आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारतीय क्रिकेटमध्ये फिरकी गोलंदाजीचा झेंडा सांभाळण्यात ‘पंजाबी मुड्यां’नी आपलं महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. बिशनसिंग बेदींनी एक काळ गाजवल्यानंतर मनिंदर सिंगला त्यांचं उत्तराधिकारी मानलं गेलं. लहान वयात क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे मनिंदर काही मॅचविनिंग खेळी करून लवकरच क्रिकेटमधून बाहेर निघून गेले. मग, काही वर्षांनी हरभजन सिंगचं पाऊल मैदानात पडलं आणि आपल्या फिरकीच्या जादूमध्ये त्यानं अनेकांना गोंधळून सोडलं. याच काळात आणखी एक सरदार मैदानावर आला होता अन् तोही फिरकी गोलंदाजी करत होता. मात्र, आता कितीही डोक्यावर जोर दिला तरी अनेकांना त्याचं नाव लवकर आठवणार नाही. सरणदीप सिंग, असं पंजाबी मुंड्याचं नाव होतं.
वास्तविक पाहिलं तर हरभजन सिंगच्याही अगोदर सरणदीपला संधी मिळाली होती. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या एकदम पहिल्या तुकडीत निवड झालेल्या काही मोजक्या खेळाडूंमध्ये सरणदीपचा समावेश होता. त्याला इरापल्ली प्रसन्ना आणि वेंकटराघवन यांच्याकडून फिरकीवर प्रभुत्व मिळवण्याची संधी मिळाली. वयाच्या २१व्या वर्षी भारतीय संघात स्थान मिळवल्यानंतर त्यानं झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्याच कसोटीत सलग चार मेडन ओव्हर्स टाकून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानं सामन्यात एकूण सहा विकेट्स घेत आपली क्षमता सिद्ध केली होती. पण तरीही त्याची कारकीर्द फक्त तीन कसोटी आणि पाच एकदिवसीय सामन्यांची ठरली. सरणदीपच्या क्रिकेट कारकीर्दीतील चढ-उतारांबाबत हा विशेष लेख…
२१ ऑक्टोबर १९७९ रोजी जन्मलेला सरणदीप सिंग ऑफ स्पिनर गोलंदाज होता. सरणदीपला राष्ट्रीय संघात खेळण्यासाठी जास्त संधी मिळाल्या नाहीत कारण त्यावेळी इतर फिरकीपटू देखील उपलब्ध होते. राष्ट्रीय संघात जरी जास्त सामने खेळता आले नसले तरी प्रथम श्रेणीचा त्याचा रेकॉर्ड अतिशय चांगला होता. गंमत म्हणजे ज्युनियर क्रिकेट स्पर्धांमध्ये सरणदीप गोलंदाज म्हणून नाही तर फलंदाज म्हणून खेळत होता. नंतर मात्र, त्यानं गोलंदाजीमध्ये हात चालवून पाहिला आणि त्यात त्याला यश आलं.
१९९८-९९मध्ये त्यानं पंजाबच्या संघाकडून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तोपर्यंत तो उत्कृष्ट फिरकीपटू झाला होता. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्यानं आठ विकेट घेऊन सर्वांचं लक्ष आपल्याकडे खेचून घेतलं होतं. यानंतर, १९९९-२०००च्या दुसऱ्या प्रथम श्रेणी हंगामात त्यानं रणजी स्पर्धेत ३७ विकेट्स घेतल्या.
त्याच वर्षी म्हणजे २००० साली सरणदीपला भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली. झिम्बाब्वेविरुद्ध नागपूरमध्ये खेळवलेल्या कसोटी सामन्यासाठी सरणदीपची निवड करण्यात आली. सहा महिन्यांतील भारताची ती पहिली कसोटी होती ज्यात एक विशेष ऑफ स्पिनर खेळवला गेला होता. सरणदीपच्या हातात खूप उशिरा बॉल देण्यात आला.
