आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
‘विराट कोहली के साथ शिखर धवन को बिठा दो और फिर तमाशा देखो’, इंडियन क्रिकेट टीमचे माजी कोच असलेले रवी शास्त्री यांनी एकाच वाक्यात आपल्या सर्वात खोडकर विद्यार्थ्यांचं वर्णन केलं होतं. रवी शास्त्रीच्या या दोन लाडक्या विद्यार्थ्यांपैकी एकजण आज ३६ वर्षांचा झाला आहे. क्रिकेट फॅन्सच्या लक्षात आलंच असेल की, मी ‘गब्बर’बद्दल बोलत आहे.
२००४च्या अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेत अक्षरश: खोऱ्यानं धावा जमा केल्यानंतर दिल्लीबॉय शिखर धवन (Shikhar Dhawan) पहिल्यांदा प्रसिद्ध झाला होता. वर्ल्डकपमध्ये त्यानं ३ शतकांसह ५०५ धावा केल्या होत्या. मात्र, त्यावेळी प्रचंड स्पर्धा असल्यानं त्याला टीम इंडियामध्ये जागा मिळाली नाही. त्यासाठी त्याला बरीच वर्षे वाट पहावी लागली.
खेळामध्ये नैसर्गिक आक्रमकता असणारा डावखुरा सलामीवीर, शिखर धवन दीर्घकाळ दिल्लीच्या संघाचा मुख्य आधार राहिला. आपल्या साईड-ऑन स्टान्सचा वापर करून जेव्हा तो ऑफ-साइडवर कट्स आणि ड्राईव्ह मारतो तो नजारा डोळ्यांचं पारणं फेडणारा असतो. बॉल वरच्यावर उचलण्याची एक नैसर्गिक देणगी धवनला लाभलेली आहे. त्यामुळं त्यानं खेळलेला शॉट क्वचितच अपशयी ठरतो. त्याच्या खेळात असलेल्या ताकदीमुळं निवड समितीला त्याची दखल उशिरा का होईना घ्यावीच लागली.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर, २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून पदार्पण करण्याची संधी त्याला मिळाली. मात्र, पहिल्याच वेळी तो शून्यावर बाद झाला. नंतर मात्र, जेव्हा-जेव्हा त्याला बदली खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आलं तेव्हा त्यानं चांगली कामगिरी केली.
मार्च २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध धवनला टेस्ट कॅप देण्यात आली. टेस्ट क्रिकेटमधील त्याची सुरुवात परिकथेप्रमाणं ठरली. आपल्या पहिल्याच सामन्यात त्यानं केवळ ८५ बॉलमध्ये सर्वात वेगवान कसोटी शतक पूर्ण केलं. पहिल्या डावात त्यानं १८७ धावांचा पाऊस पाडला होता. ऑस्ट्रेलियन बोलर्सचा अक्षरश: धुव्वा उडवून त्यांची मजा पाहण्याची संधी धवननं भारतीय ड्रेसिंग रूमला उपलब्ध करून दिली होती.
२०१३ हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात चांगला काळ होता. वन-डेमध्ये त्याने आपला तोड-फोड फॉर्म कायम ठेवला. जून २०१३ मध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ ठरला. दोन शतकांच्या मदतीनं त्यानं केवळ पाच सामन्यांमध्ये 363 धावा केल्या होत्या.
त्याच वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यानं एक शतक आणि दोन अर्धशतकं झळकावली. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतही आपला चांगला खेळ कायम ठेवला आणि कॅलेंडर वर्षात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला.
भारतीय संघासाठी खेळलेले अतुल वासन, मनोज प्रभाकर, आशिष नेहरा, रमन लांबा, अजय शर्मा, आकाश चोप्रा ज्या सॉनेट क्रिकेट क्लबमध्ये तयार झाले त्याच ठिकाणी वयाच्या १२व्या वर्षी शिखर धवन दाखल झाला होता. प्रख्यात प्रशिक्षक तारक सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानं क्रिकेटचे धडे गिरवले होते.
गंमत म्हणजे धवननं विकेट किपर म्हणून आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. मात्र, क्रिकेट क्लबमध्ये दाखल झाल्यानंतर लगेचच त्यानं अंडर-१५ स्कूल टूर्नामेंटमध्येशतक झळकावलं. तेव्हा प्रशिक्षक सिन्हांनी त्याला पूर्णवेळ बॅटिंगवर लक्ष देण्याचा सल्ला दिला. त्यानंतर काय झालं हे आपल्या सर्वांच्या समोर आहे.
