आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब
सोमवार म्हटलं की आपल्या चेहऱ्यावरील रंग उडतो. आपण नाईलाजाने उठतो आणि तयारी करून कामाला जातो. यानंतर संपूर्ण आठवडाभर आपण फक्त एका दिवसाची आतुरतेने वाट पाहत राबतो, तो दिवस म्हणजे रविवार!
रविवारचा दिवस हा चाकरमान्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सुट्टीचा दिवस, आरामाचा दिवस. या दिवशी आपल्याला परिवारासोबत आपला मौल्यवान वेळ खर्च करता येतो, कामाव्यतिरिक्त असलेले इतर छंद जपता येतात. या दिवशी ना बॉसचे तोंड पहायचे असते, ना ऑफिसचे पेंडिंग काम संपवायचे असते. रविवार हा सर्वार्थाने आपला असतो.
पण तुम्हाला माहिती आहे का आपल्याला ही रविवारची सुट्टी एका मराठी माणसामुळे मिळाली आहे? होय, रविवारची सुट्टी मिळवून देण्यात नारायण मेघाजी लोखंडे या माणसाचे सर्वात मोठे योगदान आहे. या माणसाने ही सुट्टी मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष केला होता.
भारतात पूर्वीच्या काळी सुट्टीची प्रथा नव्हती कारण भारताची अर्थव्यवस्था त्याकाळी कृषि आणि व्यापारावर अवलंबून होती आणि याला बंद ठेवण्याचा काही प्रश्नच येत नव्हता. शेतात आणि व्यापाऱ्यांसाठी काम करणाऱ्या मजुरांना त्याकाळी त्यांच्या आवश्यकतेनुसार आरामासाठी वेळ मिळत होता.
पण भारतावर इंग्रजांचे राज्य आले. इंग्रजांना त्यांच्यासाठी काम करणाऱ्या मजुरांची गरज भासू लागली. ब्रिटिशांनी देशभरात मजुरांचा शोध घेण्यास सुरुवात केली. अनेक गरीब मजुरांना इंग्रजांनी कामावर ठेवले. आपल्या मर्जीने काम करणाऱ्या मजुराला आता इंग्रजांच्या उपकारावर काम करावे लागत होते.
मजूर संपूर्ण आठवडाभर काम करायचे. त्यांचे काम दोन शिफ्टमध्ये चालायचे. सकाळचे, आपली शिफ्ट संपवून रात्री घरी यायचे तर, रात्रीचे आपली शिफ्ट संपवून सकाळी यायचे. या कामाच्या वेळांमध्ये त्या मजूरांना आपले जेवायलाआणि शौचासाठी ठराविक वेळ दिला जात होता. भारतावर इंग्रजांचे शासन असल्यामुळे सर्वांसाठी हा नियम करण्यात आला होता.
पण ज्या इंग्रज अधिकाऱ्यांवर या मजूरांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती, ते मात्र त्यांच्या सोयीने सुट्टी घेऊ शकत होते. बहुतांश इंग्रज अधिकारी हे ख्रिश्चन होते.
रविवारीच्या प्रेयरसाठी ते चर्चमध्ये एकत्र यायचे, इथेच एकमेकांशी चर्चा करण्यात त्यांचा बहुतांश वेळ जायचा. यामुळे इंग्रज अधिकारी शक्यतो रविवारी सुट्टी घ्यायचे पण भारतीय मजूरांना मात्र सदैव काम करावे लागत होते.
भारतीय मजूरांना सुट्टी न घेता काम करावे लागत असल्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या व्याधींनी ग्रासले होते. महिलांची आणि त्यातल्या त्यात गर्भवती महिलांची परिस्थिती त्याहून वाईट होती. जर एखादा मजूर थकून काम थांबवत असेल तर त्याच्या सोबतच्या मजूरांना अजून जास्त कष्ट उपसावे लागत होते. काम थांबवायचं नाही एवढं एकच त्या गोऱ्यांच्या डोक्यात असायचं आणि परिणामी मजुरांना राबवणंही थांबवायचं नाही.
भारतात ज्यावेळी मजूरांवर होणाऱ्या अत्याचारांनी परिसीमा गाठली होती, त्यावेळी सासवडजवळच्या कान्हेसर येथे एका गरीब कुटुंबात नारायण मेघाजी लोखंडे यांचा जन्म झाला. त्यांच्या घरची परिस्थिती बेताची असली तरी त्यांच्या घरच्यांनी त्याकाळी त्यांना मेट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण करू दिले.
पुढे त्यांनी रेल्वे पोस्ट विभागात काम करण्यास सुरुवात केली. इंग्रजांकडे चाकरी करत असताना त्यांना कधीच एक दिवस सुद्धा आराम करायला आणि परिवारासोबत घालवण्यासाठी वेळच मिळत नव्हता. ते सतत काम करत होते. दरम्यानच्या काळात त्यांना बॉम्बे टेक्सटाईल मिलमध्ये स्टोर कीपर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. इथे काम करत असताना त्यांना मजूरांच्या दुरावस्थेची जाणीव झाली.
