आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
2020 या दुर्दैवी वर्षाचं दुर्दैव सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येने अजून वाढलं. इरफान खानसोबत भारताचं जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करणारा महान अभिनेता आपण गमावला. ऋषी कपूर गेले आणि बदलत्या काळासोबत बदलेला जेष्ठ अभिनेता आणि समाजावर प्रभाव टाकणारं व्यक्तिमत्व आपण गमावलं. कोरोनाच्या महामारीत आपण प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर काहीतरी गमवलंय आणि सामाजिक पातळीवर आपल्या सकारात्मकतेच्या आशा आपण टिकवण्याचा प्रयत्न करतोय.
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची बातमी आली तेव्हा जवळच्या लोकांकडून सोबत असाही मेसेज आला की “तो किती पॉझिटीव्ह होता? तो असं कसं करू शकतो?”
मला वाटतं यावरून हे समजतंय की सुशांत सिनेमात फक्त पात्र साकारणारा उत्तम अभिनेताच नव्हता तर आपल्याला पॉसिटीव्ह वाईब देणारा आपला आभासी मित्रही होता. तो फक्त करोडो रुपये समाजसेवेवर खर्च करणारा बॉलिवूड स्टार नव्हता, पैशांसोबत त्या कामाबद्दलची आस्थाही त्याच्या वागण्यात होती.
Sushant4Education या आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्याने अंतराळात जाण्याची स्वप्न पाहणाऱ्या नव्या पिढीच्या, नव्या भारताच्या स्वप्नांंना पंख देण्याचं काम केलं.
त्याने स्वतः फिजिक्स विषयात ओलिंपीयाड जिंकलंय. प्लॅनिंग कमिशनने महिला उद्योजकतेच्या विकासासाठी राबवलेल्या योजनेचा त्याला ब्रँड अॅम्बेसेडर बनवलं होतं. याबद्दल तो फार बोलला जरी नसला तरीही त्याच्या मुलाखतींतून आणि ट्विटमधून आपल्याला त्याच्या या व्यक्तिमत्वाची कल्पना होती. या कामामागे असणारी अमाप सकारात्मक ऊर्जा अचानक नकारात्मकतेच्या एवढ्या टोकाला कशी गेली हे अजून तरी गूढ आहे. पण त्याच्या जाण्याने आपल्या सकारात्मक आशेचं एक केंद्र हरवलंय हे निश्चितच.
फिजिक्स विषयात रस असणाऱ्या सुशांतने इंजिनियरिंगसाठीच्या जवळपास 10 परिक्षेत यश मिळवलं होतं. बिहारच्या सामान्य कुटुंबात चार बहिणी आणि एक भाऊ त्यांच्या आईच्या निधनानंतर स्वतःला सावरत होते. त्याची बहीण राज्यस्तरीय क्रिकेटर बनली आणि सुशांतला अभिनयाचं वेड लागलं. हे सगळं घडत असताना त्याच्या वडिलांना झालेला आनंद आणि उत्सुकता त्याने कित्येकदा बोलून दाखवली.
इंजिनियरिंग सोडून अभिनयाच्या दुनियेत तो आला आणि पवित्र रिश्ता या मालिकेत मानवची भूमिका करून तो घराघरात पोहोचला. त्याच्या निरागस चेहऱ्यावर उंटणाऱ्या हावभावांनी तो करोडो भारतीयांचा चाहता बनला. टीव्हीच्या जगात एवढं मोठं यश संपादन करून अचानक त्यातून बाहेर पडून सिनेमात शून्यातून विश्व उभारण्याचा त्याचा निर्णय धाडसी होता. हे धाडस कारणी लागलं जेव्हा त्याला 3 महिन्यांतरच काय पो चे या उत्तम सिनेमात मुख्य भूमिका मिळाली.
आतापर्यंत त्याने आईच्या जाण्याचं दुःख, इंजिनियरिंग सोडण्याचं धाडस, टीव्हीच्या जगात मिळालेलं यश सोडून नवं जग निर्माण करण्याचा निर्णय, या सगळ्याच भूमिकांमध्ये त्याने एका योध्याप्रमाणे स्वतःच अतित्व बनवायला लढा दिला. त्यात तो जिंकला. पण यावेळी त्याचा स्वतःसोबत असा काय संघर्ष झाला की त्याला हरावं लागलं?
