आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारतावर झालेल्या परकीय आक्रमणांचा इतिहास मोठा आहे. इसवी सन पूर्व ३०० आणि इसवी सन १ नंतर साधारणपणे हूण, शक, कुशाण, अरब इत्यादी टोळ्यांनी या भूमीवर आक्रमणे करण्यास सुरुवात केली होती. याचा परिणाम म्हणजे १९ व्या शतकातील भारत अनेक वंशानी गजबजून गेलेल्या लोकांचा समुदाय बनला. आजही भारताची ती ओळख कायम आहे.
बाहेरून आलेले लोक म्हणजे साधरणपणे आपल्याला परकीय आक्रमण करणारे गझनी, बाबर सारखे घुसखोर आणि इराण मधून स्वत:चा जीव वाचवून भारताच्या किनाऱ्याला लागलेले पारसी लोक इतकीच माहिती असते.
पण यांच्या व्यतिरिक्तसुद्धा भारतात अशा अनेक इतर जमाती आहेत ज्या अनेक शतकांपूर्वी युद्धकाळात स्वत:च्या देशातून विस्थापित होऊन आपल्या देशात राहायला आल्या. त्यातली एक जमात म्हणजे भारतात राहणारी आफ्रिकन वंशाची जमात.
तुम्ही म्हणाल आफ्रिकन वंश भारतात कुठून राहायला आला? भारतात फार तर शिक्षण घ्यायला आफ्रिकेतून विद्यार्थी येत राहतात. त्यांच्याबद्दल चा आपला दृष्टीकोन साधारणपणे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असाच असतो.
२०१६ च्या सुमारास भारतात शिकायला आलेल्या आफ्रिकन वंशांच्या विद्यार्थ्यांवर देशभरात हल्ले झाल्याच्या घटना घडल्या होत्या. याबाबत भारत सरकार आणि पोलीस यंत्रणेने गुन्हेगारांना ताब्यात घेतले. तसेच भारतातील असोसिएशन ऑफ आफ्रिकन स्टुडंट इन इंडिया बरोबर चर्चा करून त्यांना सुरक्षेचे आश्वासन ही दिले होते.
हे हल्ले का घडले किंवा का घडतात याचं ठोस उत्तर अजून तरी सापडलेले नाही मात्र आफ्रिकन लोकांची प्रतिमा सध्या ड्रगच्या विळख्यात सापडलेला देश अशी आहे त्यामुळे साधारणपणे अशा लोकांकडे संशयाने पहिले जाते.
जर तुम्ही कधी मुरुड जंजिराच्या बाजूला फिरायला गेलात तर गाव सोडून जिथे जंगलाचा प्रदेश लागतो तिथे तुम्हाला काही लोक वस्ती करून राहत असलेले आढळतील. त्यांच्याकडे पाहिलं तर तुम्हाला असं वाटेल आफ्रिकन लोक आपल्या भारतात, महाराष्ट्रात कसे राहतात?
कारण हे लोक आपल्यासारखी मराठी बोलतात, त्यांच्या बायका आपल्यासारख्या साड्या नेसतात, त्यांची मुले सुद्धा मराठी बोलतात पण दिसायला मात्र हे लोक आफ्रिकेतील वाटावे असे आहेत.
महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात राज्याच्या सीमेवरील जी जंगले आहेत अशा सीमावर्ती भागात हे लोक राहतात.
आजपर्यंत म. गांधी हे दक्षिण आफ्रिकेत जाऊन वकिलीची पदवी घेवून आले इतकाच उल्लेख दक्षिण आफ्रिकेचा आपल्याकडे केला जातो. मात्र भारतीय आणि आफ्रिकन संस्कृतीची गाठ फार जुनी आहे हे या आपल्या देशात दुर्लक्षित राहणाऱ्या आफ्रिकन वंशांच्या लोकांकडे पाहून समजते.
यामागचा इतिहास मोठा रंजक आहे.
