आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
लहान मुलं सर्वांनाच आवडतात, नाही का? लहान मुलं न आवडणारी व्यक्ती सापडणं म्हणजे उंबराचं फुल सापडल्यासारखं आहे. असं म्हणतात पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त हळव्या आणि भावनिक असतात. त्यांना लहान मुलांचा पटकन लळा लागतो. मात्र, मी आज जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, ती वाचल्यानंतर तुमचा ‘महिला जास्त भावनिक असतात’ या वाक्यावरून विश्वास नक्कीच उडून जाईल. आता माझ्या या वाक्याला कदाचित महिलावर्गाचा आक्षेप असेल. अर्थात त्यांनी ही गोष्ट इगोवर घेतली तर..!
असो, हा खूप मोठा वादाचा विषय आहे. आपण तो जरा बाजूला ठेवूया आणि आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊ. महाराष्ट्रामध्ये अशा दोन महिला आहेत ज्यांनी आपल्या स्वार्थासाठी कित्येक लहान मुलांचं अपहरण करून त्यांची अमानुष ह*त्या केली. त्यांना न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली असून त्या सध्या आपल्या शेवटाची वाट पाहत दिवस घालवत आहेत. कोण होत्या या दोन महिला? त्यांनी लहान मुलांच्या हत्या करण्याचा घाट का घातला? आणि त्यांचे कारनामे कशा प्रकारे समोर आले? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देणारा हा लेख नक्की वाचा..
ऑक्टोबर १९९६ मध्ये नाशिकमधील ‘क्रांती गावित’ या नऊ वर्षांच्या मुलीच्या अपहरणाच्या तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक ‘मंडलेश्वर माधवराव काळे’ यांच्याकडे सोपवण्यात आली होती. जेव्हा त्यांनी हे प्रकरण हातात घेतलं त्यानंतर एखाद्या क्राईम थ्रीलर चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल, अशी घटना मालिका त्यांच्या समोर उलगडत गेली. या घटना मालिकेत तीन मुख्य पात्रं होती: एक आई आणि तिच्या दोन मुली! माजी सैनिक असलेल्या मोहन गावित यांची दुसरी पत्नी प्रतिभा मोहन गावितनं आपली सवत अंजनाबाई, तिची मुलगी रेणुका शिंदे (अंजनाबाईची पहिल्या पतीपासून झालेली मुलगी) आणि सीमा गावित (मोहन आणि अंजनाबाईची मुलगी) यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
प्रतिभा गावित यांची मोठी मुलगी क्रांती बेपत्ता होती. तिच्या बेपत्ता होण्यामागे या तीन्ही माय-लेकी जबाबदार असल्याची प्रतिभा यांना खात्री होती. बेपत्ता मुलीचा पिता, मोहन गावित हा कथित आरोपी अंजनाबाईचा दुसरा पती होता. अंजना पूर्वीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमीची बाई होती. किरकोळ चोऱ्या आणि पाकिटमारीची कामं ती करत असे. अंजनाच्या चोरटेपणाला कंटाळून मोहन गावितनं तिला व तिच्या दोन्ही मुलींना सोडून दुसरं लग्न केलं होतं. या गोष्टीचा बदला घेण्यासाठीच अंजनाबाई व तिच्या दोन मुलींनी क्रांतीला बेपत्ता केल्याचा सरळ आरोप प्रतिभा गावितनं केला होता.
पोलीस निरीक्षक काळे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक पोलिसांनी क्रांती गावित अपहरण प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यांनी अंजनाबाई आणि तिच्या दोन मुली रेणुका शिंदे व सीमा गावित यांना अटक केली. पोलिसी खाक्या दाखवूनही मास्टरमाईंड अंजनाबाई आणि तिची मोठी मुलगी रेणुका शिंदे मूग गिळून गप्प बसल्या होत्या. मात्र, पोलीस गुन्हेगारांचे बाप असतात, ही गोष्ट या प्रकरणात खरी ठरली.
तिन्ही मायलेकींमध्ये सीमा गावीत हा सर्वात कमजोर खेळाडू असल्याचं पोलिसांनी ताडलं होतं. त्यांनी चौकशीदरम्यान तिला बोलतं केलं. सीमा गावितनं क्रांतीचं अपहरण आणि ह*त्या केल्याचं कबूल केलं. सीमानं गुन्हा कबुल केल्यानंतर नाशिकमध्ये त्यांच्या घरी गेलेल्या शोध पथकाला असंख्य मुलांचे कपडे, अनेक मुलांचे फोटो सापडले. या तिन्ही मायलेकी कसलेल्या गुन्हेगार असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे त्यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठं लहान मुलांचं ह*त्याकांड समोर आलं!
