आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
स्त्री शक्तीचा जागर करण्याचा सण म्हणजेच नवरात्र ! भिन्न भिन्न संस्कृती असलेल्या आपल्या देशात नवरात्र देखील विविधांगी पद्धतीनं साजरं केलं जातं. कुठे दांडियावर ठेका धरला जातो, तर कुठे देवीचा गोंधळ घातला जातो. मात्र दक्षिण भारतात नवरात्रीच्या या नऊ दिवसांत ‘गोलू’ हा सण साजरा केला जातो. गोलू म्हणजे बाहुल्या. माती किंवा लाकडापासून देवी-देवता, संतांची प्रतिकृती तयार केली जाते. नवरात्रीत या बाहुल्या सजवून देवी-देवतांचा जीवन काळ मांडण्यात येतो.
कलाकुसर व अत्यंत आकर्षक सजावट करून या बाहुल्यांची आरास केली जाते. रामायण, महाभारतातील ऐतिहासिक घटना, रथयात्रा, लोकजीवन या बाहुल्यांच्या माध्यमातून दर्शवलं जातं.
दक्षिण भारतात आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, कर्नाटकात हा सण साजरा केला जातो. या सणाला कन्नडमध्ये गोलू, काही ठिकाणी कोलू, तर तेलुगूत बोम्मई गोलू असं देखील संबोधलं जातं, बोम्मई म्हणजे बाहुल्या आणि गोलू म्हणजे प्रदर्शन असा या शब्दांचा अर्थ होतो.
स्वत:च्या कौशल्यानुसार आपापल्या घरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बाहुल्या म्हणजेच ‘गोलू’ उभारण्यात येतात. या बाहुल्यांची आरास एका विशिष्ट पद्धतीनं करण्यात येते. बाहुल्यांच्या संख्येनुसार १ ते ११ यामधील विषम संख्येच्या पायऱ्या तयार करण्यात येतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांचं प्रतिक म्हणून नऊ पायऱ्या तयार करण्याची पद्धत जास्त प्रचलित आहे. या पायऱ्या सजवून त्यावर बाहुल्यांची आरास केली जाते. या आरासातील पहिल्या पायरीवर आंब्याच्या पानांनी सजवलेला कलश मांडण्यात येतो. त्याच्या बाजुला देवी-देवतांच्या मूर्त्या ठेवण्यात येतात. ‘चेट्टीयार बोम्मई’ ही यातली महत्त्वाची बाहुली मानली जाते. यात जीवनावश्यक गोष्टींशी निगडीत दुकानांच्या बाहुल्या मांडण्यात येतात. गोलूच्या समोर रांगोळी रेखाटली जाते.
नवरात्रीत घरोघरी या आरासापुढे श्लोकांचं, भक्तीगीतांचं पठण, मंत्रोच्चारात पूजा केली जाते. हळदीकुंकवाचा कार्यक्रम देखील आयोजिला जातो. यावेळी ‘सुदंल’ हा खास प्रसाद वाटण्यात येतो. सहसा नवरात्रीत बनवला जाणारा प्रसाद हा गोड असतो. मात्र, ‘सुंदल’ या पदार्थाची चव चटपटीत असते. काबुली चणा, मटार, मुगाच्या डाळीपासून हा प्रसाद बनवण्यात येतो. या प्रसादात खोबरं आणि कढीपत्ता आवर्जून घातला जातो. खोबरं आणि कढीपत्ता अतिशय शुभ मानलं जातं.
तामिळ कुटुंबांमध्ये नवमीला अनन्य साधारण महत्व असतं. यादिवशी विद्येची देवता सरस्वतीची आराधना केली जाते. यादिवशी घरातली बच्चे कंपनी खूप खुष असते. कारण त्यांना यादिवशी अभ्यास करावा लागत नाही. घरातल्या सर्व पुस्तकांची आरास करुन त्यांच्या रूपात देवी सरस्वतीची स्थापना केली जाते. विजयादशमीच्या दिवशी आयुध पूजन करुन सरस्वती पूजनाची सांगता केली जाते. यावेळी पूजेत ठेवलेल्या पुस्तकांचा मजकूर वाचण्याची प्रथा आहे. पायसम म्हणजेच खीर आणि सुंदल असा प्रसाद यावेळी करण्यात येतो.
