आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
दीडशे वर्षांचा ब्रिटीश राजवटीचा काळ बघितला तर अन्याय आणि अत्याचाराच्या अनेक क्रूर कथा पाहायला मिळतील. इंग्रजांनी इथल्याच भूमिपुत्रांपासून त्यांच्या जमिनी बळकावण्याचा घाट घातला. स्वतःच्याच शेतात धान्य पिकवण्यासाठी त्यांना कर द्यावा लागत असे. पिकाचे नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना द्यावा लागणारा कर काही चुकत नसे. हा कर चुकवण्यासाठी मग शेतकरी सावकारांकडून कर्ज घेत असे. कर्जाच्या वाढतच जाणाऱ्या व्याजामुळे शेतकरी अजूनच हातघाईला येई. हे सावकार देखील शेतकऱ्यांची लुट करण्यास मागे-पुढे पाहत नसत. शेतकऱ्यांकडून कर्ज वसूल करण्यासाठी हे सावकार शेतकऱ्यांचा अनन्वित छळ करत.
एकीकडे इंग्रज आणि दुसरीकडे हे सावकार. दोन्ही बाजूंनी कात्रीत सापडलेल्या सुपारीसारखी शेतकऱ्यांची अवस्था होत असे.
इंग्रजांनी जेंव्हा बिहारमधील भागलपूर जिल्ह्याच्या पुढे राहणाऱ्या पठारी भागावरील आदिवासी गावातही असाच जुलूम आणि अत्याचार सुरु केला तेंव्हा या आदिवासी समाजातील काही तरुण भडकले. त्यांनी इंग्रजांविरोधात विद्रोह पुकारला. १८५५ साली झालेला हा विद्रोह “संथाल हूल विद्रोह” नावाने प्रसिद्ध आहे.
या विद्रोहाचे नेतृत्व केले होते सिद्धू आणि कान्हू या दोन भावांनी. इंग्रजांनी पोसलेल्या सावकारी व्यवस्थेला या दोघांनी आव्हान दिले. त्यांचे हे बंड चिरडून काढण्यासाठी इंग्रजांनी या दोघा भावांना पकडून सगळ्या गावासमोर फाशी दिली होती.
सिद्धू-कान्हूला इंग्रज आणि सावकारांकडून केला जाणारा अन्यायाविरुद्ध प्रचंड चीड होती. इंग्रजांचा वरदहस्त लाभल्याने परिसरातील सावकारही माजले होते. कर्ज वसुलीसाठी म्हणून येणारे सावकार गरीब आदिवासींना अतोनात छळत होते. त्यांच्या या छळातून लहान मुले आणि स्त्रियासुद्धा सुटल्या नव्हत्या. सिद्धू-कान्हू या दोघा भावांना हा अन्याय सहन होत नव्हता. त्यांनी आदिवासी तरुणांना एकत्र करत या अन्यायाला प्रतिकार करण्याचा निश्चय केला.
सिद्धू-कान्हू आणि त्यांचा संथाल हूल काय होता हे समजून घेऊया या लेखातून.
भोगानादिह या गावातील एका आदिवासी कुटुंबात सिद्धू आणि कान्हूचा जन्म झाला. त्यावेळी हे आदिवासी जंगलातील लाकडे तोडून ती बाजारात नेऊन विकत असत आणि आपला उदरनिर्वाह चालवत असत. शिकार करणे हा तर त्यांचा छंद होता. सिद्धू आणि कान्हू अशा वातावरणात मोठे होत होते.
दोघे भाऊ जेंव्हा मोठे झाले तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की, इंग्रजांनी झूम शेतीची सक्ती केली आहे. ही झूम शेती आदिवासींसाठी अगदीच किचकट प्रकरण होते. शिवाय, त्यांनी ही शेती स्थानिक बंदोबस्ताच्या अखत्यारीत आणली. ज्यामुळे तर आदिवासींचे प्रचंड हाल सुरु झाले. झूम शेतीचे तंत्र आदिवासी लोकांसाठी त्रासदायक होते. शिवाय या स्थानिक बंदोबस्तामुळे तर त्यांच्या शेतीवरील संकटात आणखीनच भर पडली.
