आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
यंदाच्या क्रिकेट वर्ल्ड कपचा उत्साह शिगेला पोहोचला असून यावर्षी स्पर्धेचं यजमानपद भारताकडे आहे. मात्र, अगदी काही महिन्यांपूर्वी कोरोना संकटाशी झगडत असणाऱ्या भारतात स्पर्धेचं आयोजन करणं क्रिकेट चाहते आणि खेळाडूंच्या आरोग्याच्या दृष्टीनं धोकादायक होतं. अशा परिस्थितीत संयुक्त अरब अमिराती (युएई) बीसीसीआयच्या मदतीला धावून आलं होतं. त्यावेळी टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धा युएईमध्ये खेळवली गेली. यानिमित्त कित्येक वर्षांनंतर युएईमध्ये मोठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा झाली होती.
संयुक्त अरब अमिरातीतील दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, शेख जायद स्टेडियम अबू धाबी, शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अकॅडमी ग्राउंड या चार ठिकाणी टी ट्वेंटी वर्ल्डकपचा थरार रंगला होता. याच मैदानांवर इंडियन प्रिमियर लीगसुद्धा खेळवले गेले होते. त्यामुळं ही मैदानं भारतीयांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू झालेले आहेत.
कधीकाळी भारतीय क्रिकेटपटूंनी युएईतील मैदानांवर राज्य केलं होतं, विशेषत: शारजाह तर सर्वांचं आवडतं स्टेडियम होतं. नंतर मात्र, अशा काही घडामोडी झाल्या की, शारजाहसह युएईतील सर्व स्टेडियम्सवर क्रिकेट खेळण्यास भारतीयांनी नकार दिला. इतकंच काय आयसीसीनंसुद्धा कित्येक वर्षे याठिकाणी कुठलीही स्पर्धा आयोजित केली नाही. यामागे नेमकं काय कारण होतं?
८० आणि ९० च्या दशकात युएईतील क्रिकेट म्हणजे शारजाहचा थरार असं समीकरण झालं होतं. शारजाहनं क्रिकेटला लोकप्रियतेच्या एका वेगळ्या शिखरावर नेऊन ठेवलं होतं. दुबईपासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर शारजाह क्रिकेट स्टेडियम आहे. ८०च्या दशकात धनाड्य अरब व्यापारी, अब्दुल रहमान बुखातीर यांनी हे स्टेडियम उभारलं आहे. शारजाह अशी जागा आहे जी एकेकाळी जागतिक क्रिकेटमधील सर्वात हॅपनिंग जागा होती.
भारत आणि पाकिस्तानच्या लेखी तर या जागेच एक वेगळंच महत्त्व आहे. दोन्ही देशांच्या दरम्यान कश्मीर मुद्द्यावरून वातावरण तापलेलं असल्यामुळं हे दोन्ही देश क्रिकेटचे सामने खेळण्यासाठी एकमेकांच्या भूमीत पाय ठेवण्यास तयार नव्हते. अशा वेळी शारजाहमधील क्रिकेट स्टेडियम उभय देशांसाठी हक्काची जागा बनली होती.
दरम्यान, बुखातीरनं शारजाहमध्ये चार देशांच्या एकदिवसीय स्पर्धेचे नियोजन केलं आणि ते आयसीसीच्या गळी उतरवलं. त्याची योजना मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली. भारत आणि पाकिस्तानचे तर अनेक संस्मरणीय सामने येथे आयोजित केले गेले. प्रेक्षकांनी खचाखच भरलेली स्टेडियम्स आणि जगभरातील टीव्ही स्क्रीन्सवर चिकटलेले लोक क्रिकेटचा आनंद घेत होते. वर्षभर लोक ही चौरंगी क्रिकेट स्पर्धा (शारजाह कप) भरण्याची वाट पाहू लागले.
एकदिवस क्रिकेट स्पर्धेची वाढती लोकप्रियता पाहून शारजाहसह दुबईतील सट्टा बाजारही चांगलाच तेजीत आला होता. काही सट्टेबाज तर खेळाडूंच्या ड्रेसिंग रूमपर्यंतही जाऊन पोहचले होते! शारजाहमध्ये सट्टेबाजार किती तेजीत होता याबाबत काही माजी भारतीय खेळाडूंनी मुलाखतींमध्ये एक किस्सा सांगितलेला आहे. माजी खेळाडू दिलीप वेंगसरकर यांनी आपल्या एका मुलाखतीत सट्टेबाजीबद्दल माहिती दिली होती.
१९८७ साली जेव्हा भारतीय संघ शारजाहमध्ये खेळत होता, तेव्हा एक माणूस भारतीय ड्रेसिंग रूममध्ये आला. जर भारतीय संघाने शारजाह कप जिंकला तर सर्व भारतीय खेळाडूंना टोयोटा कार देण्याची ऑफर त्या माणसानं आली होती. तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून अंडर*वर्ल्डचा दाऊद इब्राहिम होता. माजी कर्णधार कपिल देव यांनीही देखील या प्रकरणाला दुजोरा दिलेला आहे.