भारतीय भूमीवर एखाद्या वादळाप्रमाणं बॅट फिरवणारा धवन परदेशातील खेळपट्ट्यांवर सपशेल अपयशी ठरला. संपूर्ण २०१४ मध्ये तो आउट ऑफ फॉर्म राहिला. त्याच्या खेळावर प्रचंड टीका झाली. अनेकांनी त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्याचं मतही व्यक्त केलं.
अशी प्रतिकूल परिस्थिती असूनही निवड समितीनं त्याच्यावर विश्वास दाखवला आणि २०१५च्या वर्ल्डकपमध्ये त्याला संधी दिली. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध ७२ धावांची खेळी करत त्यानं हा विश्वास सार्थ ठरवला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एमसीजीवर शानदार शतक (१३७) केलं. दक्षिण आफ्रेकेचे फास्ट बोलर्स मॉर्केल आणि स्टेनचा प्रत्येक वार त्यानं परतावून लावत आपल्या संघाला वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला विजय मिळवून दिला. संपूर्ण टूर्नामेंटमध्ये त्यानं ४१२ धावा केल्या. जवळपास प्रत्येक मॅचमध्ये शिखर धवन आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या जोडीनं भक्कम सलामी देण्याचं कर्तव्य पूर्ण केलं होतं.
आतापर्यंत वन-डे, टेस्ट आणि टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये अनेक धडाकेबाज खेळी करून भारतीय संघाला संकटातून बाहेर काढणारा शिखर धवन मैदानाबाहेरही प्रचंड लोकप्रिय आहे. अगदी आपल्या टोपणनावाप्रमाणं, गब्बर लाइफस्टाईल तो जगतो. ५ डिसेंबर १९८५ रोजी, महेंद्र पाल धवन आणि सुनैना धवन या पंजाबी दाम्पत्याच्या घरी शिखरचा जन्म झाला.
सध्या त्याचा समावेश भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये होतो. त्याला बीसीसीआयकडून दरवर्षी ५ कोटी रुपये मिळतात तर आयपीएलमधूनही 5 कोटीच्या आसपास कमाई होते. विविध ब्रँड एंडोर्समेंटमधून त्याची क्रिकेटपेक्षा जास्त कमाई येते. शिखर धवन रिलायन्स जिओ, नेरोलॅक पेंट्स, म्युच्युअल फंड, ड्रीम 11, एरियल सारख्या अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहिरात करतो. याशिवाय त्यानं योगा आणि वेलनेस स्टार्टअपमध्येही पैसे गुंतवलेले आहेत. शिखर धवनकडे एकूण ९५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. दिल्लीत त्याच्या मालकीचं ६ कोटी रुपयांचं आलिशान घर आहे. याशिवाय मुंबई, गुरुग्राम आणि ऑस्ट्रेलियामध्येही त्याची घरं आहेत.
शिखर धवनला टॅटू आणि गाड्यांचं प्रचंड वेड आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या कार कलेक्शनमध्ये BMW M8 Coupe चा समावेश झाला आहे. ही भारतातील सर्वात महागड्या गाड्यांपैकी एक आहे. याशिवाय त्याच्याकडे ऑडी A6, बीएमडब्ल्यू 6 जीटी, रेंज रोव्हर, मर्सिडीजसह अनेक कार आणि बाईक्स आहेत. धवनच्या शरीरावर अनेक टॅटू आहेत. त्याच्या अंगावर एक पानं नसलेला झाडाचा टॅटू आहे तर ट्रायसेप्सवर कार्पेडीयम कोट आहे. वैवाहिक आयुष्याचा विचार केला तर २०१२ मध्ये त्यानं आयशा मुखर्जी या अँग्लो इंडियन बॉक्सरशी लग्न केलं होतं. त्यांना ‘जोरावर’ नावाचा एक मुलगा आहे. काही महिन्यांपूर्वी दोघांनी घटस्फोट घेतला आहे.
सध्या शिखर धवन टीममधून बाहेर आहे. गेल्या महिन्यात युएईमध्ये झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्येही त्याला संधी मिळाली नव्हती. त्यानंतर सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी 20 आणि कसोटी मालिकेतही त्याला स्थान मिळालेलं नाही. सध्या तो टीमसोबत नसला तरी त्यानं आतापर्यंत क्रिकेटमध्ये दिलेलं योगदान विसरता येणार नाही. यापूर्वी देखील त्यानं अनेकदा वाईट फॉर्मवर मात करून टीममध्ये पुनरागमन केलेलं आहे. त्यामुळं भविष्यात जर तो पुन्हा टीममध्ये आला तर नक्कीच त्याच्या चाहत्यांना आश्चर्य वाटणार नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.