आदिवासींना शिकार करण्यावर आणि जंगलातील कुठल्याही साधनसंपत्तीवर हक्क दाखवण्यास मनाई करण्यात आली होती. म्हणजेच आजवर ते ज्यावर आपला उदरनिर्वाह चालवत होते, ते पारंपारिक मार्गच इंग्रजांनी बंद केले होते. याच कारणाने आदिवासींमध्येही इंग्रजाविरोधातील असंतोष वाढला होता.
इंग्रजांनी स्थानिक बंदोबस्त लागू केल्याने आजूबाजूच्या गावातील बंगाली महाजन आणि शेट-सावकार तर खूपच माजले होते. पिक आले नाही तरी त्यांना कर द्यावाच लागे. अशावेळी आदिवासी कर्ज काढून कर भरत असत. कधीकधी एखाद्या घरगुती कारणासाठीही कर्ज घ्यावे लागे कारण, लाकूडफाटा विकणे आणि शिकार करणे यासारखी पारंपारिक कामेही बंद पडली होती. त्यांच्या याच असहायतेचा फायदा सावकार घेत. कर्ज फेडण्यास विलंब झाल्यास मारहाण करत. कधीकधी त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्या जमिनी हडप करत. कधीकधी तर त्यांना मारूनही टाकत. याविरुद्ध न्याय मागण्यासाठी गेल्यास स्थानिक शासनही या सावकारांचीच बाजू उचलून धरत असे.
या सावकारांचे असे क्रूर वागणेही आदिवासींच्या रोषाचा उद्रेक होण्यास कारणीभूत ठरले. यावर काही तरी उपाय योजलाच पाहिजे असा निश्चय सिद्धू-कान्हूने केला. याला त्यांचे लहान भाऊ चांद आणि भैरव यांनी देखील पाठींबा दिला. गावातील आदिवासी युवकांनी आजूबाजूच्या गावातील युवकांनाही हा संदेश दिला की, सिद्धूच्या स्वप्नात धरती आबा म्हणजेच आदिवासींची कुलदेवता आली असून तिने इंग्रजांच्या शोषणातून आदिवासींच्या मुक्तीसाठी लढण्याचा संदेश दिला आहे. हा संदेश ऐकताच आजूबाजूच्या गावातील आदिवासी युवक सिद्धूला साथ देण्यासाठी तयार झाले.
पंचकाठिया येथे ३० जून रोजी साठ हजार आदिवासी युवक एकत्र आले. त्यांच्याकडे तीर-कमान, भाला, यासारखे शस्त्रे होती. मात्र त्यांच्याकडे धरतीमातेला जुलम आणि अन्यायाच्या तावडीतून मुक्त करण्याची जबरदस्त जिद्द होती.
आदिवासी तरुणांच्या या विद्रोहाची चुणूक गावातील महेश लाल दत्त नावाच्या पोलिसाला लागली आणि त्याने लगेचच क्विसलँड नावाच्या इंग्रजी अधिकाऱ्याला ही बातमी दिली. क्विसलँडने महेश लाल दत्तला ताबडतोब हे आंदोलन चिरडून टाकण्यास सांगितले. त्यासाठी सिद्धू आणि कान्हू या दोघांनाही अटक करून आणण्याचे आदेश देण्यात आले.
अधिकाऱ्याच्या या आदेशानुसार पोलीस पंचकाठीया गावात पोहोचले. मोठ्या प्रमाणावर एकत्र जमलेले हे आदिवासी खवळून गेले. त्यांनी पोलीस महेश लाल दत्तला मारून टाकले आणि संथाल हूलची घोषणा दिली.
महेश लालच्या हत्येची बातमी वणव्यासारखी सर्वत्र पसरली. सगळे आदिवासी आपापल्या शस्त्रासह घरातून बाहेर पडले आणि त्यांनी सिद्धू-कान्हुला साथ देण्याची प्रतिज्ञा केली. या आदिवासींनी आजूबाजूच्या सावकाराच्या घरावर हल्ले केले. त्यांच्या शोषणाचे कारण बनलेल्या अनेक सावकारांना यमसदनी धाडले.
