एक लाख लोकांचे पाळी विषयी प्रबोधन करण्याचा निर्धार
जगभर २८ मे हा जागतिक मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापन दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने या विषयावर २०१६ पासून काम करणाऱ्या समाजबंध या संस्थेच्या वतीने महिनाभर “Period Revolution २०२१” हे अभियान राबवले जात असून ‘मासिक पाळीस पूरक समाज निर्मितीसाठी’ असे या अभियानाचे ब्रीदवाक्य आहे.
मासिक पाळी विषयी समाजात असणाऱ्या अंधश्रद्धा व अज्ञान दूर करून महिलांना सन्मानाने जगता यावं यासाठी याविषयी समाजात अगदी खुलेपणाने बोललं गेलं पाहिजे. पण सामाजिक लज्जेमुळे असे होत नाही व याचा तोटा महिलांच्या एकूणच विकासावर होतो. या विषयाची अस्पृश्यता दूर करण्यासाठी या अभियाना अंतर्गत
अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभियाना अंतर्गत पाळीविषयी जास्तीत जास्त बोललं, लिहिलं, ऐकलं व वाचलं जावं जेणेकरून याविषयी समाजात असणारी लज्जा व अस्पृश्यता नाहीशी होईल यासाठी मासिक पाळी या विषयावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये या विषयाला धरून पत्रलेखन, कविता लेखन, निबंध लेखन, वक्तृत्व, चित्रकला, मुलाखत, पोस्टर बनवणे, अनुभव कथन अशा अनेक स्पर्धा online आयोजित करण्यात आलेल्या आहेत. सोबतच online समुपदेशन सत्र, कार्यकर्ता प्रशिक्षण, red dot bag बनवणे कार्यशाळा, पाळीविषयी प्रतिज्ञा, सखी फोन लाईन, विविध आस्थापनांना पाळीविषयी सजग करणारे email मोहीम, समाजमाध्यमांमध्ये चर्चासत्र असे उपक्रम ही राबवले जाणार आहेत.
मासिक पाळी या अवघड समजल्या जाणाऱ्या विषयावर इतक्या खुलेपणाने व इतक्या मोठ्या प्रमाणात देशात असे पहिलेच अभियान होत असल्याने या अभियानात कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रभरातून अडीचशेहून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. Social media चा विधायक वापर करत सर्व कार्यकर्ते मिळून दररोज हजारो लोकांपर्यंत हा विषय पोहोचवत आहेत व जनजागृती करत आहेत. कोरोनामुळे बाहेर पडून काम करायला बंदी असली तरी तंत्रज्ञानाचा वापर करत तरुणाई स्वतःला अशा विधायक कामात गुंतवून घेत आहे ही सकारात्मक बाब आहे.
ज्यांना आपल्या कला गुणांचा उपयोग प्रबोधनासाठी करायचा आहे अशांनी या स्पर्धांमध्ये अवश्य भाग घ्यावा असे आवाहन समाजबंध संस्थेने केले. कोणत्याही प्रवेश फी विना सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष, मुले मुली यात सहभागी होऊ शकतात. सदर अभियान हे २८ एप्रिल ते २८ मे या कालावधीत राबवले जात असून या कालावधीत १ लाख लोकांपर्यंत पोहोचवण्याचा व १० हजार लोकांना यात थेट सामिल करून घेण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. यासाठी नागरिकांनी या परिवर्तनाच्या, प्रबोधनाच्या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा.
याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच स्पर्धेत नोंदणी करण्यासाठी 7709488286/ 9767392790 वर किंवा [email protected] वर संपर्क साधता येईल.