आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आजच्या काळातही लोक भूत, प्रेत, पिशाच्च अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात. नरबळी दिल्याने पैशांचा पाउस पडतो अशा अंधश्रद्धा आजही प्रचलित आहे. अंगात येणे, भूतबाधा होणे अशा घटनांबद्दल तर विचारूच नका. या अंधश्रद्धांनी समाजाची अधोगती केली आहे, तरीही लोक सहसा अंधश्रद्धांना तिलांजली देत नाहीत. भारत असो की इतर पाश्चिमात्य देश अंधश्रद्धांनी प्रत्येक समाजाला पछाडलेलं आहे.
असंच सतराव्या शतकात इंग्लंडमधील मॅसॅच्यूसेट प्रांतातील सेलम या गावातील लोकांच्या मनावर अंधश्रद्धेचा इतका पगडा होता की त्यांच्या या अंधश्रद्धेमुळे शेकडो निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. निरपराध स्त्री-पुरुषच नाही तर लहान लहान मुलेही या अंधश्रद्धेच्या क्रूर विळख्यातून सुटली नाहीत. सेलममधील ही घटना सेलम विच ट्रायल या नावाने ओळखली जाते.
१६९७ साली घडलेल्या या घटनेबद्दल ऐकून आजही लोकांना जबरदस्त धक्का बसतो. माणूस अंधश्रद्धेला शरण जाऊन किती क्रूर वर्तणूक करू शकतो याचे उदाहरण म्हणजे सेलमचा हा विच ट्रायल खटला होय.
ख्रिश्चन धर्मात सैतान, भूत, दुष्ट आत्मे, पापी आत्मे, वाईट शक्ती अशा संकल्पनांची काहीच कमतरता नाही. सगळ्याच अंधश्रद्धाळू लोकांचा दुष्ट शक्तींवर गाढ विश्वास आहे. याच दुष्ट शक्तींच्या विश्वासातून सेलम विच ट्रायलसारखी भयानक घटनेला जन्म मिळाला.
झालं असं की, सेलम गावचे प्रमुख सॅम्युएल पॅरिस यांची नऊ वर्षाची मुलगी एलिझाबेथ आणि ११ वर्षांची पुतणी ऍबिगेल यांच्या वर्तनात अचानक बदल झाला.
या दोघीही खूप विचित्र वर्तन करत होत्या. त्यांच्या शरीराची विचित्र प्रकारे हालचाल करायच्या, विचित्र आवाजात ओरडायच्या. त्यांना त्यांच्या या वर्तनाबद्दल जाब विचारल्यावर आम्हाला काही कळत नाही. कुणीतरी आम्हाला मारहाण करत आहे असे वाटते, अशी त्यांची उत्तरे ऐकून. कुणालाही भीती वाटणे साहजिकच आहे. त्यांच्या या अशा वागण्याने गावातील सगळेच लोक चक्रावून गेले होते. यावर काही तरी उपाय तर काढणे आवश्यक होते.
यासाठी गावकऱ्यांनी डॉक्टर विल्यम ग्रीगस यांना बोलावून घेतले. विल्यम ग्रीगस यांच्या मतानुसार सैतानाने या मुलींच्या शरीराचा कब्जा घेतला होता. गावातील इतर मुलींच्या बाबतीतही हेच घडू लागले तेव्हा गावात खूप मोठी सैतानी शक्ती वावरत असल्याच्या अफवा उठवण्यात आल्या. संपूर्ण गाव या अफवेने घाबरून गेलं.
हा प्रकार नेमका आहे तरी काय याची चौकशी करण्याची जबाबदारी मॅजिस्ट्रेट जोनाथन कॉर्वीन आणि जॉन हॅथ्रोन यांच्यावर सोपवण्यात आली. या दोघांनी या प्रकरणाला असे काही वळण दिले की ही छोटीशी घटना एका मोठ्या हत्याकांडात रुपांतरीत झाली.
जोनाथन कॉर्वीन आणि जॉन हॅथ्रोन या दोघांनी चौकशी पूर्ण केली आणि या घटनेसाठी त्यांनी गावातील तीन गरीब महिलांना जबाबदार धरले. टिटूबा, सारा गुड आणि सारा ओसर्बोन या तीन महिला सैतानाच्या दूत असल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला. या तिघीही गरीब आणि खालच्या वर्गातील होत्या. टिटूबा एक कॅराबियन गुलाम होती, सारा गुड ही भिकारी होती तर साराह ओसर्बोन एक वृद्धा होती.
या तिघींनाही पकडून तुरुंगात टाकण्यात आले. तिघींचाही अतोनात छळ करण्यात आला. नंतर यांच्यावर खटला दाखल करण्यात आला. टिटूबाने आपली सुटका होईल या आशेने न केलेला गुन्हा काबुल केला.
ती म्हणाली की, गावातील सगळ्या महिलांना चेटकिणी बनवण्यासाठीच आम्हाला सैतानाने नियुक्त केले आहे. सारा गुड आणि सारा ओसर्बोन या दोघींनीही आपल्यावरील आरोप फेटाळले. त्या शेवटपर्यंत हेच सांगत राहिल्या की याच्या घटनांशी आमचा काहीही संबंध नाही.