पंचकाठियातून निघाले आणि ते साहेबगंजच्या दिशेने पुढे जाऊ लागले. महेश दत्तने आधीच क्विसलँडला सावध केलेच होते. त्यामुळे तो कॅप्टन मार्टीलोसह आपले सशस्त्र सैन्य घेऊन तयारच होता.
आदिवासी तरुण आणि क्विसलँडच्या या सैन्यात घमासान युद्ध झाले. आदिवासी तरुण एकदम उत्साहात होते तर इंग्रज सैन्याकडे आधुनिक शास्त्रे आणि तंत्र होते. आदिवासींनी जंगलातील मोठमोठ्या पहाडांचा आसरा घेतला होता. त्यांच्या गोरिला युद्धनीतीमुळे आधुनिक इंग्रज सैन्याला त्यांच्याशी लढणे जिकीरीचे वाटत होते. याचाच फायदा आदिवासी तरुणांनी घेतला.
डोंगरातील हे मोठमोठे पहाडच आदिवासींची खरी ताकद आहेत, हे मार्टीलोच्या लक्षात आल्यानंतर त्याने आदिवासींना खुल्या मैदानात येऊन लढण्यास भाग पाडले. हे आदिवासी आपआपल्या ठिकाणाहून बाहेर आले आणि इंग्रज सैन्यावर तुटून पडले. पण, त्यांची ताकद फार काळ टिकू शकली नाही. एकीकडे पारंपारिक शस्त्रास्त्रांनी लढणारे आदिवासी आणि दुसरीकडे आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज आणि तांत्रिकदृष्ट्या तरबेज असलेले इंग्रज सैन्य. हा मुकाबला काही बरोबरीतला नव्हता. इंग्रजांच्या माऱ्यापुढे अनेक आदिवासी तरुण धारातीर्थी पडले. यात सिद्धू आणि कान्हूचे भाऊ चांद आणि भैरव यांचाही मृत्यू झाला. तरीही सिद्धू आणि कान्हूच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या आदिवासी तरुणांनी हार मानली नव्हती.
शेवटी कोणत्याही युद्धात एक फितूर पुरेसा असतो जो तुमचे सगळे मनसुबे, जिद्द, संघर्ष, यावर पाणी ओततो. आदिवासी तरुणांचे हे युद्धही अशाच फंदफितुरीचे बळी ठरले.
युद्धाची ही आग आजूबाजूच्या परिसरातही वणव्यासारखी पसरली. झारखंडसह बंगालच्या काही भागातही या युद्धाचा प्रभाव जाणवू लागला. सिद्धू-कान्हूचा हा विद्रोह चांगलाच फोफावला होता.
२६ जुलै १८५५ रोजी सिद्धू-कान्हू त्यांच्या गावात आले होते. इथे पुढील रणनीती काय असावी याची योजना आखली जाणार होती. परंतु एका फितुराने पोलिसांना या बैठकीची सूचना दिली आणि पोलीस अचानकच या ठिकाणी येऊन धडकले. इंग्रज शिपायांनी दोन्ही भावांना अटक केली. त्यांना फरफटत घेऊन गेले. पंचकाठिया गावात नेऊन त्यांना गावातील एका मोठ्या वडाच्या झाडावरच फासावर लटकवण्यात आले.
सर्वांसमक्ष सिद्धू-कान्हूची ही अवस्था केल्यानंतर आपसूकच आदिवासींचा हा विद्रोह कायमचा शांत झाला. परंतु पंचकाठिया गावातील ज्या वडाच्या झाडावर त्या दोघांना फाशी दिली ते झाड आजही त्यांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून उभे आहे. आजही तिथल्या लोकांच्या मनामनात सिद्धू-कान्हूच्या पराक्रमाच्या या कथा जिवंत आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.