आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्ड इकोनॉमिक्स फ़ोरममध्ये भाषण केले. या दरम्यान ते काही सेकंद बोलता बोलता गप्प झाले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या डाव्या बाजूला दोन तीनवेळा बघितलं. काही सेकंदाच्या मौनानंतर त्यांनी फ़ोरमचे अध्यक्ष क्लॉस श्र्वाब यांना विचारलं की त्यांना मोदींचा आणि त्यांच्या दुभाषाचा आवाज स्पष्ट येतो आहे का? श्र्वाब यांनी होकार दिल्यानंतर मोदींनी त्यांचं भाषण पुढे सुरू केलं. तसं बघायला गेलं तर या घटनेत गदारोळ उठण्यासारखं काहीच नव्हतं. मात्र काही सेकंदाच्या या पॉजनं समाजमाध्यमं चेकाळली आणि मोदींविरूध्द ट्रोलींग चालू झालं. विरोधी पक्ष काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून या पॉजची थट्टा उडवली. हमें तो टेलिप्रॉम्प्टर ने लुटा, अपनों में कहां दम था.
हे ट्रोल करण्याचं कारण होतं, विरोधकांच्या मते मोदी टेलिप्रॉम्प्टरमधे गडबड झाल्यानं गप्प झाले होते. आपल्या वाक्चातुर्यासाठी परिचित मोदींना हे कौशल्य दाखविण्यासाठी टेलिप्रॉम्प्टरची मदत लागते हा या टोमण्यांमागचा अर्थ होता. मात्र नंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फ़ोरमच्या व्हिडिओद्वारे हे स्पष्ट झालं की मागून तांत्रिक चमूपैकी कोणीतरी पंतप्रधान आणि दुभाषी यांचं बोलणं श्र्वाब यांना स्पष्ट ऐकू येत आहे का? याची खातरजमा करावी असं सांगत होतं. हे सगळं स्पष्टीकरण येईपर्यंत जो धुरळा उडायचा तो उडाला होता.
खरंतर टेलिप्रॉम्प्टरचा वापर अगदी सर्रास केला जातो. मग ते दिमाखदार कॉर्पोरेट सोहळे असोत की, फ़िल्मी सोहळे किंवा राजकीय नेत्यांची जाहीर भाषणं. भाषणाच्या संदर्भासाठी समोर टेलिप्रॉम्प्टर सज्ज असतो. अर्थात हे एक यंत्र असल्यानं कधीकधी त्यात काही बिघाड झाला तर खजिल होण्यासारख्या घटना घडतात. अशीच एक घटना आजपासून एक दशक आधी घडली होती.
तत्कालीन विदेशमंत्री एस. एम. कृष्णा यांनी युएनमध्ये अशाच तांत्रिक गोंधळामुळे चक्क पोर्तुगालच्या विदेशमंत्र्यांचं भाषण वाचलं होतं. गंमतीची बाब अशी की कृष्णांचं हे भाषण चुकलं आहे हे तब्बल तीन एक मिनिटांनंतर उपस्थितांच्या लक्षात आलं.
हा किस्सा घडला असा होता की, भारताच्या वतीनं कृष्णा भाषणासाठी उभे राहिले आणि त्यांनी बोलायला सुरवात केली, माननीय महासचिवजी, माझ्या प्रिय मित्रांनो आणि विविध देशांतून उपस्थित प्रतिनिधी, सर्वांत आधी मी सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष या नात्यानं ब्राझिलचे नेता अटारियो पेट्रो यांचं अभिनंदन करू इच्छितो. आज या परिषदेत पोर्तुगाली बोलणारे दोन देश, ब्राझिल आणि पोर्तुगाल उपस्थित आहेत. आज मी खुप खुश असून मला माझा आनंद व्यक्त करण्याची अनुमती दिली जावी.
इथवर सगळेजण शांतपणे ऐकत होते मात्र नंतर उपस्थितात चुळबुळ सुरू झाली. याचं कारण म्हणजे, कृष्णा यांच्या आधी पोर्तुगालचे विदेशमंत्री यांचं भाषण झालं होतं आणि त्यांच्या भाषणाच्या इंग्रजीतल्या प्रती उपस्थितांना देण्यात आल्या होत्या.
साधारण तीन-एक मिनिटांनी लक्षात आलं की भारताचे विदेशमंत्री चक्क याआधी झालेलं पोर्तुगाली भाषण वाचत आहेत. संयुक्त राष्ट्रातील भारतीय दूत हरदीप सिंह यांच्या लक्षात ही गडबड आली आणि त्यांनी मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिलं की ते भारताचं भाषण वाचत नसून पुन्हा पोर्तुगालचंच भाषण वाचत आहेत.
त्यावेळी समाजमाध्यमांवर सामान्य जनता आजच्या इतकी सक्रीय नव्हती आणि आजच्यासारखी ताबडतोब ट्रोल करण्याची पध्दत नव्हती मात्र देशभरातून विदेशमंत्र्यांच्या या चुकीबाबत नाराजी व्यक्त होऊ लागली. माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरताना म्हटलं की, एका महत्वाच्या पदावरची व्यक्ती जेव्हा अशा एखाद्या आंतरराराष्ट्रीय संघटनेसमोर देशाचं प्रतिनिधीत्व करत असते, मत मांडत असते तेव्हा पूर्ण तयारिनिशी जाणं अपेक्षित आहे, कारण ही घटना केवळ मंत्रीमहोदयांसाठी नसून देशासाठी लाजिरवाणी आहे. त्यानंतर कृष्णा यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना अशी सारवासारव केली की, तिथे उपस्थित सर्व प्रतिनिधींच्या भाषणांची सुरवात एकसारखीच असल्यानं नजरचुकीमुळे हे घडलं आहे.
त्यांच्या या स्पष्टीकरणावर त्यांना असं विचारण्यात आलं की, समजा तुमच्यासमोर पोर्तुगालच्या मंत्र्यांऐवजी पाकिस्तानी मंत्र्यांच्या भाषणाची प्रत असती तर तुम्ही नजरचुकीनं काय काय बोलून बसला असता? जे देशविरोधी असतं?
सामान्यांनाही माहित असतं की अशी भाषणं लिहून दिलेली असतात आणि ती फ़क्त वाचायची असतात, मात्र सामान्य जनतेची इतकीच अपेक्षा असते की हे वाचन करताना किमान थोडी पूर्व तयारी मंत्र्यांनी करायला हवी, अन्यथा अशा लाजिरवाण्य़ा घटना घडतात. अर्थात अशा घटना घडल्या की काही काळ धुरळा उडतो आणि मग खाली बसतो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.