विजयादशमीच्या दिवशी या आरासातील एक बाहुली प्रतिकात्मक पद्धतीनं झोपवली जाते. त्यानंतर कलश उत्तर दिशेला हलवून प्रार्थनेअंती या सणाची सांगता केली जाते. विशेष म्हणजे गणपती किंवा देवींच्या मूर्तींप्रमाणे या बाहुल्यांचं विसर्जन केलं जात नाही. या बाहुल्यांना नीट सांभाळून ठेवून पुढच्या वर्षी परत त्यांची आरास केली जाते. यामध्ये दरवर्षी नव्या बाहुल्यांची भर पडत जाते.
विजयादशमीपर्यंत देवी देवतांच्या मूर्त्यांच्या रुपानं दैवी शक्ती घरात वास करत असल्याचा समज आहे. त्यामुळे घरात चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते. या बाहुल्यांचं शेतीशी देखील एक अनोखं नातं आहे. शेतात पेरणी करण्याआधी नांगरणी केली जाते. यातून निघालेल्या मातीतून या गोलू बाहुल्या बनवण्यात येतात. मूर्तीकारांना यातून रोजगार उपलब्ध व्हावा, हाही या सणाचा एक उद्देश असतो.
गोलू या सणाशी निगडित अनेक आख्यायिका आहेत. एक आख्यायिका प्रसिद्ध आहे ती अशी, माता दुर्गेला महिषासुराचा वध करायचा होता. मात्र, त्यासाठी लागणारं सामर्थ्य दुर्गेच्या ठायी नव्हतं. ते सामर्थ्य इतर देवी-देवतांनी देण्याची विनवणी दुर्गेनं केली. या देवतांकडून मिळालेल्या सामर्थ्याचं प्रतिक म्हणजेच गोलू.
या सणाला सामाजिक उद्धाराची देखील किनार आहे. पूर्वीच्या काळी चुल आणि मुल या दोनच भूमिकेत स्त्रिया गुंतून असायच्या. त्यांचा सामाजिक सहभाग फार कमी होता. हा सहभाग वाढावा, भेटीगाठी, विचारांचं आदानप्रदान व्हावं यासाठी देखील हा सण साजरा केला जायचा.
दक्षिण भारतातील द्रविड शैलीनं बांधलेली सुबक मंदिर डोळ्यांची पारणं फेडतात. ही मंदिर पाहिली की दक्षिण भारतीय संस्कृतीच्या श्रीमंतीची प्रचिती येते. याच संस्कृतीचा गोलू सण अविभाज्य भाग आहे. द्रविड संस्कृतीची जडणघडण, सण-उत्सव, कला इत्यादी बाबी उलगडण्याचा प्रयत्न केल्यास नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. पारंपारिक चालरीतींचं आजही दक्षिण भारतीय समाज जतन करतोय.
बाहुल्यांचा उत्सव आपल्या महाराष्ट्रातही साजरा केला जातो. गोलू सणाशी साधर्म्य असलेला ‘भुलाबाई’ उत्सव महाराष्ट्रातील विदर्भ, खानदेशात साजरा केला जातो. दसऱ्यापासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत भुलाबाई बसवण्याची प्रथा आजही ग्रामीण भागात आहे.
या उत्सवात गायल्या जाणाऱ्या भुलाबाईंच्या गाण्यांमधून लोकजीवन, पूर्वीच्या काळातील सासरपण, माहेरपण ऐकायला मिळतं. मात्र, काळाच्या ओघात भुलाबाई उत्सवाची भूल पडलेली दिसते. दक्षिणेतील गोलू असो अथवा मध्य भारतातील भुलाबाई या ऐतिहासिक परंपराचं जतन करणं सध्या काळाची गरज आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.