त्याच्या मृत्यूबद्दलची गूढता संपल्यावर तो कसा माणूस असेल याबद्दल चर्चा, तर्क, अफवा पसरतीलच. त्याचं चरित्र हनन करणारी बातमी समोर प्रशचिन्हाची ढाल वापरून खिसे भरायला वापरली जाईल. त्याआधी त्याच्या चांगलेपणावर श्रद्धा असणाऱ्या लोकांसाठी त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जेवढं त्याच्या तोंडून त्याने जाहीर केलंय ते बघू.
पवित्र रिश्ता मालिकेत सोबत काम केलेल्या अर्चना लोखंडे हिच्यासोबत सुशांत बराच काळ रिलेशनशीपमध्ये होता. त्यांच्या ब्रेकअप नंतर बरीच चर्चा झाली पण त्याने मौन बाळगलं. 4 दिवसांपूर्वी दिशा सलीआन या त्याच्या भूतपूर्व मॅनेजरच्या आत्महत्येची बातमी आली. आता त्या दोघांच्या संबंधाविषयी तर्क मांडले जात असताना सुशांतच्या बहिणीने तो लग्न करणार होता असा खुलासा केला. रिहा चक्रवर्ती सोबत त्याच्या प्रेमसंबंधाविषयी बऱ्याच चर्चा होत आहेत. बहुतेक तिच्याशीच नोव्हेंबरमध्ये त्याचा विवाह होणार असेल.
पण ही सगळी फक्त माहिती झाली, यात त्याच्यासोबत असणाऱ्या लोकांची नावं आहेत. त्याच्या वैयक्तिक मतांचा, जाणिवांचा अभाव या माहितीला गैरलागू ठरवतो. तो म्हणायचा अभिनयाच्या बिझी आयुष्यात लोकांना वेळ देणं नेहमीचं शक्य नसतं. म्हणून प्रेम टिकायला त्यावर अपेक्षांंचं ओझं नसावं आणि आपण समोरच्या माणसाला होईल तेवढं खुश ठेवावं हा हेतू, या दोन गोष्टी स्पष्ट असल्या की नातं टिकतं.
सुशांत मुळातच मितभाषी, त्यामुळं तसा तो फार कोणात मिसळत नव्हता. त्याच्याशी बोलून लोकांना बरं वाटेल अशा गप्पा मारणं त्याला जमत नव्हतं. त्याच्यामते जर दोन व्यक्तीत मतभेद नाही तर संवाद होणारच नाही आणि ज्यांच्यात मतभेद नाही, त्यांना बोलायला शब्दांची गरजच नाही. अगदी हे साधं बोलणं उलगडून सांगायलाही तो अभ्यासपूर्ण मांडणी करायचा. तो म्हणायचा,
भाषा फक्त आपल्याला नेमकं काय बोलायचं आहे हे कन्फर्म करायला आहे, त्याआधीच आपल्याला अंदाज आलेला असतो. किंबहुना प्रकाशाची गती आवाजापेक्षा जास्त असते तर ऐकू येण्यापेक्षा ओठांच्या हालचालीवरून आपण आवाज काय असेल याचा अंदाज बांधतो.
आता आयुष्यातल्या साध्या संवादाला उलगडून सांगायला जो माणूस इतका गहन विचार करतो त्याचं वैयक्तिक आयुष्यही गुंतागुंतीचं असणं सहाजिक आहे. त्याचे असे गुंतागुंतीचे ट्विट्स उलगडून सांगणारा त्याचा एक व्हिडीओ आहे, तो नक्की बघा.
लोकांना भेटण्यापेक्षा फिजिक्सचा अभ्यास, अवांतर वाचन यात स्वतःचा वेळ घालवायला त्याला आवडायचं. अगदी हौशीनर त्याने घरूनच ताऱ्यांचा अभ्यास करायला टेलोस्कोप लावला होता. तत्वज्ञान, विज्ञान आणि आयुष्यात शिकलेल्या गोष्टी बऱ्याचदा फक्त ज्ञानात भर घालतात पण एकटेपणा घालवू शकत नाही, हे सुशांतच्या उदाहरणावरून अजूनच स्पष्ट होतं.
“प्रेम तुम्हाला मानसिक स्थैर्य देतं”, असं जेव्हा तो मुलाखतीत सांगतो तेव्हा ते स्थैर्य नसणंही त्याने अनुभवलंय हे कळतं. आयुष्याचा अर्थ लावताना तो हे ही म्हणतो की, “आपण आयुष्याचा अर्थ जेवढा जास्त लागतो तेवढंच हे कळतं की आपल्याला काहीच कळत नाही”.