पूर्व आफ्रिकेतील मूळ बांटू नावाची जी जमात आहे त्या जमातीचे हे लोक आहेत. यांना सिद्धी असे म्हटले जाते. आता हे लोक भारतात कधी आले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याची सुरुवात झाली साधारणपणे ७ व्या शतकात.
भारतावर आक्रमण केलेल्या अरब लोकांनी स्वत:च्या सेवेत गुलाम म्हणून या आफ्रिका खंडातील लोकांना आपल्याबरोबर भारतात आणले. ही प्रथा पुढे इंग्रज आणि पोर्तुगीज लोकांनी सुद्धा चालू ठेवली. बाकीचे लोक जे आपल्या मर्जीने आले त्यात व्यापारी, प्रवासी, फिरस्ती, सैनिक अशा लोकांचा समावेश होता.
मुरुडचा इतिहासप्रसिद्ध जो जंजिरा किल्ला आहे तो याच सिद्धी जमातीच्या मलिक अंबरने बांधलेला होता.
मलिक अंबरला त्याच्या आई-वडिलांनी त्याला अरबांना विकल्यानंतर तो लहानपणीच भारतात आला. इथे त्याने आपल्यासारखे गुलाम म्हणून विकले गेलेले लोक गोळा केले. जवळपास १३०० सशस्त्र हबशी लोकांची फौज मलिक अंबरने उभा केली होती जी युद्धात अजिंक्य होती. याच मलिक अंबरने पुढे अहमदनगरच्या सुलतानकडे चाकरी पत्करली आणि त्याच्याकडून युद्धे लढायला सुरुवात केली.
जंजिरासारखा अभेद्य किल्ला बांधून तिथे स्वत:च्या सिद्धी जमातीच्या लोकांसाठी राहण्यासाठी अनुकूल वातावरण बनवले. हा जंजिरा इतिहासातील अत्यंत अभेद्य आणि जिंकण्यास दुर्गम किल्ला मानला जातो. मात्र मलिक अंबर सारखा अपवाद सोडला तर बाकी अनेक सिद्धी लोक तेव्हा गुलामगिरीमध्येच होते.
१८व्या आणि १९व्या शतकात गुलामगिरीची प्रथा मोडीत निघाली. तेव्हा भारतातील आफ्रिकन लोक ज्यांना शक्य होतं ते आपल्या देशात परत गेले. परंतु बाकीचे लोक मात्र आपल्याला इथले लोक आता मारून टाकतील या जीवाच्या भीतीने जंगलात पळाले, तिथे वस्ती करून राहिले.
आज भारतीय रितीरिवाज पाळणारे जे आफ्रिकन लोक दिसतात ते हेच सिद्धी किंवा हबशी लोक.
आज भारतात राहणाऱ्या सिद्धी लोकांपैकी बहुसंख्य लोकांनी इस्लाम स्वीकारला आहे. उरलेले लोक ख्रिश्चन झालेले आहेत. पण आज या लोकांनी पूर्णपणे आपली भारतीय संस्कृती स्वीकारली आहे, भाषा, चालीरीती इतकेच काय पण भारतीय साडी नेसण्याची परंपरा देखील या जमातीच्या स्त्रियांनी स्वीकारली आहे.
मराठी, कन्नड, गुजराती, कोकणी अशा स्थानिक भाषा सुद्धा त्या त्या राज्याच्या सीमेवर राहणारे हे लोक बोलतात. आफ्रिकन दिसणारी माणसे जेव्हा स्थानिक भाषा बोलायला लागतात किंवा त्यांच्या बायका साडी सारखा भारतीय पेहराव घालून आपल्या समोर येतात तेव्हा आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही.
हे लोक भारतीय लोकांमध्ये फारसे मिसळत नाही, जंगलात, रानात त्यांनी आपली वस्ती केली आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक अशा प्रदेशांच्या सीमेवर नदीच्या, तलावांच्या, ओढ्यांच्या कडेने ते भातशेती करतात. त्यांना भारतीय लोकांमध्ये मिसळण्याची इच्छा नाही असे नाही परंतु बहुदा आपला समाज आजही त्यांना आपला मानत नाही.