टिटूबाने स्वतःला वाचवण्यासाठी गावातील आणखी काही महिलांना विनाकारण या प्रकरणात गोवले. ती ज्यांचे ज्यांचे नाव घेई त्या सर्वांना उचलून कोठडीत डांबले जाई आणि त्यांचा छळ केला जाई. नंतर तर अशा सैतानाच्या दूतांना शोधून काढण्याची मोहीमच सुरू झाली. ज्या कुणाचा संशय येईल त्याच्या नावाची वर्दी दिली जात असे. लोकांना तर जनावरांवरही संशय येऊ लागला. अगदी सेलम गावातील चर्चची सदस्य मार्था कॉरेवरही चेटकीण असल्याचे आरोप लावण्यात आले. मार्थासारख्या चर्चच्या प्रामाणिक सदस्याला जर अशा आरोपानं सामोरे जावं लागलं असेल तर तिथे इतरांची काय कथा.
अनेक सामाजिक संघटनांनी या प्रकरणाचा विरोध केला. शेवटी हे प्रकरण मॅसॅच्यूसेटच्या न्यायालयापर्यंत पोहोचले. न्यायाधीशांनी कसलीही चौकशी न करता सरळ सरळ या प्रकरणातील सर्व दोषींना फासावर लटकवण्याचे आदेश दिले. अशा पद्धतीने ज्यांच्या ज्यांच्या शरीरात दुष्ट शक्ती आहे त्या सगळ्यांनाच संपवल्याने हा प्रश्न कायमचा संपुष्टात येईल असा तोडगा काढण्यात आला. पण, कुठलाही मागचा पुढचा विचार न करता दिलेल्या या निर्णयाने कित्येक निरपराध लोकांना आपले प्राण गमवावे लागले.
तिकडे सेलम गावात हा विच ट्रायल जोरात फोफावला होता आणि अनेक महिलांना या प्रकरणात गोवले जात होते. न्यायालयाने तर अशा सर्व लोकांना फाशी देण्याचा आदेश दिला होता ज्यांच्यात सैतानी शक्तीचा प्रभाव दिसेल. महिलाच काय पण नंतर नंतर तर पुरुष आणि बालकांना देखील या आरोपाखाली पकडले जाऊ लागले.
यावर मंत्री कोटॉन यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी न्यायालयाला तसे पत्रही लिहिले होते. न्यायालयाकडे या सगळ्यांना सैतान सिद्ध करणारा काही पुरावा आहे का? नसेल तर त्यांना अशा प्रकारे फाशी देण्याचा न्यायालयाला काहीही अधिकार नाही, असे खडेबोल त्यांनी या पत्रातून सुनावले होते. पण न्यायालयाने या पत्राची तितकीशी दखल घेतलीच नाही. न्यायालयाने कोटॉन यांनाच उलटे सुनावले.
या आरोपाच्या भीतीने अनेक लोकांनी गाव सोडून जाण्यास प्राधान्य दिले. कधी कुणावर आरोप केला जाईल आणि पकडून तुरुंगात टाकतील याचा काहीच नेम नव्हता. न्यायाधीशांनी तर सगळ्याच आरोपींना फाशी देण्याचे सुनावले होतेच.
या आदेशाची अंमलबजावणी करत सुमारे १५० लोकांना फासावर लटकवण्यात आले.
सेलममधील परिस्थिती गंभीर झाल्यावर गव्हर्नरने याकडे लक्ष दिले. १६९३ च्या ऑक्टोबर मध्ये या खटल्याची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले गेले. आतापर्यंत ज्यांना तुरुंगात डांबून ठेवण्यात आले होते त्या सर्वांची सुटका करण्यात आली. पुन्हा चौकशी सुरू झाल्यानंतर गव्हर्नरनी मॅसॅच्यूसेटच्या त्या न्यायाधीशांना पहिल्यांदा धारेवर धरले. त्यांनी कोणतेही पुरावे नसताना फक्त लोकांच्या सांगण्यावरून शेकडो निरपराध लोकांना डांबून ठेवले. इतकेच नाहीतर त्यातील काही निष्पाप लोकांना फासावरही लटकवले.
त्या न्यायाधीशांना नंतर या गोष्टीची जाणीव झाली आणि त्यांनी आपल्या हातून चूक झाल्याचे काबुल केले. पुढे त्यांच्या या कृत्यासाठी त्यांनाही शिक्षा भोगावी लागली. मॅसॅच्यूसेटच्या जनरल कोर्टाने या घटनेला दुर्दैवी आणि बेकायदेशीर कृत्य घोषित केले.
असे असले तरी यात ज्या निरपराध लोकांना जीव गमवावा लागला त्यांचे कुटुंब उध्वस्त झाले होते, त्यांचे झालेले नुकसान कधीच भरून येणार नाही. सेलमच्या लोकांना तर आज देखील ही घटना आठवली की प्रचंड त्रास होतो. त्यांच्यासाठी आजही हे एक भयाण स्वप्न आहे.
इतक्या भयंकर घटना घडून गेल्या तरीदेखील आजही लोकांतील अंधश्रद्धा काही कमी होत नाही!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.