आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
समाजात तुम्हाला भरपूर प्रभावित करणाऱ्या व्यक्ती भेटतील. उदाहरण द्यायचं झालं तर बॉलिवूड सुपरस्टार विनोद खन्नावर अध्यात्मिक गुरू ओशो यांचा भरपूर प्रभाव होता. यामुळे तो बॉलिवूड सोडून अध्यात्माकडे वळला.
स्टॉक मार्केट हा भारतीय अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. स्टॉक मार्केट हा शब्द तोंडातून बाहेर पडला की आपल्या समोर हर्षद मेहता घोटाळा प्रकरण समोर येतं. वरील नमूद केलेली दोन्ही प्रकरणे वेगवेगळी आहेत दोघांचा एकमेकांशी काही संबंध नाही, पण आज आपण अशा घोटाळ्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामध्ये स्टॉक मार्केट आणि अध्यात्म यांचा एकमेकांशी संबंध आहे. तर ही गोष्ट आहे चित्रा रामकृष्ण यांची, त्यांनी नेमका काय घोळ घातला आहे हे जाणून घेऊ.
चित्रा रामकृष्ण यांनी काय घोटाळा केला आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर आधी आपल्याला स्टॉक मार्केट म्हणजे नेमकं काय? ते समजून घ्यावं लागेल. स्टॉक मार्केट हे एक असं व्यासपीठ आहे जिथे गुंतवणूकदार शेअर्स, बॉंड्स, डेरीव्हेटीव्ह्जसारख्या आर्थिक साधनांचा व्यापार करण्यासाठी एकत्र येतात. स्टॉक मार्केट या व्यवहाराचे सूत्रधार म्हणून काम करते.
भारतात प्रामुख्याने दोन स्टॉक एक्सचेंज आहेत, एक आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) तर दुसरा आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE).
शेअर बाजाराचे दोन प्रकार आहेत एक प्राथमिक बाजार (primary market) आणि दुसरं दुय्यम बाजार (secondary market). प्राथमिक बाजारात कंपन्या त्यांचे शेअर्स जारी करण्यासाठी आणि पैसे उभारण्यासाठी स्वतःची नोंदणी करतात. नवीन सिक्युरिटीज प्राथमिक बाजारात विकल्यानंतर कंपनीच्या शेअर्सची दुय्यम बाजारात खरेदी-विक्री केली जाते. दुय्यम बाजारात शेअर्सच्या खरेदी विक्रीला व्यापार असे म्हणतात. शेअर बाजारात दलाल हा मध्यस्थ असतो जो या व्यापाराची सोय करतो.
वरील परिच्छेदात आपण स्टॉक मार्केटबद्दल जाणून घेतलं आता आपण SEBI बद्दल जाणून घेऊयात. SEBI ही एक वैधानिक संस्था आहे जी १२ एप्रिल १९९२ रोजी securities and exchange board of India act 1992 च्या तरतुदींनुसार याची स्थापन करण्यात आली.. SEBI चे मूलभूत कार्य सिक्युरिटीजमधील गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे आणि सिक्युरिटीज मार्केटला प्रोत्साहन देणे हे आहे. सुरुवातीला SEBI ही गैर-वैधानिक संस्था होती. १९९२ साली SEBI ही स्वायत्त संस्था झाली आणि SEBI Act 1992 द्वारे SEBI ला वैधानिक अधिकार मिळाले. SEBI ला दिवाणी न्यायलयासमान अधिकार आहेत.
SEBI ही अर्ध वैधानिक आणि अर्ध न्यायिक संस्था आहे, जी नियमावली तयार करू शकते, चौकशी करू शकते, निर्णय देऊ शकते, आणि दंड ठोठावु शकते.
चित्रा रामकृष्ण या NSE च्या पहिल्या महिला व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. सीए म्हणून त्यांनी त्यांची कारकीर्द सुरू केली आणि १९८५ साली आयडीबीआयच्या प्रोजेक्ट फायनान्स विभागात रुजू झाल्या.