त्यांच्याबद्दल आपल्या मनात तशी परकेपणाचीच भावना आहे. याचं कारणासाठी या सिद्धी लोकांमध्ये आपापसात लग्ने लावली जातात कारण आपले लोक त्यांच्याबरोबर रोटी-बेटी व्यवहार करत नाहीत. त्यामुळे आजही या लोकांची चेहरेपट्टी आणि शरीरयष्टी आफ्रिकन वाटते.
एकट्या कर्नाटकात सिद्धी जमातीचे २० हजार लोक आहेत.
त्यांनी कन्नड संस्कृती सुद्धा पूर्णपणे अवलंबिली आहे पण त्यांच्या लहान मुलांना आजही वर्णभेदाला सामोरे जावे लागते. शाळेमधून प्रवेश घेताना, आपल्या भारतीय मुलांबरोबर शिकताना ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते.
या सिद्धी जमातीचे मूळ आफ्रिकन आहे त्यामुळे ते ताकद आणि चपळपणा याच्यामध्ये अव्वल आहेत. इतिहासात हबशी जमात जी मुस्लीम राजांच्या पदरी चाकरी करत होती तिचे वर्णन करताना इतिहासकार सांगतात,
“हबशी जमात मोठी चपळ, लवचिक, ताकदवान मात्र अत्यंत क्रूर आहे.”
आज आंतरराष्ट्रीय पातळीवर टेनिसपटू सेरेना विल्यम्स, व्हीनस विल्यम्स, बास्केटबॉलपटू मायकल जॉर्डन, ब्राझीलचा महान फुटबॉलपटू पेले, जगातील सगळ्यात वेगवान धावपटू उसेन बोल्ट या लोकांकडे पाहिल्यावर आपल्याला त्यांची ताकद, त्यांचा चपळपणा जाणवतो.
मग जेव्हा आपल्या भारतात अशी मुले आहेत तर त्यांना आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये भाग घेण्यासाठी तयार का केले जात नाही असा यक्षप्रश्न आहे. १९८० मध्ये सिद्दी जमातीला भारतामध्ये सामावून घेण्यासाठी सरकारी पातळीवर पहिल्यांदा प्रयत्न झाले होते.
१९८७ साली भारताच्या युवा आणि खेळ खात्याच्या मंत्री मार्गारेट अल्वा यांनी स्पोर्ट्स ऑथॉरीटी ऑफ इंडिया या संस्थेच्या पुढाकाराने या जमातीच्या मुलांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू म्हणून घडवण्यासाठी पहिल्यांदा एक प्रोजेक्ट आणला होता.
या जमातीचे अनेक लोक गरीब आहेत आणि निरक्षर आहेत. स्पोर्ट्स ऑथॉरीटी ऑफ इंडियाच्या पुढाकाराने जी मुले खेळात प्राविण्य दाखवू शकत होती त्यांना पुढे आणण्यासाठी हा प्रकल्प सुरु केला गेला. त्यासाठी सिद्दी जमातीची भारताला ओळख व्हावी म्हणून स्पेशल एरिया गेम प्रोजेक्ट सिद्दी ज्या परिसरात राहत होते तिथे बनवले गेले. पण ६ वर्षानंतर १९९३ साली हा प्रकल्प आपल्या सरकारच्या उदासीनतेमुळे गुंडाळून ठेवला गेला.
एक दिलासादायक बातमी म्हणजे २०१६ साली या प्रकल्पाचे पुन्हा पुनरुज्जीवन झालेले आहे.
कर्नाटककडून खेळणारा १८ वर्षांचा अथलिट रविकिरण फ्रांसिस सिद्धी, १७ वर्षांची अथलिट श्वेता सिद्धी म्हणजे ही या सिद्धी पिढीची नवीन ओळख आहे.
या मुलांना योग्य ती सरकारी मदत आणि प्रशिक्षण मिळून यांचे भारतातर्फे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, भारतीय खेळाडू म्हणून यांचा चेहरा उद्याची ओळख बनावा हीच सदिच्छा!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.