आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारताच्या फाळणीनंतर भारतावरील प्रेमापोटी काही लोक पाकिस्तानातील आपले घरदार सोडून भारतात आले. शाहनवाज खान यांनी भारतावरील प्रेमापोटी आपल्या कुटुंबियांचाही त्याग केला. फाळणीनंतर त्याच्या कुटुंबीयांनी भारतात येण्यास नकार दिला. तरीही ते आपल्या एकाच मुलासोबत भारतात आले. शाहनवाज खान यांचा जन्म फाळणीपूर्व भारतातील रावळपिंडी येथे झाला होता. त्यांचे शिक्षणही तिथेच पूर्ण झाले. नंतर ते ब्रिटीश सैन्यात भरती झाले.
ब्रिटीश सैन्यात त्यांना कॅप्टन पदापर्यंत बढती मिळाली. परंतु दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी ब्रिटीश सैन्यातील कॅप्टन पदाचा राजीनामा दिला.
याच काळात सुभाष बाबूंची “तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा,” ही हाक त्यांच्या कानावर पडली आणि ते सुभाष बाबूंच्या आझाद हिंद सेनेत दाखल झाले. सुभाषबाबूंच्या निकटवर्तीय वर्तुळात त्यांनी स्थान मिळवले होते. आझाद हिंद सेनेत ते मेजर जनरल होते, या पदाने त्यांना भारतभर ओळख मिळवून दिली. आझाद हिंद सेनेने समर्पण केल्यानंतर ब्रिटीशांनी त्यांना कैद केले आणि लाल किल्ल्यात डांबून ठेवले. त्यानंतर प्रसिद्ध लाल किला कोर्ट मार्शल ट्रायल झाले.
आझाद हिंद सेनेच्या सर्वच सैनिकांना ब्रिटीशांनी मुक्त करावे यासाठी भारतीय नेते ब्रिटीशांशी बोलणी करू लागले.
स्वातंत्र्याच्या वाटाघाटींना जोर चढला तसे ब्रिटीशांवर या आझाद हिंद फौजेच्या सैनिकांना सोडण्यासाठी दबाव वाढू लागला. शाहनवाज खान यांच्यासाठी खुद्द नेहरुंनी मध्यस्थी केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर लाल किल्ल्यावर ब्रिटीशांचा ध्वज उतरवून त्याठिकाणी पहिल्यांदा तिरंगा फडकवणारे शाहनवाज खानच होते. आज देखील लालकिल्ल्यात दररोज संध्याकाळी सहा वाजता लाईट अँड साउंडचा कार्यक्रम होतो. यात नेताजींसोबतच शाहनवाज खान यांचा सुद्धा आवाज ऐकू येतो.
स्वातंत्र्यानंतर शाहनवाज खान यांनी भारतीय राजकारणात मोठी मजल मारली. मेरठ मतदार संघातून ते चार वेळा लोकसभेवर निवडून गेले. १९५२ मध्ये जेंव्हा ते पहिल्यांदा मेरठ मधून निवडून आले तेंव्हा त्यांचे कुटुंब मात्र पाकिस्तानात होते. त्यांच्या कुटुंबाने त्यांच्यासोबत भारतात येण्यास नकार दिला. त्यांचा मुलगा त्यावेळी पाकिस्तान सैन्यात दाखल झाला होता.
१९५२ जेंव्हा ते पहिल्यांदा मेरठमधून सार्वत्रिक निवडणूक लढले तेंव्हा या मतदार संघात त्यांना उदंड प्रतिसाद मिळाला.
आझाद हिंद सेनेतील एक मोठे सेनानी असल्याने आणि पाकिस्तानऐवजी भारतातच राहण्याचा निर्णय घेतल्याने जनमानसात त्यांच्याबद्दल खूपच आदरभाव होता. शाहनवाज यांनी भारतीय राजकारणात प्रगती करत होते, तेंव्हा तिकडे त्यांचा मुलगा पाकिस्तान सैन्यात प्रगतीचे एकेक टप्पे सर करत होता. ते भारत सरकार मध्ये मंत्री होते तर त्यांचा मुलगा पाकिस्तानी सैन्यात मोठा अधिकारी होता. १९५२ पासून १९६२ पर्यंत ते सलग तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले. १९६७च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
पण, त्यानंतर १९७१ मधील निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले. वेगवेगळ्या सरकारच्या कार्यकालात त्यांनी विविध विभागाचे केंद्रीय मंत्रिपद भूषवले आहे.
