आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आपल्या देशात क्रिकेट आणि क्रिकेटर्सला सर्वांत जास्त मानसन्मान मिळतो. प्रत्येक क्रिकेटरचे देशभरात कोट्यवधी चाहते आहेत. या क्रिकेटर्सच्या खेळाव्यतिरिक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत देखील त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आकर्षण असतं. तरुणाई तर कपडे आणि फिटनेसच्या बाबतीत या खेळाडूंना फॉलो करतात.
अनेकजण आपल्या आवडत्या खेळाडूसह क्रिकेटमधील इतर अनेक खेळाडूंना सोशल मीडियावर फॉलो करतात. जेणे करून मैदानाव्यतिरिक्त ड्रेसिंग रूममध्ये किंवा खेळाडूंच्या आयुष्यात घडणारे किस्से आपल्याला कळतील. मीडिया आणि सोशल मीडियाचं जाळं मोठ्या प्रमाणात पसरलेलं असूनही ड्रेसिंग रूममधील अशा अनेक गोष्टी असतात, ज्या आपल्या नजरेपासून लपून राहतात. जर खेळाडूंनी एखाद्या सार्वजनिक ठिकाणी त्या गोष्टींचा उल्लेख केला तरच आपल्याला त्या माहिती होतात.
ऐंशीच्या दशकामध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंगरूममध्ये असाच एक किस्सा घडला होता. जेव्हा तो किस्सा बाहेर आला तेव्हा अनेकांच्या आश्चर्य आणि भीती या दोन्ही भावना निर्माण झाल्या. कारण हा किस्सा दोन खेळाडूंमधील नव्हता. यामध्ये भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा प्रत्यक्ष सहभाग होता! दुबईमध्ये घडलेला हा किस्सा जेव्हा सार्वजनिक झाला तेव्हा अनेकांना कपिल देवचं कौतुक वाटलं. नेमका हा किस्सा काय होता आणि दुबईमध्ये तो का घडला हे आपण जाणून घेऊया..
हरियाणातील जाट कुटुंबात जन्मलेले कपिल देव आपल्या अनोख्या गावठी स्टाईलसाठी प्रसिद्ध होते. त्यांचा चेहराच इतका गंभीर दिसे की, नवीन आलेला खेळाडू किंवा त्यांना पहिल्यांदा भेटणाऱ्याची पाचावर धारण बसायची. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतानं १९८३ साली पहिल्यांदा विश्वविजेतेपदाला गवसणी घातली होती. त्यामुळे त्यांची आणि भारतीय संघाच्या लोकप्रियतेमध्ये प्रचंड वाढ झाली होती.
वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतानं अनेक विदेश दौरे केले. विदेश दौऱ्यांवर असताना सहकारी खेळाडू थंड पेयांचा आस्वाद घेत असताना कपिल देव दुधाची ऑर्डर द्यायचे. कपिल देव यांच्या संघात खेळलेले खेळाडू कपिलचे अनेक किस्से सांगतात मात्र, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबतचा दुबईमध्ये घडलेला किस्सा सर्वात लोकप्रिय आहे. हा किस्सा जाणून घेण्याअगोदर दुबईची त्यावेळची पार्श्वभूमी जाणून घेणं गरजेच आहे.
८० आणि ९० च्या दशकात युएईतील क्रिकेट म्हणजे शारजाहचा थरार असं समीकरण झालेलं होतं. शारजाहनं क्रिकेटला लोकप्रियतेच्या एका वेगळ्या शिखरावर नेवून ठेवलं होतं. दुबईपासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर शारजाह क्रिकेट स्टेडियम आहे. ८०च्या दशकात धनाढ्य अरब व्यापारी, अब्दुल रहमान बुखातीर यांनी हे स्टेडियम उभारलं.
दुबई हे असं ठिकाण आहे जे एकेकाळी जागतिक क्रिकेटमधील सर्वात हॅपनिंग जागा होती. भारत आणि पाकिस्तानच्या लेखी तर या जागेच एक वेगळंच महत्त्व आहे. दोन्ही देशांच्या दरम्यान कश्मीर आणि अन्य मुद्द्यांवरून वातावरण तापलेलं असल्यामुळं हे दोन्ही देश क्रिकेटचे सामने खेळण्यासाठी एकमेकांच्या भूमीत पाय ठेवण्यास तयार नव्हते. अशा वेळी दुबईमधील क्रिकेट स्टेडियम उभय देशांसाठी हक्काची जागा बनले होते.
बुखातीरनं शारजाहमध्ये चार देशांच्या एकदिवसीय स्पर्धेचे नियोजन केलं आणि ते आयसीसीच्या गळी उतरवलं. त्याची योजना मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली. प्रेक्षकांनी खचाखच भरलेली स्टेडियम आणि जगभरातील टीव्ही स्क्रीनला चिकटलेले लोक क्रिकेटचा आनंद घ्यायचे. वर्षभर लोक ही चौरंगी क्रिकेट स्पर्धा (शारजाह कप) भरण्याची वाट पाहू लागले.
एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेची वाढती लोकप्रियता पाहून शारजाहसह दुबईतील सट्टा बाजारही गरम झाला होता. काही सट्टेबाज तर खेळाडूंच्या ड्रेसिंग रूमपर्यंतही जाऊन पोहचले होते! शारजाहमध्ये सट्टेबाजार किती तेजीत होता याबाबत काही माजी भारतीय खेळाडूंनी मुलाखतींमध्ये एक किस्सा सांगितलेला आहे.
माजी खेळाडू दिलीप वेंगसरकर यांनी आपल्या एका मुलाखतीत सट्टेबाजीबद्दल माहिती दिली होती. १९८७ मध्ये जेव्हा भारतीय संघ शारजाहमध्ये खेळत होता, तेव्हा एक माणूस भारतीय ड्रेसिंग रूममध्ये आला होता. जर भारतीय संघाने शारजाह कप जिंकला तर सर्व भारतीय खेळाडूंना ‘टोयोटा कार’ देण्याची ऑफर त्या माणसानं आणली होती. तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून अंडरवर्ल्डचा बादशाह दाऊद इब्राहिम होता.
हा किस्सा माजी खेळाडू दिलीप वेंगसरकर आणि कपिल देव दोघांनी मुलाखतींमध्ये सांगितलेला आहे. थोडाफार बदल सोडला तर दोघांनी सांगितलेल्या गोष्टीवरून हे सिद्ध होतं की, भारताच्या ड्रेसिंगरुममध्ये खरचं दाऊद इब्राहिम गेला होता. ही गोष्ट भारत पाकिस्तान सामन्या अगोदरची आहे.
कर्णधार कपिल देव वगळता इतर सर्व खेळाडू आणि सपोर्टिंग स्टाफ ड्रेसिंगरुममध्ये उपस्थित होते. त्यावेळी एक माणूस अचानक ड्रेसिंग-रुममध्ये आला आणि त्यानं खेळाडूंना एक ऑफर दिली. जर भारतीय संघानं पाकिस्तानचा पराभव केला आणि शारजाह कप जिंकला तर संपूर्ण भारतीय संघासह सपोर्टिंग स्टाफच्या दारात टोयोटा कार उभी केली जाईल, अशी ती ऑफर होती.
त्यानंतर सर्व खेळाडू एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले होते. कारण, दिलीप वेंगसरकर वगळता इतर कुणालाही ती व्यक्ती कोण आहे याची कल्पना नव्हती. त्याचवेळी कर्णधार कपिल देव प्रेस कॉन्फरन्स संपवून ड्रेसिंग रूममध्ये आले आणि त्यांनी त्या व्यक्तीला बाहेर काढून दिलं. ही दिलीप वेंगसरकर यांनी सांगितलेली गोष्ट आहे.
हीच गोष्ट कपिल देव यांना देखील एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आली होती. त्यांनी दिलीपच्या गोष्टीला दुजोरा दिला होता. भारतीय संघाच्या ड्रेसिंगरुममध्ये एक व्यक्ती आली होती. त्याला खेळाडूंसोबत चर्चा करायची होती. मात्र, ड्रेसिंगरुममध्ये बाहेरची व्यक्ती काय मीडियालासुद्धा लवकर प्रवेश मिळत नाही. म्हणून मी त्या व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्या व्यक्तीनं देखील माझ्याशी जास्त वाद न घालता बाहेरचा रस्ता धरला. त्यानंतर आम्हाला समजलं ती व्यक्ती एक अंडरवर्ल्ड डॉन होती आणि आम्हाला सामना जिंकण्यासाठी अमिष देण्यासाठी आली होती.
दाऊदनं भारताच्या सामन्यावर मोठा सट्टा लावला होता. आपला पैसा वसूल व्हावा, या हेतूनं त्यानं खेळाडूंना अमिष दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय खेळाडूंनी त्याची ऑफर नाकारली होती, असं कपिल देव यांनी सांगितलं होतं. ही घटना ‘शारजाह ड्रेसिंग रूम कांड’ नावानं प्रसिद्ध आहे. बीसीसीआयचे तत्कालीन सेक्रेटरी असलेल्या जयवंत लेले यांनी देखील आपल्या पुस्तकामध्ये या घटनेचा उल्लेख केलेला आहे.
कपिल देव यांनी ज्या दाऊद इब्राहिमला बाहेर काढलं होत तोच दाऊद पुढे जाऊन १९९३ साली मुंबईमध्ये झालेल्या बॉ*म्बस्फो*टांचा मास्टरमाईंड निघाला. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर आहेत. त्याच्या डोक्यावर २.५ करोड डॉलर्सचं बक्षिस देखील ठेवण्यात आलं आहे. सध्या तो पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असल्याचा भारतीय तपास यंत्रणांना संशय आहे. या अशा धोकादायक व्यक्तीला कपिल देव नावाच्या खमक्या खेळाडूनं एकेकाळी ड्रेसिंग रूमच्या बाहेर काढलं होतं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.