आपले घरदार सोडून मजूरवर्ग दिवसरात्र काम करतो आहे, त्यांना आरामाला वेळ मिळत नाही यामुळे त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो, याची त्यांना जाणीव झाली. स्वत: सरकार दरबारी नोकरी करत असल्यामुळे मजूरांच्या हिताची मागणी सरळपद्धतीने सरकारपर्यंत पोहचवणे, अवघड आहे, हे लोखंडे यांना लक्षात आले.
महात्मा जोतीराव फुले यांचे सहकारी, कृष्णराव भालेकर, यांनी सुरु केलेल्या ‘दीनबंधू’ या वृत्रपत्राचे नारायण मेघाजी लोखंडे पहिले संपादक बनले. या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी मजूरांच्या दुरावस्थेला वाचा फोडली.
त्यांच्या वृत्तपत्रातील लेखांनी अनेक क्रांतिकारी आणि मजूर प्रेरित झाले. १८८४ साली बॉम्बे हॅन्ड्स असोसिएशनची स्थापना केली. या असोसिएशनच्या माध्यमातून १८८१ साली त्यांनी इंग्रजांकडे पहिल्यांदा कारखाना अधिनियमात बदल घडवण्याची मागणी केली पण, इंग्रजांनी त्यांची मागणी फेटाळून लावली. त्याविरोधात लोखंडे यांनी देशभरात श्रमिक सभांचे आयोजन केले. यात त्यांनी रविवारच्या सुट्टीची मागणी केली. इतकेच नाहीतर जेवणाची सुट्टी आणि कामाची निश्चित वेळ ठरवण्याची मागणी देखील त्यांनी केली.
त्यांनी कामगाराला एखाद्या दुर्घटनेमुळे इजा झाल्यास त्यांना सवेतन सुट्टी देण्याची मागणी मान्य केली, जर एखादा कामगार कामावर असताना मृत्युमुखी पडला तर त्याच्या परिवाराला निर्वाह भत्ता देण्याची मागणी देखील त्यांनी केली.
लोखंडे यांच्या मागणी प्रस्तावावर ५५०० कामगारांनी स्वाक्षरी केली. ज्यावेळी हे मागण्यांचे पत्र फॅक्टरी कमिशनकडे गेले तेव्हा मिल चालकांनी याला विरोध करण्यास सुरवात केली. त्यांनी मजुरांची अधिकच पिळवणूक करण्यास सुरुवात केली. लहान मुलांनासुद्धा कामाला जुंपले. जेव्हा लोखंडे यांच्या प्रस्तवाला सरकारने खारीज केले, त्यावेळी त्यांनी देशभरात मोठे आंदोलन छेडले. या आंदोलनात अनेक मिल मजुरांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात सभा घेतल्या.
त्यांनी १८९० साली मुंबईच्या रेसकोर्स मैदानावर घेतलेल्या सभेला तब्बल १० हजार मजूर उपस्थित होते. या सभेनंतर मजुरांनी मिलमध्ये काम करण्यास नकार दिला. या आंदोलनाने देशव्यापी संपाचे रूप धारण केले.
मुंबईसमवेत सुरत, अहमदाबाद, सोलापूर, नागपूर येथील अनेक कारखाने बंद करण्यात आले. यामुळे मिल व कारखाना मालकांचे नुकसान होऊ लागले. अखेरीस सरकारने यावेळी सामंजस्याची भूमिका घेऊन एका श्रमिक आयोगाचे गठन केले. त्याचे नारायण लोखंडे सदस्य होते.
अखेरीस त्यांच्या मागणीला मान्यता मिळाली आणि १० जून १८९० भारतातील मजूरांना रविवारची पहिली सुट्टी मिळाली. सुरुवातीच्या काळात फक्त मजूरांना देण्यात येणाऱ्या या सुट्टीने मग प्रशासन आणि शिक्षण क्षेत्रात देखील विस्तार केला आणि रविवार हा सुट्टीचा वार हे निश्चित करण्यात आले. १९४७ साली ब्रिटिशांनी भारत सोडला पण रविवारची सुट्टी कायम राहिली. आता जगभरात रविवाराबरोबर शनिवारी सुट्टी देण्यात येते, त्यामुळे भारतात देखील शनिवारी सुट्टी मिळण्यास सुरुवात झाली आहे.
नारायण मेघाजी लोखंडे यांचे कार्य फक्त त्यांनी रविवारची सुट्टी मिळवून दिली म्हणून मोठे ठरत नाही, पण त्यांनी एकट्याने मोठ्या प्रमाणात महिला आणि कामगारांना एकत्र आणून एक यशस्वी आंदोलन उभारले म्हणून मोठे ठरते.
आज जेव्हा आपण रविवारची सुट्टी साजरी करतोय तेव्हा आपल्याला नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संघर्षाची जाणीव तरी आहे का ?
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.