नेमकं काय काय कळत नाही हे शोधण्याच्या प्रवासात स्थिरता गमावून बसला असेल का तो?
माहिती नाही पण त्याच्या या मतांवरून एवढंच कळतं की कुकर्माचं पाप केल्याच्या भीतीने त्याने आत्महत्या नक्कीच नसेल केली. किंवा त्याचं कारण जगाला सांगण्याइतपत त्याला ते महत्वाचं वाटलं नसेल. कायदा आणि तत्व असं सांगतं की आत्महत्या पाप आहे. मला वाटतं हे चांगलंच माहिती असणाऱ्या सुशांतकडे पाप करायला काहीतरी पुण्यवान कारण असणार.
ब्योमकेश बक्षी चित्रपटाचा दिग्दर्शक दिवाकर बॅनर्जी म्हणतो की सुशांतच्या शांततेत अहंकार आहे, जो त्याला एक आत्मविश्वासी अभिनेता बनवतो. हा सिनेमा काय पो चे सारखाच थिएटरवर फार काळ टिकला नाही पण आता सुशांत विश्वासपात्र नट झाला होता. राबता आणि शुद्ध देसी रोमान्स या दोन सिनेमात त्याने अभिनेत्यावरून “हिरो” बनण्याचं सुख अनुभवलं आणि वडिलांना खुश केलं असं तो म्हणतो.
पात्रात असणारे गुणदोष त्याला निरागसपणे मांडता आले. PK आणि वरील दोन सिनेमातून नव्या पिढीत एक चांगला रोमँटिक ड्रामा करू शकणारा अभिनेता आपल्याला मिळाला याची खात्री प्रेक्षकांना पटली होती. पण त्याच्या मते त्याच्या कौशल्याची खरी कस एम एस धोनी चित्रपट करताना लागली होती. माहीत नसणारे पात्र रंगवणं वेगळं पण भारतात सगळ्यांनाच माहीत असलेला कॅप्टन कुल साकारणं हे जवळ जवळ धोनीच खेळतोय असं वाटणार पाहिजे होतं आणि तसं ते झालं.
आयुष्यात एक वर्ष इतर काहीही न करता फक्त क्रिकेट ट्रेनिंग, आणि धोनी होण्यासाठी लागणारे सगळे कसब मिळवले.
सिनेमाचा पहिला लूक आला, धोनी बॅट फिरवत ड्रेसिंग रूममधून बाहेर जातानाचा तो शॉट अक्षरशः व्हायरल झाला. लोकांचा कॅप्टन कुल सुशांतने जशास तसा साकारला.
मागच्या वर्षी आलेल्या सगळ्या सिनेमांमधून समीक्षकांना अभिषेक चौबे दिग्दर्शित “सोनचिरिया” सगळ्यात जास्त आवडला. त्यात सुशांतने साकारलेली मुख्य भूमिका अजूनही आश्चर्यचकित करते. एका दुर्दैवी अपघाताने झालेल्या कृत्याची भरपाई स्वतःच्या जीवाने करणारं पात्र शेवटी त्या मुलीला लेमन गोळीच्या रूपानं जगायची आशा देतं तेव्हा सुशांत सिंह राजपूत हा भारतातल्या पहिल्या दहा अभिनेत्यात स्वतःचं स्थान सिद्ध करतो.
यानंतर सुशांत बिहारच्या गावातून आलेला, सिरीयल करणारा तरुण राहिला नव्हता, आता तो स्टार झाला होता.
एकानंतर एक मोठे प्रोजेक्ट्स तो साइन करत गेला. जवळ जवळ 10 सिनेमे त्याने साइन केले होते. आणि या सुपर बिझी भविष्यात लॉकडाऊन आलं. त्या एकांतात त्याला नेमकं काय वाटलं हे माहीत नाही पण त्याने बिझी राहण्याची त्याची आवड सोडून नेहमीसाठी आराम करणं पसंत केलं.
सुशांत आज आपल्यात नाही. त्याच्या मृत्यूने त्याच्या कामाला पूर्णविराम नाही तर अल्पविराम दिलाय हे आपण त्याच्या चांगल्या कार्याला पुढे नेऊन सिद्ध करू शकतो. सुशांतच्या चांगलेपणाचा अंश आपण स्वतःत मुरवू शकतो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.