१९८४ ते २००० पर्यंत शारजाह हे अतिशय लोकप्रिय ठिकाण होतं. २९ ऑक्टोबर २००० रोजी भारतानं याठिकाणचा आपला शेवटचा सामना खेळला. श्रीलंकेविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीतील या सामन्यात भारतीय संघ २४५ धावांनी पराभूत झाला होता. त्यानंतर २००० साली जागतिक क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगचा बॉम्बस्फो*ट झाला आणि सर्वांच्या नजरा आपोआप शारजाहच्या मैदानाकडे गेल्या.
फिक्सिंगमध्ये पाकिस्तानचा कर्णधार सलीम मलिकचं नाव आलं. त्याची चौकशी करण्यासाठी जस्टीस कय्युम आयोगाची स्थापना करण्यात आली होती. सलीमने काही सामने गमावण्यासाठी लाच घेतल्याचं या चौकशी आयोगाच्या तपासात आढळलं.
याच आयोगाला दिलेल्या एका निवेदनात पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज सरफराज नवाज यांनी पाकिस्तान क्रिकेटमधील भ्रष्टाचार उघड केला होता. याची सुरुवात १९७९ मधील भारताच्या पाकिस्तान दौऱ्याने झाली होती आणि नंतर त्याचा पसारा शारजाहपर्यंत जाऊन पोहचला.
पाकिस्तानचे माजी कर्णधार अमीर सोहेल यांनी देखील शारजाह मॅच फिक्सिंगचं केंद्र असल्याचं सांगितलं. मॅच फिक्सिंगमध्ये अडकेला सर्वात मोठा मासा म्हणजेच दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिएनेही देखील शारजाहमध्ये मॅच फिक्सिंग केल्याचं कबुल केलं. मॅच फिक्सिंगच्या तपासात ‘पायजे’ नावाचा एक फिक्सरही समोर आला. त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्धचा अंतिम सामना गमावण्यासाठी पाकिस्तानच्या दोन खेळाडूंना एक लाख डॉलर्स दिले होते. एकापाठोपाठ एक बाहेर येणाऱ्या मॅच फिक्सिंगच्या प्रकरणांचा विचार करता भारत सरकारनं २००१ साली भारतीय खेळाडूंना शारजाहमध्ये खेळू न देण्याचा निर्णय घेतला.
मॅच फिक्सिंगच्या प्रकरणांमध्ये नाव आल्यामुळं शारजाह जागतिक स्तरावर बदनाम झालं. युएईतील क्रिकेट साम्राज्याला ग्रहण लागलं. याठिकाणी क्रिकेट खेळण्यास अनेक देश टाळाटाळ करू लागले. यामुळे २००३ ते २०१० या कालावधीत शारजाहमध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना झाला नाही. सात वर्षांच्या खंडानंतर २०१० साली अफगाणिस्ताननं कॅनडाविरुद्ध दोन सामन्यांची वनडे मालिका याठिकाणी खेळली.
२००९ साली जेव्हा लाहोर कसोटीदरम्यान श्रीलंका संघावर ह*ल्ला झाला. त्यानंतर कोणताही संघ पाकिस्तानात येऊन खेळण्यासाठी तयार नव्हता. २०११ साली पाकिस्तानने श्रीलंकेला यूएईमध्ये एक कसोटी मालिका खेळण्यास राजी केलं. पाकिस्तान-श्रीलंका मालिकेतील पहिली कसोटी शारजाह, दुसरी अबू धाबी आणि तिसरी दुबईमध्ये खेळली गेली.
भारतीय खेळाडूंनी २०१४ साली शारजाहच्या मैदानावर पाय ठेवला ते देखील आयपीएलचे सामने खेळण्यासाठी. २०१४ साली भारतात सार्वत्रिक निवडणुका होत्या. त्यामुळं आयपीएल देशाबाहेर खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि शारजाह उत्तम पर्याय म्हणून समोर आलं. त्यावर्षी आयपीएलच्या सुरुवातीचे काही सामने युएईमध्ये खेळवले गेले होते.
मॅच फिक्सिंगच्या प्रकरणानंतर आतापर्यंत पाकिस्तान, अफगानिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंडचे संघ याठिकाणी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट संघासह जागतिक क्रिकेटमधील संघांनी पुन्हा युएई आणि पर्यायानं शारजाहच्या मैदानावर पाय ठेवले आहेत. जवळपास दोन दशकांच्या कालावधीनंतर कोरोनाच्या निमित्त का होईना बीसीसीआयनं आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी युएईची मदत घेतली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.