झिम्बाब्वेचा संघ ४० पेक्षा जास्त ओव्हर्स खेळला होता आणि १५० च्या जवळपास धावा केल्या होत्या. तेव्हा कर्णधार गांगुलीनं सरणदीपला बॉल दिला. त्यानं चार मेडन(निर्धाव) ओव्हर्स टाकून गोलंदाजीला सुरुवात केली. याशिवाय पहिल्या डावात गाय व्हीटल आणि ॲलिस्टर कॅम्पबेलच्या विकेट देखील घेतल्या. दुसऱ्या डावात अँडी फ्लॉवरनं द्विशतक झळकावले आणि सामना अनिर्णित राखला. भारतीय गोलंदाजांना दुसऱ्या डावात सहा विकेट्स मिळाल्या. यातील चार सरणदीपनं घेतल्या होत्या. एकूणचं त्यानं आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरवात चांगल्या प्रकारे केली होती.
पहिल्या कसोटी सामन्यानंतर सुमारे एक वर्षानंतर त्याला दुसरी कसोटी खेळायला मिळाली. २००१ मध्ये सरणदीपनं इंग्लंडविरुद्ध तीन विकेट्स घेतल्या. त्यानंतर पुन्हा एका वर्षानंतर तो आपला तिसरा कसोटी सामना खेळला. हा सामना वेस्ट इंडीज विरुद्ध जॉर्जटाउन येथे खेळला गेला. त्यात त्याला फक्त एक विकेट मिळाली. ही त्याची भारतीय संघासाठी शेवटची कसोटी ठरली, यानंतर तो पुन्हा भारतासाठी कसोटी खेळू शकला नाही.
२००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या कसोटी मालिकेत सरणदीप खेळणार होता. निवड समितीनं त्याचं नाव सुचवलं होतं पण कर्णधार सौरव गांगुली हा हरभजन सिंग(भज्जी)ला घेण्याच्या निर्णयावर ठाम राहिला. त्यामुळं त्या मालिकेत सरणदीपला संधी मिळाली नाही. नंतर भज्जीनं देखील ३ सामन्यात ३२ विकेट घेऊन गांगुलीचा मान राखला. यामुळं मात्र, सरणदीपचा भारतीय संघात येण्याचा मार्ग बंद झाला. सरणदीप सिंगनं तीन कसोटी सामने खेळून १० विकेट्स घेतल्या.
दरम्यान, २००२ मध्ये त्यानं इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या फॉरमॅटमध्ये त्याने एकूण पाच सामने खेळले. त्यात त्याला फक्त तीन विकेट्स मिळवता आल्या. राष्ट्रीय संघात जास्त संधी न मिळाल्यानं सरणदीपनं प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणं सुरू ठेवलं. २००६-०७ च्या रणजी हंगामासाठी सरणदीप हिमाचल प्रदेशाच्या संघात गेला. कारण त्यांच्या संघाला एका फिरकीपटूची गरज होती. त्या हंगामात त्यानं २२.२८च्या सरासरीनं २८ विकेट्स मिळवल्या होत्या.
याशिवाय, २००० मध्ये एनकेपी साळवे चॅलेंजर करंडक सामन्यात भारताच्या वरिष्ठ संघाविरुद्ध सरणदीपनं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यानं तीन विकेट घेतल्या होत्या आणि १२ धावांवर नाबाद देखील राहिला होता.
२०१२मध्ये त्यानं प्रथमश्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. प्रत्यक्ष मैदानातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यानं प्रशासकीय जबाबदाऱ्या देखील हाताळल्या. राष्ट्रीय निवड समितीमध्ये त्याची वर्णी लागली.
जगभरातील अनेक खेळाडू लकी चार्मसारख्या गोष्टींवर विश्वास ठेवत असल्याचं आपल्याला माहिती आहे. सरणदीप सिंगच्या बाबतीत देखील काही मजेशीर गोष्टी प्रसिद्ध आहेत. क्रिकेट खेळताना सरणदीप कायम मरून रंगाची पगडी बांधत असे. मरून रंगाची पगडी आपल्यासाठी लकी असल्याचं तो मानत असे. आता पार्टी म्हटलं की, सर्वजण एकदम टापटीप कपडे घालून जातात. मात्र, सरणदीपला पार्टीमध्ये मिकी माऊसचे टी-शर्ट घालून जायला आवडे. विशेष म्हणजे ते त्याला शोभूनही दिसत.
तर अशा या सरणदीप सिंगकडे चांगली गोलंदाजी करण्याची नक्कीच क्षमता होती. मात्र, हरभजन सिंगच्या झंजावाताच्या मागे त्याची कारकीर्द झाकोळून गेली, असंच म्हणावं लागेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.