आधारशिलेचे उद्घाटन करण्यात आले.
२ अभियंते आणि एक वास्तुविशारद अशी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. १९५१ पर्यंत मंदीराचा पाया आणि गर्भगृह बनवून झाले होते.
गाभाऱ्यातील लिंगस्थापनेच्या वेळी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना बोलवण्यात आले होते. या गोष्टीला पंडीत नेहरु यांनी मात्र विरोध केला होता, ही धार्मिक पुनरुज्जीवनाची घटना आहे आणि यात राष्ट्रीय नेतृत्वाने सहभाग घेऊ नये असे त्यांचे मत होते. डॉ. राजेन्द्र प्रसाद यांनी या विरोधाचा विचार न करता लिंगस्थापनेच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
‘द श्री सोमनाथ ट्रस्ट’ हे एक धर्मादाय ट्रस्ट असुन याची स्थापना गुजरात पब्लिक ट्रस्ट कायदा, १९५०च्या अन्वये करण्यात आली आहे.
या ट्रस्टमध्ये ८ सदस्यांचे असणे आवश्यक असले तरीही सध्या ट्रस्टला सातच सदस्य आहेत. गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल याचे अध्यक्ष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, माजी उपपंतप्रधान अडवाणी, गुजरातचे माजी मुख्य सचिव प्रविण लाहेरी हे सगळे या ट्रस्टचे सदस्य आहेत. बाकीचे २ सदस्य म्हणजे कलकत्त्यातील अंबूजा-नियोशिया समुहाचे अध्यक्ष हर्षवर्धन नियोशिया आणि वेरावल येथील संस्कृतचे निवृत्त प्राध्यापक जे. डी. परमार.
या ट्रस्टचे सदस्यपद आजीवन काळासाठी आहे. जे. डी. परमार यांना १९७५ साली सदस्यत्व देण्यात आले तर प्रसन्नावदान मेहता यांच्या मृत्युनंतर २०१६ मध्ये अमित शहा यांना सदस्यत्व देण्यात आले.
राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघेही ४-४ लोकांचे नावं सुचवू शकतात. परंतु ‘ट्रस्टी मंडळ’च भावी सदस्यांची नेमणूक करण्यासाठी संभावित उमेदवारांची यादी बनवत आले आहे. त्यातुनच नविन सदस्याची निवड केली जाते.
२०१९ साली ट्रस्टकडे आलेल्या देणग्या तसेच तेथील ४०० खोल्यांच्या भाड्यातून एकूण ४२ करोड रुपये जमा झाले. २०१७ साली हाच आकडा ३९ करोड होता.
मागच्या २ वर्षात गुजरात सरकारने इथे ३१.४७ करोड रुपये खर्च केला आहे. या खर्चातुन मंदीराच्या आवारात विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न गुजरात सरकारने केला आहे.
या ट्रस्टने आपल्याकडे जमा झालेल्या पैशातून समाजसेवेची कामे केली जातात. गिर सोमनाथ जिल्ह्यातील छोट्या मुलांना अंगणवाडीतून पोषक आहार पोहचवण्याचे कार्य या ट्रस्टद्वारे केले जात आहे.
तसेच बेरोजगार तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येत आहे. मागच्या २ वर्षात १००० लोकांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यातील ७०० जणांना रोजगार मिळवण्यात यश आले आहे.
तसेच ट्रस्टच्या मार्फत दरवर्षी ५ दिवसाच्या कार्तिकी पौर्णिमेच्या मेळ्याचे आयोजन केले जाते. या मेळ्याला ८-९ लाख भक्त दरवर्षी हजेरी लावतात. स्थानिक तुरुंगातील कैदी या मेळ्यात भजे आणि समोसे विकतात असे ट्रस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंग छावडा सांगतात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.