शाहनवाज खान हे भारत सरकारचे केंद्रीय मंत्री होते. मात्र त्यांचे संपूर्ण कुटुंब पाकिस्तानमध्येच राहत होते. त्यांना तीन मुले आणि तीन मुली होत्या. फाळणीनंतर ते भारतावरील प्रेमापोटी इथे आले. परंतु त्यांच्या कुटुंबाने पाकिस्तानातच राहण्याचा निर्णय घेतला. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात सामावून घेतले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी १९५६ साली भारत सरकारने एक समिती नेमली होती. शाहनवाज खान या समितीचे अध्यक्ष होते.
१९६५ साली त्यांच्या आयुष्यात एक अजीब पेचप्रसंग उभा राहिला. १९६५ साली पाकिस्तानसोबत भारताने युद्ध पुकारले. तेंव्हा ते लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या सरकारमध्ये कृषी मंत्री पदावर होते.
त्यांचा मुलगा पाकिस्तानी सैन्यात अधिकारी होता. भारताचे कृषी मंत्री शाहनवाज खान यांचा मुलगा पाकिस्तान सैन्याच्या वतीने भारत विरोधी युद्धात सामील झाल्याची अफवा पसरली. अशा अवघड काळात देशभरातून शाहनवाज खान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. त्यांच्या मुलाचे नाव महमूद नवाज अली असे होते. पाकिस्तानी सैन्यात त्याने मोठी मजल मारली होती. देशभरात या गोष्टीवरून सरकार विरोधी वातावरण निर्माण झाले. विरोधी पक्षाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी त्यांना आपले लक्ष्य बनवले.
राजकीय दबाव असह्य झाल्याने शाहनवाज खान यांनी देखील राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. पंतप्रधान या नात्याने लाल बहाद्दूर शास्त्रीनी त्यांना मंत्रिमंडळातून बाजूला करावे यासाठी त्यांच्यावरील राजकीय दबावही वाढत होता, परंतु शास्त्री या दबावाला बळी पडले नाहीत. त्यांनी विरोधी पक्षाला सडेतोड उत्तर दिले.
त्यांचा मुलगा पाकिस्तानी सैन्यात आहे यात त्यांची काय चूक, असा प्रतिप्रश्न त्यांनी विरोधकांना केला. शाहनवाज यांचे वारसदार आजही पाकिस्तानी सैन्यात मोठमोठ्या पदावर अधिकारी आहेत.
महमूद नवाज जोपर्यंत पाकिस्तानी सैन्यात होते तोपर्यंत त्यांना आपल्या वडिलांना भेटण्याची परवानगी नव्हती. त्यांनी याकाळात कधीच आपल्या वडिलांची भेट घेतली नाही. मात्र सैन्यातून निवृत्त होताच ते आपल्या वडिलांना भेटायला भारतात आले. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जाहीर उल इस्लाम हे शाहनवाज खान यांचे सख्खे पुतणे होत. शाहनवाज खान यांचे भाऊ देखील पाकिस्तानी सैन्यात ब्रिगेडियर होते.
भारतावरील प्रेमापोटी त्यांनी मात्र कुटुंबियांशी दुरावा सहन केला. १९८३ साली वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. दिल्ली मध्ये त्यांच्या स्मरणार्थ शाहनवाज मेमोरियल फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या वतीने गरीब मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली जाते. नवी दिल्लीतील जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठाच्या परिसरातच या संस्थेचे मुख्यालय आहे.
आझाद हिंद सेनेत सामील झाल्यापासून घेतलेले भारत मातेच्या सेवेचे व्रत त्यांनी अखेरपर्यंत निष्ठापूर्वक पाळले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.