NSE ची स्थापना करण्यासाठी नेमलेल्या समितीमध्ये चित्रा रामकृष्ण यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. चित्रा रामकृष्ण यांनी NSE मध्ये असताना अनेक महत्वाचे उपक्रम हाती घेतले ज्यांचा NSE च्या व्यवहारांवर दूरगामी परिणाम झाला. तर हा आहे चित्रा रामकृष्ण यांचा थोडक्यात परिचय.
आता चित्रा रामकृष्ण यांनी केलेला घोटाळा काय आहे ते जाणून घेऊ.
याची सुरुवात होते २०१६ साली. काही वैयक्तिक समस्या आहेत असं सांगून चित्रा रामकृष्ण यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. अनेक वर्षांपासून NSEच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्स प्रक्रियेत बऱ्याच त्रुटी आहेत आणि यावरून भरपूर गदारोळ झाला होता. पण २०१७ साली SEBI च्या असं लक्षात आलं की, काही NSEच्या अधिकाऱ्यांनी उच्च फ्रीक्वेनसी ट्रेडर्सना को-लोकेशन सर्व्हरद्वारा अयोग्य प्रवेश प्रदान केला ज्यामुळे अल्गोरिदमिक ट्रेडिंगला गती मिळेल.
SEBIने या प्रकरणाची तीन वर्षे चौकशी केली आणि NSE ला सिक्युरिटीज मार्केटमध्ये पैसे उभे करण्यापासून सहा महिन्यांसाठी प्रतिबंधित केले. या तपासादरम्यान सेबीला चित्रा रामकृष्ण या एका अनोळखी व्यक्तीसोबत ईमेलद्वारे संपर्कात आहेत असं दिसून आलं. चौकशीदरम्यान या अनोळखी व्यक्तीबद्दल विचारणा केली असता चित्रा रामकृष्ण यांनी ही व्यक्ती एक अध्यात्मिक शक्ती आहे आणि गेल्या वीस वर्षांपासून माझे मार्गदर्शन करीत आहे असा खुलासा केला. तपासा दरम्यान SEBI ला हे लक्षात आले की, या तथाकथित अध्यात्मिक शक्तीच्या सांगण्यावरून अपुरी कागदपत्रे व भांडवली बाजाराचा कोणताही अनुभव नसताना आनंद सुब्रह्मण्यम यांची थेट चित्रा रामकृष्ण यांचा सल्लागार म्हणून नियुक्ती केली.
चौकशी दरम्यान चित्रा रामकृष्ण यांनी या अध्यात्मिक शक्तीचा उल्लेख “योगी शिरोमणी” असा केला आहे. चित्रा रामकृष्ण यांनी ईमेल द्वारा योगी शिरोमणी यांना अंतर्गत गोपनीय माहिती, NSE च्या आर्थिक आणि व्यवसाय योजना, लाभांश परिस्थितीबद्दल माहिती पुरवली याशिवाय चित्रा रामकृष्ण यांनी NSE च्या कर्मचाऱ्यांच्या कामगिरीच्या मूल्यांकनावरही या योगी शिरोमणी यांचा सल्ला घेतला.
SEBI ने त्यांच्या चौकशी अहवालात हे नमूद केले आहे की चित्रा रामकृष्ण यांनी केलेल्या बेकायदेशीर नियुक्त्यांबद्दल सर्व काही माहिती असून देखील NSE चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवी नरेन यांनी गोपनियतेच्या नावाखाली ही माहिती समोर येऊ दिली नाही. आनंद सुब्रह्मण्यम यांची बेकायदेशीर नियुक्ती केल्याबद्दल SEBI ने चित्रा रामकृष्ण यांना 3 करोड रुपये दंड ठोठावला, NSE ला 2 करोड रुपये दंड ठोठावला, तर आनंद सुब्रह्मण्यम, रवी नरेन, आणि NSE चे मुख्य नियामक अधिकारी व अनुपालन अधिकारी नरसिम्हन यांना प्रत्येकी 6 लाख रुपये दंड ठोठावला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.