पुणे विद्यापीठाच्या मेन गेटपासून साधारण २०० मीटर अंतरावर चतु:श्रृंगी मंदिर आहे. १९९० मध्ये या मंदिरापासून रेणुका शिंदे आणि सीमा गावीत यांच्या रक्तरंजित गोष्टीला खरी सुरुवात झाली होती. रेणुकानं आपल्या लहान मुलाचा वापर करून चोरी केली. लोकांनी तिला पकडलं मात्र, मुलाचा आधार घेऊन तिनं आपला यशस्वीपणे बचाव केला.
या घटनेनंतर तिन्ही मायलेकींना लहान मुलाचं महत्त्व लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी आपल्या गुन्ह्यांमध्ये लहान मुलांचा वापर करण्याचा निर्णय घेतला. पण, प्रत्येक वेळी लहान मुल आणणार कुठून हा देखील प्रश्न होता. त्यासाठी त्यांनी मुलांचं अपहरण करण्यास सुरुवात केली. अपहरण केल्यानंतर आणि त्यांचा वापर केल्यानंतर मुलांचं करायचं काय? असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्यांनी मुलांची क्रू*रपणे ह*त्या सुरू केल्याचं म्हटलं जातं.
अपहरण केलेल्या मुलांची ह*त्या करण्याचा सिलसिला रेणूका आणि सीमाची आई, अंजनाबाईनं सुरू केला होता. तिनं कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा संतोष नावाच्या लहान मुलाची जमिनीवर आणि खांबावर आपटून ह*त्या केली होती! एकदा जनावराच्या तोंडाला सावजाचं रक्त लागलं की, त्याला त्याची सवय लागते. अगदी याच नियमाप्रमाणं अंजनाबाई, रेणूका आणि सीमानं लहान मुलांची ह*त्या करण्यास सुरुवात केली होती.
अपहरण केलेली मुलं रडू लागली की आम्ही त्यांना ठा*र मारत असू, ही गोष्ट या निर्दयी बहिणींनी चौकशीदरम्यान कबुल केली होती. त्यांनी ४० पेक्षा जास्त मुलांचं अपहरण करून ह*त्या केल्याचं म्हटलं जातं. मात्र, क्रांती गावित पकडून एकूण ६ मुलांच्या ह*त्येचे पुरावे पोलिसांना सापडल्यानं या महिलांवर फक्त सहा मुलांच्या ह*त्येबाबत खटला सुरू करता आला.
दोन बहिणींपैकी मोठी असलेल्या रेणुकाचा दुसरा पती किरण शिंदे पोलिसांना सहकार्य करण्यास तयार झाला. गुन्हे कसे घडले आणि मृतदेहांची कशा प्रकारे विल्हेवाट लावली गेली याचा तपशील त्याने पोलिसांना दिला. त्याच्या सहकार्याचं आणि चांगल्या वर्तणुकीचं बक्षिस म्हणून किरण शिंदेला निर्दोष ठरवण्यात आलं. तर, १९९७ मध्ये खटला सुरू असतानाच अंजनाबाईचा मृत्यू झाला.
मात्र, रेणूका आणि सीमा या दोन बहिणींना शिक्षेपासून पळ काढता आला नाही. २००१ मध्ये दोघींना फाशी देण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं दिला होता. तोच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने २०१४ मध्ये कायम ठेवला होता. त्यानंतर दोघींनी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला. मात्र, त्यांनी देखील तो फेटाळला. सध्या दोघीही पुण्यातील येरवडा कारागृहामध्ये आहेत. त्यांच्या फाशीच्या शिक्षेवर अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.
रेणुका आणि सीमाचे १९९६ मधील फोटो पाहिले तर त्यांच्याकडे पाहून कुणालाही त्यांच्या काळ्या कर्मांवर विश्वास बसणार नाही. मात्र, दोघींच्या निरागस दिसणाऱ्या चेहऱ्यामागे क्रू*र वृत्ती दडलेली होती, हे या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर लक्षात येतं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.